राजस्थानमध्ये पहिल्यांदाच मतदानाने महिलांनी केली दारूबंदी, एक एप्रिलपासून बंद आहेत, एका गावात दारूची दुकाने!

राजस्थानमध्ये पहिल्यांदाच मतदानाने महिलांनी केली दारूबंदी, एक एप्रिलपासून बंद आहेत, एका गावात दारूची दुकाने!

Wednesday April 20, 2016,

4 min Read

मेवाडचा इतिहास, येथील वीर महिलांचा त्याग आणि बलिदान यासाठी संपूर्ण देशभरात ओळखला जातो. मुघलांच्या काळात राणी पद्मिनी, पन्नाधाय आणि हाडी राणीच्या त्याग आणि बलिदानाने मेवाडच्या इज्जतीला वाचविले. याच पार्श्वर्भूमीवर राजसमंद जिल्ह्याच्या लहानशा काछबली गावातील महिलांनी देखील दारूबंदीसाठी आरपारची लढाई केली आणि जिंकली. या गावातील मर्दानी महिलांनी दारू दुकानातून हटविण्यासाठी सुरु केलेल्या लढाईला निवडणुकीपर्यंत पोहोचविले आणि सरकारला गावातून दारू हटविण्यासाठी विवश केले. दारूमुळे गावात वाढणा-या मृत्युच्या घटनेमुळे चिंतेत असलेल्या महिलांनी आपली एकता दाखवून दारू विरोधात हल्लाबोल चढविला. गावातील महिलांमध्ये दारूविरुद्ध इतका क्रोध आहे की, येथे दारूचा एक थेंबही त्या विकू देण्यासाठी तयार नाहीत. आणि त्यासाठी त्या हातात काठी घेऊन लढाई लढण्यासाठी तयार आहेत. त्यांच्या हट्टापुढे प्रशासनाला हात टेकावे लागले आणि २९ मार्चला त्यासाठी पंचायतमध्ये निवडणुका ठेवण्यात आल्या. त्यांनी दिवस-रात्र एक करून गावातील पुरुषांना आपल्या बाजूने वळविले. 

image


राजस्थानमध्ये निवडणुका घेऊन दारूबंदीचा कायदा १९७३ मध्येच बनला होता, मात्र पहिल्यांदा या कायद्याचा प्रयोग उदयपुर भागाच्या राजसमंद जिल्ह्याच्या काछबली गावातील महिलांनी केला. महिलांनी निवडणुका लढविण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले आणि खूप प्रचार देखील केला. मतदाना नुसार ६७.११ टक्के लोक दारूबंदीच्या बाजूने आहेत. सरकारने केलेल्या मतदानात पंचायतच्या ९ प्रभागातून २८८६ वयस्क मतदार होते, ज्यातील २०३९मतदारांनी मत टाकले. त्यातील १९३७ मतदारांनी गावातून दारूचे दुकान हटविण्यासाठी मत टाकले, तर ३३ मतदारांनी दारूचे दुकान उघडण्याच्या बाजूने मत टाकले. ६९ मते चुकीच्या पद्धतीने टाकल्यामुळे रद्द झाली. झाले असे की, जवळपास एक वर्ष झाले, ग्रामपंचायतच्या निवडणुकीत या गावातील लोकांनी महिला सरपंच गीता देवी यांना देखील याच शर्तीवर मत दिले की, त्या गावातून दारूचे दुकान हटवतील. गीता यांनी देखील आपल्या निवडणुकीच्या वचनाला लक्षात ठेवून, जिंकल्यानंतर अनेकदा आपल्या स्तरावर प्रयत्न केले, मात्र यश मिळाले नाही. सरपंच गीता देवी सांगतात की, “जेव्हा कुणी आमचे ऐकले नाही, तेव्हा आम्ही महिलांनी दारूचे दुकान बंद करण्यासाठी एकत्र येऊन गेल्या २७ फेब्रुवारीला ग्रामसभेत गावातील लोकांचे हस्ताक्षर असलेला लिखित प्रस्ताव पास करून घेतला, मात्र सरकारने त्यांचे ऐकले नाही. तेव्हा आम्ही धमकी दिली की, स्वतःच मत द्या, महिला काठ्या घेऊन घरातून निघतील.” 

