लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाय पर चर्चा हा निवडणूक कार्यक्रम चांगलाच गाजला. निवडणुकीत ही चर्चा चांगलीच गाजली. त्यामुळं भारतीय सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला चहा नव्यानं चर्चिला गेला हे विशेष. त्यानंतर चाय पर चर्चा परवलीचा शब्द बनला. इतका की चाय आणि चर्चा यांची सांगड घालून अनेक समाजपयोगी गोष्टी करण्यावर भर देण्यात आला. याच धर्तीवर औरंगाबादच्या हारुन मुकाती इस्लामिक सेंटरनं चाय पर शादी हा अनोखा उपक्रम राबवायला सुरवात केलीय. २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आलाय.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून देशभरात पावसाने पाठ फिरवली आहे. काळ्या ढगांनी पाठ फिरवली. आकाशातून पाणीच पडलं नाही. शेती सोडाच पिण्याच्या पाण्याचीही भ्रांत. चार-पाच धरणं आणि तलाव असलेल्या मुंबईसारख्या शहराची अवस्था अगदी बिकट झालीय. तर मराठवाड्याची काय बात करणार. तिथं तर दुष्काळ पाचवीला पुजलेला. मग या नव्यानं आलेल्या परिस्थितीचं ते काय घेऊन बसायचं. दुष्काळामुळं इथली सामाजिक घडीच बिघडून गेलीय. इतकी की अनेकांनी स्थलांतर केलंय. हाता काम असेल तर जगणं शक्य आहे. म्हणून अनेकांनी आपलं गाव सोडलं आणि शहराचा रस्ता धरला अशी ही मराठवाड्यातली अवस्था. अशा परिस्थितीत लग्न कार्य कसं करणार हा प्रश्न नाही विचारलेलाच बरा. जिथं दुष्काळानं कंबरडं मोडलंय. जिथं रोजच्या खाण्याचे वांदे अशा स्थितीत लग्न कार्य कसं करणार हा गंभीर प्रश्न इथल्या समाजाला भेडसावतोय. यावर उपाय म्हणून हारुन मुकाती इस्लामिक सेंटरनं चाय पर शादी हा अनोखा उपक्रम हाती घेतलाय.
चाय पर शादी म्हणजे काय ?
हारुन मुकाती इस्लामिक सेंटरचे संचालक युसूफ मुकाती यांनी सांगितलं की “ मुस्लिम समाजात गरीब कुटुंबातल्या मुलींच्या लग्नासाठी लाखोंचं कर्ज काढलं जातं. आधीच सततच्या दुष्काळानं इथल्या लोकांची कंबर मोडलेली आणि हे लग्नासाठी नव्यानं घेतलेलं कर्ज अशा कुटुंबियांची पार वाट लावतं. त्यांना अतिशय बिकट समस्यांना सामना करावा लागतो. अनेकदा एका लग्नाचं कर्ज फेडण्यात एक अख्खी पिढी आयुष्यभर त्याच्या ओझ्याखाली वावरत असते. यातून अऩेक गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठीच चार पर शादी या अनोख्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केलीय. मुलीच्या विवाहासाठी तिचे वडील नाही म्हटलं तरी दोन ते अडीच लाखाचं कर्ज घेतात. तेही प्रचंड व्याज दरावर. मग ते कर्ज फेडण्यात या बापाची जिंदगी जाते. चाय पर शादी या कार्यक्रमाअंतर्गत वधु आणि वर पक्षाकडून संमती मिळाल्यानंतर त्यांना सेंटरतर्फे हॉल मोफत दिला जातो. शिवाय काजींचं मानधनही सेंटरच देतं. याच बरोबर ७०० ते ८०० लोकांच्या चहाचा खर्च सेंटरतर्फे केला जातो. म्हणूनच या उपक्रमाचं नाव ठेवण्यात आलंय. चाय पर शादी.”
मुस्लिम समाजात लग्न जुळवण्यावरुन होणाऱ्या समस्यांवर तोडगा म्हणून हा चाय पर शादी चा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. शिवाय लग्नात मेहर आणि इतर गोष्टींवर होणारा खर्च लक्षात घेऊन समाजाच्या एका मोठ्या घटकाला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सेंटर तर्फे केला जातोय. यासाठीच वर्षभरापुर्वी मॅरेज ब्य़ुरोची स्थापना करण्यात आली. यातून या समस्या सोडवण्य़ाचा अटोकाट प्रयत्न करण्यात आला. आतापर्यंत १२०० तरुण आणि ६५० मुलींचं सेंटरमध्ये चार पर शादी कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.
अधिकाधिक लोकांना या उपक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. इथल्या मॅरेज ब्युरोमध्ये महिन्याला ३० से ३५ लग्न ठरवली जातात. या सर्वांना चाय पर शादी करण्याचा सल्ला दिला जातो. जास्तीत जास्त लोकांना य़ा उपक्रमात सहभागी करुन घेऊन समाजाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचं युसूफ मुकाती यांनी स्पष्ट केलंय. समाजाची बाब आल्यानं अनेक जण स्वत:च चाय पर शादी साठी तयार होतात हे विशेष. दुष्काळाचा सामना करताना, सामाजिक भान ठेवून सुरु केलेला हा चाय पर शादीचा उपक्रम खरोखर स्तुत्य उपक्रम मानावा लागेल. औरंगाबादच्या लोकांचा त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय.
अशा अजून प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आमच्या पेज Facebook ला लाईक करा.
आता वाचा अशाच काही प्रेरणादायी आणि सामाजिक हित साधणाऱ्या कहाण्या :