भारतातल्या बटाटा सम्राटांनी सीरीज-बी फंडींगमधून मिळवलेत २५ कोटी रुपये!

भारतातल्या बटाटा सम्राटांनी सीरीज-बी फंडींगमधून मिळवलेत २५ कोटी रुपये!

Thursday January 21, 2016,

8 min Read

आपण भारतीय रोज एक लाख टन बटाटे रिचवतो!

गंमत वाटली ना वाचून.

गेल्या वर्षी भारताने ४.७५ कोटी टन बटाट्यांचं उत्पन्न घेऊन जागतिक बाजारपेठेत दुसरा क्रमांक पटकावला. पहिल्या क्रमांकावर चीन आहे.

जगात गहू, भात आणि मक्यानंतरचं सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ बटाटा आहे. भारतात कित्येक शतकांपूर्वी पिष्टमय पदार्थाचा स्त्रोत म्हणून केळ्याचा वापर होत असे. पण बटाट्याने याबाबतीत केळ्याचा गाशाचं गुंडाळला.

या ‘परकीय शक्ती’ने भारतीयांचा असा काही ताबा घेतला की, १७ व्या शतकात युरोपिअन लोकांनी भारतात तो आणला हे आता कोणाला सांगितलं तर विश्वास बसायला कठीण जातं.

बटाटा अतिशय पौष्टीक आहे. जलद पचन होणारा, मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेटस्, प्रोटीन्स, मिनरल्स, जीवनसत्त्व आणि काही अंशी फायबरही यात असतं. केंद्रीय बटाटे संशोधन संस्थेनुसार (सीपीआरआय) बटाट्यांमध्ये सेरीअल्स आणि भाज्यांपेक्षा जास्त पोषणमूल्य असतं.

तृप्तीचा ढेकर!

बटाट्याचा रस्सा, आमटी, भाजी, तळणं आणि चटपटीत पदार्थ बनवत नाहीत असं घरं आपल्याकडे शोधूनही सापडणार नाही. याचा भाव गगनाला भिडताच वृत्तपत्रात लगेच पहिल्या पानावर बातमी येते. सरकारला त्या दिवशी खूप कसरत करावी लागते.

हेमंत गौर, संस्थापक आणि संचालक एस व्ही एग्री

हेमंत गौर, संस्थापक आणि संचालक एस व्ही एग्री


उगीच नाही या कंदमुळाला इथले शेतकरी नगदी पिक म्हणून डोक्यावर नाचवतात. पुण्यातील बटाटे पुरवठादार संस्था, सिद्धीविनायक एग्री प्रोसेसिंग (एस व्ही एग्री)चे संस्थापक आणि संचालक हेमंत गौर म्हणतात, “तंत्रज्ञानाचा जास्त वापर न करणारे बरेचसे भाजी उत्पादक शेतकरी, पटकन पैसे मिळत असल्याने बटाट्याची लागवड करतात”.

पिष्टमयी प्रेमकहाणी

४५ वर्षीय हेमंत यांनी मेरिको, आयटिसी आणि वॉलमार्ट यां कॉरपोरेटस् मध्ये काम केलंय. १६ वर्ष नोकरी केल्यावर त्यांना बटाट्याशी संबंधित काहीतरी उद्योग करावा असं वाटू लागलं.

शेतापासून ते ताटापर्यंत बटाट्याची संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत आहे. हेमंतना माहीत होत की, या साखळीत सुसंगतता आणि एकसंधपणा आणला तर या पिकाला चांगलं मूल्य मिळू शकतं. ते सांगतात, “या साखळीत बऱ्याच रिकाम्या जागा असल्याने उत्पादनाचं खरं मूल्यच उत्पादकाला मिळतं नव्हतं”. दक्षिण भारतात शेतकऱ्यांच्या भेटी घेत असताना ते बेंगळुरूला थांबत असतं.

आपल्या निर्णयावर त्यांनी काम करायला सुरूवात केली. ते सांगतात, “मला टेबलाच्या पलिकडे बसायचं होतं. मला विश्वास होता की, मला खरेदीदार मिळतील”. त्यांनी कॉर्पोरेटमधली नोकरी सोडली आणि उद्योजक बनण्याचं पाऊल उचललं. पण त्यांना पाठींबा कसा मिळेल हे माहीत नव्हतं.

