दिनदर्शिकेच्या माध्यमातून साहित्य कला आणि संस्कृती यांना जोडणारे सर्वाधिक खपाचे प्रकाशन ‘कालनिर्णय’!
Monday March 21, 2016,
5 min Read
देशातील सर्वाधिक म्हणजे दोन दशलक्ष प्रतिपेक्षा जास्त खपाचे (एबीसी)प्रकाशन म्हणजे 'कालनिर्णय'. हे एक वार्षिक प्रकाशन आहे आणि दोन पिढ्यांपासून त्याचे कर्तेधर्ते मुंबईतील एक मराठी कुटुंब आहे असे जर तुम्हाला सांगितले तर कदाचित आश्चर्य वाटेलही. पण ही व्यावसायिक कलाकृती म्हणजे तुमच्या घरातल्या भिंतीवर नियमितपणाने दरवर्षी येऊन बसणारे ‘कालनिर्णय दिनदर्शिका’ असे सांगितले तर तुमच्या समोर विश्वास ठेवण्याशिवाय कोणाताच पर्याय असणार नाही. अगदी मराठमोळ्या मध्यमवर्गीय समाजातील सारस्वतांच्या व्यावसायिक क्षेत्रातील गरुडभरारीचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी ‘युअर स्टोरी’ने कालनिर्णयच्या प्रकाशनाची जबाबदारी लिलया सांभाळणा-या जयराज साळगावकर यांची त्यांच्या दादर येथील कार्यालयात भेट घेतली. हा व्यवसाय सांभाळणारी त्यांची ही दुसरी पिढी. जयराज साळगावकर यांचे वडील 'कालनिर्णय'चे संस्थापक जयंतराव साळगावकर 'ज्योतिर्भास्कर' म्हणून प्रसिध्द होते. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेऊन जयराज यांनीही अनेक विषयात प्राविण्य मिळविले. मुंबईच्या रुईया महाविद्यालयात पदवी मिळवल्यानंतर कालनिर्णयच्या विकासाच्या वेगासोबतच त्यांनी इतिहास, संस्कृती, अर्थशास्त्र, उर्जा, वने, पर्यावरण, पर्यटन, कामगार, उद्योग, प्रकाशन अश्या विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त केले आणि त्यातून अनेक महत्वाच्या संस्थांचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून कार्यरत झाले. ध्वनी प्रदुषण कमी करण्याच्या प्रयत्नात देखील त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यांच्या विविध क्षेत्रातील या कार्याची दखल अनेक महत्वाच्या व्यासपीठांवरून घेण्यात आली आहे.
साधारणपणाने असा समज पूर्वीपासून होता आणि बहुतांश आजही असतो की मराठी माणूस उद्योग-व्यापार क्षेत्रात फारशी रुची दाखवत नाही आणि त्यामुळेच तो यशही मिळवू शकत नाही. पण हा समज पूर्णत: खोटा ठरतो तो कालनिर्णयच्या यशोगाथेचे अवलोकन केल्यानंतर. सत्तरच्या दशकात वडील ज्योतिर्भास्कर जयंतरावजी साळगावकर यांनी सुरू केलेल्या या उद्योगाचा विस्तार जगातील सा-या महत्वाच्या शहरांपासून गाव-खेड्यातील घरा-घरापर्यंत कसा झाला आहे ? त्यासाठी कोणत्या प्रकारे बाजारपेठेचा अभ्यास केला ? ग्राहकांच्या गरजा आणि व्यावसायिक खर्चांचा ताळमेळ कस घातला ? याचे अभ्यासपूर्ण विवेचन जयराजजी यांनी 'युअर स्टोरी'ला माहिती देताना केले.
गेल्या ४५ वर्षांपासून कालनिर्णय या रोजच्या वापरातील दिनदर्शिकेच्या प्रकाशन आणि वितरणाच्या उद्योगाचा प्रसार करतानाच लोकांच्या जीवनात नित्यनवीन काहीतरी देण्याचा संकल्प करण्यात आला आणि तो तडीस नेण्यासाठी कमालीचे नियोजन आणि मेहनत करावी लागली असे जयराजजी म्हणाले. ते म्हणाले की, “ आम्ही केवळ दिनदर्शिकाच प्रकाशित करत नाही, तर त्यात आरोग्य, स्वादिष्ट, सौंदर्य, आणि नित्योपयोगी सर्व धर्मियांसाठीची उपयुक्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो.” 'कालनिर्णय'च्या यशोगाथेबाबत सांगताना ते म्हणाले की, सुमंगल प्रेस या संस्थेची स्थापना वडील जयंतराव व जयराज ह्यांनी मिळून केली. पन्नासच्या दशकात ते मुंबईत आले त्यावेळी दैनिक वृत्तपत्रात शब्दकोडे देण्याचे काम करत असत. जयराज म्हणाले की, “तो त्यांचा पहिला आणि शेवटचा नोकरीचा अनुभव होता. त्यानंतर शब्दकोडे असलेले शब्दरंजन हे त्यांचे स्वत:चे प्रकाशन त्यांनी सुरू केले. जाने. १९७३ मध्ये पहिल्यांदा कालनिर्णयची छपाई करण्यात आली. मराठीतील पंचवीस हजार प्रती त्यावर्षी विकल्या.”
