‘राज्यस्थान इंस्टीटयूट’ बनले अलवर गावातील मुलांसाठी एक प्रेरणास्थान

‘राज्यस्थान इंस्टीटयूट’ बनले अलवर

गावातील मुलांसाठी एक प्रेरणास्थान

Thursday February 25, 2016,

4 min Read


अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मुलभूत गरजा असल्या तरी त्या पलिकडे जाऊन शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. एखाद्या गरिबाला आर्थिक रुपात केलेली मदत ही तात्पुरत्या स्वरुपाची असते. तेच जर एखाद्या अशिक्षिताला शिक्षित केले तर येणाऱ्या त्यांच्या पिढीचे भविष्य हे उज्ज्वल ठरते. शिक्षण हे समाजात सकारात्मक बदल घडून आणायला कारणीभूत ठरते. याचे महत्व जाणून विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी व समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढे सरसावले आहे अलवर स्थित ‘राज्यस्थान विद्यापीठ इंस्टीटयूट’ चे संस्थापक डॉक्टर फरमान अली.

डॉक्टर फरमान अली

डॉक्टर फरमान अली



कसा आला विचार

फरमान अली यांनी दिल्ली येथून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून हिंदी मधून एमए केले व जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पीएचडी ची पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ त्यांनी मोतीलाल नेहरू कॉलेज ( दिल्ली विद्यापीठ ) तसेच राज्यस्थान विद्यापीठात पण मुलांना शिकवण्याचा कार्यभार सांभाळला. मुलांना शिकविण्याचे काम फरमान यांच्या आवडीचे होते पण त्याही पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी खोलात शिरून काम करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांना आपली मातृभूमी अलवरसाठी काही करण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. अलवर हा राज्यस्थान मधील मागासलेला भाग आहे. इथल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे हुशार मुलं सुद्धा लहान सहान काम करून आपला उदरनिर्वाह करायला विवश होते. फरमान यांना एक कल्पना सुचली की अलवर मध्ये एक असे इंस्टीटयूट उघडावे जिथे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांसाठी स्वतःला तयार करून त्यांचे भविष्य मार्गी लावू शकतील. याच कल्पनेने प्रेरित होऊन फरमान यांनी नोकरीला राजीनामा दिला व सन २००९ मध्ये राज्यस्थान इंस्टीटयूटची स्थापना केली. त्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी घरच्यांचा पूर्ण पाठींबा होता पण त्यांच्या वडिलांचे विशेष मार्गदर्शन व मोलाचे योगदान त्यांना मिळाले.

सुरवात

फरमान सांगतात की अलवर मध्ये उच्च शिक्षितांची संख्या ही नगण्य आहे व जे शिक्षित आहेत ते शहरांमधील वास्तव्य अधिक पसंत करतात त्यामुळे या भागातील परिस्थिती होती तशीच आहे. फरमान यांनी निश्चय केला की युवकांच्या कल्याणासाठी ते प्रयत्न करतील व त्यांनी दोन विद्यार्थ्यांपासून शिकविण्यास प्रारंभ केला. फरमान यांचे ध्येय व कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांचे नाव रुपास आले. लांबून मुलं त्यांच्या इंस्टीटयूट मध्ये शिकण्यासाठी येवू लागली.

२ पासून ३५०० मुलांपर्यंत

आज फरमान यांच्या इंस्टीटयूट मध्ये जवळ जवळ ३५०० मुलं विभिन्न स्पर्धांच्या प्रशिक्षणाची तयारी करीत आहे. इंस्टीटयूट मध्ये २० शिक्षक व ३२ बिगर शिक्षकांचा स्टाफ आहे. इथल्या प्रशिक्षणाने मुल वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून आपले व कुटुंबाचे नाव उज्ज्वल करत आहे. राज्यस्थानमध्ये शिक्षण श्रेणीच्या निरनिराळ्या परीक्षांमध्ये, शाळेतील शिक्षकाच्या पदासाठी, राज्यस्थान प्रशासकीय सेवा व राज्यस्थान पोलीस विभागातील पदांसाठी फरमान अली विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे.

