राज-मणी: कच-यासाठी अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी सोडणारे दोन भारतीय.

देशप्रेम म्हणजे काय असतं ? देशासाठी काही करावं म्हणजे नेमकं काय करावं ? या प्रश्नांची उत्तरं मणी वजीपेय आणि राज मदनमोहन या दूरदृष्टी असलेल्या दोन तरूणांच्या कार्यातून मिळतात. भारतातलं घाणीचं साम्राज्य ज्यांना अस्वस्थ करून गेलं, ज्यांना भारतातल्या सार्वजनिक आरोग्याची चिंता वाटू लागली, या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेता यावं म्हणून अमेरिकेतल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर ज्यांनी पाणी सोडलं, अशा दोन झपाटलेल्या तरूणांच्या कार्यकर्तृत्वाची ही कथा.

राज-मणी:
कच-यासाठी अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी सोडणारे दोन भारतीय.

Thursday August 20, 2015,

6 min Read

बनयन हा असंघटित क्षेत्रातला एक उच्च तंत्रज्ञानाने युक्त असलेला सामाजिक उपक्रम आहे. भारतातल्या घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत येणा-या रिसायकलिंग व्हॅल्यू चेन पद्धतीत उद्‌भवणाऱ्या समस्या नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सोडवणं, रिसायकल करता येईल असा कचरा वेगळा करणं आणि डंपिंग ग्राऊंडवर कच-याचा डोंगर उभा राहू न देता, तिथून अधिकाधिक कचरा रिसायकलिंग प्रक्रियेसाठी वळवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

बनयन कंपनीचे शिलेदार

बनयन कंपनीचे शिलेदार


रिसायकल करता येईल असा कचरा वेगळा करून त्याचं वर्गीकरण आणि एकत्रिकरण करणं, वर्गीकरणानंतरची प्रक्रिया करणं, रिसायकल करण्याजोग्या पदार्थांवर नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुनर्प्रक्रिया करणं, या माध्यमातून भारतातल्या रिसायकलिंग व्हॅल्यू चेन पद्धतीतली अकार्यक्षमता खणून काढणं ही महत्त्वाकांक्षा घेऊनच बनयन उपक्रमाची सुरूवात झाली.

बनयनचे सीईओ आणि एक संस्थापक मणी वजीपेय म्हणातात, “ आमचं मिशन हे असंघटित क्षेत्रामध्ये प्रगतशील रिसायकलर्स शोधून काढणं आणि त्यांची देखभाल करणं, त्यांच्या विकासासाठी त्यात पुरेशा संधी निर्माण होतील, तसेच त्यांच्या कमाईच्या क्षमता वाढतील अशा तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचं जीवनमान उंचावणं हे आहे.“

दमदार सुरूवात

बनयनचा जन्म कसा झाला हे जाणून घेणं खरोखर प्रेरणादायी ठरेल. मणी जेव्हा भारतात आले तेव्हा प्रवासादरम्यान त्यांना सगळीकडे घाण आणि घाणच बघायला मिळाली. सार्वजनिक ठिकाणांवर अशी घाणीची परिस्थिती बघितल्यानंतर मणी खूपच अस्वस्थ झाले. याच परिस्थितीकडून त्यांनी कच-याची समस्या नष्ट करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीनं एक संस्था स्थापन करण्याची प्रेरणा घेतली. त्यांना लक्षात आलं, की अशा संस्थेच्या माध्यमातून भारतात घनकचरा व्यवस्थापनाचं चांगलं चित्र निर्माण होऊ शकेल. शिवाय व्यवस्थापनातल्या चांगल्या पद्धती रूजवणं आणि सर्वसामान्य लोकांना या प्रक्रियेत कार्यप्रवृत्त करणं, अशी कामं संस्थेच्या माध्यमातून नक्कीच होऊ शकतील.

