जे मिळालेलं नाही ना, तेच तुम्हाला पळवेल…

भारतासारख्या देशात एक उद्योजक बनून दाखवणे म्हणजे तशी तारेवरची कसरतच… आणि ही कसरतही तुम्हाला इथल्या नोकरशाहीच्या कचाट्यात करावी लागते. तुम्हाला कळतच नाही तुमच्या पुढच्या पावलाखाली या नोकरशाहीने केळ्याचे सालपट टाकून ठेवलेय, की काट्यांचा गुच्छ ?

जे मिळालेलं नाही ना,
तेच तुम्हाला पळवेल…

Sunday October 04, 2015,

4 min Read

कालचीच गोष्ट आहे बेंगलूरू मध्ये मी (श्रद्धा शर्मा, ‘युवर स्टोरी’च्या संस्थापिका आणि मुख्य संपादिका)जेव्हा माझी गाडी चालवत जात होते त्यावेळी रस्त्यावर नेहमीप्रमाणेच ट्रॅफिक जाम झालेले होते. माझा गाडी चालवण्याचा वेग ताशी अवघा दहा किलोमीटर होता.हा वेग म्हणजे या वेगवान अन् महाकाय शहरात जशी एक गोगलगाय... गाडीच वेग आणि ट्रॅफिक पाहता वेळेचा सदुपयोग म्हणून मी काही छोटीमोठी कामे फोन वरुन उरकून घ्यायचे ठरवले. हळुवार वेगाचा एक फायदा हमखास असतो. तुम्ही निवांतपणे मोबाईलवरून काही कॉल करू शकता आणि निवांत बोलू शकता. तसे मी करून पाहिले, पण एक कॉल लागेल तर शप्पथ! नेहमीप्रमाणे नेटवर्कच मिळत नव्हते. ‘नो कॉल ड्रॉप सर्व्हिस’ही नव्हती. साधा फोन कॉल रिसिव्ह होणे कठीण होते… हे सारे काही आजच घडत होते असे नाही तर अनेकदा अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो … भारतातील मोबाईल कंपन्या एकीकडे ३जी बद्दल बोलतात तर दुसरीकडे भारताच्या तांत्रिक राजधानी बेंगळुरूमध्ये सातत्याने कॉल ड्रॉप होणे ही अत्यंत निराशाजनक आणि खेदाची बाब आहे.


श्रद्धा शर्मा, ‘युवर स्टोरी’च्या संस्थापिका आणि मुख्य संपादिका)

श्रद्धा शर्मा, ‘युवर स्टोरी’च्या संस्थापिका आणि मुख्य संपादिका)


भारतासारख्या देशात एक उद्योजक व्यावसायिक बनून दाखवणे म्हणजे तशी तारेवरची कसरतच… आणि ही कसरतही तुम्हाला इथल्या नोकरशाहीच्या कचाट्यात करावी लागते. तुम्हाला कळतच नाही तुमच्या पुढल्या पावलाखाली या नोकरशाहीने केळ्याचे सालपट टाकून ठेवलेय, की काट्यांचा गुच्छ? तुम्ही गळपटणार आहात की स्वत:ला बोचवून घेणार आहात? थोडक्यात उद्योजक बनवण्याच्या वाटेवर नोकरशाहीने कधीही मऊ गालिचे अंथरलेले वा फुले पाखरलेली नसतात. या वाटेवर असतात काटेच काटे… आणि असलीच तर सालपटे! उद्योजकतेच्या वाटेवरील दुसरे आव्हान म्हणजे इथे पायाभूत सुविधांचा अभाव आ वासून उभाच असतो तुम्हाला गिळायला. एकतर आपला देश आकाराने भरेल चिनच्या एकतृतीयांश आणि या आकारात माणसे अशी गच्च कोंबलेली. म्हणजे खरं तर चीनवर आपली याबाबतीत वरटांग. त्यात कोंबलेल्या या माणसांमध्ये उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या आपल्यासारख्यांचा श्वास गुदमरणारच.


image


घुसमट होत असलेल्या अशा अनेक लोकांसारखीच मी कधीतरी नैराश्याच्या गर्तेत गुरफटून जायचे. हतोत्साहित व्हायचे. चितेसारखीच चिंतेत जळायचे. दररोज कधीतरी, एकदातरी मला असे का होते… याचे ंउत्तर मात्र मला वारंवार हेच मिळायचे, की अरे हे तर छानच आहे… नैराश्याची लाट का येते तर आशेचा किनारा आहे म्हणून… तो प्रश्न हतोत्साहित का करतो तर उत्तर शोधण्यासाठीचा अनंत उत्साह आत ओसंडतो आहे म्हणून… एखादी चिंता मला का जाळते तर तावून सलाखून तिचे सोने व्हायचेय म्हणून…


माझ्यावर विश्वास बसत नाहीये? चला मग तुम्हाला माझी गोष्टच सांगते. दिल्लीतील लब्धप्रतिष्ठित सेंट स्टिफन कॉलेजात दाखल होण्यासाठी मी पाटण्याहून आलेले होते. पाटण्यात शाळेत असताना मी कितीतरी वादविवाद स्पर्धा गाजवलेल्या होत्या. कितीतरी बक्षिसेही मिळवलेली होती. मी दिल्लीतही वादविवाद मंडळाची सभासद होण्यासाठी म्हणून अर्ज केला. मला खात्री होती, की माझी निवड हमखास होणार. पण तसे घडले नाही. कारण इथले नियम मला माहित नव्हते. सादरीकरणाची एक विशिष्ट शैली इथे अपेक्षित होती. प्रतिस्पर्ध्यांचा मुद्दा खोडून काढताना पाळावयाचे विशिष्ट संकेत ठरलेले होते. त्यात मी कुठेही बसत नव्हते आणि माझी निवड टळली. मी बाजूला फेकले गेले.


