मनमौजींना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाली ‘रेड ब्रिगेड’, दीड वर्षापासून ३४००० मुलींना दिले आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण
Saturday December 19, 2015,
4 min Read
एक मुलगी जी कुणाला तरी आपला जिवलग आणि चांगला मित्र समजत होती ती त्याच्याच लैंगिक शोषणाला बळी पडली. या अत्याचाराने पीडित मुलीचे पूर्ण वर्ष घाबरण्यात आणि त्या धक्क्यातून सावरण्यात गेले, पण त्याचवेळेस तिच्या एका साहसी निर्णयाने समाज परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न हा उषा विश्वकर्माच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण टप्पा ठरला. ही अशी एक धगधगती ज्वाला आहे की जी जगभरातल्या दुसऱ्या मुलींसाठी बऱ्या वाईट तसेच रोडरोमिओंविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करणारी शक्ती होती. आज उषा दुसऱ्या मुलींना हिम्मत देऊन त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन आणू पाहत आहे. गरज पडल्यास वाईट नजरेने बघणाऱ्या रोडरोमिओंबरोबर दोन हात करण्याचे शिक्षण देत आहे. म्हणून आज लखनऊ आणि वाराणसी सारख्या शहरांमध्ये जेव्हा उषा विश्वकर्माच्या ‘रेड ब्रिगेड’ ला बघून रस्त्यात बिनधास्त निडर होऊन फिरणारे मनमौजी आपल्या घरात लपून बसतात. हा ‘रेड ब्रिगेड’ चा करिष्मा आहे जे मागच्या दीड वर्षापासून जवळजवळ ३४००० मुलींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देत आहे.
उषा विश्वकर्मा यांचा जन्म उत्तरप्रदेशातल्या एका वस्तीत झाला पण त्यांचे शालेय शिक्षण लखनऊ मध्ये झाले. त्यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी पुस्तकांविनाच माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पैशाच्या अडचणीमुळे पुस्तके विकत आणून त्या अभ्यास करू शकत नव्हत्या तसेच त्यांना झुग्गी झोपडीमधल्या मुलांबद्दल विशेष कणव असल्यामुळे त्यांनी या मुलांना शिकवण्याचे काम सुरु केले.
एक दिवस त्यांना कळाले की ज्या मुलांना त्या शिकवीत आहे त्यातील ११ वर्षाच्या मुलीवर तिच्या काकांनीच बलात्कार केला. मुलीच्या पालकांनी या घटनेविषयी पोलिसात तक्रार न देता प्रकरण दडपून टाकले. उषासाठी हा खूप मोठा धक्का होता. आतापर्यंत त्यांनी दूरदर्शन आणि वर्तमानपत्र यामध्येच अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या आणि बघितल्या होत्या. या घटनेला काही अवधीच झाला होता आणि याच दरम्यान उषाचा एक मित्र ज्याला ती मनातल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी सांगायच्या त्यानेच एक दिवस त्यांचे लैंगिक शोषण केले. या घटनेमुळे त्या अंतर्मनातून घाबरल्या. समाजातील लोकांच्या कुंठीत स्वभावामुळे त्यांनी याची वाच्यता कुणाकडे केली नाही पण या घटनेमुळे त्या वर्षभर भीतीने या धक्क्यातून बाहेर पडू शकल्या नाही. त्यांची तब्येत इतकी खराब झाला की घरच्यांनी लखनऊच्या नूर मंजिल मनोचिकित्सा केंद्रात पाठवण्याचा विचार केला. याच दरम्यान त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले,पण त्यांच्या काही मित्रांनी त्यांची साथ सोडली नाही व त्यांचे कायम समुपदेशन करीत राहिले.
