सकारात्मक बदलांचे दूत घडविणारा 'प्रखर भारतीय'

सकारात्मक बदलांचे दूत घडविणारा 'प्रखर भारतीय'

Friday February 12, 2016,

7 min Read

प्रखर भारतीय यांचे पालक खरं म्हणजे मुळचे कानपूरजवळील एका खेड्यातील....मात्र प्रखरचा जन्म झाला त्याच वर्षी त्यांनी कानपूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलाला तेथील सर्वोत्तम शाळेतच शिक्षण मिळाले पाहिजे, या हेतूनं त्यांच्या पालकांनी हा निर्णय घेतला होता. लहान असताना ते जवळच्या झोपडपट्टीत रहाणाऱ्या त्यांच्याच वयाच्या मुलांकडे नेहमी पहात असत. ही मुले खरं तर अगदी त्यांच्यासारखीच होती, पण ती कधीच शाळेत गेली नव्हती. त्याशिवाय त्यांच्या उन्हाळी सुट्टीत आईवडील त्यांना गावी घेऊन जात, जिथे वीज किंवा मूलभूत स्वच्छताही पोहचली नव्हती. त्या लहान वयापासूनच समाजात पदोपदी दिसणाऱ्या या दरीने त्यांना अस्वस्थ करण्यास सुरुवात केली होती.

image


त्या वयात आपल्या मनाने नोंदविलेली ही निरीक्षणे म्हणजे एका अर्थाने आपली अन्यायाशी झालेली पहिलीच ओळख असल्याचे तीस वर्षीय प्रखर सांगतात. त्यातही खास करुन शिक्षणाबाबतच्या अन्यायाची त्यांना प्रकर्षाने जाणीव होऊ लागली होती. त्यांनी निवडलेले जगावेगळे कारकिर्दीचे पर्याय आणि आज ते करत असलेले काम, यांची बीजं त्या कोवळ्या वयातच रोवली गेली होती, असंच म्हणावं लागेल. आज जेंव्हा आपण वाय-फायकडून लाय-फायच्या दिशेने वाटचाल करत आहोत, प्रखर यांच्या छोट्याशा गावात अजूनही वीज पोहचलेली नाही किंवा अगदी मूलभूत स्वच्छतेच्या सोयीही उपलब्ध नाहीत. आपण खरोखरच त्या भारतापासून किती दूर आहोत, ना?

महाविद्यालयात असताना प्रखर यांनी युथ अलायन्स सुरु केले. सामाजिक समस्यांवर काम करण्याची संधी तरुणांना देण्यासाठी हा गट सुरु करण्यात आला होता. २००९ मध्ये प्रखर टीच फॉर इंडिया या मोहिमेतील पहिल्या तुकडीत सहभागी झाले. २०११ मध्ये त्यांनी युथ अलायन्स पुनरुज्जीवित केली आणि त्याची अधिकृत नोंदणीही केली. भारतातील सामाजिक समस्या नाविन्यपूर्ण प्रकारे सोडविण्याच्या दृष्टीने सुसज्ज नेतृत्वाची चळवळ उभारणे, हा यामागचा प्रमुख उद्देश होता...

आजपर्यंतचा प्रवास

प्रखर हे मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी घेण्यासाठी गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे गेले. “ माझ्या महाविद्यालयात २,५०० विद्यार्थी होते आणि त्यापैकी फक्त पंचवीचएक जणांनाच ते अभियांत्रिकी का शिकत आहेत, हे पक्के माहित होते. तुम्ही चार वर्षे इलेक्ट्रीकल आभियांत्रिकी शिकता आणि त्यानंतर एखाद्या आयटी कंपनीत तुम्हाला नोकरी मिळते आणि तुम्ही जावा कोडींग करत रहाता! यामागे काय तर्कशास्त्र आहे? त्याचप्रमाणे आणखी एक गोष्टही मला वारंवार त्रस्त करत असे, ती म्हणजे ग्रामीण आणि शहरी भारतात असलेली प्रचंड दरी... आपल्याकडे तरुणांची एक प्रचंड मोठी फळी आहे, जी ग्रामीण भारतात चमत्कार घडवून आणू शकेल, पण ती या भयंकर वस्तुस्थितीपासून कितीतरी दूर आहेत, हे वास्तव मला नेहमीच खटकत असे. पण एकदा का त्यांना या वस्तुस्थितीची जाणीव झाली, तर मात्र निश्चितच त्यांना त्याबाबत काही करावेसे वाटेल, असा विचार मी केला,” प्रखर सांगतात.

image


काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणण्याची आशा मनात बाळगूनच प्रखर यांनी युथ अलायन्स (वायए) ची रचना केली. वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पाणी वाचवा मोहीम, यांसारखे उपक्रम राबवत त्यांनी कामाला सुरुवात केली. यामध्ये अधिक खोलात शिरत २००९ मध्ये प्रखर हे जनाग्रहाच्या (टाटा टी) जागो रे या मोहिमेत सहभागी झाले आणि गझियाबाद प्रदेशाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आगामी सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार ओळखपत्र काढून घेण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देणे, ही यामागची कल्पना होती. ही मोहीम प्रचंड यशस्वी ठरली आणि त्यातूनच तरुणांबरोबर काम करण्याची आणि त्यांना ग्रामीण आणि शहरी भागातील मोठ्या दरीबाबत जागरुक करण्याची प्रेरणा प्रखर यांना मिळाली

