माझ्या कुटूंबीयांनी गावाचा पायाभूत विकास केला नाही अशी कबूली देऊन युवा सरपंच प्रतिभा यांनी पालटले एका वर्षात पंचायतीचे चित्र!

माझ्या कुटूंबीयांनी गावाचा पायाभूत विकास केला नाही अशी कबूली देऊन युवा सरपंच प्रतिभा यांनी पालटले एका वर्षात पंचायतीचे चित्र!

Friday March 18, 2016,

4 min Read

 “लहानपणी हे ऐकत आले होते की, मुली तर गावातून निघून जातील, अंतिम यात्रेत लाकूड तर मुलगाच देईल. मात्र तुम्हाला माहिती आहे, मी गावातील मुलगी जरी असले तरी गाव सोडून कुठेच जाणार नाही आणि गावात प्रत्येकाच्या अंतिम संस्कारासाठी लाकूड देखील मोफत देते”.

ओठावर स्मितहास्य ठेऊन स्वतःबाबत प्रतिभा सांगत आहेत. प्रतिभा यांच्या या गोष्टी ऐकताना थोड्या अचंबित करणा-या वाटतील, मात्र महाविद्यालयात शिक्षण घेणा-या राजसमंद जिल्ह्याच्या पछमताच्या तरुण सरपंचाच्या या योजनेने पंचायतीमध्ये सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मोठा बदल झाला आहे. पहिले तर गरीब अंतिम संस्काराच्या खर्चाच्या ओझ्यातून वाचत आहेत आणि दुसरे हे की, हे विचार बदलले आहेत की मुलाने लाकूड दिल्यानेच मोक्ष मिळतो. प्रतिभा यांनी हे वचन आपल्या निवडणुकीत दिले होते की, कुणालाही अंतिम संस्कारासाठी खर्च करण्याची गरज नाही, त्या त्यांचा स्वतः खर्च उचलतील. त्यामुळे सुकलेल्या लाकडांचे पंचायतमध्ये एक वखार देखील बनविली आहे. 

image


२३वर्षाच्या वयात क्लिनिकल साईकोलॉजीमध्ये मास्टर पदवी प्राप्त करणा-या सरपंच असलेल्या प्रतिभा चौधरी यांच्या तीन पिढ्या राजकारणातीलच आहेत. मात्र प्रतिभा यांना ही बाब नेहमीच खटकायची की, हे क्षेत्र आजही विकासापासून खूप वंचित आहे. प्रतिभा सांगतात की, “जेव्हा मी निवडणूक जिंकून पहिल्यांदा सरपंच भवनात पोहोचले तेव्हा पाहिले की लोकांच्या निवृत्तीवेतन आणि प्रमाणपत्राचे कागद त्यांच्या आजोबांनी हस्ताक्षर केलेले आहेत. त्यांना कुणीही जमा करून घेतलेच नाही आणि लोकांनी हा विचार केला की, ते या योजनांसाठी पात्र नव्हते, त्यामुळे काही झाले नाही” 

पाच वर्षासाठी सरपंच बनलेल्या प्रतिभा यांना सर्वकाही बदलायचे आहे. मीरा महाविद्यालयातून एमए पूर्ण करून जेव्हा त्या मोहनलाल सुखाडिया विद्यापीठातून मानवशास्त्रात पीएचडी करत होत्या, तेव्हा घरातल्या लोकांनी त्यांना राजकारणात टाकले. दोन वेळा सरपंच असलेल्या ताऊ प्याचंद यांनी निवडणूक लढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. हे सोपे नव्हते. अखेरच्या क्षणी चुलत भावाच्या पत्नी देखील समोर उभ्या होत्या. प्रतिभा यांनी निवडणूक तर जिंकली, मात्र खरी परीक्षा आता सुरु झाली. 

