शेतकऱ्यांचं फेसबुक ‘फार्मिली’

शेतकऱ्यांचं फेसबुक ‘फार्मिली’

Sunday October 25, 2015,

4 min Read


'फार्मिला' हा आपला उद्योग सुरू करण्यापूर्वी कार्तिक नटराजन यांनी अनेक स्टार्टअप आणि उद्योगांमध्ये प्रयोगशीलता दाखवली होती. “ मी माझं करीअर नेटवर्किंग टेलिकॉम क्षेत्रातून सुरू केलं. मी ९० च्या दशकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये जुनीपर नेटवर्कचा संस्थापक आणि स्थानिक व्यवस्थापक होतो. फक्त १८ महिन्यांमध्येच कंपनीची उलाढाल शून्यापासून ते ४ कोटी अमेरिकन डॉलरपर्यंत नेण्याचं काम मी केलं. यानंतर नेटवर्क क्षेत्रात नव्यानं येणाऱ्या आणि आधीपासून असलेल्या काही परकीय कंपन्यांना मदत करण्यासाठी कंपनीची स्थापना केली. आयपी टेलिफोनच्या क्षेत्रात दोन संयुक्त उद्योग ( स्नॉम आणि वेगास्ट्रीम) बदलले जे आजही काम करत आहेत. मी स्नॉमसोबतच्या उद्योगात होतो तिथेच माझा डॉ. क्रिस्टियन स्ट्रेडक यांच्याशी परिचय झाला आणि मैत्रीही झाली. १४ वर्षांपासून आमची मैत्री आहे. ते आता माझ्यासोबत फार्मिलीचे सीटीओ आणि सहसंस्थापक म्हणून काम करत आहेत. ”


image


कार्पोरेट क्षेत्रात ते यशाची शिखरं चढत होते. पण लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यात उद्योजकतेच्या कल्पना होत्या. “ माझे आजोबा चहाच्या मळ्याचे मालक आणि तांदळाचे व्यापारी होते. तर माझे वडील कॉफीच्या मळ्याचे मालक होते. मी या मळ्यांमध्येच लहानाचा मोठा झालो. त्यामुळेच मी मनानं कायम प्रफुल्लित असतो. याच कारणामुळे तीन वर्षांपूर्वी मी कर्नाटकच्या संकलेशपूरमध्ये कॉफी मळ्यात गुंतवणूक केली. यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या मुळांशी जोडलो गेलो कारण इथं जैविक शेती करता येणार होती आणि यातून खूप पैसाही मिळणार होता.”


image


मळ्यात गुंतवणूक केल्यानंतर कार्तिकचे मळ्यासाठी ऑरगॅनिक प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण फार्मिली सुरू होणं हा निव्वळ एक योगायोग होता.

इथल्या स्थानिक विद्यालयाच्या दुरूस्तीसाठी आम्ही निधी दिला, तसंच गावातील मंदिर उभारणीसाठी मदत केली. अशा गोष्टींमुळे तिथल्य़ा गावकऱ्यांमध्ये आमच्याविषयी कुतूहल निर्माण झालं होतं. बंगळुरूहून आलेला एक आयटीमधला तरुण गावात काय करतोय याविषयी लोकांमध्ये उत्सुकता होती. अनेक शेतकऱ्यांनी मला भेटून त्यांच्या भावना व्यक्त केल्या, “ तुम्ही जनहिताचं काम करताय ही चांगली गोष्ट आहे पण दानधर्म ही एकदाच करण्याची गोष्ट आहे. आम्ही माहिती तंत्रज्ञानाबद्दल बरंच काही ऐकून आहोत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना बंगळुरूमध्ये खूप पगारही मिळतो. पण त्यामुळे आमच्या आयुष्यात काहीही बदल झालेले नाही. या क्षेत्राची आम्हाला काही मदत होईल असा कोणता मार्ग आहे का ?”


image


” त्या लोकांनी हेही सांगितले की आम्ही शेतात आल्याची लागवड केली आहे आणि आम्ही आता ते आलं काढणार नाही. २-३ एकर शेती असलेले शेतकरी पीक का कापणार नाहीत हे जाणून मला धक्का बसला. आल्याच्या अतिरिक्त उत्पादनामुळे त्याचे भाव इतके उतरले आहेत की ते काढण्याचा खर्चही निघणार नाही असं मला सांगण्यात आलं. ही एकाच शेतकऱ्याची व्यथा आहे की संपूर्ण शेती क्षेत्रात अशीच परिस्थिती आहे याचा शोध जेव्हा मी घेतला तेव्हा शेतीमधील ३० ते ५० टक्के पदार्थ आपल्या ताटापर्यंत पोहोचतच नसल्याचं मला आढळलं, आणि यावर कोणीही काहीही करत नसल्याचंही दिसून आलं.

