मुंबईत वाहतूक नियंत्रणासाठी 'एमटीपी ॲप'
Tuesday January 10, 2017,
3 min Read
महाराष्ट्र पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस, बृहन्मुंबई महापालिका आणि परिवहन आयुक्तालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या २८ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा आज ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मुंबई शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस शाखेमार्फत करण्यात येत असलेला माहिती तंत्रज्ञानाचा वापर व यासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम प्रशंसनीय आहेत, असे गौरवोद्गार बच्चन यांनी याप्रसंगी काढले.
एनसीपीए सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या सुरुवातीस बच्चन यांच्या हस्ते हायड्रॉलिक क्रेनला झेंडी दाखवून या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. सप्ताहाचा कालावधी 9 ते 15 जानेवारी दरम्यान असून या काळात विविध उपक्रमांद्वारे रस्ते सुरक्षिततेविषयी जनजागृती केली जाणार आहे.
अमिताभ यांनी केले एमटीपी (MTP) ॲप डाऊनलोड
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सादरीकरण करताना मुंबई वाहतूक पोलीसांच्या MTP (Mumbai Traffic Police) या ॲपविषयी सहपोलीस आयुक्त भारंबे यांनी माहिती दिली होती. कार्यक्रम सुरु असतानाच आपण आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्याचे बच्चन यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, मुंबई शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस शाखेमार्फत करण्यात येत असलेला आयटी तंत्रज्ञानाचा वापर व यासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम प्रशंसनीय आहेत. आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा तेथील वाहतुकीची शिस्त पाहून आपण अचंबित होतो. आपल्या देशातही अशीच शिस्त आवश्यक असून जेव्हा परदेशातील लोक इथे येतील तेव्हा येथील वाहतुकीची शिस्त पाहून त्यांनी अचंबित व्हायला हवे. मुंबई वाहतूक पोलीसांमार्फत राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम पाहून तो दिवस फार दूर नाही असा विश्वास वाटतो, असे त्यांनी सांगितले.
शिस्तबद्ध वाहतुकविषयक जनजागृतीसाठी आपण संपूर्ण योगदान देण्यास तयार असून वाहतूक शाखेने यासाठी विविध जाहीराती, लघुफिल्म्स तयार कराव्यात, आपण त्यास सहभाग देऊ, असे बच्चन यांनी यावेळी सांगितले. आपला भारत देश अधिकाधिक स्वच्छ, निर्मल आणि शिस्तबद्ध वाहतूकविषयक संवेदनशील बनविण्यात सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रस्ते सुरक्षेसाठी स्वतंत्र निधी - अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव
अपर मुख्य सचिव श्रीवास्तव म्हणाले की, रस्ते अपघातातून होणारी मोठी जिवीतहानी लक्षात घेता रस्ते सुरक्षा हा विषय शासनाने प्राधान्यक्रमाने हाती घेतला आहे. यासाठी स्वतंत्र रस्ते सुरक्षा निधी उभा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून विधीमंडळाच्या मागच्या अधिवेशनात यासंदर्भातील निर्णय झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पोलीस आयुक्त पडसलगीकर म्हणाले की, मुंबईसारख्या शहरात अपघातांमध्ये दरवर्षी पाचशे ते सहाशे जणांचा मृत्यू होतो. देशभरात दरवर्षी लाखो लोक अपघातांमध्ये बळी पडतात. देशाच्या मनुष्यबळाची होणारी ही खूप मोठी हानी आहे. हे रोखण्यासाठी वाहतुकीतील शिस्त आवश्यक असून लोकांनी जाणीवपूर्वक यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अपर पोलीस महासंचालक पद्मनाभन म्हणाले की, वाहतुकीमधील बेशिस्त रोखणे ही काळाची गरज झाली आहे. याशिवाय चांगल्या वाहतूकीसाठी दर्जेदार पायाभूत सुविधांचीही आवश्यकता आहे. शिस्तबद्ध वाहतुकीविषयी संवेदनशील होऊन आपण अपघातांमधून होणारी मोठी प्राणहानी टाळू शकतो, असे ते म्हणाले.
वाहतूक नियंत्रणासाठी हेल्पलाईन
वाहतुकीवर नियंत्रणासाठी मुंबई वाहतूक पोलीसांमार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी सहपोलीस आयुक्त (वाहतूक) भारंबे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. मुंबईत वाहतूक नियंत्रणासाठी MTP (Mumbai Traffic Police) हे ॲप्लिकेशन सुरु करण्यात आले असून त्यावर वाहतूक शाखेशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय ८४५४९९९९९९ या क्रमांकावर हेल्पलाईनही सुरु असून या सेवांचा लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारंबे यांनी यावेळी केले.
परिवहन आयुक्त डॉ. गेडाम यांनीही यावेळी सादरीकरण करुन आरटीओ शाखेमार्फत सुरक्षीत वाहतुकीसाठी केल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. (सौजन्य - महान्युज)