माहिती तंत्रज्ञानात नाही, तर दुग्धव्यवसायात मिळाला ʻसंतोषʼ

माहिती तंत्रज्ञानात नाही, तर दुग्धव्यवसायात मिळाला ʻसंतोषʼ

Friday November 06, 2015,

3 min Read

काही लोक आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असतात. त्यापैकीच एक म्हणजे संतोष डी सिंह. बंगळूरू येथुन पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरची दहा वर्षे त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगाचा अनुभव घेतला. या दरम्यान त्यांनी डेल आणि अमेरिका ऑनलाईनसाठी काम केले. ही त्यावेळेची गोष्ट आहे जेव्हा भारतात माहिती तंत्रज्ञान प्रचलित होते. तेव्हा त्यांना कामासाठी जगभर फिरण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यांना हे समजले की, पैसा कमाविण्यासाठी अजूनदेखील मार्ग आहेत जसे की उद्योग व्यवसाय. तेव्हाच त्यांच्या मनात दुग्धव्यवसायाची कल्पना आली. आपल्या या निर्णयाची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर संतोष यांनी कॉर्पोरेट जगाशी संबंध संपवला आणि आपल्या कल्पनेला मूर्त स्वरुप देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या दरम्यान त्यांनी प्रकल्प व्यवस्थापन, सुधारित प्रक्रिया, व्यवसायाबद्दलची माहिती, विश्लेषण आणि संसाधन व्यवस्थापन यांचा अभ्यास करणे सुरू केले. कॉर्पोरेट संस्कृतीत काम करताना ते या गोष्टी शिकले होते. संतोष यांच्या मते, दुग्धव्यवसायात स्थैर्यासोबतच फायदादेखील आहे. हे एक असे काम आहे ज्यात त्यांना फक्त वातानुकुलित खोलीतून बाहेरच पडायचे नव्हते तर त्यांच्यासाठी हा एक उत्साहवर्धक अनुभव होता.

image


संतोष यांच्याकडे दुग्ध व्यवसायाबद्दल कोणताही अनुभव नव्हता. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रीय दुग्ध अनुसंधान संस्थेत प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. शिक्षणादरम्यान संतोष यांनी दुग्धव्यवसायासंबंधित अनेक अनुभव घेतले. या दरम्यान त्यांनी गाय पालन कसे केले जाते, याचे शिक्षण घेतले. ज्यामुळे कोणतेही काम आपण दीर्घकाळापर्यंत करू शकतो, असा त्यांच्यात विश्वास आला. सोबतच हा आकर्षक व्यवसाय असल्याचे त्यांना जाणवले.

जवळपास तीन वर्षांपूर्वी संतोष यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी आपल्या तीन एकर जागेत तीन गायींना ठेवले. या दरम्यान त्यांनी दुग्ध उत्पादनाचे काम सुरू केले. त्यासोबतच त्यांनी गायींची देखभाल करणे, त्यांना आंघोळ घालणे, दुध काढणे आणि साफ सफाई करणे, यांसारखी कामे स्वतःच केली. सुरुवातीला २० गायी घेऊन आपले काम सुरू करण्याचा त्यांचा मानस होता. त्याच अनुषंगाने त्यांनी पायाभूत आराखडा तयार केला. मात्र एनडीआरआयचे एक प्रशिक्षक ज्यांच्याकडून संतोष यांनी प्रशिक्षण घेतले होते. संतोष यांनी याबाबत तांत्रिक मदतीसाठी नाबार्ड यांच्याकडून माहिती घ्यावी, असा त्यांनी सल्ला दिला. संतोष यांनी नाबार्ड येथे यासंबंधात चर्चा केली. तेव्हा त्यांना समजले की, संसाधनांच्या योग्य वापराने त्यांना लाभ होऊ शकतो. गरज होती ती फक्त या व्यवसायाला मोठे स्वरुप देण्याची आणि गुरांची संख्या १०० वर नेण्याची. यामुळे रोज त्यांना हजारो लीटर दुध मिळणार होते आणि एका निष्कर्षानुसार त्यांची वार्षिक उलाढाल एक कोटींच्या घरात जाणार होती.

image


गेल्या पाच वर्षांमध्ये दुग्ध उत्पादनाच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि या व्यवसायात फायदादेखील चांगला आहे. संतोष यांचा आत्मविश्वास त्या वेळेस वाढला जेव्हा नाबार्ड यांनी त्यांना दुग्ध व्यवसायाकरिता रौप्य पदकाने सन्मानित केले. त्यानंतर स्टेट बॅंक ऑफ म्हैसूरने त्यांच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. या गुंतवणुकीमुळे त्यांच्या कामाचा वेग वाढला आणि त्यांनी १०० गायी पाळण्याच्या पायाभूत आराखड्यावर काम करण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांच्या मनात एक विचार आला की, दुष्काळाच्या परिस्थितीत जेव्हा जनावरांसाठी हिरवा चारा मिळणे कठीण असते, तेव्हा काय करायचे. गेल्या १८ महिन्यांपासून अवकाळी पाऊस पडत होता. त्यामुळे चाऱ्याच्या किंमती दहापट वाढल्या होत्या. त्यामुळे रोजच्या उत्पादनातदेखील घट झाली होती आणि उत्पादनाने किमान स्तरदेखील गाठला. परिस्थिती एवढी बिघडली होती की त्यांनी आपल्या साठवणीतील पैसा देखील या कामासाठी वापरला. या दरम्यान त्यांनी अशा परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी उपाय शोधणे सुरू केले. ज्यानंतर त्यांनी हायड्रोफ़ॉनिक्सच्या माध्यमातून हिरवा चारा निर्माण करण्याचा निर्णय घेतला. आता जेव्हा या वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस पडला तेव्हा संतोष दुग्ध उत्पादनात वाढ करण्यात यशस्वी झाले. संतोष सध्या आपल्या कामाला पुढे नेण्यासाठी या कामात अधिक गुंतवणूक करू इच्छितात. त्यासाठी ते सध्या बॅंकेऐवजी दुसरे पर्यायदेखील चाचपडून पाहत आहेत. जेणेकरुन या कामाला ते अधिक मोठ्या स्तरावर नेऊ शकतील.

image