सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीची पाळमुळं रोवणाऱ्या वनिता शास्त्री
Thursday October 29, 2015,
5 min Read
ʻआयुष्यात दररोज आपल्याला नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी आपल्याला नेहमीच आपल्या मनाची कवाडं खुली ठेवायला हवी.ʼ, असे मत आहे डॉ. वनिता सिन्हा शास्त्री यांचे. अशोका विद्यापीठाच्या अध्यक्षा असलेल्या डॉ. वनिता नेहमीच असल्या अनेक आव्हानांचा सहज सामना करत असतात. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बोस्टन येथे रेडवुड इन्व्हेस्टमेंट सिस्टम आयएनसी (Redwood Investment System Inc.) येथे काम केले. त्यानंतर त्यांनी समाजसेवी संस्थांची स्थापना केली. कार्नेल विद्यापीठातून पीएचडी घेतल्यानंतर त्यांनी स्कूल ऑफ़ मॅनेजमेंट बोस्टन यूनिवर्सिटी, वेल्लेस्ले कॉलेज Massachusetts आणि यूनिवर्सिटी ऑफ़ मास dartmouth येथे विद्यादानाचे काम केले. राजकारण या विषयाच्या विद्यार्थिनी असलेल्या वनिता या गांधीजींच्या विचारांनी फारच प्रभावित झाल्या आणि त्यांनी गांधीजींबद्दल अधिक माहिती आत्मसात केली. याशिवाय शास्त्रीय नृत्यकला आणि नाटक यांमध्येदेखील वनिता यांना रस होता. वनिता यांच्याशी चर्चा करताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी आणि अशोका विद्यापीठाच्या अध्यक्षा म्हणून भविष्यात त्या कोणत्या योजना अंमलात आणणार आहेत, याची विस्तृत माहिती आम्हाला दिली. वनिता सांगतात की, दोन बहिणी आणि एक भाऊ यांच्यासोबत रात्रीच्या जेवणाच्या वेळेस कोणत्याही प्रश्नावर मी चर्चा मसलत करत असे. याच वातावरणात मी लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे या गोष्टींचा प्रभाव माझ्या जीवनावर आहे. माझी आई नेहमी सांगायची की, आपण आय़ुष्यात काहीही करू शकतो. या एका वाक्याने मला आय़ुष्यात कधीही हार न मानण्याची आंतरीक शक्ती दिली, असे त्या सांगतात.
वनिता यांनी लेडी श्रीराम महाविद्यालयातून राज्यशास्त्र, एमए आणि एमफिल जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पूर्ण केले आहे. तर पीएचडी कॉर्नेल विद्यापीठातून पूर्ण केली आहे. अशोका विद्यापीठाने भारतात उदार कला कार्य़क्रमाची सुरुवात केली. याच कारणामुळे त्यांना बोस्टन येथून भारतात येण्यासाठी प्रेरित केले आणि त्या या कार्यक्रमाच्या एक भाग बनल्या. ʻमी माझ्या कारकिर्दीत शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक आणि व्यवस्थापन याबाबत नेतृत्व केले आहे. या सर्व गुणांना एकत्रित आणण्याची माझी भूमिका आहे. अशा एका संस्थेबाबत विचार करणे, त्या संस्थेच्या कार्यक्रमांना अधिक खंबीर करणाऱ्यांसोबतच भविष्यातील नेत्यांना प्रेरणा देण्याची मला मिळालेली संधी नेहमीच मला उत्साहित करत असते.ʼ, असे त्या सांगतात.
मेरु एज्युकेशन फाऊंडेशनचा उद्देश उत्तर अमेरिकेतील नागरिकांना भारताची कला, इतिहास, भाषा आणि संस्कृतीचे ज्ञान देणे, हा आहे. मेरूसोबत काम करताना त्यांनी भारतातील शाळेच्या सर्व स्तरांवरचा ( KG पासून १२ वी पर्यंत) अभ्यासक्रम बनविला आहे. त्या सांगतात की, ʻकाही अभ्यासक्रम आम्ही ʻद सलेम इंडिया स्टोरी, मेरीटाइम ट्रेड बिटवीन सलेम एमए एंड इंडिया (१७८८-१८४५)ʼ येथुन भाषांतरीत केले आहेत.ʼ २००१-२००२ साली त्यांनी नवी दिल्ली येथे हॅबिटॅट लर्निंग सेंटरदेखील सुरू केले. जे तंत्रज्ञानाबाबतीत निरक्षर असलेल्या तरुणांना संगणकाचे प्रशिक्षण देते. माधवी मुद्गल आणि प्रसिद्ध गुरू केलुचरण महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ओडिसी शैलीत प्रशिक्षित अशा भारतीय शास्त्रीय नृत्यांगणा आहेत. नृत्यकलेत रुची असल्याने त्यांनी या विषयातच अभ्यास करणे पसंत केले. शास्त्रीय नृत्य या विषयासोबतच भारतीय सौंदर्यशास्त्र या विषयावरदेखील त्या व्याख्यान देतात. यासोबतच वनिता यांनी नाटक कलाकार म्हणून देखील काम केले आहे. तसेच अमेरिकेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिंदी भाषेच्या शिकवण्यादेखील घेतल्या आहेत.
