कामगारांना अल्पदरात पौष्टिक पोटभर अन्न पुरवण्याचा डच नागरिकाचा वसा

कामगारांना अल्पदरात पौष्टिक पोटभर अन्न पुरवण्याचा डच नागरिकाचा वसा

Friday March 04, 2016,

4 min Read

नेदरलँडमधील इन्वीयूने २०१३ मध्ये भारतामध्ये काम करायचं ठरवलं. डच गुंतवणूकदार जेस वान दे झांड इन्वीयूच्या प्रसाराकरता भारतात दाखल झाले. इथे आल्यावर त्यांची गाठ पडली प्रभात अग्रवाल यांच्याशी. एचसीएल आणि आरपी पुंज यासारख्या बड्या कॉरपोरट्समध्ये नोकरी केल्यावर स्वतःच काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात त्यांनी उद्योगात उडी घेतली. प्रभात असंघटीत क्षेत्र आणि कनिष्ठ वर्गाकरता त्यांना परवडणाऱ्या दरात पौष्टीक आणि स्वच्छ अन्न पुरवतात. जेस यांना प्रभात यांची कल्पना चांगलीच भावली. आणि मग तेही जनता मिल्सच्या प्रकल्पात सामील झाले. झोपडपट्ट्या आणि नाक्यांवर केवळ २० रुपयांमध्ये पौष्टिक जेवण पुरवणारी जनता मिल्स ही एक छोट्या रेस्टॉरंटसशी साखळी आहे.

जनता मिल्सची चव चाखताना जेस वान दे झांड आणि प्रभात

जनता मिल्सची चव चाखताना जेस वान दे झांड आणि प्रभात


जनता मिल्स

एक रिक्षाचालक संपूर्ण शहरात रोज साधारण १०० किलोमीटर फिरतो. भूक लागली की रस्त्याच्या कडेला असलेल्या धाबा किंवा टपरीवर काहीतरी खाऊन पोट भरतो. पण हे फक्त उदरभरणच असतं यातून त्याला किती जीवनसत्त्व किंवा एका दिवसाला आवश्यक असणाऱ्या कॅलरिज मिळतात? शिवाय या जागी असणारी स्वच्छता आणि ताजं अन्न हा संशोधनाचा वेगळा विषय आहे. ड्रायव्हर, कंडक्टर, क्लिनर्स, बांधकामावरचे मजूर, कंत्राटी कामगार, सुरक्षारक्षक या सर्वांच्या पोटात बहुतांशी असंच अस्वच्छ जागी, शून्य पोषणमूल्य असलेलं अन्न पडतं. कारण त्यांना परवडणाऱ्या किंमतीत हेच उपलब्ध असतं. हे सर्वच जण अर्धपोटी बारा-बारा तास काम करतात. जेस म्हणतात, “पोषणमूल्याचा अभाव असलेलं अन्न खाल्याचा परिणाम या सर्वांच्या प्रकृतीवर होत असतो. कॅलरीज कमी मिळाल्याने कार्यक्षमतेचा अभाव, परिणामी कमी उत्पन्न मिळतं. आणि हे दुष्टचक्र असचं सुरू राहतं”.

प्रभात यांच्या मते ही समस्या खूप मोठी आहे,

“गुडगावमध्ये साधारण २५ लाख लोकसंख्या आहे. त्यातले १५ लाख लोक असंघटीत क्षेत्रात काम करतात. दिल्ली एनसीआरमध्ये हा आकडा १० पटीने वाढतो. म्हणजेच साधारण दीड कोटी लोकांना नियमित उत्पन्न, वैद्यकीय सुविधा, विमा किंवा निवृत्तीवेतन या बाबतीत अस्थिरता आहे. मासिक उत्पन्नामध्ये सतत चढउतार असतो. पाच ते आठ हजार असा चढउतार होत असतो. त्यामुळे दिवसाला ६० रुपयांचं जेवण हे त्यांच्याकरता अळवावरच्या पाण्यासारखं आहे. आणि मी हे फक्त एका शहरापुरतं बोलतोय”.

या समस्येवर तोडगा काढण्याकरता पौष्टीक आणि स्वस्त जनता मिल्सची कल्पना पुढे आली. दिल्ली एनसीआरच्या कामगार वर्गाला परवडणाऱ्या किंमतीत ते जेवण पुरवतात. २० रुपयांमध्ये वरण-भात किंवा पोळी-भाजी मिळते. तर ३० रुपयांमध्ये वरण, भात, पोळी, भाजीसोबत कोशिंबीरही दिली जाते.