मणी यांनी स्टीव्ह बँक लीन लॉंच पॅड कार्यक्रम आणि कोलंबिया ग्रीनहाऊस इनक्यूबेटर इथं बनयनचं बिझनेस मॉडेलच विकसित केलं. तंत्रज्ञानाचा कल्पकतेनं उपयोग करून मोठ्या आत्मीयतेने समाजाशी संबंधीत असणारी कच-यासारखी समस्या सोडवण्याचं स्वप्न घेऊन तंत्रज्ञ राज मदनगोपाल हे सहा महिन्यानंतर परदेशात आले. मणी म्हणतात, “आम्हा दोघांची मैत्री २००२ सालात डेलवरच्या न्यूयॉर्क टाऊन विद्यापीठात झाली. वर्गाला दोघे सोबत दांडी मारणारे आम्ही, पुढे घनिष्ट मित्र बनलो. ”

त्यावेळी डेलवर विद्यापीठातून मणी इलेक्ट्रीकल इंजिनियरींगमध्ये ( वायरलेस कम्युनिकेशन) पीएचडी करत होते. तर राज हे मेकॅनिक इंजिनियरींगमधून (रोबोटिक) मास्टर्स करत होते. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. मणी पोहचले सॅन डिगोच्या क्वालकॉममध्ये, तर राज सियाटलमध्ये मोबाईल स्टार्टअपमध्ये रूजू झाले. दहा वर्षांनंतर फोनवर बोलताना सहजपणे मणी यांनी भारताच्या घनकचरा व्यवस्थापन समस्येबाबत आपलं व्हिजन काय आहे याबाबत विषय छेडला आणि त्यासोबत त्यांनी बर्कली आणि कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये विकसित करत असलेल्या त्यांच्या बिझनेस मॉडेलबद्दल राजना सांगितलं. त्यानंतर कोलंबियाच्या इनक्यूबेटरचा एक भाग म्हणून मणी आणि राज यांनी ग्राहक शोधणं आणि आपलं मॉडेल कार्यान्वित करण्याच्या उद्देशानं दोघांनी हैद्राबाद आणि बंगळुरूला भेटी दिल्या.

मणी पुढं म्हणतात, “ नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या ब-याच मोठ्या महानगर पालिकांच्या व्यवस्थापकांशी आम्ही बोललो. हैद्राबादमध्ये काही वसाहतींना भेटी दिल्या, अनेक शहर पालिका आयुक्तांच्या भेटी घेतल्या, खासगी घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदारांना भेटलो. शहरातले चिंध्या वेचणारे, रद्दीवाले, कबाडीवाले अशांच्याही भेटी घेतल्या.”

मणी आणि राज यांनी तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ कसून मार्केट रिसर्चचा अभ्यास केला. ते लोकांशी बोलले. यातून मग दोघांना असं जाणवलं, की या देशाला तातडीनं एका अशा एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन कंपनीची गरज आहे, जी कचरा गोळा करण्यापासून तो डंपिंग ग्राऊंड पर्यंत वाहून नेईपर्यंत, डंपिंग ग्राऊंड व्यवस्थापन, रिसायकलिंग आणि कच-यापासून वीज निर्मिती करणं, अशी घनकचरा व्यवस्थापनातली सर्व प्रकारची कामं तडीस नेईल आणि परीपूर्ण अशी व्हॅल्यू चेन पद्धत विकसित करेल.

त्यानंतर दोघेही मग युएसला परतले. तिथे दोघांनी तीन महिने बे विभाग आणि न्यूयॉर्क शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया कशी चालते याचा अभ्यास केला. तिथे त्यांनी डंपिंग ग्राऊंड्सना भेटी दिल्या, कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणा-या प्लांट्सना भेटी दिल्या, रिसायकलिंग केंद्रांना भेटी दिल्या. 

हे काम पूर्ण झाल्यानंतर मग दोघांनी आपल्या लठ्ठ पगारावर पाणी सोडत आपल्या नोक-या सोडल्या आणि ते भारतात आले. त्यानंतर २०१३ च्या जुलै महिन्यात दोघांनी बनयनची स्थापना केली. या संस्थेनं महानगर पालिका क्षेत्रातल्या घनकचरा व्य़वस्थापनावर आपलं लक्ष केंद्रीत केलं.

