ʻटाईम्सवर्झʼच्या देबदत्ता यांची यशोगाथा

ʻटाईम्सवर्झʼच्या देबदत्ता यांची यशोगाथा

Thursday December 03, 2015,

3 min Read

आयुष्य हे तुम्ही घडवता तसं घडत असतं. आपल्या प्रत्येकाकडे आपल्या पसंतीचे आयुष्य निवडण्याचे स्वातंत्र्य असते आणि आयुष्यातील कठीण काळ म्हणजे आपण निवडलेल्या पर्य़ायाचा एक भाग असतो, हे उद्गार आहेत देबदत्ता उपाध्याय यांचे. भारतीय कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणारी पहिली आणि एकमेव बाजारपेठ म्हणजे टाईम्सवर्झ, देबदत्ता या त्या उद्योगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक आहेत. या कंपनीच्या यशाचे सर्व श्रेय हे देबदत्ता यांच्या अथक मेहनतीला जाते. साहित्य या विषयातून शिक्षण पूर्ण केलेल्या देबदत्ता यांचे स्वप्न पत्रकार व्हायचे होते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेत नोकरीसाठी अर्जदेखील केला. मात्र तेथे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती वितरण विभागात. रिस्पॉन्स एक्झिक्युटीव्ह पदावर त्यांनी काम सुरू केले. आतापर्यंत त्यांना अनेक चांगल्या कंपनीतील कामाचा अनुभव आहे. त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक आय़ुष्यातील काही महत्वांच्या टप्प्यांबद्दल आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतले. ओडिशा राज्यातील रुरकी शहरात देबदत्ता यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल मनुष्यबळ विभागात कार्य़रत होते. तसेच त्यांची आईदेखील सुशिक्षित होती. देबदत्ता यांनी आपल्या आयुष्यातील महत्वाचे दिवस रुरकी येथे व्यतित केले. देबदत्ता या एकोणीस वर्षाच्या असताना त्यांचे कुटुंब छत्तीसगड येथील भिलाई शहरात स्थलांतरीत झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर देबदत्ता नागपूरला स्थायिक झाल्या. तेथे त्यांच्या व्यावसायिक आयुष्याला सुरुवात झाली. पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यामुळे देबदत्ता यांनी लग्नानंतर माध्यमांमध्ये वितरण विभागात काम करण्यास सुरुवात केली. द टाईम्स ऑफ इंडिया, याहू! इंडिया यांसारख्या अव्वल आणि प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले. स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा पूर्वीपासूनच असल्याचे देबदत्ता सांगतात. २०१२ साली जेव्हा देबदत्ता नोकरी करत होत्या, तेव्हा खासगी आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल राखणे, त्यांच्यासाठी आव्हान ठरत होते. गृहिणी, आई आणि नोकरदार स्त्री, या तिन्ही भूमिका चोख बजावताना त्यांच्या नाकी नऊ येत होते. ʻविभक्त कुटुंबात कोणाचीही मदत नसताना एका मुलाला सांभाळणे, दैनंदिन आयुष्यातील कामे पूर्ण करणे, हे माझ्यासाठी एक आव्हान होते. माझ्यासारख्या अनेकजणींना या समस्येचा सामना करावा लागतो. यावर माझ्या आणि माझ्या सहकाऱ्याच्या मनात टाईम्सवर्झची कल्पना आली. आमच्या संकल्पनेने आता मूर्त स्वरुप धारण केले आहे.ʼ, असे देबदत्ता सांगतात. 

image


देबदत्ता यांच्या मते, टाईम्सवर्झ ही एकाच ठिकाणी सर्व घरगुती सेवा पुरवणारी एक कंपनी आहे. या कंपनीद्वारे प्रमाणपत्रधारक सेवा पुरवणाऱ्यांची पडताळणी करुनच त्यांना ग्राहकांशी संपर्कात आणले जाते. यामुळे फक्त ग्राहकांचाच फायदा होत नाही तर छोट्या स्तरावर काम करणाऱ्या कामगारांनादेखील एका शिस्तबद्ध बॅनरखाली आणणे, यामुळे शक्य झाले आहे. विस्थापित असलेले कामगार यामुळे एका बॅनरखाली एकत्रित झाले. त्यांचे राहणीमानदेखील यामुळे सुधारल्याचे त्या सांगतात. सध्या ही कंपनी मुंबई आणि पुणे या शहरात ५००हून अधिक सेवा पुरवणाऱ्या कामगारांचा पुरवठा करते. देबदत्ता यांच्या मते, आयुष्यात विविध टप्प्यातील प्रवास हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तीन वर्षांपूर्वी मुंबईत या उद्योगाची सुरुवात झाली. ७०ते ७५ टक्के घरगुती सेवा या उद्योगाद्वारे पुरविल्या जातात, असे देबदत्ता सांगतात. देबदत्ता सांगतात की, तीन वर्षांपूर्वी जेव्हा कॉर्पोरेट जगतात स्वतःचा ठसा उमटविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. मात्र सध्या त्यांनी सर्व लक्ष त्यांच्या मुलाकडे केंद्रीत केले असून, त्याला मार्गदर्शन करण्यात त्या त्यांचा अधिकतम वेळ व्यतित करतात. टाईम्सवर्झ नसते तर देबदत्ता कुठे असत्या, या प्रश्नावर बोलताना त्या ʻमला मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रात काम करायला मला आवडले असतेʼ, असे सांगतात.प्रत्येकाला सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी प्रेरीत करणे गरजेचे आहे. देबदत्ता यांच्या व्यावसायिक वाढीलादेखील त्यांचा भक्कम शैक्षणिक पाया, हाच कारणीभूत असल्याचे त्या सांगतात. नव्या उद्योजकांना देबदत्ता सल्ला देतात की, ʻउद्योजकतेत प्रत्येक उद्योजकाला चढ-उतारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे उद्योजकांनी कुठे झुकते घेण्यास लाजू नये. अनेकदा आपण एकत्रितरित्या अनेक समस्या सोडवतो, ज्या एकट्याने सोडवणे अवघड असते.ʼ, असे त्या सांगतात.

image


लेखिका - पल्लवी सिन्हा

अनुवाद - रंजिता परब