image


गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती, पंचायतकडे निधी देखील नव्हता. गावातल्या लोकांना खूप आशा होती. जयपूरच्या फे-या मारणे सुरु केले आणि पीएचडी मंत्री किरण महेश्वरी यांच्याकडून बनास नदीचे पाणी पाईप लाईनने आणण्याचा ६६लाखांचा प्रकल्प मंजूर करून घेतला. गावात पाण्याची टाकी बसविण्यात आली आणि घरात नळातून पाणी आले. त्या भागातील खासगी कंपनी हिंदुस्तान जिंक लिमिटेड यांच्याकडून देखील खूप मदत घेऊन पंचायतमध्ये आरजो प्लांट लावला. त्या व्यतिरिक्त गावातल्या सर्व भागांना सिमेंटने रस्ते तयार केले आहे. गावातल्या कमला सांगतात की, “पहिले घरातून निघणे कठीण होते. पावसात गावच चिखल बनायचा, मात्र आता पक्का रस्ता केला आहे".

image


प्रतिभा यांच्या पंचायतीत पाच मोठी गावे येतात, जेथून पंचायत भवन खूप लांब होते, त्यामुळे त्यांनी ई- कियोस्क सुरु केले, जेणेकरून प्रत्येकजण येथे येऊन संगणकात आपला अर्ज टाकेल आणि त्यानंतर प्रतिभा त्यांचे काम ऑनलाईन पाहू शकतील आणि त्यांच्या कामाचा आलेख बघू शकतील. लोक पाहू शकतील की त्यांच्या अर्जाचे काम कुठपर्यंत पोहोचले आहे. या योजनेच्या यशाने गावातील अर्धी समस्या दूर केली आहे. सर्वात अधिक समस्या वृद्धावस्था निवृत्तीवेतन आणि विधवा निवृत्ती वेतनाची होती. मात्र ई- मित्र कियोस्क मार्फत सर्व काम गावात होत होते. इतकेच नव्हे तर आता खात्यातून पैसे आणण्यासाठी शहरात देखील जावे नाही लागत. प्रतिभा यांनी त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत करार केला आहे आणि बँकेतील लोक मोबाईल बँकिंग मार्फत गावात जाऊन काम करत आहेत. 

image


प्रतिभा मोकळ्या वेळेत पुस्तके वाचणे पसंत करतात, सोबतच त्यांची पुढील शिक्षण घेण्याची इच्छा देखील आहे. त्या स्वतःसाठी वेळात वेळ काढून अभ्यास देखील करतात. प्रतिभा यांची शिक्षणाप्रती आवड पाहून गावातील युवा वर्ग देखील प्रोत्साहित होत आहे आणि गावातील मुले मुली स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. प्रतिभा यांचे आजोबा बद्रीलाल तीसवर्षापर्यंत येथील प्रधान राहिले आहेत. मोठे काका डॉक्टर रतनलाल जाट सहाडा विधानसभेचे आमदार राहिले आहेत आणि दुसरे डॉक्टर बॉ. आर. चौधरी काका सध्या सहाडा मध्येच आमदार आहेत. मात्र गावातील दुकानदार कमलेश चौधरी सांगतात की, प्रतिभा आपल्या कुटुंबियातील लोकांसारखी नाही. त्या विकासावर लक्ष देतात. ५० वर्षात जे गावात झाले नव्हते, ते त्यांनी एका वर्षात करून दाखविले आहे.

प्रतिभा सांगतात की, “मला सांगण्यात संकोच वाटत नाही की, आमच्या घरातल्या लोकांनी क्षेत्रातील विकासाकडे कधीच लक्ष दिले नाही. लोकांच्या गरजेला देखील नीट समजले नाही. त्यामुळेच त्यांचा आधारभूत स्तर कधीच बनला नाही.”

त्यामुळे म्हटले जाते की, तरुण चांगले आणि वाईट समजतात. चुकीचे आणि योग्य यातील फरक जाणतात. तरुणांना माहित आहे की, विकास करणे गरजेचे आहे आणि त्यांना हे देखील माहित आहे की, जनता समजदार आहे आणि त्यांच्या समजूतदारपणाची इज्जत देखील आहे.

लेखक : रिम्पी कुमारी

अनुवाद : किशोर आपटे

    Share on
    close