'महिलांच्या सुरक्षेचा संदेश घेऊन २१ वर्षांची अनाहीता फिरते सायकल घेऊन, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत'

'महिलांच्या सुरक्षेचा संदेश घेऊन २१ वर्षांची अनाहीता फिरते सायकल घेऊन, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत'

Wednesday February 24, 2016,

3 min Read


वय वर्ष २१ मणिपाल विद्यापीठाच्या बेंगळूरू कॅम्पसमधून, द्रुकश्राव्य माध्यमातून पदवी मिळवलेली अनाहीता साईप्रसाद सायकलवरून काश्मीर ते कन्याकुमारी एकटीनेच प्रवास करून आलीय. ट्रिप्टोच्या अहवालानुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वरून सायकलिंग करत जाणारी अनाहिता ही पहिली महिला आहे. जिने तब्बल ४,५२८ किलोमीटरच अंतर पार केलं आहे. या प्रवासातून अनाहिताला महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न मांडायचे असून महिलांना स्वातंत्र्य मिळवून देणे हेच तिचं उद्दिष्ट्य आहे.

" गेल्या वर्षी माझ्या पदवी अभ्यासक्रमानंतर मी भारतात अनेक ठिकाणी एकटीच फिरले. एक महिनाभर फिरले आणि मग काश्मीरला सायकलिंगसाठी गेले. मला अनेक लोक भेटले जे मला विचारायचे, मी एकटी का फिरतेय? मला भारतात लोकांचा महिलांच्या सुरक्षेप्रती असणारा हा दृष्टीकोन बदलायचा आहे आणि माझं सायकलिंग करत, फिरत जाण्यामागचं उद्दिष्टच हे होतं की मी जर एकटीने हा सायकलिंग प्रवास पार केला तर हा दृष्टीकोन बदलण्यात मी काही अर्थी यशस्वी ठरेन. खरंतर माझ्या पालकांनाही ही कल्पना काही रुचली नव्हती कारण यापूर्वी कोणत्याही महिलेनं अशी एकट्यानं टूर केलेली नव्हती. पण मला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनीही होकार दिला."

image


" मी रात्री प्रवास करीत नाही. साधारण संध्याकाळी मी सायकलिंग करणं थांबवते आणि माझं पुढचं अंतर ठरवते. सूर्यास्तानंतर रहदारीतून वाट काढणं खरतर धोकादायक असतं. अनेक आव्हान असतात, जशी की राहण्यासाठी योग्य जागा शोधणं आणि काही ठिकाणी अत्यंत खडतर रस्ता असतो. कधीकधी मला वाहतुकीत अडकल्यानं उशीर होतो. जरी माझा संपूर्ण आराखडा तयार असतो तरी कधी कधी मला मधूनच वेगळी वाट काढावी लागते. त्यामुळे मग आता मी गेस्ट हाऊस किंवा सरकारी पर्यटन निवास अशा जागांवर भिस्त ठेवते किंवा मग कधी मित्रमंडळी किंवा नातेवाईकांच्या घरी धडकते" अनाहीता सांगत होती.

या प्रवासात तिला मिळणाऱ्या आदरातिथ्याबद्दल ती भरभरून बोलते," मी सोनमर्ग मधल्या एका छोट्याश्या गावात होते. मी तिथे एक दोर घ्यायला थांबले होते, तिथे मला काही जणांनी त्यांच्या घरी बोलावलं आणि त्यांच्या घरातील महिलांशी माझी ओळख करून दिली. एक महिला एकटीने सायकल प्रवास करतेय हे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं होतं आणि त्यांनी मला दुपारी त्यांच्यासोबत जेवण्याचा आग्रह केला. ही जी प्रेरणा आहे त्याने मला पुढे जाण्याचं बळ मिळत गेलं. मी जितकं अधिकाधिक नवे रस्ते शोधते , तितकी मी या देशाच्या प्रेमात पडतेय. कधी कधी मला वाटतं काही ठिकाणी थांबावं आणि या मुलखाची अधिक ओळख करून घ्यावी. पण वेळ मर्यादीत असल्यानं मला ते करता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी खूप सारा नवीन मित्र परिवार बनवला". 

image


"स्वत:चं उदाहरण देताना तिला आशा आहे की अधिकाधिक महिला आपल्याला वाटणाऱ्या भयातून मुक्तता मिळवण्यासाठी पुढे येतील. भारतभर अशा प्रकारे एकटीने सायकल भ्रमण करणं, यासाठी खरंच हिम्मत लागते. अनहीतानं हा प्रवास केवळ गमतीखातर नाही केलाय तर आपल्याचा देशातील अनेकांसाठी एक संदेश देण्यासाठी केला आहे आणि हे दर्शवत की वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी ती आपल्या वयापेक्षा कितीतरी प्रगल्भ आहे. आपल्या देशात जिथे स्त्रियांवरील वाढते अत्याचार , हा रोजच्या वृत्तपत्रातला मथळा असतो , टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अनाहीतासारख्या तरुण मुलीनी देशाची प्रतिमा बदलवण्यासाठी आणि जनमानसाचं मत बदलवण्यासाठी घेतलेले कष्ट हे खरंच वाखाणण्याजोगे आहेत ." 

मुळ कथा : थिंक चेंज इंडिया

अनुवाद : प्रेरणा भराडे 

    Share on
    close