पतीला आलेल्या हृदयविकारानंतर उधार शिलाई मशीनने केली सुरुवात, २ महिन्यांत मिळाली मोठी ऑर्डर

पतीला आलेल्या हृदयविकारानंतर उधार शिलाई मशीनने केली सुरुवात, २ महिन्यांत मिळाली मोठी ऑर्डर

Saturday December 19, 2015,

5 min Read

आयुष्य हे एका लपंडावाच्या खेळासारखे आहे. आयुष्यात आपण जी सुंदर स्वप्न रंगवितो ती वास्तवात पूर्ण होतीलच याची शाश्वती नसते. आयुष्यातील संकटाची चाहूल ही प्रत्येकालाच असते पण आपण सगळे त्याकडे कानाडोळा करतो. पण अचानक असे काहीतरी अघटीत घडते ज्याची आपण कल्पनासुद्धा केलेली नसते. अशा वेळी आपण काय कराल ? कसे कराल? आयुष्य पुढे कसे वळण घेईल? काहीच सांगता येत नाही. श्वेता सोनी यांची कहाणी ही अशीच काहीशी आहे.

श्वेता सोनी या आपल्या आयुष्यात संतुष्ट गृहिणी होत्या. अचानक एक दिवस आयुष्याला कलाटणी मिळाली आणि सगळेच चित्र बदलले. नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. घरातल्या कामात व्यस्त असणाऱ्या श्वेता यांच्या समोर मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला, आता काय ? ह्याच वळणावर श्वेता यांनी एक यशस्वी उद्योजक बनण्याच्या दिशेने पाऊल उचलले.


image


श्वेता यांनी २०१३ मध्ये अंबर जयपूर ची सुरुवात केली. मुलांच्या कपड्यांचा काही भाग हा बराच रिकामा वाटायचा, त्या तिथे काहीतरी डिझाईन बनवू पाहत होत्या. त्या भारतीय हँड बॉक्स बरोबरच वेस्टर्न आउटफीट तयार करतात. त्यांच्या भारतीय पोशाखात घागरा चोली, कुर्ता पायजमा, सदरा, नेहरू जॅकेट यांचा समावेश आहे. श्वेता यांनी एक शिवण कारागीर आणि जयपूर मधल्या एका मित्राकडून शिलाई मशीन उधार घेऊन आपल्या कामाची सुरुवात केली.

“ आज दीड वर्षात माझ्याकडे ८ कामगार आणि ८ मशीन आहेत. पुढच्या दोन वर्षात त्यांची संख्या ५० पर्यंत घेवून जाण्याची माझी योजना आहे. मी फेसबुकवर स्वतःच्या पेजद्वारे याची सुरुवात केली आणि बघून थक्क झाले की माझ्या फेसबुक पेजवर उपलब्ध असलेल्या लोकांकडून मला ऑर्डर मिळू लागल्या. २ महिन्याच्या आतच एक उत्साहवर्धक संधी चालून आली जेव्हा एका ऑस्ट्रेलियन कंपनीने माझ्या कलेक्शनला पसंती देऊन पहिल्या ऑर्डरसाठी बोलावले.”

श्वेताला आत्मनिर्भर बनण्यामागे त्यांची महत्वाकांक्षा खूप मोठी होती. त्या युपीच्या शहाजानपूर या छोट्या शहरात लहानच्या मोठ्या झाल्या. ९० च्या दशकात सर्जनशिलतेला फक्त एक छंद म्हणून बघितले जायचे. सगळ्यांचे लक्ष अभ्यास, डॉक्टर, इंजिनिअर नाहीतर आयएएस बनण्यावर जास्त असायचे. श्वेता यांनी १२ वी विज्ञान पूर्ण केले पण त्यात त्यांची श्रेणी कमी होती. यापूर्ण क्रमात त्यांच्या सर्जनशिलतेला पूर्णपणे नाकारले गेले. त्या खराब प्रदर्शन करू लागल्या, अभ्यासातील रुची हळूहळू संपू लागली व त्या स्वतःवरचा विश्वास गमावू लागल्या. त्यांनी त्यांची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला. जयपूरला आपल्या आजीच्या घराजवळ असलेल्या एका कॉलेजमधून फाईन आर्ट्स मधून त्यांनी पदवी घेतली.

एका छोट्या शहरात जिथे कोणत्याही गोष्टीला वाव नाही, कमी वयात लग्न होणे, इंटरनेटचा वापर नाही त्यामुळे कोणत्याही उद्योगाबद्दल लोकांना माहिती नव्हती. नवीन व्याप्ती या सीमित होत्या. आम्ही जास्तीत जास्त ऐकले होते किंवा बघितले होते की एखाद्या महिलेने स्वतःचे एक बुटीक उघडले आहे, ही एक मोठी नवलाईची गोष्ट होती. पालकांना मुलांच्या इच्छेपेक्षा त्यांची लग्न जास्त महत्वाची वाटायची. अशा वातावरणात राहून मला वाटू लागले की स्त्रियांचे काम लग्न करून कुटुंब व्यवस्था पुढे चालविणे आहे. पण आज मला वाटते की मी किती अज्ञानी होते.

