गावांना स्मार्ट बनवण्यासाठी दोन परेदशी महिलांचा ‘इस्मार्ट’ पुढाकार
Saturday October 24, 2015,
5 min Read
आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं अजूनही ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात पोहोचलेली नाहीत. गेल्या ५० वर्षात तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झालंय तरीही आवश्यक उपकरणं मात्र ठराविक भागांपुरतीच मर्यादित राहिली आहेत. वितरणावर विशेष भर देऊन ही समस्या सोडवली जाऊ शकते. असाच काहीसा प्रयत्न केला आहे आयव्ही लिगच्या विद्यार्थिनींनी. या दोन विद्यार्थिनींनी आपल्या विचारांना मूर्त रुप देत इस्मार्टची सुरूवात केली. इस्मार्टच्या माध्यमातून ग्रामीण भागाला तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयोग त्या करत आहेत. या उपक्रमाची सुरुवात तामिळनाडूमधून झाली आहे. ग्रामीण भारतातील सर्व किराणा दुकानांवर मुलभूत तंत्रज्ञान असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं उपलब्ध करुन देण्याचा इस्मार्टचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे इस्मार्ट स्थानिक स्तरावरील उत्पादनांना प्राधान्य देत आहे.
सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा घडवून आणणाऱ्या उत्पादनांना इस्मार्ट प्रोत्साहन देत आहे.
या अनोख्या आणि परिणामकारक संकल्पनेची सुरुवात डायना आणि जॅकी नावाच्या दोन विद्यार्थिनींनी केली.
संशोधना दरम्यान या दोघींना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे भारताच्या ग्रामीण भागातील छोट्या छोट्या किराणा दुकानांकडे लोकांचा ओढा अधिक आहे आणि या दुकानांवर त्यांचा खूप विश्वासही असतो. डायना आणि जॅकीने आपल्या उत्पादनांच्या वितरणासाठी याच छोट्या छोट्या दुकानांवर विश्वास दर्शवला. इस्मार्टचे सेल्स एक्झिक्युटिव्ह या छोट्या दुकानांवर उत्पादनं ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर भर देतात. या छोट्या दुकानदारांनी इस्मार्टच्या उत्पादनांबाबत इतरांना सांगण्यास सुरूवात केली. एकप्रकारे त्यांनी मार्केटिंगचं काम केलं. हळूहळू या दुकानदारांचा इस्मार्टवरील विश्वास वाढू लागला आणि याचाच परिणाम म्हणून २०१२ मध्ये पोलची इथं इस्मार्टचं वितरण केंद्र सुरू झालं. आता तामिळनाडूच्या ग्रामीण भागात इस्मार्टची ६ वितरण केंद्र सुरू झाली आहेत. इस्मार्ट सौर कंदिलांसह जलशुद्धीकरण यंत्र, कृषी सहायक यंत्र अशा उत्पादनांची विक्री करते.
इस्मार्टची कार्यपध्दती बाजारपेठेपेक्षा वेगळी आहे. इस्मार्टतर्फे जेवढी उत्पादनं वितरीत केली जातात ती सर्व स्थानिक लोकांनी तयार केलेली असतात. अशाप्रकारे इस्मार्ट स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ तर उपलब्ध करुन देतेच पण त्यांना प्रोत्साहनही देत आहे. सामाजिक रचनेला भक्कम करुन त्याद्वारे व्यापाराला एक नवीन दिशा देण्याचा इस्मार्टचा प्रयत्न आहे. सौर कंदिल किंवा शेतीसाठी उपयुक्त उपकरणं ग्रामीण ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यामागे ग्रामीण भारताला सक्षम करणं आणि तंत्रज्ञानाच्या जवळ आणणं हा उद्देश आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी ग्रामीण भागातील लोकांना हीच उत्पादनं एखादी एनजीओ आणि सरकारी योजनेच्या माध्यमातून मोफत दिली जात होती. पण ती दुय्यम दर्जाची असत आणि त्यांना कोणतीही सर्विसिंग किंवा विक्री पश्चात सेवा मिळत नव्हती. इस्मार्टला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की जेव्हा याच ग्रामीण ग्राहकांना हीच उत्पादनं दुकानांच्या माध्यमातून मिळाली तेव्हा त्यांनी त्याबाबत आपला विश्वास व्यक्त केला आणि या उत्पादनांचं महत्त्व जाणून घेण्यास सुरुवात केली. इस्मार्टचा सर्वप्रथम प्रयत्न हाच होता आणि त्यात त्यांना यश येत होतं. ग्रामीण लोकांकडे अशी उत्पादनं यापूर्वीही येत होती. पण त्यांच्या दर्जामुळे या उत्पादनांवर लोकांचा विश्वास राहिला नव्हता. हाच विश्वास परत मिळवणं हे इस्मार्टपुढील आव्हान होतं. हीच समस्या सोडवण्यासाठी त्यासाठी इस्मार्टने बाजारपेठेतील इतरांपेक्षा एक पाऊल पुढे टाकलं. इस्मार्टने उत्पादनांची काळजीपूर्वक तपासणी केली आणि मंजुरी घेऊनच ती बाजारात उतरवली. व्यवस्थित तपासणी झालेली उत्पादनं असल्याने ग्राहकांचा त्यावर विश्वास बसला. तसेच काही तांत्रिक बिघाड असला तरी सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना भटकावं लागलं नाही. उत्पादन विक्रीपर्यंतच ग्राहकांशी संबंध ठेवण्यापेक्षा विक्रीनंतरही उत्पादनांची सर्विसिंग आणि इतर गोष्टींची काळजी इस्मार्टतर्फे घेतली जाते.
आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून इस्मार्टने ग्राहकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. पण यामुळे त्यांच्यावरील जबाबदारीही वाढली आहे.
भारताच्या दक्षिणेतील तामिळनाडूसारख्या राज्यात एका अनोळखी जागी डायना आणि जॅकीने आपलं स्वप्न साकारण्यासाठी इस्मार्टची मुहूर्तमेढ रोवली. वास्तविक पाहता डायनासाठी हा परिसर अनोळखी नव्हता. मद्रास आयआयटीमध्ये शिकत असताना डायनाने इथं खूप वेळ घालवला असल्यानं तिचा या ठिकाणी खूप लोकांशी परिचय झाला होता. तामिळनाडूमध्ये काम सुरू करण्यासाठी दोघींना मदत झाली ती जॅकीचा वर्गमित्र प्रशांत वेंकटरमन याची. पोलाची इथल्या प्रशांतने त्यांची खूप मदत केली. संकटांचा व्यवस्थित सामना करण्याची क्षमता आपल्यात असल्यानं स्वप्न साकार करण्यासाठी मागेपुढे न पाहता पाऊल उचललं असं जॅकी सांगते.
इस्मार्टचा प्रवास खूपच रोमांचकारक आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रातील कार्टियर वुमेन्स इनिशिएटीव्ह २०१४ सारख्या पुरस्काराने सन्मानित डायनाने आपण उद्योजक होऊ याचा कधी विचारही केला नव्हता. दक्षिण भारतातील उद्योजकतेचा प्रसार आणि त्याचे सामाजिक परिणाम या विषयावरील प्रबंधावर काम करत असताना डायनाला एक गोष्ट जाणवली की बाजारपेठेत वितरणाची कोणतीही व्यवस्थाच उपलब्ध नाहीये, वितरणाबाबत एकप्रकारची उदासीनता होती.
एमआयटी कॉलेजमधून नागरी नियोजन आणि आंतरराष्ट्रीय विकास या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डायनाला या समस्येबाबत जनजागृती निर्माण करायची होती. त्यामुळेच डायना जॅकीच्या इस्मार्ट उपक्रमात सहभागी झाली. हार्वर्ड विद्यापीठातून विकासातील सातत्य विषयात अभियांत्रिकी पदवी घेतलेली जॅकी डायनाच्या विचारांशी सहमत होती. महाविद्यालयातील एका प्राध्यापकानं जॅकी आणि डायनाची ओळख करुन दिली होती, पण दोघींचे विचार एकमेकींना पटले आणि त्या चांगल्या मैत्रिणी झाल्या. जॅकीसारखी चांगली भागीदार मिळाली हे आपलं भाग्य आहे असं डायना सांगते. जॅकीने इथिओपीया आणि द. आफ्रिकेसारख्या देशांमधील वितरण व्यवस्थेतील त्रुटी जाणून घेतल्या होत्या तर डायनाने तिबेटमध्ये ग्रामीण भागातील विक्री आणि विपणन व्यवस्थेमधील अडचणी जवळून पाहिल्या होत्या. जॅकी आणि डायनाने इस्मार्टसाठी काही पुरस्कारही मिळवले आहेत. यात एमआयटी आयडियाज ग्लोबल चेंज, डेल सोशल इन्होव्हेशन चॅलेंजसारख्या पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांसोबत मिळणाऱ्या रकमेमुळे कंपनीला एक ऊर्जाही मिळाली आहे. पण या पुरस्कारांपैकी सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे कार्टियरचा वुमेन्स इनिशिटीव्ह ऍवॉर्ड २०१४...याच पुरस्कारानं इस्मार्ट, जॅकी आणि डायना या तिघांना एक ओळख दिली. जवळपास सगळ्याच उद्योगांमध्ये वितरण व्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचं जाणवलं असं डायना सांगते. त्यामुळे याच मुद्यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रीत केलं. जागतिक पातळीवर या विषयात पुढाकार घेतला ही त्यांची महत्त्वाची ओळख बनली आणि महिलांनी या कार्याला सुरुवात केल्याने त्याचं महत्त्व अजून वाढलं. स्थानिक पातळीवर इस्मार्टचा कोणीही स्पर्धक नाही ही त्यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे. सर्व ऋतुमध्ये उपयोगी पडतील अशी उपकरणं इस्मारर्टतर्फे ग्राहकांना उपलब्ध करुन दिली जातात, यामुळेच कंपनीचा विकास वेगानं झालाय. कंपनीनं आता कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. सध्या आर्थिक गुंतवणुकीच्या हेतुनं कंपनीचं काम थोडं धीम्या गतीनं सुरू आहे. पण ग्रामीण वातावरणात पूर्णपणे सामावून जाण्याचा आणि भारताच्या ग्रामीण भागात व्यवसायाची नवीन व्याख्या निर्माण करण्याचा कंपनीचा मानस आहे. दोन परकीय महिलांनी केलेला हा प्रयत्न नक्कीच भारताचा पाया मजबूत करणारा आहे. इस्मार्ट उद्योगांना एक ऊर्जा पुरवत आहे तसंच देशाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावत आहे.