महात्माजींच्या सत्यवचनी व्यक्तिमत्वाची नालस्ती कधीच होऊ शकत नाही!

महात्माजींच्या सत्यवचनी व्यक्तिमत्वाची नालस्ती कधीच होऊ शकत नाही!

Saturday September 17, 2016,

6 min Read

मागील सप्ताहात माझ्या लेखाने देशभरात खळबळ माजली होती. समाजाच्या सर्वच स्तरावरील लोकांमध्ये त्यावर चर्चा रंगल्या. प्रत्येकाची आपली मते होती. काही म्हणाले की, माझे म्हणणे खूपच आगाऊपणाचे आहे आणि काहीनी मी जी मते मांडली ती मूर्खपणाची असल्याचा अभिप्राय दिला. काहींनी तर माझ्या राजकीय कारकिर्दीचा अंत झाल्याचे भाकीत केले. मला अनेकांचे निषेधाचे मेल आले.माझ्या वॉटसप मध्ये तर संदेशांच्या अनेक प्रकारच्या मतांचा भडिमार झाला. त्यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे संदेश होते. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर न संपणा-या चर्चा झाल्या. वृत्तपत्रातून संपादिकय मते छापून आली. ज्येष्ठ पत्रकारांची अनेक मुद्दे मांडणारी मते प्रसिध्द झाली, पण मी शांत होतो.

माझा लेख राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत नव्हता. पण तो एका महात्म्याबाबतचा संदर्भ होता,ज्यांनी आम्हा भारतीयांना बोलण्याचे श्वास घेण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यांना महात्मा गांधी म्हणतात. माझ्या लिखाणातील टीका वाचून माझ्या काही टीकाकारांना वाटले की मी त्यांचा अवमान करण्यासाठी बोलतो आहे, अनेक वर्षानंतर या देशात त्यांच्या बद्दल अशा प्रकारे कुणी बोलत होते, त्यांच्या बद्दल जाणून घेऊ इच्छित होते, याबद्दल बोलताना एका भारताच्या थोर सूपुत्राने म्हटले आहे की, “ माझ्या जीवनातील हे वैशिष्ट्य आहे की मी श्रीमान गांधी यांना व्यक्तिश: ओळखतो, आणि मी तुम्हाला खरे तेच सांगेन, वेगळे, शूरत्वाचे आणि आगळे वेगळे चैतन्य अशाप्रकारे भूतलावर खचितच अवतरले नसेल. ते पुरूषातील अव्दितीय पुरुष होते, आदर्शातील महान आदर्श होते, राष्ट्रभक्तातील महान राष्ट्रभक्त होते, आणि आम्ही असे नक्कीच म्हणू शकतो की, त्यांच्यातील भारतीय मानवता उच्च पातळीवर पोहोचणारी होती.” हे वक्तव्य करणारे थोर पुरूष दुसरे कुणी नाहीतर थोर समाज सेवक देश भक्त गोपाळ कृष्ण गोखले होत.

image


काही लोकांसाठी माझे लिखाण बुचकळ्यात टाकणारे होते. सत्य काय आहे? मी ते पुन्हा कधीतरी सांगेन. पण मी जर कधी व्यक्ती म्हणून कुणाचा सन्मान केला असेल तर ते मो.क गांधीच आहेत. मी काही अंधभक्त नाही. किंवा मी आंधळा समर्थकही नाही. पण मला प्रामाणिकपणाने असे वाटते की, खरोखर श्रेय द्यायचे झाले आणि भारतीयांच्या मनात ब्रिटिशांच्या साम्राजाच्या विरोधात जनक्षोभ निर्माण करणारे बापूच होते. तेथे जर सामुहिक नेतृत्व करून जागृती निर्माण केली असेल तर तिचे श्रेय महात्मा गांधी यांचेच आहे. आणि त्यांनी हे सारे अत्यंत वेगळ्या पध्दतीने केले जी रुढ पध्दत नव्हती. ज्यावेळी इतिहास आणि संस्कृती यांचा हिंसे सोबत अविष्कार केला जात होता. बापूंनी वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी जीवावर उदार होऊन अहिंसेचा मार्ग निवडला.

