“तुम्हाला हवे ते घेवून जा नको असेल ते सोडून जा” द वॉल ऑफ काइंडनेस
Friday February 03, 2017,
2 min Read
द वॉल ऑफ काइंडनेस ‘दयेची भिंत’ उपक्रम प्रथम इराणमध्ये सुरु झाला आणि काही दिवसांत देशभरात पोहोचला. हा दान आणि कल्याण उपक्रम आहे, यामध्ये सार्वजनिक जागी कपड्याचे हँगर लावले जाते, या हँगरवर उपयोगी येतील असे कपडे वस्तू दान म्हणून लटकविल्या जातात जे गरजू, वंचित आणि अनाथ असतात त्यांना त्यांचा उपयोग होऊ शकतो.
उत्तर भारतातील बहुतांश लहान आणि मोठ्या शहरातून हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. याला ‘नेकी की दिवार’ असे म्हटले जाते, ही भिंत छान सजवली जाते आणि रोज स्वच्छ केली जाते. ज्या लोकांना कपडे नको असतील, किंवा इतर वापरायोग्य वस्तू नकोश्या असतील ते येथे आणून दया भिंतीला ते टांगून ठेवतात. आणि गरजू त्यांना हवे असेल ते घेवून जातात. कपड्यांशिवाय नागरिक येथे पुस्तके, खेळणी, चपला, देखील ठेवतात. या मागचा उद्देश इतकाच “तुम्हाला हवे ते घेवून जा नको असेल ते सोडून जा”.
उत्तर भारतामध्ये या भिंती वेगाने वाढत आहेत, यात एक भिलवाडा येथे, तीन जयपूरमध्ये, आणि इतर अनेक अलाहाबाद, डेहराडून आणि कोरबा येथे आहेत.एका रिक्षा वाहकाने सांगितले की, “ मी रिक्षा ओढतो आणि पत्नी-मुलांना कपडे खरेदी करता येतील अशी कमाई नाही, मित्राने मला या जागेबाबत सांगितले, आणि मला आनंद झाला कारण त्यांच्या मापाचे कपडे येथे मिळाले.”
महेश अग्रवाल हे संस्थापक असलेल्या भोपाळ येथील समूहाने सांगितले की, “ सुरुवातीला आम्हाला फारसा प्रतिसाद नव्हता मात्र लोक आता उत्स्फूर्तपणे समर्थन देतात याचा आनंद आहे, गरजू लोक वस्तू नेतात, वापरुन आणूनही देतात. या संकल्पनेच्या यशाने आम्ही अशा प्रकारच्या आणखी दयाळूपणांच्या भिंती बाजूच्या भागात आणि शहरात बांधू इच्छितो.”
येथे कुणीही प्रशासन किंवा संघटना या वस्तूंची नोंद किंवा हिशेब ठेवत नाही की किती वस्तू आल्या आणि गेल्या. हा केवळ दाते आणि गरजू यांच्यातील अदान प्रदान करण्याचा उपक्रम आहे. ज्या भिंती कधीकाळी थुंकून घाण केल्या जात होत्या आणि स्वच्छ केल्या जात नव्हत्या त्याच आता स्वच्छ केल्या जातात आणि रंगविल्या जात आहेत. आणि उत्तरभारता मधील हे लोण आता देशभर पसरू लागले आहे.
या सारख्याच आणखी काही कहाण्या तुम्हाला माहित असल्यास आम्हाला कळवा. यासाठी [email protected] वर संपर्क साधा.