अमेरिकेतल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावातल्या किराणा दुकानदारांच्या जीवनात बदल घडविणारे अमृतांशू

अमृतांशू यांना आपल्या मेहनत आणि ध्यास यावर भरोसा होता, त्यामुळेच त्यांनी सा-या अडचणींवर मात केली आणि मायक्रोसॉफ्ट तसेच कँपजेमिनी सारख्या प्रसिध्द कंपन्यांचे प्रकल्प केले. . . .पुण्यापासून अमेरिकेपर्यंतचा प्रवास केला. . . .वडीलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळत होती, पण आपला वेगळा उद्योग उभा करण्याच्या विचाराने त्यांनी नव्या दिशेने पाऊल ठेवले आणि पारंपारिक दुकांनाना ई-कॉमर्सने जोडण्यात दंग झाले.

अमेरिकेतल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावातल्या किराणा दुकानदारांच्या जीवनात बदल घडविणारे अमृतांशू

Monday June 20, 2016,

4 min Read

स्वत:च्या संधी नाकारून दुस-यांना संधी देण्यासाठी काम करणे ही काही साधी गोष्ट नाही; पण काही लोक अशी हिम्मत दाखवतात. बिहारची राजधानी पटनाच्या अमृतांश भारव्दाज यांचेही असेच आहे. पटनाच्या एस के पुरी भागात राहणा-या भारव्दाज यांनी अमेरिकेतील आपली नोकरी यासाठी सोडली की, येथे परत येऊन येथील लोकांच्या भल्यासाठी काही काम करता यावे. त्यांच्याच प्रयत्नातून मोतीहारी जिल्ह्यातील केसरीया गावात वीज आली, त्या आधी हे गांव अंधारात बुडाले होते. अमृतांशू प्रत्येक वर्षी आपल्या अमेरिकन सहका-यांच्या मदतीने सोलर दिव्यांनी येथील घरे उजळवत गेले. एवढेच नाहीतर गरजूंना रोजगाराच्या सधी देऊन त्यांनी त्यांना आर्थिक मदतही केली आहे.

image


पटना येथील ज्ञान निकेतन येथून आपल्या शालेय शिक्षणाची सुरुवात करणारे अमृतांशू सांगतात की, शिक्षणात लहानपणी ते फारसे चांगले नव्हते. पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करत त्यांनी कशीबशी कॉलसेंटरची नोकरी मिळवली. पण त्या़ंची इंग्रजी चांगली नसल्याने त्यांना काढून टाकण्यात आले. या घटनेने त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. मग त्यांनी कठोर मेहनत घेऊन आपल्या इंग्रजीचे तसेच सामान्य ज्ञानाचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या बळावरच मग त्यांना अमेरिकेत नोकरी मिळाली. त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे अनेकदा त्यांचा तेथे सन्मानही झाला. याच दरम्यान अमृतांशू यांच्या जीवनात एक दुख:द घटनाही घडली. त्यांच्या वडीलांचे निधन झाले. वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांना त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकत होती. लोकांनी त्यांना तसा सल्लाही दिला. पण त्यांनी अनुकंपा तत्वावर नोकरी नको असा विचार केला आणि आपल्या कष्टातून काहीतरी मिळवावे असा निश्चय केला. ३३ वर्षाचे अमृतांशू त्यावेळी अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत सोबत मोठ्या पगाराची नोकरी करत होते. तेथेच त्यांना अनेक सुविधाही मिळत होत्या. पण हे सारे सोडून आज ते पटना येथे उद्योजकतेच्या अशा मार्गाच्या शोधात आहेत की, ज्यातून इतरांनाही आत्मनिर्भर करता येईल. या प्रयत्नात त्यांना यशही मिळत आहे. बिहार सरकारच्या योजनेअंतर्गत शहरातील प्रमुख अनोख्या उद्यमींना बिहार इंडस्ट्रीज असोशिएशन मध्ये जागा दिली जात आहे. यासाठी अमृतांशू यांची देखील निवड झाली आहे. आज त्यांच्याकडे नऊ जणांना रोजगार मिळाला आहे. इतकेच नाहीतर ते आपल्या काही सहका-यांना सोबत घेऊन अशा काही भन्नाट कल्पनांवर काम करत आहेत ज्यातून राज्याला त्यांचा अभिमान वाटेल.