सध्याच्या पिढीला कदाचित माहिती नसेल की कधीकाळी ते सुध्दा हिंसेचे समर्थक होते. त्यांनी स्वत:च मान्यही केले होते की, “ ज्यावेळी मी इंग्लडला गेलो, मी हिंसेचा पुरस्कर्ता होतो. मला त्यावर विश्वास होता आणि अहिंसावादी मी नव्हतो.” पण एका रशियन लेख काचे लिओ टॉलस्टॉय यांचे वाचन केल्यानंतर ते बदलणारे व्यक्ती होते. गांधी स्पष्ट आणि प्रामाणिक होते. हिंसा आकर्षक वाटते. ती अतिसंवेदनशील असते. ती उत्कंठा वाढवणारी असते. इतिहासात विरश्रीयुक्त हिंसेची अनेक उदाहरणे देण्यात आली आहेत. हिंसेने इतिहासाचा मार्ग कसा बदलला आहे, १९१७मधील रशियन क्रांती ही नवीन घटना होती. हा तो काळ होता जेव्हा मार्क्सवाद आणि साम्यवादाचा बोलबाला जगभर होता. त्यातून अनेक महान हुशार नेते निर्माण झाले. मार्क्सवादाने हिंसेचे समर्थन केले आहे समानतेच्या नावाखाली, श्रमिक वर्गासाठी,समाजाच्या इतर निर्मितवर्गासाठी, वर्गीय शत्रुत्वासाठी आणि लोकांना बंधमुक्त करून भांडवलशाहीच्या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी. सिझरच्या काळापासून लेनीनच्या काळापर्यंत हिंसेचे उदात्तीकरण पहायला मिळेल. पण गांधी साधे सामान्य व्यक्ती नव्हते जे अशा उदाहरणांमुळे बधले असते. त्यांनी अहिंसेचे तत्व मान्य केले होते, “सत्याग्रह” हाच भारतीयांच्यासाठी ब्रिटीशांच्या विरोधात लढण्याचा मूलमंत्र होता. जेंव्हा सारा देश मदनलाल धिंग्रा यांनी सर कर्झन वेलस्ली यांचा वध केल्याच्या चर्चेत रंगला होता त्यावेळी, गांधी मात्र प्रतिक्रिया देण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते स्पष्टपणे म्हणाले होते, “ भारताला अशा खून सत्रातून काहीही मिळणार नाही- हरकत नाही ते काळे असोत की गोरे. अशा प्रकारच्या हुकमतीमध्ये भारताला चिरडून टाकले जाईल आणि यातून आपलेच नुकसान होईल.” गांधीजी यांचे नातू राजमोहन गांधी यांनी त्यांच्या “मोहनदास” या पुस्तकात लिहिले आहे की,- “ तिरस्काराची ही भावना त्यांनी (सावरकर) मग गांधीच्या बाबत मनात ठेवली जी १९०९मध्ये निर्माण झाली होती,ज्यावेळी गांधीजी यांनी वाईलीच्या खूनाचा दोष धिंग्रा यांना दिला होता.” सावरकरांना गांधी यांच्या हत्येसाठी अटक झाली होती मात्र नंतर पुराव्या अभावी सुटका झाली होती.

