जम्मू-काश्मिर खो-यातील नैसर्गिक खजिना जगभरात पोहोचवणारा ‘प्युअरमार्ट’

जम्मू-काश्मिर खो-यातील नैसर्गिक खजिना जगभरात पोहोचवणारा ‘प्युअरमार्ट’

Sunday October 11, 2015,

5 min Read

देशातल्या सर्वात मोठ्या सेंद्रीय खाद्य साहित्याचे प्रसिद्ध ऑनलाईन स्टोअर असलेल्या ‘प्युअरमार्ट’ चे सर्वेसर्वा साहिल वर्मांनी आपले बालपण जम्मूच्या खो-यातच व्यतीत केले आहे. केशर आणि काजू-बदामासारखे सुके मेवे खात आपले बालपण घालवलेले साहिल म्हणतात, की बाहेरून येणा-या पर्यटकांना हे सुकेमेवे भरपूर आवडतात आणि या सुक्या मेव्यासाठी या पर्यटकांना वेडे होतानाही ते नेहमीच पाहत आले आहेत.

केशर आणि सुके मेवे साहिल यांना अगदी सहज मिळत होते. म्हणूनच त्यांना प्रश्न पडायचा की या सुक्या मेव्यांमध्ये असे काय आहे, की हे पर्यटक त्यासाठी इतके वेडे होतात आणि सुक्या मेव्यांच्या खरेदीला कमालीचे महत्त्व देतात. बालपणातल्या याच विचाराने त्यांच्या भविष्यातल्या ‘प्युअरमार्ट’च्या कल्पनेला प्रत्यक्ष साकार करण्याचे काम केले.

जम्मूच्या खो-यात आपलं बालपण घालवल्यानंतर साहिल पहिल्यांदाच फार्मसीचा अभ्यास करण्यासाठी बंगळुरूला गेले. त्यावेळी त्यांना आपल्या मुळापासून दूर होण्याची जाणीव झाली. साहिल ते दिवस आठवतात आणि सांगतात, की तो काळ त्यांच्या जीवनातला सर्वात कठिण असा काळ होता. परंतु देशाच्या कानाकोप-यातून अभ्सासासाठी आलेल्या तरूणांना आणि लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी मैत्री करण्याची संधी मिळाल्याचेही ते सांगतात. साहिल पुढे सांगतात, की या अनुभवाने जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनच बदलून टाकला.

आपल्या जीवनाच्या त्या काळात आपल्याला अनेक चांगले मित्र लाभले आणि जम्मू-काश्मिरच्या लोकांबद्दल त्यांच्या मनात काय गैरसमज आहेत याबाबतही माहिती मिळाली. देशातल्या विविध भागात राहणा-या लोकांच्या मनात खो-यातल्या लोकांच्या स्थितीबाबत काय दृष्टीकोन आहे याबाबत जाणून घेणेही त्यामुळे त्यांना शक्य झाले. साहिल हसत हसत सांगतात की जेव्हा ते देशाच्या विभिन्न भागांमधून आलेल्या लोकांना भेटले तेव्हा त्यांना खो-यात पसरलेला दहशतवाद, केशर, सुकामेवा आणि बर्फासोबत असलेल्या आपल्या नात्याची जाणीव झाली आणि तेव्हा त्यांना या गोष्टींचे महत्त्वही कळून चुकले.

image


दरम्यानच्या काळात साहिल यांच्या जीवनाला एक असे वळण मिळाले, ज्या वळणाने त्यांचा आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. खाण्यापिण्यात केलेला हलगर्जीपणा आणि व्यस्त दिनचर्येमुळे त्यांच्या एका मित्राच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला. साहिल सांगतात की त्या वेळी त्यांना समजले की आपले जन्मठिकाण असलेल्या जम्मू-काश्मिर खो-यात मिळणा-या केशर, काजू-बदामासारख्या गोष्टींमध्ये ह्दय़रोगासारख्या रोगांबरोबर तसेच इतर शारीरिक दुर्बलतांसोबत लढण्याची क्षमता असते आणि म्हणूनच या गोष्टी जगात प्रसिद्ध आहेत.

साहिल सांगतात की या घटनेनंतर त्यांच्या मनात एक असा विचार आला की अशा या आरोग्यदायक नैसर्गिक गोष्टी संपूर्ण देशभरातल्या लोकांपर्यंत सहजपणे पोहोचवण्याच्या दृष्टीने काही का करू नये. तसेच जम्मू-काश्मिर खो-यातल्या दहशतवादाबाबत लोकांची असलेली मानसिकता बदलण्याची एक संधी देखील त्यांनी हेरली.

साहिल यांनी जेव्हा हा निसर्गाचा खजिना जगापर्यंत पोहोचवण्याचा निश्चय केला तेव्हा त्यानी याबाबत आपल्या पत्नींचा देखील सल्ला घेतला. त्यांच्या पत्नींनी त्यांची ही योजना साकार करण्यासाठी आपला पूर्ण पाठिंबा दिला. परंतु साहिल सांगतात, की त्यांचे कुटुंब परंपरावादी आहे. यामुळे त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना आपल्या या योजनेची कुणकुणही लागणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली. त्यांनी जर असे केले नसते तर साहिलना हे काम त्यांनी करूच दिले नसते असे साहिल खात्रीने सांगतात.