उन्हाळ्याच्या सुटीत जेव्हा मी पाटण्याला परतले. इथल्या शाळेतल्या माझ्या शिक्षिका रेखा श्रीवास्तव यांना आवर्जून भेटले. दिल्लीतील वादविवाद मंडळाचा माझा अनुभव सांगितला. माझी निवड टळल्याची वेदनाही त्यांच्यासमवेत वाटूनच घेतली. पाटण्यातील उत्तम शाळांतून एक असलेल्या माझ्या नोट्रे दॅम शाळेसाठी ही बाब अत्यंत खेदाची आहे, की वादविवादातील मूलभूत व अत्यंत वरकरणी, पण आवश्यक अशा बाबींमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ही शाळा तयार, तरबेज करू शकत नाही. वादविवाद मंडळांतून बाहेर (दिल्लीसारख्या शहरांत) काय चाललेले आहे, ते आपल्याला इथे माहित नसणे निव्वळ दुर्दैवी आहे… वगैरे… वगैरे गरळ मी ओकूनच टाकली.


ही सगळीच गरळ रेखाबाईंनी हसत-हसत फेकलेल्या एका वाक्यात पुसून स्वच्छ केली. अर्थात मी हे सगळे दुखणे सांगत असतानाही त्या अधनं-मधनं आणि हळुवार हसतच होत्या… तर रेखाबाई म्हणाल्या :

‘‘जो तुम्हे नहीं मिला, वही तुम्हे दौडायेगा.’’ (जे तुम्हाला मिळालं नाही तेच तुम्हाला पळवेल.)


यशासाठीची आग अंतरात तेव्हाच लागते जेव्हा तुम्हाला काही मिळालेले नसते, तुम्ही काहीतरी शिकलेले नसता, तुमच्याकडे अभाव असतो… हा अभावच तुमच्या पंखांचा पिता असतो… आणि अभावातून फुटणारे पंखच तुम्हाला अनंत आसमंतातील कोटी-कोटी उड्डाणांसाठी तयार करतात… तरबेज करतात!


माझ्यात अभाव कुठला आहे, मी काय मिस करते आहे. प्रत्येक आला दिवस मला कशासाठी पुढे ढकलतो आहे, ही झळ १९९९ च्या उन्हाळ्यापर्यंत माझ्यासोबत होती.


आम्ही वेदना, दु:ख अनुभवलेलेच नसेल तर आनंदाची व्याख्या आम्ही कशी बरे करू शकतो? अपयश कशाशी खातात हेच माहित नसेल तर यशाची चव आम्ही कशी चाखू शकतो? वैभव म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने आम्ही कसे जाणू शकतो जोवर अभाव अनुभवलेला नसेल.


…आणि आता भारतातील उद्योजक आणि होऊ घातलेले उद्योजक या सर्वांसाठी मी म्हणेन...

भारतातील अभूतपूर्व संधी म्हणजे भारतातील अभूतपूर्व अभाव. आमच्यासाठी इथं खूप काही करण्यासारखे आहे. जे जे म्हणून आपल्याकडे नाही, ते ते मिळवण्यासाठीची मोठी संधी हा अभाव आपल्यासाठी निर्माण करतो आहे… एक उद्योजक म्हणून आणि एक देश म्हणूनही. हा अभाव म्हणजे आम्हाला पुढे नेणाऱ्या वाहनात भरण्यासाठीचे इंधन आहे.


कल्पना करा… ते वाहन… ते इंधन… आणि ती आग… आपण व्यवस्थित धगधगती ठेवली… तो वेग आपण व्यवस्थित धडाडता ठेवला तर हीच बाब देशातल्या कोट्यवधी बांधवांचे जीवनमान उंचावणारी ठरेल. आमच्या देशासमोर मोठाल्या समस्या आहेत. याचाच अर्थ असा, की इथेच एक मोठे मार्केट आहे. आपल्याच घरात. वेगळ्या वाटेवरल्या वाटसरूंसाठी तर इथे तयार वहिवाट आहे… कष्ट आणि कल्पनांच्या सिंचनातून अभावात विकासाचा वटवृक्ष फुलवण्याची संधी बहाल करणारी… आणि अशा प्रत्येक कष्टाला, प्रत्येक कल्पनेला डोक्यावर घेऊन नाचणारी कोट्यवधी पावलेही (उपभोक्ता, ग्राहक) येथे तयार आहेत… चांगल्या बदलासाठीची अंगभूत गुणवत्ता आणि चांगल्यासाठीचे बदल… खरंच भन्नाट आहेना!