कार्यालयात जाता-जाता या बंगळूरूवासीयांने; मागील पाच वर्षात जमविले ७५ किलो खिळे!
Saturday February 18, 2017,
2 min Read
हे आहेत बंगळूरूचे ४२ वर्षांचे अभियंता, बेनेडिक्ट जेबाकुमार, ज्यांना रस्त्याने जाताना खिळे गोळा करण्याचा विचित्र छंद आहे. मात्र त्यांच्या या आगळ्या छंदामागे चांगले कारण आहे, त्यामुळे या माणसाच्या जिद्द आणि मेहनतीला तुम्ही सलाम कराल.
आऊटर रिंग रस्त्यावरून इको स्पेस येथील कार्यालयात जाताना नेहमी प्रमाणे खिळे गोळा करणे हे काम पाच वर्षापासून सुरु आहे. तेंव्हापासून त्यांनी ७५किलो खिळे गोळा केले आहेत. सुरुवातीला कार्यालयात जाताना त्यांना नेहमी टायर फुटण्याच्या समस्येला सामोरे जावे लागे आणि अशी घटना जवळपास पंक्चरचे दुकान असले तर हमखास घडत असे मात्र त्यांना ते नशिबवान असल्याचे वाटत असे. मात्र पंक्चरचे दुकान जवळच असणे आणि टायर फुटणे यांच्यात काहीतरी संगती असल्याचे त्यांच्या लक्षात येवू लागले. बेनेडिक्ट यांना अशा प्रकारच्या घटनेला महिनाभरात किमान सहा वेळा सामोरे जावे लागे. मग त्यांनी या विषयात लक्ष घातले आणि खिळे गोळा करण्यास सुरुवात केली. मात्र नवे टोकदार खिळे आश्चर्यकारकपणे त्याच मार्गात दुस-या दिवशी दिसू लागले. त्यानंतर त्यांनी या दुष्प्रवृत्तीचा शांतपणे सामना करण्याचे ठरविले. त्यांनी रस्त्यावरून जाताना खिळे गोळा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी लवकरच खिळे शोधण्याचे यंत्र तयार केले. त्यांच्या एका मित्राने त्यांचा हा प्रवास सोशल मिडियातून व्यक्त करण्यास सांगितला, त्यातून लोकांना आणि सरकारी यंत्रणाना माहिती मिळाली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “ मी अधिका-यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मिडियाचा आधार घेतला. मी दररोज बंगळूरू शहर पोलिस आणि बंगऴुरू शहर प्रशासनाला माहिती देवू लागलो. दोन अशाच घटनांमध्ये पोलिसांनी दोघांना रंगेहाथ अटक केली. मात्र तरीही प्रश्न सुटला नाहीच”.
बेनेडिक्ट यांनी स्वत:च मग खिळे गोळा करणे सुरू ठेवले. मात्र त्यांनतर त्यांच्या मुलाने त्यांना चुंबकाचा वापर करण्यास शिकवले. आता ते मच्छिमारी करण्याच्या काठीने चुंबकाच्या मदतीने खिळे गोळा करतात. आता ते जाताना कुठे खिळा तर सुटला नाही ना यांची पाहणी करत जातात. त्या बाबत ते म्हणतात, “ माझा मेंदू आणि डोळे आता सरावले आहेत, रस्त्यात खिळा असेल तर लगेच मला तो दिसतो, आणखी एक गोष्ट म्हणजे हे खिळे आसपासच पडलेले सापडतात. त्यामुळे ते गोळा करणे सोपे जाते”
भर रस्त्याच्या वाहतुकीमध्ये एखादा माणूस अशाप्रकारे खिळे शोधत जातो हे लोकांचे लक्ष वेधून घेणारे असते. याबाबत विचारले तर ते म्हणतात की, “ या धावपळीच्या जगात लोकांना कुणी माणूस भर रस्त्यात काही शोधतो आहे याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. या खिळ्यामुळे त्यांच्या वाहनाला मोठा अपघात होवू शकतो याकडे देखील पाहण्यास त्यांना वेळ नसतो”.
सहा वर्षापासूनचे त्यांचे हे निरपेक्ष खिळे मुक्त रस्ते अभियान त्यांना आता थांबवावे लागत आहे कारण ते बंगळूरू सोडून तमिळनाडूमध्ये त्यांच्या गावी जात आहेत. तेथे ते त्यांचा मासेमारीचा छंद जोपासणार आहेत. त्यांना वाटते की, कुणीतरी दुसरा नक्कीच त्यांचे काम हाती घेईल.