केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत ११ वे स्थान पटकावणा-या संस्कृती जैन

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत ११ वे स्थान पटकावणा-या संस्कृती जैन

Sunday October 25, 2015,

5 min Read

काही आठवड्यांपूर्वी पीटीआय/ बातम्यांचे मथळे काहीसे अशा प्रकारचे होते:

यूपीएससी परीक्षा: राजस्थानात तीन मुलींनी सर्वोच्च पहिल्या तीन जागा पटकावल्या, जम्मू-काश्मिरच्या ९ उमेदवार लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. यांमध्ये तीन महिला उमेदवार, लोकसेवा आयोग परीक्षांच्या पहिल्या चार उमेदवारांमध्ये दिल्लीच्या तीन महिलांचा समावेश. भारतात व्यावसायिक कारकिर्दीच्या दृष्टीने लोकसेवेला सर्वाधिक पसंती दिली जाते. संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चालणा-या या परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थी भाग घेतात आणि विद्यार्थ्यांसाठी या परिक्षेत मिळणारे यश हे वर्ल्ड कप जिंकण्याहून मुळीच कमी नसते. यामध्ये केवळ एकच फरक असू शकतो, आणि तो म्हणजे हे आपले व्यक्तीगत यश असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गोल्डन लिस्टमध्ये असलेल्या नावांमध्ये एक नाव आहे संस्कृती जैन यांचे. संपूर्ण भारतात त्या अकराव्या आल्या होत्या.

जे विद्यार्थी या परीक्षेचा शेवटचा टप्पा, म्हणजेच मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होतात अशांना रँक दिली जाते. सर्वात पुढे असणा-या विद्यार्थ्यांचा आयएसआय ( भारतीय प्रशासकीय सेवा), इतरांचा आयपीएस( भारतीय पोलीस सेवा), आयएफएस ( भारतीय परदेश सेवा) रेल्वे अशा सेवांमध्ये समावेश केला जातो. संस्कृती या पूर्वी दोन वेळा ही परीक्षा पास झाल्या होत्या. भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याच्या इराद्याने त्यांनी ही परीक्षा तिस-यांदा दिली आणि त्यांच्या मेहनतीला फळ देखील आले. श्रीनगरमध्ये जन्मलेल्या संस्कृती यांनी या परीक्षेच्या तयारीसाठी भरपूर प्रवास केला. देशभरातील सहा वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांनी भरपूर अभ्यास केला. त्यांचे पालन पोषण देखील इतरांपासून वेगळेच होते. याचे कारण म्हणजे त्यांचे आईवडिल हवाई दलात होते. त्यांनी बीआयटीएस ( पिलानी) च्या गोवा कँपसमधून ग्रॅज्युएशन केले. संस्कृती सांगतात, “ जेव्हा मी कॉलेजला होते त्या वेळी मी एकाच ठिकाणी सर्वात जास्त काळ राहिले होते. मला बीआयटीएस, पिलानी अशा ठिकाणी शिकण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. या संस्थांनीच मला पूर्णपणे बदलून टाकले. मी जी काही आज आहे ती याच संस्थांमुळेच आहे.

आपल्या ग्रॅजुएशन नंतर वेगवेगळ्या क्षेत्रांबाबत माहिती मिळवण्यासाठी संस्कृती यांनी २०११ ते २०१२ पर्यंत पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चमध्ये खासदाराची लेजिस्लेटिव्ह असिस्टंट ( एसएएमपी) म्हणून शिष्यवृत्ती मिळवली. २०१२ च्या शेवटी त्यांनी दिल्लीतील सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या विषयात संशोधक सहकारी म्हणून काम करणे सुरू केले.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्या आयआरएस ( भारतीय महसूल सेवा) मध्ये रूजू झाल्या. सध्या त्या नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ( एनएडीटी) मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्या म्हणतात, “ ही एक खूप सुंदर सेवा आहे, कारण ही सेवा शासनाच्या सर्व कार्यांसाठी पैसे गोळा करण्याचे काम करते.”

image


एलएएमपी शिष्यवृत्ती संपल्यानंतर त्या परीक्षा देतील असा संस्कृती यांनी निर्णय घेतला होता. शिष्यवृत्ती अभ्यासक्रम शिकत असताना त्या भारतात धोरणे तयार करण्यामध्ये रूची दाखवू लागल्या. धोरणे तयार करण्याच्या प्रक्रियेचा भाग बनायचे असेल तर लोकसेवा हा सर्वात चांगला मार्ग आहे हे त्यावेळी त्यांच्या लक्षात आले.

