गरीब मुलांना सर्वोत्तम संधी देण्याचा प्रयत्न करणारी 'परिक्रमा'

गरीब मुलांना सर्वोत्तम संधी देण्याचा प्रयत्न करणारी 'परिक्रमा'

Friday October 23, 2015,

5 min Read

हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या पेहरावात, केस बांधलेले आणि कपाळावर एक गोल मोठा टिळा लावून सजलेल्या शुक्ल बोस आपले स्वप्न असलेल्या ‘परिक्रमा ह्युमॅनिटी फाऊंडेशन’ बद्दल विश्वासाने बोलतात. ‘Parikrma’ या नावात ‘a’ नाही आहे. “हा शब्द मूळ स्वरूपात संस्कृतमधून घेतलेला आहे. ‘a’ असलेला ‘parikr‘a’ma हा शब्द देवनागरी संस्करण आहे.” अशा बारकाव्यांवर लक्ष देण्यासाठीच आपण ‘कंपॅरेटिव्ह लिटरेचर’ या विषयात जादवपूर विदयापीठातून एमए केले असल्याचे शुक्ल बोस गंमतीने सांगतात.

image


शुक्ल या ‘परिक्रमा ह्युमॅनिटी फाऊंडेश’ या संस्थेच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ‘जीवन समान अटींवर’ आहे हा या संस्थेचा सिद्धांत आहे. सर्वात गरीब मुलांना सुद्धा जगातील सर्वात चांगल्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे फाऊंडेशनचे ध्येय आहे. त्यांनी १२ वर्षांपूर्वी १६५ विद्यार्थ्यांसोबत राजेंद्रनगरमधून आपल्या कामाची सुरूवात केली होती. आज हे फाऊंडेशन बंगळुरू शहरातील जयनगर, सहकारनगर, कोरमंगला आणि नंदिनी लेआऊट अशा ठिकाणी चार शाळांमध्ये १७०० मुलांना यशस्वीपणे शिक्षण देत आहे.

हा विचार शुक्ल यांच्या मनात पूर्वीपासूनच घोळत होता. तसे पाहिले तर त्यांनी आपल्या बालपणातच ही गोष्ट जाणली होती. हे बंगाली कुटुंब दार्जिलिंगमध्ये राहत होते. त्यांचे वडिल सनदी अधिकारी असल्यामुळे त्यांची नियुक्ती दार्जिलिंगमध्ये झाली होती. शुक्ल यांची आई एक चांगल्या गृहिणी होत्या.

शुक्ल सांगतात, “मी माझ्या आई-वडिलांची खूप लाडकी होते, विशेषत: आईची. माझ्या आईचे पाचवेळा गर्भपात झाल्यानंतर माझा जन्म झाला. माझ्यानंतर दीड वर्षांनी माझ्या भावाचा जन्म झाला. परंतु मी नेहमीच माझ्या आई-वडिलांची लाडकी राहिले आहे. लिंगभेदाच्या अडचणींचा सामना मला करावा लागला नाही. माझे बालपण खूपच सुखात गेले. मी चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतलेले आहे.” परंतु, त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी काही नियम बनवले होते. एक प्रामाणिक शासकीय अधिकारी असल्याने आपल्या सात गाड्यांपैकी एकाही गाडीचा उपयोग ते आपल्या लाडक्या लेकीसाठी करत नसत. त्या गाड्या केवळ ऑफिसच्या कामासाठी होत्या. वडिलांच्या या नियमामुळे शुक्ल यांना शाळेत जाण्यासाठी सहा किलोमीटर पायी जावे लागे.

त्या सांगतात, “ आमचे आयुष्य खूप साधेपणाने गेले. परंतु, अशा वातावरणात वाढणे मोठे प्रेरणादायक होते. आज मी जे काही आहे ते याच कारणांमुळे.” शिक्षण आपल्याला सशक्त बनवते असे शुक्ल यांना वाटते. म्हणूनच कदाचित त्या नेहमी एक चांगल्या विद्यार्थिनी राहिल्या. त्यांनी कोलकत्यामधून आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. तिथे त्या वसतीगृहात राहिल्या. त्या हसून सांगतात, “ ही माझी स्वतंत्र होण्याची पहिली संधी होती.” १९७६ मध्ये त्या १९ वर्षांच्या असताना त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्या आपल्या पतीसोबत भूतानला गेल्या. त्यांचे पती भूतानमध्ये काम करत होते.

पहिली शाळा

शुक्ल यांनी भूतानमध्ये भारतीय सैन्याच्या मुलांना शिकवले. हा त्यांच्यासाठी एक अद्भुत असा आनंद होता. त्या शाळेत रोजची कामे आणि अभ्यासक्रम पाहत असत. परंतु त्यांना तिथले पाणी आवडले नाही म्हणून त्या भारतात परतल्या. भारतात आल्यानंतर त्यांनी ‘कंपॅरेटिव्ह लिटरेचर’ मध्ये एमए केले. त्यानंतर त्यांनी ‘हॉस्पिटॅलिटी’ या क्षेत्रात काम केले. काम करत असतानाच त्यांनी ‘सेल्स अँड मार्केटिंग’ मध्ये ‘एमबीए’ केले.