हेमंत सांगतात, “मी दिल्ली जवळच्या पतपरगंज नावाच्या गावातल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातला आहे. आमच्या घरात सर्व इंजिनिअर्सचाच भरणा, उद्योजक व्हायचं कोणाच्या डोक्यातही कधी आलं नव्हतं. पस्तिशीच्या आत मला काहीतरी ठोस करायचं होतं कारण त्यानंतर तुमच्याकडे जास्त पर्याय नसतात. वैयक्तिक जवाबदाऱ्या वाढल्याने भरभक्कम पगाराची निश्चिंत नोकरी सोडून उद्योग सुरू करणं जरा धोकादायक असतं”.

उत्तराखंडच्या जी बी पंत शेती आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. तर आयआरएमए विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आपल्या या ज्ञानाच्या आणि काही बटाटे उत्पादक शेतकऱ्यांच्या भरवशावर त्यांनी व्यवसायाचं पाणी जोखायचं ठरवलं.

ते आठवणींना उजाळा देतात, “मी खरंच खूप भाग्यवान होतो. काही बटाटा उत्पादक शेतकरी माझ्यावर विश्वास ठेवत त्यांचं उत्पादन द्यायला तयार झाले”. अशी भावनिक गुंतवणूक अमूल्य असते. त्यामुळेच हेमंत यांनी शेतकऱ्यांच्या विश्वासाला सार्थ करत त्यांना कंपनीत समभाग दिले.

कारणाचं मूळ

भारतीय भाजी बाजारात बटाट्याला लोकप्रिय आणि अनन्य स्थान आहे. (फोटो सौजन्य- गेट्टी इमेजेस)

भारतीय भाजी बाजारात बटाट्याला लोकप्रिय आणि अनन्य स्थान आहे. (फोटो सौजन्य- गेट्टी इमेजेस)


२००९ मध्ये सहसंस्थापक गणेश पवार यांच्यासोबत हेमंत यांनी एसव्ही एग्रीची स्थापना केली. बटाटे उत्पादकांना हंगामाच्या आधी आणि नंतर उपाययोजना देण्याच्या या उद्देशानं त्यांनी कामाला सुरूवात केली. लोक कॅपिटलकडून सिरीज बी राउंडद्वारे (खाजगी गुंतवणुकदार व्यवसायवाढीसाठी एखाद्या व्यवसायाला देत असलेला गुंतवणुकीचा दुसरा हप्ता) आणि अस्पदा या गुंतवणूक कंपनीद्वारे त्यांनी सुरूवातीला २५ कोटींचं भांडवल उभारलं. अस्पदाने आणखी १० कोटींच्या गुंतवणुकीची हमी दिली आहे.

सोरोस इकोनॉमिक डेव्हलपमेंट फंड, ओमिद्यार नेटवर्क आणि गुगल यांनी एकत्रित येऊन साँग नावाची फर्म बनवलीय. अस्पदाचं याचं काम पाहते. या फर्मद्वारे एसव्ही एग्रीने २०११ मध्ये पाच कोटींचा निधी मिळवला. हेमंत सांगतात, “आम्ही साँगला काही रक्कम देण्यात यशस्वी झालो”.

महसूलाबाबत बोलताना हेमंत सांगतात की, अंदाजे ६० कोटींची उलाढाल आम्ही करत आहोत आणि पुढच्या तीन वर्षात आमची उलाढाल ५०० कोटींवर न्यायचं आमचं उद्दीष्ट्य आहे. “आम्ही जैविक उत्पादनांच्या बाजारात आहोत. उत्पादन खऱ्या अर्थानं तयार व्हायला चार वर्ष लागतात. बटाट्याचं बी उत्पादकांना देण्यात येतं. (पण बटाटा हे केवळ ९० दिवसांचं पिक आहे)”.

“मला वाटतं, मी बटाट्यांसोबत अजून दहा वर्ष तरी काम करू शकेन”.

बटाट्याचा बाजार खूप मोठा आहे. बटाटा व्यवसायात असणारी साखळीतली अनिश्चितता, आर्थिक हितसंबंध असणाऱ्या सर्वांकरिता काळजीचा विषय आहे. डळमळीत साखळीबाबत हेमंत सांगतात, “जो बियाण विकतो त्याला उत्पादनाशी काहीही देणघेणं नसतं. तो शेतकऱ्यांकडून त्याच्याकडील बियाणातून आलेलं उत्पादनही परत घेत नाही. उत्पादन विकत घेणारा कोणीतरी वेगळाच असतो. नंतर आणखी एकजण त्याच्या गोदामात उत्पादन साठवतो किंवा ठेवतो. त्याला दर्जाशी काही देणघेणं नसतं. त्याच्याकरता ‘अमूक इतक्या गोणी माल आला आणि अमूक गोणी माल बाहेर गेला’ एवढचं असतं. तो फक्त गोदाम भाड्याने देत असतो. यासगळ्यात आणखी एक जण असतो, वेफर्स, चीप्स आणि बटाट्याचे पदार्थ बनवणारा उत्पादक. त्याला जे काही उपलब्ध आहे त्यातून आपला माल निवडावा लागतो. त्यामुळे आम्ही या साखळीतल्या रिकाम्या जागा भरण्याचं ठरवलं. कारण या जागा भरल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नव्हतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, आवश्यक आहे तिथं तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आम्ही ठरवलं”