या विषयाकडे लक्ष वेधताना राज म्हणाले, “संपूर्ण देशभरातून आम्ही या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदांचा आढावा घेतला आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या आघाडीच्या बायोगॅसपासून वीज निर्मिती करणा-या कंपनीसोबत भागीदारी करत राऊरकेला स्टील प्लांट कंपनीसोबत ‘कच-यापासून वीज निर्मिती’ करारात सहभागी झालो.

लाल फीत आणि स्वायत्ततेचा अभाव: भारतातल्या नव्या कंपन्यांसाठी अडथळे

संबंधीत अधिका-यांना स्वायत्तता नसणं आणि सोबत लाल फीतीचा कारभार, ही कारणं भारतात नाविण्यपूर्ण प्रकल्प सुरू करण्यातले अडथळे आहेत.

यामुळं निविदा प्रक्रिया आणि बोलणी करणं अशा महत्त्वाच्या कामांसाठी पाच पाच महिने खर्ची घालावे लागतात. म्हणजे हेच बघा, की २०१३ सालच्या जून महिन्यात सुरू झालेली निविदा प्रक्रिया पूर्ण व्हायला महिनोंमहिने गेले.

मणी म्हणतात, “ या परिस्थितीनं आम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवला. शहरांमधल्या घन कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम कंपनीची नितांत आवश्यकता असूनही भारतातल्या नगरपालिका, महानगर पालिकांची धोका पत्करणं आणि नवं काही तरी करणं याबाबतची भूक अगदी मर्यादित स्वरूपाची होती.” 

भारतात नवी सुरूवात करणा-या कंपन्या सरकारपासून दूर का राहतात ? 

या परिस्थितीमुळं मग एक मध्यवर्ती कल्पना पुढे आली. ती म्हणजे भारतातल्या घन कचरा व्यवस्थापनाच्या जगात अशा मॉडेलद्वारे उतरायचं जे टॉपलाईन महसुलासाठी सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या शासकीय संस्थांवर अवलंबून नसेल.

मणी पुढे म्हणतात, “ रिसायकलिंग क्षेत्र हे जणू नैसर्गिकरित्या आमच्यासाठीच होतं. दरवर्षी, भारतात ६.७ दशलक्ष टन इतकं रिसायकल करण्याजोगं मटेरिअल डम्प केलं जातं. (याची किंमत १९ हजार कोटी रुपये इतकी भरते) हा सगळा कचरा जमिनीत डम्प करत असताना स्वच्छतेचे नियम पाळले न गेल्यामुळं पर्यावरणाची गंभीर स्वरूपाची हानी होत आहे.” या रिसायकलिंग व्हॅल्यू चेन प्रक्रियेशी संबंधीत असंघटीत क्षेत्राचा भाग मोठा आहे आणि त्यामुळेच हे क्षेत्र ७० टक्के इतका जगात सर्वात जास्त असलेला रिसायकलिंग रेट देत होता. उपरोधिकपणे, चिंध्या वेचणाऱ्या वर्गाला बहिष्कृतांसारखी वागणूक मिळत असते, आणि या व्हॅल्यू चेनच्या शेवटाला असलेले हे भटके, कचरा वेचणारे आणि जवळचे रद्दीवाले यांना रोजगार मिळावा, तसच खेळतं भांडवल उपलब्ध व्हावं म्हणून मध्यस्थी असलेल्या मोठ्या व्यापा-यांवर अवलंबून राहावं लागतं.

