कल्याणी खोना... अपघातातून तीन वेळा सावरुनही आयुष्य सुरेख आहे, असा मंत्र देणाऱ्या उत्साहमुर्ती !

कल्याणी खोना... अपघातातून तीन वेळा सावरुनही आयुष्य सुरेख आहे, असा मंत्र देणाऱ्या उत्साहमुर्ती !

Wednesday December 23, 2015,

5 min Read

अपघात... जे आपल्याला बदलतात. ते आपली स्वत:शीच ओळख करून देतात! कयानी खोना यांच्यासाठी हे वाक्य म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं ब्रीदवाक्य झालं.

२०१३ मध्ये संस्कृती आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत कल्याणी यांना ब्राझीलला जायला मिळालं. तिथे त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिकवण्याची संधी मिळाली. याच प्रवासात त्यांना बेलेम या शहरातही जायला मिळालं. बेलेम गरीबी आणि गुन्हेगारीमुळे कुप्रसिद्ध आहे. त्यावेळी तिथं होत असलेल्या फुटबॉल वर्ल्डकपसाठी फिफाला होत असलेल्या विरोधानंही जोर धरला होता. पण म्हणतात ना ! नशीब कसे खेळ खेळते. एका संध्याकाळी एक गुन्हेगार तिचा पाठलाग करू लागला आणि चोरल्या गेलेल्या तिच्या बॅगेत तिचा पासपोर्ट हरवला. पण कल्याणीनं या परिस्थितीचा सामना न डगमगता करायचा ठरवला. एक घटना म्हणून विसरून जायचं त्यांनी ठरवलं. आता ही या घटनेची आठवण आली की त्या हसतात, " खरंतर मी घाबरून जायला हवं होत. एक तर परदेश, तिथली भाषाही मला येत नव्हती आणि माझी ओळख दाखवणारं कागदपत्र चोरीला गेलेलं." पण कल्याणी यांच्यासाठी ही घटना म्हणजे एक शिकवण ठरली. त्या म्हणतात,

image


"तुम्हाला काही माहित नसेल, सर्व काही मनाविरुद्ध घडत असेल तर एकच मंत्र लक्षात ठेवायचा, तो म्हणजे, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. म्हणजे सर्व काही तुम्हाला आकलन व्हायलाच हवं असं काही नाही. कारण मला माहितेय की, सगळं काही व्यवस्थित होणार आहे."

कल्याणीची मुलाखत घेताना हे सतत जाणवत होतं की त्या या मंत्राचा अक्षरश: जयघोष करत असणार. पण त्यांच्या बाबतीत हे इतकंच नाही तर बरंच काही बोलण्यासारख आहे. एक व्यक्ती म्हणून कल्याणी यांना अनेक गोष्टी करण्याची घाई आहे. ज्या गोष्टींमुळे त्यांच्या भवितव्याला आकार मिळेल आणि परिणाम म्हणून कल्याणी यांनी बऱ्याच गोष्टी शिकल्या. मार्केटिंग ते पी. आर . २०१२ ते २०१४ या काळात त्यांनी २० वेगवेगळे प्रकल्प हाती घेऊन ते पूर्ण केले.

आपल्याला नेमकं काय हवंय हे जाणून घेण्यासाठी त्या अनेकांना भेटल्या. त्यांची आवड नेमकी कशात आहे ते त्यांना समजत नव्हतं . मुंबईतल्या एच आर महाविद्यालयात वाणिज्य विषयात पदवी मिळवलेल्या कल्याणी यांचा नेहमी वर्गात वरचा क्रमांक असायचा. त्यांच्या मित्र परिवारानं त्यांना सल्ला दिला तो म्हणजे, जे सगळे हुशार विद्यार्थी करतात ते करायचा. चांगल्या नामांकित, बहुराष्ट्रीय कंपनीत काम करायचं. पण त्यांना कुठेतरी हे रुचलं नव्हतं. त्या म्हणतात, "सगळ्या छोट्या गोष्टी पुढे मोठ्या होतात." कुठेतरी त्यांना ही जाणीव होती की त्यांचे अनुभव हे त्यांच्यासाठी एक मोठं पोट्रेट बनणार आहे, ज्यावर त्या अभिमानानं स्वत:चा हक्क सांगू शकतील.

image


अपघात क्रमांक २

असं म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीला एक वेगळा शेवटही असू शकतो. एक विरोधी शेवट! त्यांच्या बाबतीत शेवट नाही झाला तर एका वेगळ्या भव्य गोष्टीची सुरुवात त्यांच्या आयुष्यात झाली.

इतर मित्र-मैत्रिणीनी नोकऱ्या शोधल्या म्हणून मग त्यानीही एक नोकरी स्वीकारली. त्यांना नोकरी सुरु करण्यापूर्वी एकदा मनसोक्त भटकायचं होत, हिमालयामध्ये, २० दिवसांसाठी, १४,००० फुट ट्रेकिंग !आणि तेंव्हाच त्यांच्या आयुष्यातला हा दुसरा अपघात झाला. अपघात म्हणजे काहीतरी नवा उद्यम सुरु करण्याचा विचार! आता या घटनेला एक वर्ष झालंय आणि तुम्हाला अजूनही त्या असंच म्हणताना दिसतील, की त्या अपघातानं झालेल्या उद्यमी आहेत. पण सुरु करण्याचा विचार करणं यावर त्याचं साहस थांबलेलं नाही तर त्यांनी असा उद्योग सुरु केला ज्याची त्यांना अजिबात माहिती नव्हती. त्यांनी विशेष गरज असणाऱ्या व्यक्तींसाठी एक विवाह जमवणारी संस्था सुरु करायचं ठरवलं.

