स्वच्छ भारत अभियानाचे 'वालुकाशिल्प'

स्वच्छ भारत अभियानाचे 'वालुकाशिल्प'

Monday October 03, 2016,

1 min Read

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षातर्फे राज्यात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला तसेच प्रतिमेला अनेक संस्थातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच अनेक संस्था, संघटनांतर्फे स्वच्छता अभियान, स्वच्छतेची शपथ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

स्वच्छ भारत अभियानाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त महात्मा गांधीजींना गिरगाव चौपाटी येथे वालुकाशिल्पाद्वारे अनोखी आदरांजली वाहण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वालुकाशिल्पकार  सुदर्शन पटनाईक यांनी हे शिल्प तयार केले आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातर्फे गिरगाव चौपाटी येथे स्वच्छ भारत अभियान आणि निर्मल सागर तट अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी वालुकाशिल्प साकारण्यात आले आहे.

image


स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातर्फे गेले 15 दिवस सुरु असलेल्या निर्मल सागर तट अभियानाचा वालुकाशिल्प साकारुन समारोप करण्यात आला. वालुकाशिल्प साकारण्याआधी चौपाटीची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांच्यासह परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सुदर्शन पटनाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे 10 ट्रक वाळू वापरुन 10 फूट उंच व 40 फूट रुंद असे भव्य वालुकाशिल्प साकारले आहे. तिरंग्यासह विविध रंगात वालुकाशिल्प उद्या गांधी जयंतीपासून नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे.

सुदर्शन पटनाईक निर्मल सागरी तट अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसिडर असून त्यांनी कोकण किनारपट्टीवर फिरुन सागर किनाऱ्यांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली आहे. महाराष्ट्रातील किनारपट्टी ही सुंदर असून ती स्वच्छ ठेवण्यासाठी मी वालुकाशिल्पाद्वारे संदेश देत असल्याचे पटनाईक यांनी सांगितले.