जेव्हा त्या सामान्य स्थितीत आल्या तेव्हा त्यांनी विचार केला की आपल्या शिक्षणाबरोबरच अशा घटनांवर पण काम करण्याची गरज आहे. त्यांचे असे मानने आहे की, ‘जर मी स्वतःच सुरक्षित नसेल तर माझ्या शिक्षणाचा काय फायदा?’ त्यानंतर त्यांनी महिलांच्या एका कार्यशाळेत भाग घेतला जिथे उत्तरप्रदेशातल्या ४-५ जिल्ह्यातील जवळजवळ ५५ मुलींनी भाग घेतला होता. त्यातील ५३ मुलींनी सांगितले की त्यांच्याबरोबर त्यांच्याच नातेवाईकांनी बलात्कार, मारझोड आणि इतर अत्याचार केले. या नातेवाईकांमध्ये त्यांचे वडील, भाऊ, काका आणि इतर लोक सामील होते. या माहितीने उषाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या मुलींनी या विषयाबद्दल काहीतरी ठोस निर्णय घेण्याचा पण केला. यानंतर त्यांनी महिला अत्याचारासंबंधातल्या या घटनांवर काम सुरु केले.
लखनऊच्या माडियांव भागात राहणाऱ्या या मुली रोजच्या अशा अत्याचारांना वैतागल्या होत्या, भर रस्त्यात कुणीतरी हात पकडायचे, ओढणी ओढायचे, हे सगळे सहन न होऊन उषा यांनी १५ मुलींचा एक गट तयार केला जो अशा मुलांच्या विरोधात जाऊन त्यांच्या कुटुंबियांना जाऊन सांगतात की त्यांची मुले रस्त्यात महिला आणि मुलींशी कसे गैरवर्तन करतात. बऱ्याच वेळा परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर या मुलींना पोलीस स्टेशनमध्ये पण जावे लागते. सहा ते सात महिने हा उपक्रम असाच सुरु होता पण एकदा संस्थेच्या एका मुलीने आपल्या सोबतीच्या मदतीने एका रोडरोमिओची धुलाई केली. त्यानंतर मुलाचे पालक त्यांना बरेच वाईटसाईट बोलले पण सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर त्यांनी लाजेने मान खाली घातली.
या घटनेनंतर मुलींचा आत्मविश्वास बळावला, त्यांनी ठरविले की यापुढे असा कोणताच अत्याचार त्या सहन करणार नाही. यानंतर कुठेही अशाप्रकारची छेडछाड दिसली तर या मुली अगोदर समजावण्याचे काम करायच्या आणि नाहीच ऐकले तर सगळ्यामिळून धुलाई करायच्या. यानंतर त्यांनी एक ड्रेस कोड बनविला. या मुली लाल आणि काळ्या कपड्यांमध्ये महिलांसंदार्भातल्या कार्यक्रमात किंवा एखाद्या चौकातल्या नाटकात भाग घेण्यासाठी जातात तेव्हा लोक त्यांना ‘रेड ब्रिगेड’ म्हणतात. याअगोदर कोणतेही नाव नसलेल्या या मुलींना हे नाव आवडू लागले.
उषा सांगतात की, ’रेड ब्रिगेड’ ची सुरुवात आमच्या सुरक्षेसाठी केली होती कारण यात सहभागी होणाऱ्या मुली तेव्हा खूप तरुण होत्या पण समाजाच्या मान्यतेनंतर आम्ही आमच्या कामाचा विस्तार वाढवला आणि जबाबदारी पेलत गेलो.’
प्रारंभी जेव्हा ‘रेड ब्रिगेड’ ची स्थापना झाली तेव्हा ठरवले की वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून रोडरोमिओंवर नजर ठेवायची तसेच अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा. आमची संस्था आजपण निर्भयाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी २९ तारखेला महिलांच्या अत्याचार विरोधात निदर्शने करतात. विशेषकरून अशा भागात जिथे एखाद्या स्त्रीवर बलात्कार किंवा अॅसिड हल्ला या सारख्या गंभीर घटना घडलेल्या असतात. त्यांच्याच प्रयत्नांचा परिणाम हा आहे की आज स्थानिक प्रशासनाने लखनऊच्या अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. याव्यतिरिक्त पीडित मुलींना वाढीव सवलत मिळत आहे.
लेखक : हरीश बिश्त
अनुवाद : किरण ठाकरे