वनिता सांगतात की, ʻमहिलांना विशेषकरुन माझा एक सल्ला आहे. आपल्यातील प्रत्येकजण आपले ध्येय निश्चित करतो आणि त्या दिशेने कूच करतो. आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि त्याचे पालन करा.ʼ वनिता यांनी अनेक जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून आपली कारकिर्द घडवली आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणाला त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळले. जेव्हा त्यांची मुले मोठी होत होती. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे लक्ष पुरविले. वनिता त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणायच्या. त्यांच्यासोबत सर्वाधिक वेळ व्यतित करायच्या. मात्र आता त्यांनी सर्व लक्ष आपल्या कामावर केंद्रीत केले आहे. तंत्रज्ञान महिलांसाठी अडचणीचे आहे, असे वनिता यांना अजिबात वाटत नाही. त्या सांगतात की, ʻआज महिला प्रत्येक क्षेत्रात आहेत आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. मी नेहमी दुसऱ्या महिलांना सल्ला देत असते आणि माझे अनुभव सांगत असते. मला वाटते की, महिला या संस्कृतीच्या एका विशेष पद्धतीच्या वाहक आहेत.ʼ भारतात आजवर अनेक महिला नेत्या जन्माला आल्या. ही गोष्ट सदैव भारतीय महिलांना पुढे वाटचाल करण्याची आणि असामान्य गोष्टी साध्य करण्याची प्रेरणा देते, असे त्या सांगतात. आधुनिक आणि व्यावसायिक असण्यासोबतच आपल्या संस्कृतीशी नाळ जोडून राहणे, हे देखील तेवढेच महत्वाचे आहे, असे वनिता यांचे मत आहे. त्या सांगतात, "गेल्या ३० वर्षांमध्ये मी नव्यासोबत जुनेदेखील जोडण्याचा प्रयत्न केला आहे. ʻपरंपराʼ हा काही भूतकाळ नाही. हे एक ज्ञान असून, वास्तविकरित्या आपल्या जीवनात याचे योगदान आहे". एक पालक म्हणून त्या आपल्या मुलांना आणि पतीला भारताबद्दल जाणून घेण्यास, आपल्या चुलत भावंडांसोबत, आजी आजोबांसोबत मैत्री करण्यास आणि त्यांची भाषा बोलण्यासाठी प्रेरीत करतात. आजचे जग हे जेन वाय (Generation Y) मोबाईल फोन आणि एप्लीकेशन अनुकूल आहे. माझ्या मते, शिकत राहणे ही कायम सुरू राहिल अशी प्रक्रिया आहे. मी नेहमीच माझ्या विद्यार्थ्यांकडून, मुलांकडून आणि सहकर्मचाऱ्यांकडून काही ना काही शिकत असते, असे त्या सांगतात.
वनिता सांस्कृतिक शिक्षणावर भर देताना सांगतात की, अशोकामध्ये आम्ही कला या विषयाला अभ्यासक्रमाचा एक भाग बनविले आहे. शिक्षण क्षेत्रासोबत संपर्कात राहिल्याकारणाने वनिता यांनी हा बदल पाहिला आहे. ʻशिक्षण बदलत आहे. ज्या पद्धतीने आपण शिकलो, त्यात बदल होत आहे. गेल्या पिढीने ज्या गोष्टी उशीरा शिकल्या होत्या. आजची पिढी ते फार लवकर शिकत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या क्रांतीद्वारे माहिती मिळणे सोयीस्कर झाले आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमापासून ते ई-लर्निंग सारखे अनेक पर्याय शिक्षणासाठी आहेत.ʼ, असे त्या सांगतात. ʻभारत आणि अमेरिकेतील सर्वात मोठे अंतर म्हणजे कंपनीतील उत्पादन बाहेर तयार करणे, हे आहे. मला वाटते की, यात वाढ होत आहे. उद्योजकतेच्या काळात आलेल्या अपयशाचा स्वीकार करणे, हा अमेरिकेच्या इकोसिस्टम आणि सामाजिकतेचा एक भाग आहे. ही विचारपद्धती भारतात आणणे आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, याची आवश्यकता आहेʼ, असे त्या सांगतात. बोस्टन येथील टीआयई (TIE)च्या कार्यकारी संचालक होण्याच्या नाते वनिता या अनेक यशस्वी उद्योजकांशी चर्चा करायच्या. ज्यापैकी काही जणांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्या सांगतात की, ʻमला त्यांच्याकडून बरेच शिकायला मिळाले. विशेष म्हणजे यशस्वी होण्यासाठी विनम्र असणे, प्रत्येक लहान सहान गोष्टीचा मान राखणे तसेच आपण जे काही करतो, त्यात मानवता असणे, हे गरजेचे आहेʼ, असे त्या सांगतात. ʻयशस्वी लोक नेहमीच आनंदी नसतात. मात्र आनंदी लोक नेहमीच यशस्वी होतात.ʼ, हा मोलाचा सल्ला वनिता यांना त्यांच्या माजी सल्लागारांनी दिला होता. ज्याचे पालन त्या दैनंदिन जीवनात काटेकोरपणे करतात.