शिक्षण आणि आरोग्य ही अशी दोन क्षेत्र आहेत जी देशाची दशा आणि दिशा कशी आहे ते सूचित करतात. ज्या देशातील लोक सुशिक्षित आणि आरोग्यसंपन्न असतील त्या देशाची प्रगती होते. त्यामुळे सरकारदेखील या दिशेने कामाला लागले आहे. त्यासोबतच अनेक लोक या क्षेत्रात काम करण्यासाठी पुढे येत आहेत. अश्याच एका व्यक्तीचे नाव आहे डॉक्टर बी आर लक्ष्मी ज्या एमडीसीआरसीच्या संस्थापक आहेत. ते कोयंबतूर तमिळनाडू मध्ये आहे.
एक व्यावसायिक असून आपली संस्था चालवणे, त्याच जोडीला गरिबांना मदत करणे हे खूपच मोठे काम आहे. बहुतेकवेळा असे पाहिले जाते की, गरिबांच्या मदतीला सरकारी किंवा इतर संस्था पुढे येतात, किंवा त्या ज्यांना सरकारकडून अनुदान मिळते अश्या संस्था हे काम करताना दिसतात. परंतू अश्या संस्था खूपच कमी असतात ज्या एक मोठे संशोधन केंद्र चालवतात आणि तरीही गरिबांच्यासाठी काम करतात. एमडिसीआरसी अशा निवडक संशोधन केंद्रापैकी एक आहे.
आयआयटी मद्रास येथून लक्ष्मी यांनी पीएचडी करताना बायोमँट्रीक आणि जेनेटिक्स हा विषय घेतला होता. त्यांनी कोयंबतूर येथे आपली मास्टर्सचा अभ्यास पूर्ण केला. महाविद्यालयीन काळापासूनच त्यांचा कल सामजिक विषयांकडे होता. त्यावेळी त्यांच्या एका प्राध्यापकांनी सांगितले की, विज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तेंव्हाच त्याचा खरा उपयोग सत्कारणी लागू शकतो. जर ते काही मूठभरांसाठी असेल तर त्याचा काहीच फायदा नाही. या गोष्टीची लक्ष्मी यांनी मनात खूणगाठ बांधली, आणि मग प्रयत्न सुरू केला की या माध्यमातून विज्ञान सामान्य आणि गरजू लोकांपर्यंत कसे पाहोचवता येईल?
सार्वजनिक आरोग्य नेहमीच त्यांच्या मनात घोळणारा विषय होता ज्यात त्यांना काहीतरी काम करावेसे वाटत होते. पीएचडी नंतर त्या परदेशात गेल्या. सिंगापूर, अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनींमध्ये काम केले. पण जेंव्हा त्यांचा मुलगा नवव्या वर्गात गेला तेंव्हा त्यांनी ठरवले की, त्या आता समाजासाठी काम करतील. मग त्या जागतिक बँकेच्या एका प्रकल्पात सहभागी झाल्या. तेथे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी काम सुरू केले. कार्यक्रमादरम्यान अनेक गांवे दत्तक घ्यायची होती. त्याच सुमारास त्या सुंदरा मेडिकल फाऊंडेशनच्या संपर्कात आल्या. परंतू त्याच वेळी त्सुनामी आली आणि सरकारने काही काळासाठी प्रकल्पाचे काम थांबविले. त्यानंतर त्यांच्याजवळ मस्क्यूलर डायस्ट्रिफीवर काम करण्याची एक संधी प्रकल्पाच्या रूपाने आली. त्यासाठी त्यांना डचसरकारकडून अर्थसहाय्य देखील मिळाले. असे असले तरी त्यांना स्वत:ला या आजाराबाबत फारसे ज्ञान नव्हते. त्यांना हे देखील ज्ञात नव्हते की याची व्याप्ती किती असू शकते? त्यामुळे त्यांनी हे समजावून घेण्यासाठी एका अमेरिकन डॉक्टरांना संपर्क केला आणि त्यांनी लक्ष्मी यांना संशोधनासाठी त्यांच्या प्रयोगशाळेत येण्यास सांगितले.
लक्ष्मी सांगतात की, ‘हेल्थकेअर हे क्षेत्र असे आहे की, चांगले निष्पन्न होण्यासाठी संशोधन करत राहिले पाहिजे आणि स्वत:ला अद्य़यावत केले पाहिजे. तुम्हाला आजारांच्या मुळाशी जाऊन शोध घेतला पाहिजे जेणेकरून लोकांना योग्य उपचार देता येतील. तुम्ही हे कधीच समजता कामा नये की तुम्हाला सारे काही माहिती आहे. आपल्या संशोधन क्लिनीकमध्ये लक्ष्मी मस्क्यूलर डायस्ट्रिफीने पिडीत मुलांवर इलाज करतात तेही मोफत!
म्यूटेसनबाबत जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यात संशोधनाची खूप गरज आहे त्यातून भविष्यात मुलांच्या उपचारांसाठी खूपच मदत होणार आहे. या आजारात मुले जास्त ग्रस्त असतात. लक्ष्मी आणि त्यांच्या सहका-यांनी चांगले काम केले आणि चार वर्षे जेंव्हा त्यांना अनुदान मिळत होते तेंव्हा ५०० रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले. परंतू चार वर्षांनंतर जेंव्हा अनुदानाची वेळ पूर्ण झाली तेंव्हा त्यांना हे काम बंद करायचे नव्हते. आता प्रश्न होता की त्या निधी कसा उपलब्ध करणार? लोकांना मदत कशी करणार? त्यावेळी सर्वच तज्ञांना लक्ष्मी यांनी एक मार्ग सूचविला. त्यांनी सर्वांनी मिळून एक विद्यापीठ सुरू करावे आणि लोकांना मदत करावी अशी कल्पना त्यांनी मांडली, ती सा-यांनाच भावली आणि त्यांनी लक्ष्मी यांना होकार दिला.
मस्क्यूलर डायस्ट्रीफी मुख्यत: लहान मुलांचा आजार आहे. तीन वर्षांचा असेपर्यंत मुल साधारण असते. पण नंतर त्याची लक्षणे जाणवू लागतात. जसे मुले अचानक खाली पडतात, आई-वडिलांना वाटते की तसे अशक्तपणामुळे होत असावे. त्यामुळे ते त्याला गांभिर्याने अनेकदा घेत नाहीत. परंतू मूल पाच वर्षांचे होते आणि तेंव्हाही हे प्रकार होत राहतात त्यावेळी ते डॉक्टरांना दाखवतात. एमडीसीआरसी जवळ आज ३५०० मुलांची माहिती आहे, ज्यांना हा आजार झाला आहे. एमडिसीआरसी सातत्याने या मुलांवर उपचार करत आहे. २०११मध्ये एमडिसीआरसीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरूवात केली. त्यावेळी लक्ष्मी यांना समजले की या आजाराने ग्रस्त मुलांची संख्या खूप मोठी आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने लक्ष्मी आणि त्यांच्या सहका-यांना अग्रीम संशोधनासाठी एक केंद्र दिले आहे. याशिवाय लक्ष्मी यांनी जेंव्हा आपल्या कामाबाबत विविध व्यासपीठांवर जाऊन सांगितले तेंव्हा अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. लक्ष्मी यांनी ख-या अर्थाने विज्ञान सामान्य माणसांसाठी उपयोगात आणले आणि त्यातून गरीबांची मदत केली आणि करत आहेत.