शहीद यांच्या मुलांना व विधवांना मोफत शिक्षण

फरमान सांगतात की राज्यस्थान मधील अनेक लोक हे देशसेवेचे कर्तव्य पार पडत आहे म्हणून मी सुद्धा माझे कर्तव्य ओळखून शहिदांच्या मुलांना व त्यांच्या विधवा पत्नींना मोफत प्रशिक्षण देत आहे. शारीरिक रूपाने असक्षम लोकांना ४० टक्के सवलत दिली जाते.

भगवान राम यांची पहिली आरती

याच बरोबर फरमान अली अलवर येथील विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेऊन त्यांना प्रोत्साहन देतात. ते अशा संस्थांनांना आर्थिक रुपात मदत करून पदोपदी सहाय्य करतात. फरमान हे अलवर मध्ये होणाऱ्या रामलीलेचे सदस्य आहे व रामाच्या आरतीचा पहिला मान दरवर्षी त्यांचाच असतो. याशिवाय ते अनेक एनजीओशी संबंधित आहे.

फरमान यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते ग्रामीण भागात जाऊन शिक्षणाच्या प्रचार व प्रसाराचे कार्य करून तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून जनजागृती करून शिक्षणासंबंधीच्या अडचणींचे निवारण पण करतात. मागच्या अनेक वर्षा पासून त्यांचे कार्य नि:स्वार्थपणे सुरु आहे. अलवर मध्ये त्यांचे नाव बरेच परिचित आहे, लोक त्यांचा सल्ला घ्यायला लांबून येतात. फरमान सांगतात की लोकांना शिक्षणासाठी जागरूक करणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे.

पत्नीची साथ :

फरमान यांची पत्नी एमए बीएड आहे व त्या गावातील गरीब स्त्रियांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. या महिला शिक्षित नसल्यामुळे प्राकृतिक अस्वास्थतेसाठी त्या फरमान यांच्या पत्नी कडेच येतात अशा महिलांना दवाखान्यात नेऊन त्यांच्या उपचाराचा खर्च सुद्धा बऱ्याच वेळा त्या आपल्या पैशाने करतात. लवकरच फरमान गावातील वयस्कर लोकांसाठी एक उपक्रम राबवणार आहे जे छोट्या मोठ्या तक्रारीने ग्रासलेले आहे जेणेकरून त्यांच्या समस्येचे समाधान करू शकतील.

हे कार्य फरमान हे स्वतःच्या हिम्मतीवर करीत आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान सरकारकडून मिळत नाही व त्यांची सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही त्यांच्या इंस्टीटयूट मधून मिळणाऱ्या मिळकती वरच त्यांचे कार्य चालते. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ते मुलांना शिकवण्याचे काम करतात व त्या नंतर रात्री उशिरा पर्यंत लोकांच्या मदतीसाठी बाहेर असतात. तसेच सुट्टीच्या दिवशी ग्रामीण भागातील लोकांच्या मदतीसाठी निघतात. आपल्या या कामामुळेच लोकांमध्ये त्यांच्या प्रती आदराची भावना आहे.

फरमान मानतात की, "शिक्षण प्रत्येक समस्येचे समाधान आहे. भारताला जर सुपर पॉवर बनायचे असेल तर गावागावात शिक्षणाच्या प्रचाराची मशाल ही पेटवलीच पाहिजे. हे काम केवळ सरकार पुरतेच मर्यादित न राहता प्रत्येक व्यक्तीने यासाठी पुढे आले पाहिजे. जर आपण भारतातील गावागावात शिक्षणाचा प्रचार करू शकलो तर भारताचे नाव लवकरच जगातील अव्वल देशांच्या यादीत सामील होईल. 

काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारे शिक्षकच चांगले विद्यार्थी घडवू शकतात : 'आयटीच'

कॉर्पोरेट कारकीर्द सोडून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवण्यास झटणारा अभियंता 'मधूकर बानुरी'

एकट्यानेच सुरुवात करून शिक्षणाचे सखोल ज्ञान वाटण्याच्या प्रयत्नात ‘विद्या’!

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close