त्यानंतर अगदी योग्य वेळी टीच फाॅर इंडिया या मोठ्या संधीने त्यांच्या दारावर दस्तक दिली. यातून प्रखर यांना दुर्लक्षित समुदायांबरोबर काम करण्याची आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याची संधी मिळाली. ते सांगतात, “ मी टीएफआयमध्ये काम स्वीकारले कारण मला ‘भारताच्या’ गरजा जाणून घेण्याची इच्छा होती, खऱ्य़ा ‘इंडियाच्या’ गरजा... या लोकांबरोबर जोडले जाण्याची, त्यांच्या आयुष्याचा भाग होण्याची आणि अखेरीस तरुणांशी आणि या भारताशी नाते जोडण्याची माझी इच्छा होती, जेथे तुम्ही समस्या सोडविणारा म्हणून काम करु शकाल.” टीएफआय मध्ये त्यांना समविचारी तरुण सहकारी म्हणून मिळाले, जे काही तरी बदल करण्यासाठी प्रयत्नशील होते. यामुळे प्रखर यांचा युवाशक्तीवरील विश्वास आणखी बुलंद झाला.

तेथील वर्ग आणि समुदायांमधून मुलभूत समस्यांविषयी खूप काही शिकण्याची संधी त्यांना मिळाली, अशा समस्या ज्या सरकार आणि समाजाकडून दुर्लक्षिल्या गेल्या होत्या. “ शिक्षक बनण्याचा अनुभव हा अभूतपूर्व तर होताच पण मी आजपर्यंत घेतलेल्या अतिशय कठीण अनुभवांपैकी एकही होता. तुम्ही जे इतरांना शिकविता ते स्वतः करणे अर्थात ‘बोले ते तैसा चाले’ या तत्वाने चालणे खूपच आवश्यक असल्याचे मला याकाळात प्रकर्षाने जाणवले. ती माझ्यासाठी जणू काही एक प्रयोगशाळाच होती आणि माझे अंतर्मन समजून घेण्यात याची मला मोठी मदत झाली,” प्रखर सांगतात. या फेलोशीपमधून त्यांना मिळालेली सर्वात मोठी शिकवण म्हणजे या गोष्टीची जाणीव की बाह्यबदल घडवून आणण्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असते ते अंतर्गत बदल घडवून आणणे...

युथ अलायन्स

टीएफआयमध्ये दोन वर्ष काम केल्यानंतर युथ अलायन्स अधिक लक्ष देऊन सुरु करण्यासाठी प्रखर यांना आत्मविश्वास तर मिळालाच पण त्याचबरोबर एक सुस्पष्टता आली.

image


त्यांचे दोन प्रमुख कार्यक्रम आहेत. त्यापैकी पहिला आहे ग्राम्य मंथन... हा नऊ दिवसांचा निवासी कार्यक्रम असून, यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. ग्रामीण भारताबाबत शहरी तरुणांमध्ये जागरुती निर्माण करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश असून, त्याअंतर्गत कानपूर देहातमध्ये प्रत्यक्ष काम केले जाते. तर ओनस(ONOUS) हा त्यांचा दुसरा कार्यक्रम आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला हा कार्यक्रम म्हणजे एक वर्षभराचा परिवर्तनचा प्रवासच असतो, ज्याद्वारे या विद्यार्थ्यांना त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि उद्योजकतेच्या कौशल्याच्या शोध प्रवासासाठी सक्षम केले जाते. त्याचबरोबर वायए कौशल्य निर्माण करण्याच्या दृष्टीने डिजाईन थिंकींग, रिसोअर्स मोबिलायझेशन, प्रभावी संवाद, यांसारख्या विषयांवर विविध कार्यशाळाही आयोजित करते. ओनसचे फेलो समुदाय प्रकल्पांमध्ये काम करतात आणि काही विशिष्ट समस्या सोडविण्याचे त्यांचे लक्ष्य असते.

image


पुरस्कारांमधून मिळणाऱ्या पैशातूनच प्रामुख्याने भांडवल उभारणी केली जाते – ‘गुगल फॉर आंत्रप्रुनर्स’ पुरस्कार, रोड्स युथ फोरम, हे त्यापैकीच काही पुरस्कार. त्याशिवाय वायएने प्रवाह, सीवायसी आणि गुंज यांसारख्या संस्थांशीही भागीदारी केलेली असून त्यांच्याकडून त्यांना आर्थिक मदत मिळते. गेल्या दोनेक वर्षांत वायएच्या कार्यक्रमांना युनायटेड नेशन्स पॉप्युलेश फंड (युएनएफपीए), युएनव्ही आणि नॅशनल फाऊंडेशन ऑफ इंडीयाकडून निधी मिळत आहे.