गांधी यांचे महानपण अशाप्रकारच्या दुश्वासाने कमी होत नाही, त्यांचे थोरपण त्यांच्या सच्चेपणात, धाडसात होते. त्यांनी असे कधीच सांगितले नाही जे त्यांनी त्यांच्या जीवनात अनुभवले नाही. आणि याची त्यांच्या कुटूंबाला मोठी किंमत द्यावी लागली. त्यांच्या पत्नी कस्तुरबा ज्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील दिवसांत जेंव्हा त्यांना सत्याग्रहात एकदा अटक झाली होती, कस्तुरबा आजारी पडल्या होत्या त्यांची स्थिती गंभीर झाली होती. त्यांना विनंतीरजा घेऊन पत्नीसमवेत रहा असे सांगण्यात आले होते, गांधीजींनी नकार दिला होता. त्यांनी पत्र लिहिले होते जे आजच्या काळातील कुणी नवरा बायकोला लिहू शकत नाही. “ जरी त्यांच्या मनाला यातना होत होत्या, तरी सत्याग्रहामुळे त्यांना त्यांच्याकडे जाता येत नव्हते”. जर त्यांनी हिंमत दाखवली आणि योग्य असा आहार घेतला तर त्यांची तब्येत सुधारेल, पण जर काही या आजारपणामुळे त्याचे बरे वाईट झाले, त्यांनी असा विचार करू नये की एकट्याने मरण आणि सोबत असताना मरण यात तसा काहीच फरक नसेल”

त्यांचा पूत्र हिरालाल यांनाही त्यांच्या या वागण्याचा विरोध होता. इतकेच काय पण अखेरच्या दिवसांत हिरालाल इतके निराश होते की,त्यांनी वडिलांसोबतचे सारे संबंध तोडून टाकले होते. ते नाराज होते कारण त्यांच्या वडिलांनी केवळ त्यांच्या शिक्षणाची आबाळ केली नव्हती तर त्यांना इंग्लडला कायद्याच्या अभ्यासाकरीता पाठविले जे त्यांना नको होते. प्रत्येक वडिलांनी हरिलाल यांचे ते गांधीजींना लिहिलेले पत्र वाचावे, त्यातील एक ओळ अशी होती, “ तुम्ही आम्हाला अज्ञानी ठेवले,” कुणी म्हणेल की गांधीजी वडील म्हणून अपयशी झाले, पण सत्य हेच होते की, त्यांना कुठेही तडजोड करायची नव्हती. अगदी त्यांच्या मुलासाठी सुध्दा. जर ते इतर सर्वांशी कठोर वागत असतील तर त्यांनी त्यांच्या मुलाशी देखील तसेच वर्तन ठेवायला हवे होते. सध्याच्या भारतातील राजकारणी जे आपल्या मुलांनी दिेलेला प्रत्येक शब्द खरा करण्यासाठी धडपडताना दिसतात त्यांना गांधीजीच्या कडून खूप काही शिकता येईल. त्यांच्या विचार आणि कृतीमध्ये सारे काही समान होते, त्यांच्या मते छगनलाल यांनी शिष्यवृत्ती घेऊन इंग्लडला जावून कायद्याचा अभ्यास करणे हिरालाल यांच्या पेक्षा योग्य ठरणारे होते. त्यामुळे छगनलाल गेले आणि त्यांचा मुलगा नाही जे वडील आणि मुलगा यांच्यातील वादाचे कारण ठरले.

गांधी महान होते कारण ते साधे होते. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये छक्केपंजे नव्हते. त्यांच्या वास्तवात काळे किंवा सफेद दोनच रंग होते. तेथे मधला करडा रंग नसे, त्यांच्यामते सत्यवचनी असणे हेच चारित्र्यवानपणाचे समाजातील व्ययच्छेदक लक्षण होते. आणि व्यक्तिगत जीवनात सुध्दा. पण दुर्दैवाने आज आपण ज्या काळात राहतो आहोत, जेथे सत्य मागच्या बाकावर गेले आहे, आणि समजणार नाहीत असे युक्तिवाद केले जात आहेत,ज्याला मानभावीपणा म्हणतात. गांधी महानच होते आणि राहतील. एका लेखाने त्याचे महत्व इतिहासात कमी होणार नाहीच पण त्यांचे महानपण अधिक उजळेल, त्यांच्या जीवनाच्या संशोधनातून त्यांच्या काळातील घटनांच्या विश्लेषणातून त्यामुळे चर्चा या होत राहिल्या पाहिजेत.

लेखक : आशुतोष,जेष्ठ पत्रकार

(आशुतोष हे आम आदमी पक्षाचे नेते आहेत, सदर लेखातील त्यांच्या मतांशी यूअर स्टोरी संपादक सहमत असतीलच असे नाही.)