भारतीय स्टार्टअप जगतातील दोन अव्वल खेळाडू आमने-सामने

भारतीय स्टार्टअप जगतातील दोन अव्वल खेळाडू आमने-सामने

Tuesday March 08, 2016,

5 min Read

राहुल यादव स्टेजवर आला आणि म्हणाला की आयआयटी- मुंबईच्या दीक्षांत सभागृहामध्ये उपस्थित व्यावसायिक बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱया विद्यार्थ्यांप्रमाणे त्याने त्याची बी टेकची पदवी स्वीकारणे अनुभवायला पाहिजे होते पण त्याने तसे केले नव्हते. त्याचे हे वाक्य संपते न संपते तोच तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले.

सूत्रधार असलेली ब्लूमबर्गची आभा बकाया उपस्थितांना सांगण्याचा प्रयत्न करत होती की राहुल कुठलेही उदाहरण घालून देण्याचा प्रयत्न करत नाही आहे, मात्र एव्हाना राहुलची ऍन्टी हिरो प्रकारची प्रतिमा मुलांच्या मनात पक्की बसली होती. जो वेगळ्या वाटेने पदक्रमणा करतो. शर्यतीचा असा घोडा ज्याला तुम्ही अडवू शकत नाही.


सचिन बन्सल (डावीकडून) आणि राहुल यादव

सचिन बन्सल (डावीकडून) आणि राहुल यादव


आयआयटीच्या जादूशी परिचित असलेला सचिन बन्सलही सभागृहात आला आणि त्यानेही आयआयटी दिल्लीमधील जून्या आठवणी ताज्या केल्या. तो आज जगातील पाच अव्वल ई-कॉमर्स कंपन्यांमधील एक असलेल्या ‘फ्लीपकार्ट’चा संस्थापक असला तरी तो ज्या महाविद्यालय आणि विद्यापीठात शिकून मोठा झाला त्या संस्था नेहमीच त्याच्या कृतज्ञतेचा आणि जुन्या आठवणींचा एक भाग आहेत.

“मी माझं प्रमाणपत्र इथून घेणं अपेक्षित होतं पण मी ते केलं नाही. मी यांना सांगितलं होतं की एक दिवस ते मला बोलावतील,” या टिपण्णीसह आयआयटी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ई-समीट 2016 मध्ये राहुल आणि सचिन या भारताच्या स्टार्टअप विश्वातील दोन सुपरिचित वक्तिमत्वांमध्ये चर्चेला सुरुवात झाली.

“माझ्यासाठी आयआयटी म्हणजे एकत्र आलेली सर्वोत्तम डोकी आणि हॉस्टेलमधील वाईट पायाभूत सुविधा,” राहुल यादव मिश्किलपणे पुढे सांगतो, “असे असले तरी मला एक आयआयटीअन असल्यामुळे अजिंक्य असल्यासारखे वाटले. कारण आपण कुणाच्याही बाहेरच्या व्यक्तीच्या मदतीशिवाय निर्मिती, डिझाईन, विक्री असे सारे काही करु शकतो. उत्पादन निर्माण करणे, ते डिझाईन करणे इत्यादी सर्वच बाबतीत आपण निपुण असतो. यामध्ये उतरताना मला वाटलं होतं की एवढंच असतं, याच सर्वांची आपल्याला आवश्यकता असते. मार्केटींग, एचआर आणि मीडिया रिलेशन्स हे फार महत्त्वाचं नसतं. मात्र मी चुकीचा ठरलो. तुमचं उत्पादन फार चांगलं असलं तरी ते स्वतःहून विकलं जाणार नाही; मार्केटिंग, फिल्ड सेल्स, कम्युनिकेशन आणि मीडिया हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. एचआर, ऍडमिनीस्ट्रेशनचं कामही तितकंच महत्त्वाचं असतं आणि जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ही सर्व कामं चांगल्या पद्धतीने करु शकणारी एक टीम उभी करावीच लागते,” राहुल सांगतो.

ते सांगतात, एका स्टार्टअपच्या संस्थापकाची त्याने उभारलेल्या शाळेत शिपायापासून प्रिंसिपलपर्यंतची सर्व कामं स्वतः करण्याची तयारी असावी लागते. सचिन स्वतःचा अनुभव सांगतो, “सात वर्षांपूर्वीपासून अगदी वर्षभरापूर्वीपर्यंत जवळपास प्रत्येक दिवशी मी काही न काही तरी नवीन काम केलं आहे. बदल फक्त स्थिर आहे. जी माणसं चपळ असतात तीच पुढे जातात.”

पण स्टार्टअप जगतात नवे काय आहे आणि कुठली आव्हाने कायम आहेत? या प्रश्नावर उत्तर देताना सचिन सांगतो, “नोकरी सोडल्यानंतर 10 आठवड्यांमध्ये आमच्याकडे ‘फ्लिपकार्ट'ची ब्ल्यू प्रिंट तयार होती. मात्र कंपनी अधिकृतरित्या नोंदणीकृत करण्यासाठी आणखी 45 दिवस लागणार होते हे खूप मोठं आव्हान होतं. पण मला वाटतं अशी आव्हानं कायम असली तरी काहीतरी नवे सुरु करण्याबाबत निर्भयपणे विचार करणारे लोक आमच्याकडे असणं, लोकांना सुरुवात करण्याची इच्छा असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि उद्योगाच्या या चांगल्या कल्पनेमध्ये एकदा गुंतवणूक झाल्यावर गुंतवणूकदारांचं चित्रही परिणामकारकरित्या पालटलं आहे. नोकरभरतीचं चित्र बदललं आहे. पारंपरिक मोठमोठ्या उद्योगांऐवजी स्टार्टअपशी जोडले जायला लोक इच्छुक आहेत. स्टार्टअपमुळे लोकांना पैसे कमविण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.”