आनंददायी कॉर्पोरेट करिअर

कोलकत्याच्या ‘ओबेरॉय ग्रँड’ या हॉटेलमधून शुक्ल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथूनच त्या हळूहळू कॉर्पोरेटच्या पाय-या चढू लागल्या. कर्मचा-यांसाठी वर्तमान पत्र सुरू करण्याची घटना आठवून शुक्ल सांगतात, “ या काही गोष्टी जीवनात रस निर्माण करण्यासाठी होत्या. बरेचदा आपल्याला माहित नसते की कर्मचारी इतर गोष्टींमध्ये देखील चांगले असू असतात.” या वर्तमान पत्राने वास्तवात खूप चांगले काम केले. यामुळे त्यांना आपल्या कर्मचा-यांशी जवळीक साधता आली. कॉलेजला असताना त्यांनी मदर टेरेसांसोबत सात वर्षे काम केले. अनाथ लोकांची काळजी घेणा-या ‘निर्मल ह्रदय’ सोबत काम केल्यानंतर त्या ‘शिशुभवन’मध्ये मुलांची देखभाल करत असत.

image


यशस्वी कंपनीच्या कारकिर्दीला अलविदा

२६ वर्षांच्या यशस्वी कॉर्पोरेट जीवनानंतर शुक्ल यांनी नोकरी सोडून दिली. त्या सांगतात, “ मी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर होते, परंतु माझ्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा मी निर्णय घेतला.” याच कारणासाठी त्यांनी आपल्या यशस्वी कॉर्पोरेट कारकिर्दीला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या ( एनजीओ) प्रमुख म्हणून काम करायला सुरू केले. ही संस्था अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करते. या संस्थेच्या भारतातील व्यवस्थापकीय संचालक ( एमडी) असलेल्या शुक्ल यांनी ‘शिक्षण’ हा विषय आपल्या प्रकल्पासाठी निवडला.

एकदा यश मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या बचतीनंतर २००३ मध्ये ‘परिक्रमा’ ही संस्था सुरू केली. हे एक जोखमीचे काम होते. परंतु त्यांना आपल्या कल्पनेवर विश्वास होता आणि परिश्रम आणि संघर्ष करत त्यांनी आपल्या संस्थेला यश मिळवून दिले..

त्यांनी आपल्या या उपक्रमात उत्तमातील उत्तम कॉर्पोरेट पद्धती आणल्या. त्यांनी लोकांचे म्हणणे ऐकले आणि त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी प्रेरित केले. कठोर परिश्रम आणि कार्याच्या आवडीने परिक्रमा या संस्थेला त्यांनी एका नव्या उंचीवर पोहोचवले. कॉर्नेल विद्यापीठ आणि आयआयएम, बंगळुरू इथे ‘परिक्रमा ह्युमॅनिटी फाऊंडेशन’ चा अभ्यासक्रमातील एका धड्याच्या स्वरूपात समावेश करण्यात आला आहे.

लळा आणि छंद

वाचन हा शुक्ल यांचा छंद आहे आणि यावेळी त्या चर्चिल यांच्या मुलीने लिहिलेले ‘Clementine Ogilvy Spencer-Churchill’s biography’ हे चर्चिलचे चरित्र वाचत आहेत. क्लेमेंटाईन स्पेंसर चर्चिल या सर विंस्टन चर्चिल यांच्या पत्नी आहेत. आपल्या कुटुंबियांसाठी जेवण बनवणे शुक्ल यांना खूप आवडते. त्या पहाटे साडे चार वाजता उठतात. यामुळे त्यांना स्वत:साठीही वेळ काढता येतो आणि जेवण बनवण्यासाठीही वेळ मिळतो. टीव्हीवर त्या काही शो सुद्धा पाहतात. शुक्ल यांचे मुक्या प्राण्यांवरही खूप प्रेम आहे. त्यांच्या घरी पाच कुत्रे पाळलेले आहेत. शिवाय प्रत्येक शाळेत देखील एक एक कुत्रा आहे. त्यांना कुत्र्यांना फिरवणेही खूप आवडते.

त्यांचे आदर्श

शुक्ल यांचे तीन आदर्श आहेत – मदर टेरेसा, सर निकोलस विन्टन ( दुस-या महायुद्धात ज्यांनी नाजी अधिकृत चेकोस्लोवाकियाहून ६६९ मुलांना वाचवले, ते ब्रिटिश मानवतावादी), आणि दलाई लामा. त्या म्हणतात, “ त्यांचा साधेपणा आणि त्यांची मानवता मला खूप आवडते. त्यांचे इतरांसाठी विचार करणे त्यांना महान बनवते.”

त्यांचे एक स्वप्न आहे – भविष्य कसे असेल माहित नाही, पण पुढील वीस वर्षे सकाळी सव्वा आठ वाजता शाळेच्या हॉलमध्ये उपस्थित राहणे. “ मात्र ही शाळा परिक्रमाच्या विद्यार्थ्यांद्वारे सुरू व्हायला हवी” विद्यार्थ्यांच्या आवडत्या अक्का म्हणतात.