बहिणीच्या बलिदानानंतर नोकरीचा राजीनामा देऊन आपले जीवन समाजासाठी समर्पित करणारे शरद कुमरे
Monday February 29, 2016,
4 min Read
देशप्रेम व समाज कल्याणाची तळमळ ही अनेकांच्या रक्तातच असते, देशासाठी सर्वस्व समर्पित करून, हेच आपल्या आयुष्याचे ध्येय समजून प्रत्येक काम नि:स्वार्थ भावनेने करण्याचा ते प्रयत्न करतात. शरद कुमरे हे अशाच एका देशभक्ताचे नाव आहे ज्यांनी चांगली सरकारी नोकरी सोडून आपले आयुष्य हे समाज कल्याणासाठी वाहिले.
शरद कुमरे यांची बहिण शहीद बिंदू कुमरे २००१ मध्ये काश्मीर मध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाली, त्यांनी मृत्यूपूर्वी चार आतंकवाद्यांना मारले. या घटनेनंतर शरद यांनी प्रण घेतला की ते आपले आयुष्य देशासाठी अर्पण करून देशाच्या उद्धारासाठी शक्य तितके प्रयत्न करतील. मध्यप्रदेश मध्येच बालपण व्यतीत झालेले शरद कुमरे हे चांगल्या पदावरच्या सरकारी नोकरीवर कार्यरत होते. परंतु नोकरीबरोबरच देश व समाजासाठी ते पर्याप्त वेळ देऊ शकत नाही म्हणून त्यांनी चांगली नोकरी सोडून ‘पराक्रम जनसेवी संस्थान’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमाने त्यांनी भ्रष्टाचार विरोधात मोहीम काढली. या प्रकारात त्यांनी माहितीच्या अधिकारात अनेक भ्रष्ट अधिका-यांना तुरुंगात पाठवले. या दरम्यान शरद यांना बराच त्रास दिला गेला. जे लोकं त्यांच्या विरोधात उभे राहिले त्यांची ओळख अनेक राजकारण्यांशी होती पण शरद यांनी कुणालाच दाद न देता आपले कर्तव्य करत राहिले.
भ्रष्टाचार निर्मुलना व्यतिरिक्त त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे काम सुरु केले आहे. शरद यांनी अनेक गावांना (जावरकाठी,नकाटोला,आमटोला गाव, जिल्हा सिवनी, डोंडियाघाट जिल्हा होशंगाबाद) दतक घेतले व तेथील भू-विकासाची काम सुरु केली. या गावांमध्ये त्यांनी एक लाखापेक्षा जास्त झाडे लावली. शरद यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना ‘ग्रीन आईडल अवॉर्ड’ने सन्मानित केले आहे.
शरद यांचा पूर्णपणे सौरउर्जेवर चालणारा एक इकोफ्रेंडली पेट्रोलपंप आहे जिथे नारळ, केळीच्या झाडांबरोबरच अनेक प्रकारच्या भाज्या लावल्या आहे तसेच मुलांच्या खेळण्यासाठी झोके आहेत. त्यांच्या या पेट्रोल पंपाला सलग तीन वर्षा पासून ग्रीन अवार्ड मिळत आहे. या व्यतिरिक्त ते शाळा व कॉलेज मध्ये झाडांची रोपटे भेट स्वरूप देतात, ते सांगतात की कुठे ही गेले की ते लोकांना फुलांची माळ व फुले देण्याऐवजी रोपटी भेट देतात.
शरद सांगतात की भारत हा प्रतिभाशाली देश आहे परंतू अंतर्गत राजकारणामुळे भारताचे खूप नुकसान झाले आहे. राजकारणामुळेच देशात दंगली होऊन अराजकता माजते. नेहमी एकोप्याने रहाणारे लोक भडकाऊ वृत्तीच्या लोकांमुळे एकमेकांचे शत्रू होतात व रक्त सांडवायला सुद्धा मागेपुढे बघत नाही. शरद यांना या गोष्टीचे खूप दु:ख होते, ते सांगतात की लोकांनी या पुढे एकोप्याने राहिले पाहिजे. ते सगळ्या धर्माला व जातीला एक दुसऱ्यांच्या मदतीचे आव्हान देतात व रक्तदानाला महादान मानतात, कारण सगळ्यांचे रक्त हे एकच असते. जातपात ही माणसांनी बनवली आहे देवाने तर आपल्याल्या एकसारखेच बनवले आहे. त्यांनी स्वतः ७० पेक्षा जास्त वेळेस रक्तदान केले आहे व सन १९९३ पासून मध्यप्रदेशच्या भिन्न जिल्यात आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.
शरद सांगतात की या कार्याला सामान्य माणसाचे भरपूर योगदान मिळाले आहे व ते जास्तीत जास्त संख्येने रक्तदान शिबिरात येऊन रक्त दान करत आहे. या कामासाठी ते वेगवेगळ्या दवाखान्यांच्या संपर्कात आहे, जिथे ते गरजेनुसार या साठवलेल्या रक्ताचा पुरवठा करतात.
शरद यांनी युवर स्टोरीला सांगितले की,’’मुलं हे आपल्या देशाचे भविष्य आहे पण आज कालच्या या धावपळीत आपण मुलांना नैतिक मूल्याची शिकवण देऊ शकतनाही जी खूप गरजेची आहे त्यांच्यामध्ये संस्कारांचा अभाव असता कामा नये, एकमेकांना मदत करण्याची भावना असली पाहिजे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक ज्ञानाची त्यांना कल्पना पाहिजे तसेच देशभक्तीची भावना मनातूनच जागृत झाली पाहिजे’’.
या काळातच मुलांना प्रोत्साहित व आत्मनिर्भर करून त्यांच्या अंतर्मनामध्ये नैतिक मूल्यांना जागृत करण्यासाठी शरद यांनी ‘आकाश टीम’ची स्थापना केली. या टीमच्या माध्यमाने ते मुलांकडून रचनात्मक काम करवून देश व समाजाप्रती त्यांना प्रेरित करतात.
शरद सांगतात की जनसेवा हा आता त्यांच्या दिनचर्येचा एक भागच बनला आहे व त्यांना या कामाचा आनंदच वाटतो त्यांची पत्नी डॉ.लक्ष्मी कुमरे यांची या कार्यामध्ये त्यांना मोलाची साथ मिळत आहे. शरद हे भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न बघत असून भारताला जगातील सगळ्या अग्रगणी देशांच्या रांगेत बघू इच्छित आहे.
आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.
आता वाचा संबंधित कथा :
मूक-बधिरांच्या अधिकारासाठी चांगल्या नोकरीला राजीनामा देणारे ज्ञानेंद्र पुरोहित
कचरा वेचक मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी धडपडत आहेत, बनारसचे प्राध्यापक राजीव श्रीवास्तव!
अंधश्रध्दा निर्मूलन करुन जनजागृतीसाठी प्रयत्नरत आहेत डोळ्यांचे एक डॉक्टर दिनेश मिश्र!
लेखक : आशुतोष खंतवाल
अनुवाद : किरण ठाकरे