४५ वर्षांनंतर आज कालनिर्णय भारतातील सर्वाधिक खपाचे प्रकाशन आहे, ज्याच्या दरवर्षी दोन दशलक्षपेक्षा जास्त प्रती विकल्या जातात. आणि इंग्रजीसह देशातील नऊ भारतीय भाषांतून तसेच मोबाईल अॅप आणि वेबसाईट पोर्टलच्या माध्यमातूनही ते जगभरात पोचते. ‘भि्ंतीवरी कालनिर्णय असावे’ इतक्या सहज प्रकारे हे प्रकाशन घराघरात पोहोचले आहे. कालनिर्णयच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल आता कोट्यावधी रुपयांची आहे आणि जयंतरावजी यांच्या निधनानंतरही त्यांची दुसरी पिढी या व्यवसायाचा विस्तार करते आहे. अंधेरी येथे सुमंगल प्रेस मध्ये विविध प्रकारच्या छपाईचे काम वर्षभर चालते. जयराज म्हणाले की, "मराठी प्रकाशन क्षेत्रात सर्वात आधी रंगीत छपाईची सुरूवात आम्हीच केली. अनेक दूरचित्रवाणी कार्यक्रमांना प्रायोजकत्व देण्यासही सुरुवात कालनिर्णयनेच केली होती". जयराज साळगावकर, बंधू जयेंद्र व कुटुंबातील इतर मिळून या प्रकाशन व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी सांभाळतात. कला, संस्कृती आणि साहित्य यांची रेलचेल असलेल्या या प्रकाशनात रोजच्या तिथी, वार, दिवसांच्या महत्वाच्या नोंदीसह दैनंदिन रोजनिशीच्या नोंदी करण्यासाठी स्वतंत्र जागा दिली जाते त्यामुळे वर्षभरातील महत्वाच्या नोंदी ग्राहकांना सहजपणाने करता येतात आणि गरजेनुसार त्या त्यांच्या नजरे समोर राहतात. त्यामुळे अनेकदा मागील काही वर्षांची प्रकाशनेही ग्राहक सांभाळून ठेवतात इतके त्याचे महत्व असते.
जयराज म्हणाले की, “ कालनिर्णयच्या यशानंतर महाराष्ट्राच्या बाजारात अश्या प्रकारच्या अनेक म्हणजे ४२ प्रकारच्या दिनदर्शिकांची लाटच आली. मात्र आपली उपयुक्तता आणि लोकप्रियता त्या लाटेतही जपून ठेवण्यात कालनिर्णयने यश मिळवले”. 'कालनिर्णय'ने समाजाच्या शेतकरी, कामगार इत्यादी वर्गाचा नेहमीच विचार केला. त्यामुळे त्यांनी शेतक-यांच्या उपयोगासाठी वेगळी दिनदर्शिका देखील प्रकाशित केली. त्याचप्रमाणे स्वादिष्ट, सौंदर्य, भविष्य, आरोग्य अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या गरजा ओळखून त्यानुसार वेगळी प्रकाशने देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हे सारे काही अर्थातच सोपे नव्हते, जयराज म्हणाले की, “सांगली जिल्हातील एखाद्या शेतक-याच्या दैनंदिन उपयोगात काय असेल आणि मुंबईत नोकरी करणा-या ग्राहकाला काय हवे असेल याचा नेहमीच व्यवसायिक पध्दतीने विचार करण्यात आला. त्यासाठी अनेक जणांकडून त्यांच्या मागील वर्षीच्या दिनदर्शिकेचा कसा वापर केला आणि त्यात कोणत्या त्रुटी जाणवल्या याचा वेध घेण्यात आला”. वेगवेगळ्या भाषा,पंथ, जाती, धर्माच्या लोकांना एकाच प्रकारच्या प्रकाशनातून जोडताना व्यावसायिकतेबरोबर समाज भान ठेवण्याचे शिक्षणही संस्थापक जयंतराव यांनी दिले आणि आपल्या कार्यातून त्याचा प्रत्यय दिला. त्यामुळे 'कालनिर्णय'च्या विक्रीतून अनेक गरजूंना दोन -तीन महिने रोजगारही उपलब्ध होतो. समाजातील गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक अशा सा-या घटकांना जोडणारा समान दुवा म्हणूनही आज 'कालनिर्णय'ने जगभरात आपली ओळख निर्माण केली आणि टिकवली आहे. जयराज म्हणतात की, “ हा देश निधर्मवादी आहे ही उक्ती तितकीशी योग्य नाही इथे अनेक जाती-समुदाय आणि धर्माला मानणारे लोक राहतात, त्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. भारतीय संविधानाने दिलेल्या धर्म स्वातंत्र्याच्या किंवा श्रध्दा-उपासना यांच्या स्वतंत्रतेच्या मुद्द्याला अनुसरून 'कालनिर्णय'ने आपल्या ग्राहकांच्या सेवेचा प्रयत्न केला आहे.”
आणखी काही यशस्वी उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.
आता वाचा संबंधित कहाण्या :