संकटात असलेल्या महिलांनी अॅपच्या माध्यमातून काही सेकंदातच पोलिसांकडून मदत कशी मागावी, जाणून घ्या...
Sunday April 24, 2016,
3 min Read
राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्यूरोनुसार वर्ष २०१४ मध्ये बलात्काराचे ३६३५८ गुन्हे देशभरातील विभिन्न ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. म्हणजेच प्रत्येक दिवशी १०० पेक्षा अधिक बलात्काराचे गुन्हे दाखल होतात. अशा गुन्ह्यांवर लगाम लावण्यासाठी पोलीस सदैव तत्पर असतात, परंतु ही प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. आयआयटी दिल्ली येथून संगणकशास्त्रामध्ये पदवी घेतलेल्या आदित्य गुप्ता यांनी जेव्हा या समस्येवर खोलपर्यंत विचार केला, तेव्हा त्यांना जाणीव झाली की, समाजात लैंगिक हिंसेचे प्रमाण वाढते आहे. समाजात लिंगभेदाची समस्या दूर करण्यासाठी त्यांनी 'पीपल फॉर पॅरेटी' ची स्थापना केली. इतकेच नव्हे तर, त्यांनी एक असे अॅप बनविले की, समस्येत असलेल्या कुठलीही महिला केवळ काही सेकंदातच पोलिसांकडून मदत मागू शकते.
आदित्य गुप्ता आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर एका मोठ्या कंपनीत काम करत होते, मात्र त्या कामातून ते संतुष्ट नव्हते. तेव्हा त्यांनी ही नोकरी सोडून आपले काम सुरु करण्याबाबत विचार करू लागले, मात्र त्यांना समजत नव्हते की, करावे तरी काय. आदित्य सांगतात की, “१६ डिसेंबर २०१२ला दिल्लीमध्ये जेव्हा निर्भया प्रकरण झाले तेव्हा, त्या प्रकरणाने मला मनापासून खूप हळवे केले होते, तेव्हा मला याबाबत दु:ख झाले की, आपल्या समाजात लिंगभेद किती मोठ्या प्रमाणात आहे.”
या घटनेनंतर आदित्य गप्प बसले नाहीत आणि त्यांनी लिंगभेदाच्या समस्येला दूर करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर एप्रिल, २०१३मध्ये त्यांनी दिल्ली मध्ये 'पीपल फॉर पॅरेटी' ची स्थापना केली. आज ही संस्था लिंगभेद हिंसेला कमी करण्याचे काम करतात.
आपल्या कामादरम्यान त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये आणि दुस-या ठिकाणी जाऊन महिला आणि पुरुषांमध्ये पसरलेल्या असमानतेला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान तरुणांसोबत काम करून आदित्य यांनी पाहिले की, आपत्कालीन स्थितीत पोलिसांची मदत लवकरात लवकर मिळण्यासाठी कुठलेही अॅप नाही. आदित्य सांगतात की, "आमच्याकडे तांत्रिक ज्ञान होते, तेव्हा आम्ही विचार केला की आम्हाला एक असे अॅप बनविले पाहिजे, ज्यामुळे पोलिसांना आधुनिक तंत्राशी जोडून त्यांची समाजाप्रती जबाबदारी वाढविली जाऊ शकेल.”
इतकेच नव्हे आदित्य यांना जाणीव झाली की, जेव्हा एखादी घटना घडते, तेव्हा पोलिसांना १००नंबर वर फोन करण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी पाच मिनिटे लागतात. हे पाहता कमीत कमी वेळेत पोलिसांपर्यंत पोहोचण्याचा रस्ता शोधण्यास सुरुवात केली. आदित्य आणि त्यांचे आयआयटीमधील तीन मित्र शशांक यदुवंशी, रविकांत भार्गव आणि रमण खत्री यांनी मिळून ‘पुकार’नावाचा अॅप बनविला. ज्याला दाबताच घटनास्थळाची माहिती मिळते, सोबतच ४-५ जवळच्या लोकांपर्यंत देखील भीतीचा संदेश पोहोचतो.
आदित्य यांनी ‘पुकार’ अॅपचे जून २०१४मध्ये अनावरण केले आणि त्याची सुरुवात राजस्थानच्या अलवर जिल्ह्यापासून झाली. ज्यानंतर त्यांनी त्याला कोटा आणि उदयपुर मध्ये देखील सुरु केले. आदित्य यांच्या मते, हे एक सेफ्टी ऍप आहे आणि त्याच्यामार्फत पोलिसांना सूचना देण्यास कमीत कमी वेळ लागतो. तसेच पोलीस कंट्रोल रूम मध्ये बसलेल्या ऑपरेटरसाठी घटनेला मॉनिटर करणे सोपे होते, कारण कंट्रोलरूममध्ये तांत्रिक प्रणाली लागलेली असते. सोबतच कम्प्युटरमध्ये अॅप दाबणा-याचे नाव, फोन नंबर आणि ठिकाणाची माहिती मिळते. या अॅपला गुगल प्लेस्टोरमधून मोफत डाउनलोड केले जाऊ शकते. आतापर्यंत या अॅपला ६०हजारपेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे आणि गुगल मध्ये याची रेटिंग ४.५आहे.
भविष्याच्या योजनांबाबत आदित्य यांचे म्हणणे आहे की, ते ‘पुकार’ चा विस्तार राज्य पातळीवर करू इच्छितात. त्यासाठी त्यांची अनेक राज्यांच्या पोलिसांसोबत चर्चा सुरु आहे. त्यांचे मत आहे की, जिल्हा पातळीवर पोलिसांचे अधिकार खूप मर्यादित असतात, त्यामुळे या अॅपला अधिक फायदेशीर बनविण्यासाठी संपूर्ण राज्यात लागू करू इच्छितात.
यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा :
रातुल नरेन यांचं ‘बेंपु ब्रेसलेट’ अपुऱ्या वजनाच्या बालकांना देतयं संजिवनी
मानसिकरित्या वैतागलेल्या व तणावग्रस्त लोकांसाठी एक डॉक्टर तयार करत आहे “हॅप्पीनेस आर्मी”
लैंगिक अत्याचाराने पीडित एक स्त्री बदलत आहे समाजातील रूढीवादी विचार
लेखक : गिता बिश्त
अनुवाद : किशोर आपटे