पुण्याजवळ एसव्ही एग्री एरोपोनिक्स तंत्रज्ञान म्हणजे रोपाला गरज असेल तशी हवा किंवा धुक्याच्या वातावरणाचा वापर करतात. यामुळे चांगल्या प्रतीचं बियाण तयार होतच शिवाय त्यातून चांगल उत्पादनही निघतं. या बियाणांना नंतर प्रयोगशाळेत वृद्धीसाठी पाठवलं जातं. हेमंत सांगतात, “सीपीआरआय आणि काही डच जातींवर आम्ही काम करत आहोत. लवकरच काही नवीन जाती बाजारपेठेत पाठवणार आहोत. प्रयोगशाळेतले बटाटे जणू झेरॉक्स मशीनच आहे. यात सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर पार्टही आहे. सॉफ्टवेअरकरता आम्हांला रोपाचं बीज जाणून वेगवेगळ्या जाती हव्या असतात. तर हार्डवेअर करता एरोपोनिक्स प्रयोगशाळा हवी असते”.

प्रवेश


बटाट्यांपासून अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात त्यांना मागणीही प्रचंड आहे. त्यातलाच एक आलू टिक्की. (सौजन्य- गेट्टी इमेजस)

बटाट्यांपासून अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात त्यांना मागणीही प्रचंड आहे. त्यातलाच एक आलू टिक्की. (सौजन्य- गेट्टी इमेजस)


सुरुवातीला, एसव्ही एग्रीने उत्कृष्ट प्रतीचं बियाणं बनवून देशभरात साधारण तीन हजार शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिलं. या बियाणातून आलेलं उत्पन्न त्यांनीच परत विकत घेतलं. हेमंत विस्ताराने सांगतात, “यामुळे मला नवीन जातींची ओळख करून देता आली. भारतात व्यावसायिक पातळीवर केवळ १० -१२ जाती उपलब्ध आहेत. तर नेदरलॅण्डस् मध्ये बाजारात ५० वेगवेगळ्या जातीचे बटाटे मिळतात”.

ग्राहकांना या जातींमधला फरक लक्षात येणं जरा मुश्किल आहे. पण हेमंत सांगतात की, काही चोखंदळ ग्राहक या जातींमधून हवा तो माल बरोबर निवडतात. “बिहारच्या बाजारांमध्ये उत्कृष्ट प्रतीच्या बटाट्याला किलोमागे एक किंवा दोन रुपये जास्त मिळतात. म्हणजेच बटाटा उत्पादन किंमतीची १० ते १५ टक्के रक्कम. त्यामुळेच शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या जातीचं बियाण उपलब्ध करुन देण्याची चांगली संधी आमच्याकडे आहे”. हेमंतच्या मते यामुळे बाजारात चांगली स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांची पिळवणूक थांबून त्यांना लाभ मिळेल. ते म्हणतात, “तसं बघितलं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत ‘पिळवणूक’ शब्द वापरायला मला आवडत नाही. आपण असं म्हणूयात की पूर्वी ते वेगळ्या वातावरणात काम करायचे. आता मी त्यांना वेगळे पर्याय उपलब्ध करून देत आहे”.

एकदा कंपनीने उत्पादन परत विकत घेतलं की, मॅककेन, आकाश नमकीन, यलो डायमंड, पेप्सिको, आयटीसी यांच्यासोबत आणखी ६५ लहान मोठ्या प्रक्रिया उत्पादकांना विकण्यात येतं. एस व्ही एग्री प्रशिक्षण देणं, तंत्रसामग्री पुरवठा या पातळ्यांवरही प्रक्रिया उत्पादकांसोबत काम करते. म्हणजेच सर्व पातळ्यांची काळजी घेते. हेमंत सांगतात, “बऱ्याचदा उत्पादकांना माल १०० टक्के कसा वापरता येईल याबाबत माहीत नसतं. त्यामुळे साल काढताना बटाट्याचा १० टक्के भाग वाया जातो. आम्ही या गोष्टींकडे लक्ष देत आम्ही त्यांच्यासोबत काम करतो त्यामुळे त्यांच्या यंत्रातून उत्कृष्ट काम करून घेता येतं”.