जेव्हा की कॉलेज कॅम्पसमध्ये शेकडो आणि बाहेरच्या जगात जवळपास लाखोंवर स्टार्टअप्स उदयाला येत आहेत, स्पर्धा वाढली आहे, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कल्पनेचं सोनं कसं काय केलं? या प्रश्नावर उत्तर देताना सचिन सांगतो, “मी आसपासच्या जगातील सर्वात मोठी समस्या शोधतो. उदाहरणार्थ, आज भारत अशा टप्प्यावर आहे जिथे टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन अजून झालेलं नाही, जिथे टेक्नॉलॉजीचा सर्वोत्कृष्ट वापर सर्वच क्षेत्रात होत नाही. मात्र ही परिस्थिती लवकरच बदलेल. तेव्हा उद्योजकाने आपल्या वेळीच्या मोठ्या आव्हानांची कालमर्यादा व्यवस्थित समजून घेऊन त्यांच्यावर तोडगा काढण्याचे काम करायला पाहिजे.”

“आणि कोण म्हणतं की स्पर्धा ही एक वाईट गोष्ट आहे? ही स्पर्धा आपल्याला प्रोत्साहित करते. कुठल्याही कंपनीसोबत सर्वात वाईट गोष्ट जर कुठली घडू शकत असेल तर ती म्हणजे त्यांना स्पर्धक नसणे. ऍमेझॉनने बाजारात प्रवेश करण्यापूर्वी आमचा वृद्धी दर वर्षानुवर्ष 100 टक्के होता, मात्र ऍमेझॉनच्या कडक प्रवेशानंतर दरवर्षी आमचा वृद्धी दर 200 टक्के राहिला आहे. जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तुम्हाला जास्त पैसा उभा करावा लागतो; मात्र ते सर्व पोषक आणि उत्पादनक्षम असते.”

निधी उभारण्याच्या स्पर्धेची काळी बाजू तसंच उद्योगवृद्धी आणि विकास व नफा यामध्ये समतोल राखण्याचा ताण याबाबत बोलताना राहुल सांगतो की ज्या चांगल्या कल्पनेसाठी निधी उपलब्ध होतो ती अपवाद ठरण्याऐवजी प्रमाण ठरते ही वस्तुस्थिती आहे.

“गुंतवणूकदार दोन प्रकारचे असतात. वैयक्तिक गुंतवणूकदार आणि निधी. आम्हाला (त्याच्या हाऊजिंग डेजसंदर्भात) वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून खूप आधार मिळाला, त्यामुळे मी लोकांकडून मर्यादित रक्कम घेण्याला प्राधान्य देतो. व्हिसीज अनेकदा गुंतवणूक करायला घाबरतात. मला फंड व्यवस्थापकांबाबत फारसा आदर नाही,” स्पष्टवक्ता राहुल सांगतो. जेव्हा की सचिनचे म्हणणे वेगळे आहे. “तू कदाचित चूकीच्या गुंतवणूकदारांना भेटला असशील, कारण माझा अनुभव खूप सकारात्मक आहे. जर तुमचे गुंतवणूकदार तुमच्या योजनेबाबत सहमत नसतील तर निश्चितपणे तुम्हाला पुढे अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे तुम्ही काय करता आहात आणि तुमचा दृष्टीकोन काय आहे याबाबत तुम्ही गुंतवणूकदाराला संपूर्ण कल्पना दिली पाहिजे आणि ते तुमच्याशी सहमत आहेत याची खात्री करुन घेतली पाहिजे,” सचिन सांगतो.

जेव्हा राहुलने पॉवर डायनामिक्स नेहमीच गुंतवणूकदारांच्या बाजूने जात असल्याचा दावा केला तेव्हाही सचिनने आधीच सीमारेषा आखून गुंतवणूकदारांबरोबर एक मजबूत नाते कसे निर्माण करायचे याबाबत अमूल्य सल्ला दिला.

“पॉवर डायनामिक्स बदलण्याचेही मार्ग आहेत. अलिबाबा आणि फ्लीपकार्टने संस्थापकांना मतदानाचा हक्क दिला. जर जास्त पैसा मिळत असेल तर तरुण मंडळीही तुमच्याप्रती सौम्य व्हायला इच्छुक असतात. निष्कर्ष काय तर व्यवसायाचा मुख्य हेतू जपला गेला पाहिजे. जर व्यवसाय यशस्वी झाला तर प्रत्येकाला फायदा होणारच.”

पैशाबरोबर यश येते आणि यशाबरोबर प्रसिद्धी, किंवा राहुलच्या बाबतीत – अपकिर्ती. पण राहुल म्हणाला त्याने नकारात्मकतेला दूर सारुन जोरदारपणे पुढे जाण्याचा मार्ग निवडला. “मी माझ्याविषयीचे लेख वाचत नाही. आपल्याबाबत काय लिहिले आहे याची पर्वा न करणे हाच अपकिर्ती हाताळण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे.”

“मीडिया त्यांच्या रिपोर्ताजमध्ये यश किंवा अपयशाचे एकतर खूप सकारात्मक किंवा खूप नकारात्मक चित्र रंगवते,” सचिन सांगतो. तो पुढे म्हणतो की असे असले तरी स्टार्टअपविषयीचे वातावरण सामान्यतः सकारात्मक आहे.

त्याच्या मते आजकाल तरुणाई स्वतःच खूप उत्साही आहे. या खोलीतील जमाव हा त्याचा पुरावा आहे. पंतप्रधान याविषयी बोलत आहेत; त्याची ही स्वीकृती आहे. 

लेखिका – बिंजल शहा

अनुवाद – अनुज्ञा निकम