पटना येथे आल्यानंतर अमृतांशू यांनी किरकोळ दुकानदारांना चांगली स्थिती यावी म्हणून असा मंच तयार केला आहे की, जेथून लोक ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून आपल्या आवडत्या दुकानदारांकडून कपडे, मिठाई आदी चीजवस्तू घरी मागवू शकतात. खरेतर ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या प्रचारामुळे कुठेना कुठे किरकोळ दुकानदारीवर वाईट प्रभाव पडलाच आहे. वर्षानुवर्षे किराणा दुकाने चालविणारे लोक, औषध दुकानदार, कपड्याचे व्यापारी आपला व्यवसाय बदलण्यास मजबूर झाले आहेत. किंवा मग या मंदीचा सामना करण्यास विवश होत आहेत. अशाच दुकानदारांना त्यांची अडचण ओळखून अमृतांशू यांनी वेगळा मंच निर्माण करून दिला आहे. जेथे लोक ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय देखील मिळवतात आणि अशा दुकानदारांना त्यांची विक्री देखील करता येते. अमृतांशू यांनी युअर स्टोरीला सांगितले की, “ आज लोक इंटरनेट फ्रेंडली होत आहेत. लोकांना वेळ नाही. त्यामुळे दुकानात जाण्याऐवजी ते ऑनलाइनवरून सामान मागवितात. त्यामुळे किरकोळ दुकानदारांचे नुकसान होते. त्यामुळे मी गंगा फ्रेश डॉट कॉम नावाचे संकेत स्थळ सुरू केले आहे. जेथे लोकांना आपल्या आवडत्या दुकानातून चीजवस्तू घरपोच मागविता येतात. अमृतांशू यासाठी आज दिवसरात्र आपल्या सहकारी मित्रांसोबत काम करत आहेत. ते सांगतात की, मी माझ्या डिलेवरी बॉयसोबत कित्येकवेळा डिलेवरी देण्यास जातो. जेणे करून ग्राहकांना काय हवे ते मला नीट समजावे आणि त्यांना मला आणखी चांगली सेवा देता यावी.

अमृतांशू सागतात की, ग्राहकांनाही या गोष्टीचे वाईट वाटते की ते आपल्या नेहमीच्या दुकानांना सोडून अन्यत्र सामान घेत आहेत. पण त्यांच्या व्यस्तेतेमुळे त्यांना तसे करावे लागते. मग अशावेळी त्यांना त्यांच्या आवडत्या दुकानातूनच ऑनलाईनचा पर्याय मिळाला तर घर बसल्या त्याच सा-या वस्तू ते खरेदी करू शकतात. दुकानदारांनाही ग्राहक टिकून राहिल्याचे समाधान मिळते. ते म्हणतात की, गंगाफ्रेश डॉट कॉम वर लॉगइन केल्यानंतर लोकांना ग्रोसरीकिराणा माल, बेकरी , कपडे आदी चीजवस्तूंची यादी उपलब्ध होते. तेथे ते आपल्या आवडत्या चीजवस्तू मागवू शकतात. आम्ही त्यांच्या हव्या असलेल्या वस्तु चांगल्या दर्जेदार ठिकाणातून मिळवून देतो. लोक आम्हाला फोनवरुनही मागणी नोंदवू शकतात आणि आवडत्या दुकानदाराबाबत सांगू शकतात. हे सारे आम्ही पंधरा रुपयांच्या डिलिवरी चार्जच्या माध्यमातून उपलब्ध करुन देतो. आम्ही पटना येथे एका खास पध्दतीच्या वाहनातून ई-कार्ट मधून सामान पोहोचविण्याचे काम करतो. त्यामुळे आमचा खर्च कमी होतो. ग्राहकांना कितीही सामान हवे असो आम्ही केवळ १५ रुपयेच सेवाशुल्क घेतो.”

अमृतांशू यांच्या विचार आणि समजण्याच्या पध्दतीमुळे गंगा फ्रेश डॉट कॉम सुरू आहे, मात्र त्यांना नेहमीच वाटते की शहरांसोबत गावांमध्येही विकासाच्या त्या सा-या गोष्टी असाव्या. त्यासाठी त्यांनी एक गाव निवडले. मोतीहारी मधील केसरीया गाव. अंधारात बुडालेल्या या गावाला त्यानी वीज देण्याचा निश्चय केला. प्रयत्न आणि आपल्या बुध्दीकौशल्यातून त्यांनी गावात सौर उर्जेबाबत जागरुकता आणली. आणि परिणाम सर्वांच्या समोर आहे. आपल्या अमेरिकेतील मित्रांना तसेच सहका-यांच्या सोबत त्यांनी गावात सौर ऊर्जेच्या चांगल्या तंत्राचा विकास केला आहे आणि त्यातून लोकांनाही आत्मनिर्भर केले आहे. आता स्थिती अशी आहे की लोक आपल्या घरांसोबत आजुबाजूला देखील दिव्यांची सोय करत आहेत. अमृतांशू यांनी एकाचवेळी दोन कामे केली आहेत. एक तर ई कॉमर्स नसल्याने बंद पडत जाणा-या दुकानदारांना पुन्हा उभे केले आहे. दुसरे गावांच्या विकासासाठी लोकांना जागरुक केले आहे. हे तर निश्चित की, अशा प्रकारचे विचारच देशाच्या विकासात उपयोगी आहेत.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

कथा कल्पक उद्योजकाची...

मानवी क्रांतीचा आरंभ करण्याची गरज – विशाल सिक्का, सीईओ, इन्फोसिस

‘मेडिको’च्या माध्यमातून एका क्लिकवर आरोग्यसुविधा आटोक्यात


लेखक : कुलदीप भारद्वाज

अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील

    Share on
    close