वैयक्तिकरित्या आणि संस्थात्मक पातळीवरही हवेतलं कार्बनचं प्रमाण कमी करण्याकरता या उद्योजकाकडे आहेत जालीम उपाय

वैयक्तिकरित्या आणि संस्थात्मक पातळीवरही हवेतलं कार्बनचं प्रमाण कमी करण्याकरता या उद्योजकाकडे आहेत जालीम उपाय

Sunday April 24, 2016,

4 min Read

जागतिक पातळीवर हरितगृहांमधून वायू उत्सर्जनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. घातक विषारी वायू उत्सर्जनबाबतचे कायदे अतिशय गुंतागुंतीचे असल्याने कंपन्या त्याचा गैरफायदा घेताना दिसतात. यामुळे परिस्थिती आणखी चिघळत चालली आहे. नो२सीओ२ (no2CO2) आणि सीबॅलेन्सचे संस्थापक विवेक गिलानी म्हणतात,

"देशात कार्बनच उत्सर्जन अतिप्रमाणात श्रीमंत लोकांकडून होत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्यांचं प्रमाण केवळ एक टक्काच आहे. पण या प्रदुषणाच्या आछादनाचा परिणाम 82.3 कोटी सामान्य नागरिकांवरही होत आहे. या सामान्य नागरिकांचा या उत्सर्जनात काहीही वाटा नसतो. म्हणजेच या सामान्य नागरिकांच्या पडद्याआड श्रीमंतांचे खेळ सुरू आहेत".

विवेक गिलानी, संस्थापक, नो२सीओ२ आणि सीबॅलेन्स

विवेक गिलानी, संस्थापक, नो२सीओ२ आणि सीबॅलेन्स


योजना आयोगाच्या कमी कार्बन उत्सर्जनाकरता उपाययोजना २०१४ अहवालानुसार, भारताने २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण सन २००७ च्या तुलनेत ४२ टक्क्यांनी कमी केलं पाहिजे. याकरता देशावर ५५,५९४ अब्ज ८१ कोटी ५३ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे.

यापेक्षा वाईट परिस्थितीकडे विवेक आपलं लक्ष वेधतात,

"कमी प्रमाणात कार्बन उत्सर्जन करणाऱ्यां विरोधात कायदेशीर कारवाई करणं अतिशय गुंतागुंतीचं आहे. खरतरं हे प्रमाण कमी करण्याकरता कंपन्या तसंच वैयक्तिक पातळीवर फक्त पुढाकाराची गरज आहे. म्हणजेच हा पूर्ण विषय पर्यावरणापेक्षाही मानवतेशी जास्त निगडीत आहे".

पर्यावरण संवर्धनाची जाणीव विवेक यांच्यात किशोर वयातच रुजली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी असोसिएशन ऑफ युथ फॉर बेटर इंडिया या संस्थेत कचरा व्यवस्थापनावर काम करायला सुरूवात केली. या संस्थेच्या प्रकल्पांतर्गत विवेक यांनी त्यांच्या निवासी संकुलाच्या सर्व सभासदांना एकत्र आणून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा साठवण्याकरता त्यांचं मन वळवलं. त्यानंतर एनव्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करण्याकरता विवेक मॅसशुसेटस विद्यापीठात दाखल झाले. मास्टर्सनंतर कार्बनचं साम्राज्य कमी करण्याकरता काम करणाऱ्या संस्थांसोबत त्यांनी काम केलं. २००९ मध्ये ते भारतात परत आले. कार्बनचं प्रमाण कमी करणं हे सरकारसोबतच शाळा, महाविद्यालय, कार्यालयं यासोबतच ती प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे या ठाम मताने त्यांनी दोन सामाजिक संस्था सुरू केल्या. 

लोकांना जाणीव करून देण्याकरता नो२सीओ२

आपल्या रोजच्या आयुष्यात कार्बन उत्सर्जन करण्याऱ्या वस्तूंचा वापर टाळण्याकरता लोकांचं मन वळवण्याचं काम नो२सीओ२ करते. ना नफा तत्वावर या संस्थेचं काम चालतं. विवेक यांनी 'C-Footprint Calculator' हे मोफत ऑनलाईन टूल बनवलं आहे. याद्वारे एखादयाला त्याच्या वीज, विमानप्रवास, अन्न आणि पाणी वापरादरम्यान किती प्रमाणात कार्बन उत्सर्जित होत आहे हे जाणून घेता येतं. परिवर्तन घडवून आणण्याकरताही ते काही उपाय सुचवतात. साधनांचा वापर कमीतकमी कसा करता येईल याकरताही ते काही मार्ग सुचवतात. उदाहरणार्थ, कार पूलिंग, कचरा व्यवस्थापन इ. एखाद्या व्यक्तिला ही कल्पना पटल्यावर, ती व्यक्ती या गोष्टीचा प्रसार आणि प्रचार करतेच असं विवेक म्हणतात. त्यामुळे 'जाणीव, कमी वापर आणि समतोल' या त्रिसूत्रींच्या जोरावर विवेक लोकांचं मन कार्बनचा वापर कमी करण्याकरता वळवतात. 