त्याशिवाय काही व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांकडूनही काही आर्थिक मदत मिळते. प्रखर पुढे सांगतात, “ आमच्या सल्लागार मंडळाचा आम्हाला नेहमीच खंबीर पाठींबा राहिला आहे. त्याशिवाय आम्ही आमच्या कार्यक्रमांसाठीही शुल्क आकारतो आणि आमच्या एकूण अंदाजपत्रकाच्या सुमारे २५ ते ३० टक्के निधी यातूनच मिळतो.”

image


आरंभापासून आजपर्यंत वायएने ३५० हून जास्त लोकांबरोबर थेटपणे काम केले आहे. तर त्यांचे माजी विद्यार्थी हे वेगवेगळ्या संस्थांमध्ये सुमारे ३५ विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांच्यापैकी ८० जण हे सामाजिक विकास क्षेत्रात काम करत आहेत. यावेळी वायए बरोबर काम करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्यांचे प्रखर आवर्जून उदाहरण देतात. त्यापैकी एक पल्लवी... ही एका खूपच श्रीमंत कुटुंबातील मुलगी... पण ती तिच्या कुटुंबाशी अक्षरशः भांडून सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिली. अशीच आणखी एक मुलगी जी ग्राम्य मंथन कार्यक्रमात सहभागी झाली होती, ती आता बिहारमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करत आहे.

वायए मध्ये काम करत असताना आलेल्या आव्हानांबाबत बोलताना प्रखर सांगतात, “ आमचे संपूर्ण काम हे मानसिकता बदलाशी संबंधित आहे आणि त्यासाठी वेळ लागतो. अशा वेळी त्याचा प्रभाव प्रत्यक्ष मोजणे अतिशय अवघड असते आणि त्यामुळेच निधी मिळविणेही कठीण गोष्ट असते.” दुसरे आव्हान असते ते वायएचे काम पालकांना समजावून सांगण्याचे... कारण हे कार्यक्रम त्यांच्या पाल्यांना एका आत्मनिरिक्षणात्मक मार्गावर घेऊन जातात, जेणेकरुन ते त्यांचा मार्ग स्वतः निवडू शकतील, जो कदाचित त्यांच्या पालकांच्या स्वप्नांपेक्षा वेगळा असेल. ही गोष्ट सुरुवातीच्या काळात प्रखर यांच्या कुटुंबासाठीसुद्धा लागू होती. मात्र काही काळानंतर, त्यांच्या कुटुंबियांनी ते करत असलेले काम पाहिले, तसेच त्यातून त्यांना मिळत असलेला आनंदही त्यांना दिसला आणि त्यानंतर मात्र कुटुंबिय नेहमीच प्रखर यांच्या खंबीरपणे पाठीशी राहिले.

image


तीन वर्ष पूर्णवेळ काम केल्यानंतर वायएची सूत्रे दुसऱ्या कोणाकडे तरी सोपविण्याची प्रखर यांची योजना आहे. “ संस्था ही एखाद्या कल्पनेप्रमाणे पसरली पाहिजे आणि तिने तरुण आदर्श आणि सामाजिक उद्योजकांचे संगोपन केले पाहिजे. यानंतरही मी तरुणांबरोबरच काम करीन पण ते अधिक कठोर मार्गाने असेन. एका अशा संस्थेच्या स्थापनेतून मी हे साध्य करेन, जेथे राष्ट्र उभारणीचे कार्यक्रम राबविले जातील. कदाचित ‘इंडीयन स्कूल ऑफ डेमॉक्रसी’... भारतीय लोकशाही मजबूत करण्याची आणि त्यासाठी लोकशाहीच्या चार प्रमुख स्तंभांचा भाग होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी तो पूर्णवेळ निवासी कार्यक्रम बनेल.

त्यांच्या आयुष्याचे लक्ष्य आहे ते त्यांच्या स्वप्नासाठी काम करण्याचे... हे स्वप्न आहे माणूसकी असलेल्या, न्याय्य जगाच्या निर्मितीचे.. “ ही एक खूपच मोठी प्रक्रिया आहे आणि यासाठी कदाचित आणखी काही शतकांचा काळ जावा लागेल, पण याची बीजे प्रेमाने, विश्वासाने आणि आशेने पेरणारा, या भूमिकेतच मी स्वतःला पहातो,” प्रखर सांगतात.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

‘टिच फॉर इंडिया’तून जय मिश्रा यांची गरीबांच्या शिक्षणासाठी धडपड!

व्हीलचेअरवर बसून एका सैनिकी अधिकाऱ्याने पेलले ५०० मुलांचे भविष्य

गरीबांच्या शिक्षणासाठी लोकल ट्रेनमध्ये ‘दान’ मागणारा प्रोफेसर...

लेखक – स्निग्धा सिन्हा

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

    Share on
    close