जनता मिल्सची कार्यप्रणाली

जनता मिल्स दोन स्तरावर काम करतं. पहिला म्हणजे शहरात त्यांचे स्वतःचे आऊटलेटस् आहेत. छोट्या छोट्या उद्योजकांद्वारे हे चालवण्यात येतात. आउटलेटस् च स्थळ निवडणं, ८-१६ जणांच्या बसण्याची सोय करणं या फ्रंचाईजी मॉडेलप्रमाणे हे काम चालतं. जनता मिल्स त्यांना तयार जेवण पुरवतं. अक्षयपात्रसोबत मोठ्या स्वयंपाकघरात हे जेवण बनवलं जातं. सरकारी आणि निमसरकारी शाळांमध्ये ना नफा तत्वावर अक्षयपात्र जेवण पुरवतं. अक्षयपात्रच्या स्वयंपाकघरात सकाळी ११ वाजता जेवण तयार होतं. जनता मिल्स लहान उद्योजकांना आवश्यक ते अकांउटंस्, सेवाक्षेत्राला आवश्यक असणाऱ्या बाबींच प्रशिक्षणही देतं.

खूप मोठ्या प्रमाणात भाज्या आणि वाणसामानाची खरेदी केल्यामुळे त्यांना अवघ्या २० रुपयांतही दर्जेदार जेवण पुरवता येतं. लहान उद्योजकाला या सेटअपसाठी ७० हजार ते एक लाख रुपयांचा खर्च येतो. आणि या उद्योगात हमखास यश असल्यामुळे काही उद्योजक तर महिन्याला ५० हजार रुपयांचीही कमाई करत आहेत.

दुसऱ्या स्तरावर जनता मिल्स वेगवेगळ्या कॉर्पोरेटससोबत काम करते. वेगवेगळ्या कामांकरता कॉर्पोरेटस् मध्ये कंत्राटी कामगार असतात. या कामगारांकरता जनता मिल्सच्या मध्यवर्ती स्वयंपाकघरातून थेट पाकीटबंद जेवण पुरवण्यात येतं. सध्या ते लार्सन टुर्बोसारख्या १० कॉर्पोरेटस् ना पाकीटबंद जेवण पुरवतात.

वाटचाल

गुडगाव आणि कुरूक्षेत्र परिसरात जनता मिल्सच्या ३० फ्रंचाईजी आहेत. दिवसाला ते १५ हजार जणांची क्षुधा आपल्या पौष्टिक जेवणाने शांत करतात. आतापर्यंत त्यांनी ६८ लाख, १३ हजार ९३५ जणांनी त्यांच्या सेवेचा लाभ घेतलाय.

पुढील तीन महिन्यांमध्ये आपली सेवा आणखी वाढवण्याकरता आता ते जोरदार प्रयत्न करत आहेत. बेंगळुरू आणि विशाखापट्टणममध्ये जनता मिल्सची सेवा देण्याकरता ते आता आखणी करत आहेत. यासोबतच ते ‘जनता फूड व्हॅन्स’ या नावाने आपले फूड ट्रक्स आणणार आहेत. नाकाकामगारांची संख्या जास्त असणाऱ्या भागात हे ट्रक पार्क करण्यात येतील.

पण जेस आणि प्रभात यांच्याकरता वाढणाऱ्या आकड्यांपेक्षा लोकांचे अनुभव जास्त भारावून टाकणारे आहेत. यामुळे त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळतेय.

“एका नाकाकामगाराच्या कामाच्या ठिकाणी जनता मिल्सचा स्टॉल नव्हता. त्याचा एक मित्र जनता मिल्सचा नेहमीचा ग्राहक आहे. एक दिवस त्याचा मित्र त्याच्याकरता जनता मिल्सचं जेवणाचं पाकीट घेऊन गेला. त्याला हे पौष्टीक आणि परवडणाऱ्या किंमतीतलं संपूर्ण जेवण प्रचंड आवडलं. या जेवणाच्या आमिषाने त्याने आपली बदली जनता मिल्सच्या स्टॉलजवळच्या साईटवर करायला आपल्या कंत्राटदाराला पटवलं”.

रणजीत गालसिंह या ३५ वर्षीय सुरक्षारक्षकाचा अनुभवही छान आहे. ते सांगतात, “मी गेली तीन वर्ष गुडगावच्या सिंकदरापूर भागात काम करतोय. पण या भागात किफायतशीर दरात घरच्यासारखी चव देणारं एकही रेस्टॉरंट माझ्या पाहण्यात नाही. खिशाला जास्त ताण न देता मला पोटभर आणि पौष्टिक जेवण मिळतयं”.

जनता मिल्सला लोकांच्या पसंतीची हीच तर पावती हवीय...

अशाच नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

स्नॅकीबलः एक पाऊल निरोगी जगण्याच्या दिशेने

"भूक मिटाओ" मोहिमेमुळे टळली १८०० मुलांची उपासमार

गरजूंचे पोट भरणारा सामाजिक उपक्रम ʻफिड युअर नेबरʼ

लेखिका – श्वेता विट्टा

अनुवाद – साधना तिप्पनाकजे