या कामाच्या सुरूवातीलाच आलेल्या आव्हानांबाबत बोलताना साहिल सांगतात की जवळजवळ एक वर्षापर्यंत ते आणि त्यांच्या पत्नी देशातल्या विविध शहरांमध्ये फिरले आणि बाजारांमध्ये जाऊन खो-यामध्ये मिळणा-या या नैसर्गिक खजिन्याबाबत दुकानदारांना समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. साहिल सांगतात की बहुतेक लोकांना केशराच्या पाकळ्या आणि अक्रोडच्या फळाबाबत विशेष अशी माहिती नव्हती याचे त्यांना सर्वात जास्त आश्चर्य वाटले. साहिल पुढे बोलताना म्हणतात की लोकांमध्ये जागृती घडवण्यासाठी त्यांना सोबत सतत केशर आणि अक्रोडची फळे ठेवावी लागत असत. यामुळे केशर आणि अक्रोडचे फळ खरोखर दिसते कसे हे त्यांना प्रत्यक्ष दाखवणे शक्य होत होते.

आपल्या यशाची कहाणी ऐकवताना साहिल पुढे सांगतात, “ २०११ च्या आसपास जेव्हा भारतात इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करणा-या लोकांची संख्या वाढत होती त्याचवेळी मी याकडे पावले टाकायला सुरूवात केली आणि हे मी योग्य वेळी उचललेले पाऊल सिद्ध झाले.”

जे ठरवले ते करूनच दाखवायचे अशी जिद्द बाळगणा-या साहिल यांनी याच दरम्यान ‘प्युअरमार्ट’ चा पाया घातला आणि सुरूवातीला नैसर्गिक आणि भेसळ नसलेले केशर आणि अक्रोडच्या विक्रीपासून आपले काम सुरू केले. आरोग्यासाठी या दोन्ही वस्तू सर्वात चांगल्या मानल्या जातात. म्हणूनच त्यांनी या दोन पदार्थांपासून आपल्या कामाची सुरूवात केली आणि संपूर्ण देशभरात आत्ताच्या घडीला या सेंद्रीय पदार्थांचा व्यवसाय ते यशस्वीपणे करत आहेत. ते सांगतात, “ नागालंड ते कन्याकुमारी आणि कोलकत्यापासून ते अगदी थेट अंदमान पर्यंत संपूर्ण देशभरात कदाचितच एखादे असे ठिकाण असेल जिथे या नैसर्गिक खजिन्याचा वापर केला जात नाही. या व्यतिरिक्त आमच्याकडे कॅनडा, दुबई, युके आणि इतर अनेक देशामधूनही मागणी येतच आहे.”

‘प्युअरमार्ट’ बाबत बोलताना साहिल म्हणतात की जो माल ते ग्राहकांना पुरवत आहेत तो माल पूर्णपणे नैसर्गिक आणि स्थानिक शेतक-यांनी पिकवलेला आहे. ते पुढे म्हणतात, “ जर तुम्ही तुमच्या ग्राहकांना चांगला माल पुरवत असाल तर तुम्हाला अधिक काही करण्याची गरज नाही असे आम्ही सतत मानत आलो आहोत. फक्त तुम्ही तुमच्या ग्राहकांना खूश ठेवा, ते स्वत:च तुमच्या कामाला पुढे नेण्याचे काम करत राहतील. एकदा का तुम्ही तुमच्या ग्राहकांचा विश्वास जिंकलात तर मग ते तुमच्यासाठी एखाद्या बोनसपेक्षा कमी नसेल.”

साहिल अभिमानाने सांगतात की इतक्या वर्षांमध्ये ९९ टक्के ग्राहक त्यांनी पुरवलेल्या मालामुळे समाधानी आहेत. ते म्हणतात, “ आता आमचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही दुस-यांवर अवलंबून आहोत. यामुळे काही बाबींमध्ये माल पोहोचवणा-या त्या लोकांच्या हातून काही चुकां झाल्या तर त्याची शिक्षा मात्र आम्हाला आणि आमच्या ग्राहकांना भोगावी लागते.”

ते पुढे म्हणतात, “ ग्राहकांच्या घरापर्यंत माल पोहचवणे आणि त्यांच्याकडून किंमत वसूल करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. ग्राहकांच्या दरवाजापर्यंत माल पोहोचवण्यात येणा-या समस्यांमुळे अनेकवेळा ग्राहकांचा विश्वास तुटतो आणि या प्रक्रियेत सतत सुधारणा घडवण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. ”

साहिल म्हणतात, “या समस्येतून मार्ग काढत आम्ही बंगळुरूमध्ये एक स्टोअर उघडले आहे. इथे आम्ही कोणतेही अधिकचे मूल्य न आकारता मूळ किंमतीत ग्राहकाच्या घरी माल पोहोचवतो आणि तो ही एका दिवसात. येणा-या दिवासांमध्ये इतर शहरांमध्येही असेच स्टोअर्स उघडण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

साहिलची कथा ‘इच्छा तिथे मार्ग’ या म्हणीचा प्रत्यय देते. आपल्या कामाच्या माध्यमातून साहिलनी संपूर्ण जगात लोकांच्या डोक्यात घर करून राहिलेल्या जम्मू-काश्मिरच्या दहशतवादाच्या प्रतिमेला बदलण्यात मोठी भूमिका वठवली आहे.

image