श्वेताला एका रात्री जाणवले की तिच्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला आहे, तेव्हा तिच्या डोक्यातील हवा निघून गेली, पाय जमिनीवर आले. भविष्याचा हिशोब मांडण्यास सुरुवात झाली. त्यांनी नवऱ्याला दवाखान्यात नेले आणि डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवला. त्यांच्या सासऱ्यांना गाडी चालवता येत नव्हती आणि त्या स्वतः चांगल्या चालक नव्हत्या म्हणून त्यांना एका भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागला. त्या रात्रीच्या आठवणींनी आजपण त्यांचे डोळे पाणवतात.

"त्या ५-६ दिवसात दवाखान्यात तसेच घरात अनेक निर्णय आणि जबाबदारी घेण्याची वेळ आली. मी सुन्न झाले, त्याचा परिणाम माझ्या संपूर्ण मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर झाला, मी खचून गेले होते. पण सासरे आणि मुलांसमोर मी स्वतःला सावरले". नवऱ्याच्या आजारपणामुळे जबाबदारी पेलण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय माझ्याकडे उपलब्ध नव्हता. कालांतराने नवऱ्याच्या प्रकृतीत सुधारणा होवू लागली. श्वेता यांनी त्यांच्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेतली. ‘मला जाणवले की करण्यासारखे बरेच काही आहे. कठिण परिस्थितीत सुद्धा मी एक कणखर नेतृत्व करू शकते. फक्त मला स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना जाणवले की त्यांनी आत्मनिर्भर राहायला पाहिजे.

त्यांनी आयुष्यात कधीही बाहेर काम केले नव्हते. पैसा हा मूळ मुद्दा होताच, पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे त्यांचा आत्मविश्वास होता. त्यांचा स्वतःवर विश्वास नव्हता पण तरीसुद्धा त्यांनी कामाला सुरुवात केली आणि जेव्हा त्यांच्या डिझाईनला पसंती मिळू लागली तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी छोटेखानी सुरु केलेल्या उद्योगाचा विकास झाला.

"प्रत्येक महिलेला माझा सल्ला आहे की, आयुष्यात एकदा तरी आपल्यात असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करावा. जोपर्यंत आपण प्रयत्न करीत नाही तोपर्यंत आपल्यातल्या सुप्त कलागुणांची आपल्याला ओळख होत नाही. जर माझ्या आयुष्यात ही कटू घटना घडली नसती तर मी आपली प्रतिभा, ध्येय आणि स्वतःची ओळख पूर्णपणे विसरले असते. लोकांनी आपल्याला आपल्या वडिलांच्या किंवा नवऱ्याच्या नावाने ओळखण्यापेक्षा स्वतःच्या नावाने ओळखले पाहिजे".

या शिकवणीला पुढे नेत श्वेता सांगतात की, "जेव्हा स्त्रीच्या नात्याने आपण सामानतेविषयी बोलतो तेव्हा विचार हा दुतर्फा झाला पाहिजे. स्त्री या नात्याने आपण साथ देण्यासाठी सुद्धा बरोबरी केली पाहिजे. मग ते वडील, नवरा, मुलगा असो त्यांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिले पाहिजे.

श्वेता यांना आपल्या नवऱ्याची साथ आहेच पण त्यांच्याकडून प्रेरणा पण मिळत आहे, जे त्यांच्या उद्योगात आणि मुलांना मदत करीत आहे. आपल्या कलाकुसरीने तयार केलेले कपडे जेव्हा त्यांच्या अंगावर बघते तेव्हा त्यांना गर्वाची अनुभूती होतो. त्या सांगतात की, "तुम्ही तेव्हाच उत्साही राहाल जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे काम कराल". त्यांना एक गोष्ट आवडते की त्यांना कोणत्याही ऑफिस मध्ये जावे लागत नाही, आपल्या कोणत्याही डिझाईनशी तडजोड करावी लागत नाही. त्यांच्या आवडीचे असेल ते काम त्या करतात. ग्राहकांची पसंती त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करते. पण त्यांना या गोष्टीची खंत वाटते की त्यांनी मोठ्या डिझाइनर्ससाठी डिझाईन बनवल्या नाही. "मला विश्वास आहे की मी त्या उंचीपर्यंत पोहोचू शकेल पण मला माहित नाही कधी आणि केव्हा. पण एक गोष्ट मला नक्की माहित आहे जर मी विचार केला तर शून्यापासून सुरुवात करावी लागणार नाही". श्वेता आपल्या पंखांना पसरवून उंच गगनभरारी घेऊ इच्छितात. ह्या उद्यमी सांगतात की, "मला एक प्रसिध्द डिझाईनर नाही बनायचे. मला नाही वाटत की माझे कपडे लोकांनी कमी किंमतीत घेतले पाहिजे. माझी इच्छा आहे की ते भारतात आणि परदेशातल्या मोठ्या दुकांनामध्ये योग्य किंमतीत विकले जावेत. माझी अशी इच्छा आहे की परदेशातल्या सगळ्या मुलांनी भारतीय डिझाईनचे कपडे घालावेत. माझ्या ब्रँडला एक ग्लोबल ब्रँडच्या स्वरुपात लौकिक मिळावा’.

लेखक : साहिल

अनुवाद : किरण ठाकरे