संस्कृती यांनी ही परीक्षा अनेकदा दिली आणि अनेकदा त्या पासही झाल्या. मात्र आपल्याला हवी ती रँक मिळेपर्यंत त्यांनी परीक्षा देणे सुरूच ठेवले. संस्कृती या अथक परिश्रम करणा-या व्यक्ती आहेत याचाच हा पुरावा आहे. त्यांच्या मते ही परीक्षा अतिशय कठीण असते. कारण इथे आपल्या बुद्धिमत्तेसोबत आपल्या व्यक्तिमत्त्वाची देखील परीक्षा घेतली जाते. सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीमध्ये अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध अशा विविध विषयांचे देखील ज्ञान असणे आवश्यक असते. त्या म्हणतात, “ जर कुणाची एका विषयावर चांगली पकड असेल, तर मग त्याला केवळ चालू घडामोडींबाबत माहिती असण्याचीच आवश्यकता असते.


परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना त्यांचा एक साधा सल्ला आहे - 


विचारांवर चांगली पकड असली की आपल्या ज्या विषयांचा अभ्यास करायचा असतो त्या साठी आवश्यक असणारा मजबूत पाया तयार होतो.

जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळू शकतो असे जे लोक मानतात, अशा लोकांसाठी संस्कृती सांगतात, “ ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला खडतर परिश्रम घ्यावे लागतात ही गोष्ट खरी आहे, परंतु या परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या आयुष्यातील इतर गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत असे मी माझ्या व्यक्तीगत पातळीवर मानत नाही. या परीक्षेसाठी तयारी कशा प्रकारे करायला हवी, किती मेहनत घ्यायला हवी हे पूर्णपणे आपल्या वैयक्तिक तयारीवरच अवलंबून असते.” पहिल्या वर्षी त्यांनी आपल्या वैकल्पिक विषय असलेल्या तत्त्वज्ञान या विषयाच्या चांगल्या तयारीसाठी कोचिंगची मदत घेतली होती. त्यांना प्रत्येकवेळी मिळालेले यश हे त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा आणि मनापासून केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहे. ही परीक्षा संपूर्ण वर्षभर टप्प्याटप्प्याने होत राहते, त्यामुळे आपल्याला धैर्याची गरज असते. शिवाय आपल्याला पर्यायांचा देखील विचार करून ठेवणे गरजेचे असते. जेव्हा आपण ही परीक्षा जर कधीच उत्तीर्ण झालो नाही तर मग अशा वेळी तुम्हाला तुम्ही विचार केलेल्या पर्यायाचा उपयोग होतो. पर्याय ठेवण्याचा आणखी एक फायदा होतो, आणि तो म्हणजे आपल्यापुढे पर्याय उपलब्ध असल्यामुळे आपण अगदी शांतपणे ही परीक्षा देऊ शकतो. संस्कृती यांच्या मते लोकसेवा आयोगांच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे किंवा अनुत्तीर्ण होणे ही कोणाचे यश मोजण्याचे मापदंड असू शकत नाही. या परीक्षांचे आलेले निकाल संस्कृती यांच्यासाठी सुखद आश्चर्याचे धक्केच होते. त्यावर त्या म्हणतात, “ परंतु निकालाच्या एक दिवसानंतरच येणा-या वर्षांमध्ये मला काय करायचे आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आले, तेव्हा एका मोठ्या जबाबदारीचा भार माझ्यावर आला आहे असे मला वाटले”

या वेळच्या परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्यां मध्ये महिलांची संख्या मोठी आहे हे पाहून संस्कृती यांना मोठा आनंद झाला आहे. आपल्या देशात महिलांबरोबर केला जाणारा भेदभाव हे एक सत्य असल्याचे संस्कृती मानतात. ही स्थिती बदलण्यासाठी लैंगिक भेद बाजूला सारुन महिलांनी पुढे यायला हवे असे त्यांना वाटते.

image


त्या सांगतात, “ लैंगिक भेदाच्या शिकार झालेल्या माझ्यासारख्या महिलांनी पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक परिश्रम घेतले पाहिजेत.” शिक्षण, विशेषत: महिलांसाठी शिक्षण हा विषय त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या म्हणतात, “ शिक्षण हे कोणत्याही प्रकारच्या जीवनाला बदलू शकते. शिक्षणामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये सामाजिक जागृती येते आणि जागृतीचा प्रसार देखील होतो. आणि तरूण वयात जागृती निर्माण केल्यामुळे समाजाला बदलण्यासाठी मदत होते.” मसूरीच्या अकादमीत लवकरच सुरू होणा-या प्रशिक्षणाची संस्कृती खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी त्या एका वेळी एकच पाऊल उचलू इच्छितात. त्या म्हणतात, “ सध्या मोठमोठे दावे करणे हे माझ्यासाठी घाईचे होईल असे मला वाटते. मी जेव्हा कामाला सुरूवात करेन, त्यावेळी माझा पाया मजबूत असला पाहिजे. त्यासाठी प्रशिक्षणाच्या काळात मला माझे काम कसे आहे हे चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहे.माझ्या देशातील लोकांची माझ्या क्षमतेनुसार चांगली सेवा करणे हाच माझा मुख्य उद्देश असेल.”