भारतात हे व्यापारी चिंध्या वेचणारे, कचरा गोळा करणारे आणि रद्दीवाल्याचं शोषण करत असल्याचं मणी आणि राज यांच्या लक्षात आलं. या नाडलेल्या कामगारांना आणखी कर्ज द्यायचं आणि आपल्यालाच त्यांचा माल विकायला लावायचा, तो ही बाजारात असलेल्या किंमतीहून काहीसा स्वस्त दरात. अशा पद्धतीनं हे व्यापारी चिंध्या वेचणारे, फिरते कचरा वेचणारे आणि रद्दीवाल्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. या परिस्थितीमुळं राज आणि मणी यांनी भारतात निर्माण झालेल्या शोषणावर आधारीत रिसायकलिंग व्हॅल्यू चेनला अडथळा निर्माण करण्यासाठी आपले नवे बिझनेस मॉडेल तयार केले. मणी आणि राज यांनी भारतासाठी रिसायकलिंग बिझनेस मॉडेल तयार केल्याबरोबर त्यांचे मित्र आणि कुटुंबियांनी पैसा उभा कऱण्यासाठी विशेष प्रयत्न करून तारण म्हणून १००००० अमेरिकन डॉलर इतकी रक्कम एका आठवड्यात उभी केली.

तंत्रज्ञान हीच बनयन या संस्थेची उत्पत्ती आहे.

बनयनचं स्वत:चं सक्षम असं सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. अँड्रॉईडवर आधारित असंघटित क्षेत्राचे जनरेटर अॅप आहे. कामकाज मनाप्रमाणे व्हावं आणि ते कंपनीला अनुकूल असावं यासाठी कामकाजावर कंपनीचं पूर्ण नियंत्रण राहणं आवश्यक असतं. यासाठी डेटा अॅनालिस्ट इंजिन, रोजच्यारोज कामगिरीत सुधार व्हावा, असंघटीत क्षेत्रामधून प्रगतीशील रिसायकलर्सचा शोध घेणे आणि त्यांना टिकवून ठेवणे, यासाठी एसएसएस वर आधारीत ट्रेडींग प्लॅटफॉर्म. कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी व्हावी यासाठी या मॉडेलमध्ये GPS वर आधारीत राऊटींग आणि ट्रॅकिंग इंजिन सुद्धा आहे.

लोकांमध्ये, उद्योगांमध्ये जागृती निर्माण व्हावी, त्याचप्रमाणे आपल्या भागात सुरू झालेलं काम व्यवस्थित चालत रहावं, आपल्या धोरणात आवश्यक ते उपयुक्त बदल अंगीकारले जावेत यासाठी नगरपालिका आणि महानगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना उपयुक्त दृष्टीकोण निर्माण व्हावा या उद्देशानं बनयन ही संस्था व्हॅल्यू चेनच्या प्रत्येक टच पॉईंटला नियमितपणे मिळवलेला कच-याच्या विश्लेषणाचा अहवाल तयार करत असते.

महसुलाचं मॉडेल

गाठींच्या स्वरूपात प्रक्रिया करून तयार केलेल्या रिसायकलेटची विक्री करणं, पुनर्प्रक्रिया करणा-यांना आणि उत्पादकांना पेलेट्स आणि चीप्स विकणे, या माध्यमातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कमॉडिटीज बाजारातून प्रामुख्याने संस्था महसुल तयार करते.

कंपनीचं वेगळेपण आणि युएसपी

कचरा गोळा करण्यापासून आणि दळणवळणापासून ते अगदी प्रक्रिया आणि रिसायकलिंग करून तयार झालेल्या मालाच्या विक्री पर्यंत परिपूर्ण अशी सेवा देत, संपूर्ण सप्लाय चेनवर पूर्णपणे नियंत्रण राखत आणि पुरवठादारांच्या जाळ्यात समावेश करून असंघटित क्षेत्राला मजबूत बनवत कंपनीनं आजच्या स्पर्धेच्या युगातलं स्वत:चं आपलं वेगळेपण अधोरेखित केलय. 

या महिन्याच्या अखेरीपर्यंत १५०० हून अधिक कबाडीवाल्यांचं एकत्रिकरण करून कंपनीच्या पुरवठादारांच्या नेटवर्कमध्ये त्यांना जोडणं ही कंपनीची ‘स्टार्टअप' योजना आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये कंपनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये एकाचवेळी सुरू होणार आहे.