image


राज्याच्या मद्यनिषेध कायदा १९७३मध्ये ही तरतूद आहे की, ग्रामपंचायतचे पन्नास टक्के लोक जर दारूच्या दुकाना विरुद्ध मत टाकतात, तर दारूचे दुकान बंद केले जाईल. गावात दारूमुळे अनेक मृत्युनंतर महिलांनी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला दारूचे दुकान बंद करण्यासाठी सांगितले, मात्र कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, तेव्हा गावातील महिलांनी स्वत:च १५ मार्चला गावात निवडणुकीची व्यवस्था केली. ज्यात ६०टक्के लोकांनी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मत टाकले. या मतदानाचा परिणाम घेऊन ग्रामीण जिल्हा प्रशासनाकडे जाऊन दारूचे दुकान बंद करण्यासाठी सांगितले, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत म्हटले की, ते स्वतः मतदान आयोजित करतील. राजसमंदच्या जिल्हाधिकारी अर्चना सिंह सांगतात की, “ आम्ही त्यांना निवडणुकीचे नियम सांगितले. आता परिणाम आल्यानंतर एक एप्रिलपासून पंचायतचे दारूचे दुकान बंद करण्यात आले आहे.” 

image


या गावातील महिला आणि ग्रामीण दारूच्या दुष्परिणामामुळे इतके त्रासलेले आहेत की, आता या गावात एक थेंब दारूचा विकू देऊ इच्छित नाही. इतकेच नव्हे तर, या गावातील महिला सरकार आणि प्रशासनाविरोधात देखील त्या उभे राहण्यासाठी तयार आहेत. या गावातील मोठे आणि वयोवृध्द देखील या महिलांच्या मनौधैर्याला बघताना दारूविरुद्ध या अभियानात त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरले. ग्रामीण लोकांच्या मते, मागील काही दशकांपासून या गावात दारूच्या सेवनाने अनेक कुटुंब पोरकी झाली. अनेक महिला विधवा झाल्या, तर अनेक मातांना आपल्या मुलांचा अकाल मृत्यू पाहावा लागला. दारूने लहान लहान मुलांचे अन्नच हिसकावून घेतले नाही तर, त्यांना अनाथ देखील केले. पंचायत परिषदेच्या सदस्य मीरा देवी सांगतात की, गावात एका वर्षात दारू प्यायल्याने सात लोकांचा मृत्यू झाला आहे. 

image


या गावातील महिलांच्या संघर्षाची कहाणी देखील खूप दु:खदायक आहे. या गावातील पुरुष दारू पिण्याचे इतके आधीन आहेत की, दिवसाची सुरुवातच दारूमुळे करतात. हेच नव्हे तर, दारू पिण्याचा हा क्रम दिवस रात्र चालतच आहे. दारूच्या नशेमुळे या गावातील युवा पिढी विखुरली जात आहे आणि बेरोजगार तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. या मोठ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी दारूच्या दुकानांना हटविण्याबाबत सांगितले जाते तेव्हा, सरकारी नियमांचा संदर्भ दिला जातो. राज्यात दारू विरोधी आंदोलन चालविणा-या पूजा छाबडा सांगतात की,

“ही तर सध्या सुरुवात आहे. आता हळू हळू सर्व पंचायतीत आम्ही निवडणुकीची मागणी करू आणि मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना आमचे ऐकावे लागेल.” राज्यात दारूबंदी लागू करण्यासाठी माजी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ता गुरुशरण छाबडा यांनी जयपूरमध्ये उपोषण करून आपला जीव दिला होता.

लेखिका : रिम्पी कुमारी

अनुवाद : किशोर आपटे