त्या जीवनातल्या आपल्या तत्वज्ञानाशी कायम राहिल्या ते म्हणजे सगळं काही ठिक होणार आहे. यावर कल्याणी म्हणतात, " इथे गरज आहे ती एका बदलाची ! इथे नुसता कळवळा किंवा कणव वाटून उपयोग नाही तर समजून घेणं गरजेचं आहे. नुसतं वाईट वाटतं म्हणून रस्ता पार करायला मदत करून दिली म्हणजे झालं असं नाही तर थांबून त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांची आस्थेनं विचारपूस करायला हवी की आज तुम्हाला कस वाटतंय ? "

बेंगळूरूमधल्या एका परिषदेच्या दरम्यान कल्याणी तिथे होत्या. चाळीशीतल्या नारायणला व्हील चेयरमधून जाण्यास मदत करत होत्या. काही महिन्यांपूर्वी नारायण यांनी कल्याणीला संपर्क साधला तो सोशल मिडियामध्ये त्यांची माहिती वाचून. नारायण यांनी कल्याणीला एक मेल लिहिला, की त्यांच्या आयुष्यात धन, दौलत, पैसा, घर सर्व काही आहे ,फक्त जीवाभावाचं माणूस नाही ज्याच्याकडे परतायची इच्छा होईल. त्यांचा हा एकटेपणा कुठेतरी कल्याणीला खटकला.

प्रत्येक सजीवाची एक सामाजिक गरज असते. जी पूर्ण न झाल्याने नैराश्य येतं. हे साधं गणित आहे. कल्याणी सांगतात, आज त्यांची फर्म ‘वाॅण्टेड अम्ब्रेला’ ही विशेष गरज असणाऱ्या अपंगांसाठी एक मोबाइल डेटींग एप सुरु करत आहे. 'लवेबिलिटी ' हे त्याचं नाव. आणि हा एप सर्वांसाठी आहे म्हणजे सर्वसामान्य लोकही या एपला भेट देऊ शकतात आणि अपंग व्यक्तींबरोबर मैत्री करू शकतात.

image


तिच्याविषयी अधिक जाणून घेताना आपल्याला कळतं की, अरेच्या या तर फक्त २२ वर्षांच्या आहेत. हा मोबाइल एप त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी सुरु केला. त्यांना अद्यापही अपंगांच्या संज्ञा समजायच्या आहेत. त्यासाठी त्या इंटरनेटची मदत घेतात आणि अशा वेळी त्यांची आपल्या कामाबद्दल असलेली आस्था आवर्जून दिसून येते.

कल्याणीसाठी हे विशेष सक्षम असलेले लोक प्रेरणादायी ठरतात. " खरंतर हेच लोक समाजातले आदर्श आहेत. ते माझ्याचसाठी नव्हे तर संपूर्ण समाजाला एक प्रेरणा देतात. त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे."

या दुसऱ्या अपघातातून त्या काय शिकल्या असेल बरं?

तर त्या हसतात आणि म्हणतात, " तुम्ही शुन्य पैशांतून काहीही सुरु करू शकता. तुम्हाला भले त्याचा अनुभव नसेल तरीही आणि आधार नसला तरीही तुमच्या बाबतीत सारं काही ठीक होणार आहे."

तिसरा अपघात :

लवेबिलिटी हे त्यांच्या तिसऱ्या अपघाताच नाव ! २०१५ मध्ये त्यांनी त्याचं हे एप विशबेरी या क्राऊडसोर्सिंग व्यासपीठावर ठेवलं.

आज या एपला १४३ समर्थकांकडून , ६लाख १५ हजारांचा निधी जमा झाला आहे. आणि यावर त्यांची प्रतिक्रिया आहे ," जोवर या जगात प्रेम आहे, तोवर मला माहितेय , माझ्याबाबतीत सर्व काही व्यवस्थित होणार."

हा खरंच एखादा अपघात असू शकतो का ? यावर त्याचं उत्तर आहे, " हो ! मला असं वाटत की आपल्याला योग्य आहे ते आपल्याला मिळतं. आपल्याला काय हवंय, ते मागावं लागतं हे मात्र मी सर्वाना सांगू इच्छिते . मी विशबेरीवर विचारलं आणि त्या बदल्यात मला खूप प्रेम मिळाल." कल्याणीनं एका सकारात्मक विचारावर आपली मुलाखत संपविली.

image


मुलाखत संपवता संपवता कल्याणीनं सांगितलं की त्या सकाळपासून अनेक बैठकांमध्ये धावताहेत. आणि कसल्या बैठका? यावर त्याचं उत्तर आहे , त्या सामाजिक न्याय विभागासाठी सल्लागार म्हणून काम करतात. त्याचबरोबर , पंतप्रधानाच्या एक्सेसिबल इंडिया कार्यक्रमासाठी त्या एक योगदानकर्त्याही आहेत .

कल्याणी यांनी नव्या पिढीसाठी एक आदर्श परिपाठ घालून ठेवला आहे. त्या जे काही करतायत यासाठी नव्हे तर आवड किंवा ध्येय म्हणजे काय हे जाणून घेण्याची तळमळ असणाऱ्या प्रत्येकासाठी त्याचं कार्य हे प्रेरणादायी आहे. त्याचं काम हे कोणत्याही सामान्यांना , ज्यांना काहीतरी वेगळं करवून दाखवण्याची इच्छा आहे, त्यांना प्रेरणा देणारं आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर अपघातांकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आपसूकच आपल्याला मिळते.

मुळ लेखक – तरुष भल्ला

अनुवाद – प्रेरणा भराडे

    Share on
    close