सारंगखेड्याचे नाव जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणू- मुख्यमंत्री

सारंगखेड्याचे नाव जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणू- मुख्यमंत्री

Thursday December 22, 2016,

2 min Read

सारंगखेडा येथील ४०० वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असणारा यात्रोत्सव आणि येथील अश्व प्रदर्शन सोहळ्याचे पर्यटनदृष्ट्या अनोखे महत्व आहे. या सोहळ्याला शासनाचे पाठबळ देवून जगाच्या पर्यटन नकाशावर आणण्यासाठी आगामी काळात सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

image


सारंगखेडा, ता. शहादा येथे एकमुखी दत्त यात्रोत्सवानिमित्त राज्य शासनाचा पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सारंगखेडा चेतक फेस्टिव्हल- 2016 आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त उत्तर महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सोहळा व पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्योजक सुभाष रुणवाल, उद्योजक सरकारसाहेब रावल, किशोर खाबिया, डॉ. तुषार देवरस यांना उत्तर महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच नंदुरबार जिल्ह्याची माहिती देणारे मोबाईल ॲप व संकेतस्थळाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

image


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चेतक फेस्टिव्हलला आंतरराष्ट्रीय स्वरुप देण्याचा मंत्री रावल यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रयत्नाला शासनाचे पूर्ण पाठबळ आहे. काळाच्या ओघात अडचणीत आलेली आदिवासी संस्कृती ही प्राचीन व समृध्द संस्कृती असून या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करुन संवर्धन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या ठिकाणी आयोजित पर्यटन परिषदेनिमित्त पर्यटन क्षेत्रातील अनेक व्यावसायिक आले आहेत. त्यांच्या माध्यमातून सारंगखेडा परिसरात पर्यटकांना आणण्यासाठी निश्चितच मदत होईल. राजस्थानमधील पुष्कर व गुजरातमधील कच्छ महोत्सवाप्रमाणे सारंगखेड्याचा चेतक महोत्सव आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यासाठी सर्वंकष मदत केली जाईल.

जगभरात पर्यटनाला मोठा वाव आहे. पर्यटनामुळे सामाजिक अभिसरण होवून एकतेची भावना निर्माण होते. याशिवाय व्यवसायाला चालना मिळून रोजगार निर्मितीही होते. जगभरात सर्वाधिक रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून पर्यटन व्यवसायाकडे पाहिले जाते. पर्यटनाच्या निर्मित्त येणारा पर्यटक हा त्या ठिकाणच्या सर्व घटकांना रोजगाराची संधी देवून जातो. नंदुरबार जिल्ह्यातही पर्यटनाला मोठा वाव आहे. येथील निसर्ग संपदा, पर्वतराजी, दुथडी भरुन असलेले तापी नदीचे पात्र, निसर्गरम्य तोरणमाळ अशा पर्यटनस्थळांमुळे सारंगखेडा, प्रकाशा आणि तोरणमाळ दरम्यान पर्यटन सर्किट विकसित करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

ज्‍या अश्व प्रदर्शनासाठी सारंगखेडा प्रसिध्द आहे, तेथे अत्याधुनिक अश्व संग्रहालय व संशोधन केंद्र तयार करण्यास शासन अनुकूल असून तसा प्रस्ताव पाठवावा. यामुळे अनेक अश्व प्रजातींची माहिती येथे उपलब्ध होवून येथील पर्यटनाला नवे आयाम प्राप्त होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

मंत्री रावल म्हणाले, सारंगखेडा यात्रोत्सवाची महती जगभरात पोहोचविण्यासाठी `ब्रँडिंग` करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत प्रयत्न केले जातील. या भागातील विविध पर्यटनस्थळे विकसित केले जातील. तसेच आदिवासींची संस्कृती जगापुढे आणण्यासाठी येथील होळी, भोंगऱ्या महोत्सवांचेही ब्रँडिंग केले जाईल. (सौजन्य : महान्युज)