हे खूप भयंकर होतं. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत तर दुसरीकडे लोक भुकेने मरत आहेत. या समस्येचं उत्तर शोधण्याचा मी निर्णय घेतला. माझा शाळेपासूनचा मित्र बालामुरुगन जो २४ वर्षांपासून शेती करतोय त्याची मदत मी घेतली. तो आज फार्मिलीचा सह संस्थापक आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्यानंतर काढलेले निष्कर्ष हे रहस्यभेद करणारे होते.

उत्पादन आणि वितरण व्यवस्थेमधील सदोष व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचं शोषण होतंय हे या संशोधनातून पुढे आलं. यात खुले आणि लवचिक स्त्रोत सगळ्यात मोठे दोषी असल्याचं दिसत होतं. त्यानंतर दलालही तेवढेच दोषी होते. या समस्येवरील उपाय सोपा होता. शेतकरी उत्पादन करतात आणि त्याच्या विक्रीची जबाबदारीही त्यांच्यावरच टाकली जाते. त्यामुळे एकप्रकारची विसंगती निर्माण होते आणि शीतगृहांच्या अभावामुळे तर नुकसान प्रचंड प्रमाणात वाढतं.

या समस्येवर उपाय शोधायचा तर ज्या पद्धतीने खाद्यपदार्थांचं उत्पादन, वितरण आणि उपयोग केला जातो त्यात महत्त्वपूर्ण बदल केले जाणे आवश्यक आहेत. मागणीवर आधारित उत्पादन पद्धत अवलंबली जाऊ शकते. म्हणजे ग्राहक कशाची मागणी करतील त्यानुसार उत्पादन घेण्यात यावे. यात सुपरमार्केट, किराणा दुकानं आणि हॉटेल्सेसारखे ग्राहक असतील. यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव तसेच रोख पैसाही मिळेल.

खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि मागणीनुसार त्यांचं वितरण यांचा मेळ बसवून योग्य लॉजिस्टिकच्या आधारे एक यंत्रणा उभारण्यासाठी एका व्यासपीठाची गरज होती. नुकसान टाळण्यासाठी ६० ते १०० टक्के जादा खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. त्याचबरोबर जमीन आणि पाण्याचा इतरही उपयोग करता येणं या दोन्ही मोठ्या गोष्टी आहेत. यातूनच फार्मिलीचा जन्म झाला,” असं कार्तिक सांगतात.

शेतकऱ्यांचा थेट ग्राहकांशी, शेतकऱ्यांचा इतर शेतकऱ्यांशी संपर्क आणि शेतकऱ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाशी ओळख करुन देत शेतकऱ्यांना सशक्त करण्याचं काम फार्मिली करत आहे. कार्तिक याला शेतकऱ्यांचं फेसबुक म्हणतात. त्यांच्या मते, “ हे सर्व शक्य आहे पण त्यासाठी शेतकरी आणि त्यांची शेती डिजिटली दिसणं आवश्यक आहे. फार्मिलीने शेतकऱ्यांना एका मायक्रो वेबसाईटद्वारे हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं आहे. यात शेतकरी आपलं शेत, आपली क्षमता आणि आपलं उत्पादन दाखवू शकतात.”


image


खरेदीदार याच व्यासपीठावर आपल्याला आवश्यक त्या पीकाची मागणी नोंदवू शकतील. शेतकरी त्या मागणीला उत्तर देऊ शकतात आणि ऑनलाईनच ते भाव ठरवू शकतात. शेतकरी त्यावरच आपला माल विक्रीला ठेवू शकतात आणि त्यावर बोलीही लागू शकते.