एस व्ही एग्री ने डच कंपनी मूइजी सोबत एकत्र येऊन बटाट्यासाठी अत्याधुनिक गोदाम बनवलयं. जर साठवणूक व्यवस्था योग्य नसेल तर बटाट्यातल्या साखरेच्या प्रमाणामुळे साठवलेला माल वाया जाईल. ते सांगतात, “आमच्याकडे गुजरात, इंदूर, उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये तंत्रज्ञानावर अवलंबून खेळती हवा आणि साठवणूकीची योग्य व्यवस्था असलेली गोदाम आहेत”.

अस्पदा इनव्हेस्टमेंट सल्लागारचे सहसंस्थापक आणि कार्यकारी भागीदार कार्तिक श्रीवास्तव यांच्यानुसार,

“एसव्ही एग्री शेतकरी ते ग्राहक यांच्यातल्या साखळीतल्या प्रत्येक पातळीवर दुव्याचं काम करणार हे आमच्याकरता महत्त्वाचं होतं. ते शेतात लक्ष देतात, सामाजिक बांधिलकी जपतात आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या समजून त्या सोडवण्याकरता प्रयत्न करतात”

बटाट्याचं सिंहासन

हेमंतने कृषीद्योग सुरू केला तेव्हा त्यांना माहीत होत की, या व्यवसायातल्या प्रस्थापितांशी त्यांची आता टक्कर होणार आहे. ते सांगतात, “संघटीतपणे काम करणारे फारच कमी लोक बाजारात होते. आयटीसी, पेप्सिको, कॅडीला (एग्रो) आणि महिंद्रा यांसारख्या कृषीधारीत व्यावसायिकांकडेच त्यांची स्वतःची पुरवठा साखळी आहे. पेप्सिको आमचा स्पर्धक आहे असं मी नाही म्हणणार कारण आम्ही त्यांनाही बटाटे पुरवतो. आम्ही आयटीसीलाही पुरवठा करतो. पण बियाणांच्या बाबतीत आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करतो.” हेमंत सांगतात, खरी स्पर्धा पाहता चांगल्या प्रतीचं बियाण केवळ तीन टक्केच आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ९७ टक्के उत्पादक जे बटाट्याच्या डोळ्याचा पिक रोपणासाठी वापर करतात त्यांच्याशी माझी स्पर्धा आहे.

सध्या एस व्ही एग्रीकडे ५० जण कामाला आहेत. पण सुरुवातीच्या काळात योग्य लोक निवडून कामावर ठेवणे हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं.

“बटाटे विका हे लोकांना पटवून सांगणं खूप अवघड काम होतं. त्यावेळी मी जास्त पगारही देऊ शकत नव्हतो. फक्त आशावाद दाखवू शकत होतो”.

त्यांच्या टीममध्ये सध्या आयआयएम आणि आयआयटी पदवीधारक आहेत. “आयआयटी खडगपूरमधल्या माझ्या पहिल्या कर्मचाऱ्याशी माझ्या एका मित्राने ओळख करून दिली. त्यांनी आयटीसीमध्ये पाच वर्ष काम केलं होतं आणि काहीतरी प्रभावशाली काम करण्याचा त्यांचा विचार होता. एका प्रस्थापित मोठ्या कंपनीतून आल्यामुळे लहान कंपनीत त्यांनी शिकण्याचा एका मोठा आलेख पार केला. आज त्यांच्याकडे कंपनीचे पाच टक्के समभाग आहेत”.

हेमंतना बटाट्याचे चीप्स आणि सलाड खूप आवडतात. ते सांगतात उद्योजक बनल्यानंतर त्यांच्यातला अहंपणा खूप कमी झालाय. ते सांगतात, “कॉर्पोरेटमध्ये काम करताना तुमच्यात मोठा अहंपणा येतो. पण आज मी सुखी माणूस आहे. मला वाटतं मी यामुळे पाच वर्ष आणखी जगेन”.

हेमंत आज या ठिकाणी पोहचले यामागे त्यांचे कठीण श्रम आहेत. आपल्याकडे कृषी क्षेत्रापेक्षा आयटी इंडस्ट्रीला जास्त मानाच स्थान दिलं जातं. अशा वेळी हेमंत बटाट्यावर स्वार होऊन शेतकरी आणि त्यांच्या टीमला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जात आहेत.

'विनी द पूहचे' निर्माते ए ए मिल्ने यांच्यानुसार, “जर एखाद्याला खरचं बटाटे आवडत असतील तर तो अतिशय सभ्य माणूस आहे असं समजायचं”.

लेखिका – दीप्ती नायर

अनुवाद – साधना तिप्पनाकजे