नो२सीओ२ साईटचा फोटो

नो२सीओ२ साईटचा फोटो


उदाहरणार्थ, अपबायटू या मोहिमेत विवेक लोकांना त्यांच्या एसीचं तापमान दोन अंशांनी वाढवायला सांगतात. ते म्हणतात,

"रेस्तराँ, थिएटर्स, ऑफिस अशा बऱ्याचशा ठिकाणी गरज नसताना उगीचच तापमान खूप कमी ठेवलेलं असतं. शास्त्रीयदृष्ट्या आपलं शरीर २४ अंशापर्यंत तापमान सहन करू शकते. जर एखाद्या कॉफि शॉपने अशाप्रकारे तापमान ठेवलं तर वर्षाला ते दहा हजार रुपयांची बचत करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे ५ झाडांचं आयुष्यही. तसंच ०.२९ किलो कार्बन उत्सर्जनाचं प्रमाणही कमी होतं". 

SAP च्या जर्मनीतील मुख्य माहिती केंद्राच्या पुढाकाराबाबत विवेक सांगतात, "आम्ही या केंद्राला त्यांचं तापमान १४ अंशावरुन १५ अंश करायला सांगितलं. यामुळे वर्षाला २१९,००० KWH ची बचत झाली. भारतातली साधारण १ हजार घरं या उरलेल्या वीजेने महिनाभर उजळून निघतील".

मोठ्या कंपन्यांकरिता सीकार्बन

सीबॅलन्स ही व्यावसायिक तत्वावर काम करणारी संस्था आहे. संस्थांना वैयक्तिक पातळीवर विचार करायला ही संस्था प्रयत्न करते. विवेक आणि त्यांची टीम एखाद्या संस्थेतून किती कार्बन उत्सर्ग होत आहे हे जाणून घेते. त्यावर कसं नियंत्रण आणता येईल याचे उपाय सांगते.

सीबॅलन्स गीटस्, लेमन ट्री हॉटेल्स, आयसीआयसीआय बँक, शेनडर इलेक्ट्रिक आणि विप्रो या काही नामांकीत कंपन्यासोबत काम करत आहे. २०१४ मध्ये पन्नास वर्ष जुन्या गिटस् कंपनीमध्ये कार्बनच्या मोक्याच्या जागा आणि आयुष्यचक्रा संबंधी एक चाचणी विवेक आणि त्यांच्या टीमने घेतली. या ठिकाणचा उत्सर्ग कसा कमी करता येईल ते पाहिलं. उदाहरणार्थ, कच्चा माल साठवण्याची जागा. आणखीही बऱ्याच जागा माहीत झाल्या. त्यानंतर याठिकाणी योग्य पावलं उचलल्यावर वर्षाला दोन हजार टन कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण कमी झालं. 

२०१५ मध्ये विवेक यांना जाणवलं की, आपण वैयक्तिक आणि कंपन्यांच्या पातळ्यांवर प्रयत्न तर करत आहोत. पण ते पुरेसे नाहीत. जर शिक्षणव्यवस्थेत या सगळ्याचा अंतर्भाव केला तर जास्त लवकर परिवर्तन घडेल.

आणि मग विवेक यांनी अॅकेडेमिक करिकुला इंटिग्रेशन प्रोजेक्ट सुरू केला. यात आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, इमारत तज्ज्ञ, एनर्जी मोडेलर्स यांच्यात कार्बनच्या दुष्परिणामांबाबत जागृती करायला सुरूवात केली. हरित इमारत, डिझाइन, तापमान शाश्वतपणे कमी करणे, बांधकामाची पद्धत या गोष्टींवर ३-५ दिवसांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं जातं. आतापर्यंत मुंबई, दिल्ली आणि पुण्यामध्ये अशाप्रकारच्या कार्यशाळांमधून २०० जणांनी भाग घेतलाय.

अखेरीस विवेक म्हणतात, "अनेक जण वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळ्यांवर पर्यावरण संवर्धनाचं काम करत आहेत. याचा प्रभावही पडत आहे. यासर्वांनी आपले प्रयत्न आणि यशाची माहिती सर्वांसमोर आणली पाहिजे. जेणेकरुन याबाबत अधिकाधिक जनजागृती होऊन लोकांचा सहभाग वाढेल. परिणामी पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल".

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा :

असा एक स्टार्टअप जो 'कारपूलिंग' मार्फत रस्त्यावर गाड्यांची संख्या कमी करण्यासाठी तत्पर आहे

कचऱ्यातून पैसे मिळवणारे देशातले पहिले स्टार्टअप

आबीद सुरती.....पाणी वाचवणारे बाबा


लेखिका - श्वेता विट्टा

अनुवाद - साधना तिप्पनाकजे


    Share on
    close