कालपर्यंत ब्रेड व अंडी विकून उदरनिर्वाह करणारा आज इतर मुलांना इंजिनियर, आयएएसचे शिक्षण घेण्यास करतोय मदत
Friday April 08, 2016,
4 min Read
आयुष्यात मनुष्याला नेहमीच चांगल्या-वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्यातच जगण्याचा खरा मतितार्थ उमगतो व समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते. आज मॅकॅनिकल इंजिनीअर असलेला हा मुलगा कधी काळी गरिबीमुळे ब्रेड विकून तर कधी वाहनांचे टायर बदलून तर कधी आपल्या आईला चूल पेटवण्यासाठी गल्ली-बोळ्यातून कोळसा गोळा करून आपला उदरनिर्वाह करीत असे. पण आज आपल्यासारख्या गरीब मुलांना हा दिवस बघायला लागू नये म्हणून जिद्दीने त्यांना तो आयएएस, डॉक्टर व इंजिनीअर बनवण्यासाठी मदत करीत आहे. अमोल साईनवर, जगात भलेही त्याचे नाव नसेल पण जे ओळखतात त्यांच्यासाठी तो तारक आहे. अमोल यांनी आपली संघटना ‘हेल्प अवर पीपल फॉर एज्युकेशन’ म्हणजे ‘होप’च्या मार्फत गरीब मुलांची अपेक्षापूर्ती करीत आहेत तसेच ‘शिवप्रभा चॅरिटी ट्रस्ट’ च्या मार्फत ग्रामीण विकास, आरोग्य व योग साधनेच्या विकासासाठी कार्यशील आहेत.
अमोल यांच्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले म्हणून त्यांना आपला विद्यालयीन अभ्यासक्रम ब्रेड-अंडी विकून तसेच दुसऱ्या मुलांची शिकवणी घेऊन पूर्ण करावा लागला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पुढचे शिक्षण ‘राजीव गांधी इंजिनीअर कॉलेज चंद्रपूर, नागपूर मधून पूर्ण केले. बीटेकचा अभ्यासपूर्ण केल्यानंतर त्यांनी एमटेकचा विचार केला तेव्हा पण त्यांच्या समोर आर्थिक अडचणी ‘आ’ वासून उभ्या होत्या. म्हणूनच जेव्हा बीटेकमध्ये कॉलेजात प्रथम आल्यानंतर त्यांना मिळालेले १३ हजार ५०० रुपयांचे बक्षीस, त्यांनी शाळेच्या वाचनालयात पुस्तक खरेदीसाठी दान केले, जेणेकरून गरीब मुलांचे पुस्तकांअभावी नुकसान होऊ नये.
सन २००६ मध्ये अमोल जेव्हा ‘सिप्ला’ कंपनीमध्ये काम करत होते तेव्हा कामानिमित्त त्यांना युगांडाला जावे लागले. तेथील गरिबी व कुपोषण बघून त्यांनी निर्णय घेतला की शिक्षण क्षेत्रातील आपल्या कार्याचा अंतर्गत स्तरावर जास्तीत जास्त विस्तार करायचा. मित्रांशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी सन २००७ मध्ये ‘हेल्प अवर पीपल फॉर एज्युकेशन’ नामक संस्था स्थापन करून त्यांच्या अंतर्गत सन २०१२ पर्यंत सुमारे ४०० मुलांना २.७५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली.
शिक्षण क्षेत्रातील आपल्या या कामानंतर सन २०१२ मध्ये ‘ग्रामीण विकासाअंतर्गत त्यांनी ६ गांव दत्तक घेऊन ‘विद्यादिप’ हा अनोखा उपक्रम राबला. जी गावे अजून विजेपासून दुरापास्त होती अशा क्षेत्रातील मुलांना सोलर दिव्यांचे वाटप केले. या योजनेअंतर्गत २०१२ ते २०१५ पर्यंत सुमारे ४०० मुलांना सौर दिव्यांचा लाभ झाला. त्यांच्या प्रयत्नांनीच २०१४ मध्ये महाराष्ट्राच्या लोणवाडी गावात वीज पोहचवली व रस्ते तयार झाले. या गावातील शाळांना त्यांनी डिजिटल केले तसेच सोलर पंपामार्फत पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.
अमोल साईनवर यांनी युवर स्टोरीशी झालेल्या गप्पांमध्ये सांगितले, "ग्रामीण विकासानंतर आमचे लक्ष्य हे स्त्री सबलीकरणाच्या क्षेत्रात आहे. यामागचा हेतू म्हणजे स्त्रियांनी कणखर बनावे. मागच्या दोन वर्षात निश्चित उत्पन्न नसल्यामुळे जेव्हा शेतकऱ्यांनी कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीमुळे आत्महत्या केल्या. या घटनेवर लक्ष केंद्रित करून आम्ही सन २०१४ मध्ये ‘शिवप्रभ चॅरिटेबल ट्रस्ट’ ची स्थापना केली. याच्या अंतर्गत ‘प्रभा महिला विकास’ च्या माध्यमाने शेतकऱ्यांच्या पत्नीला व विधवेला शिवण कामाचे प्रशिक्षण देऊन एक शिवणयंत्र दिले आहे. काही स्त्रियांसाठी म्हशी, बक-या, कँन्टीन इ. सुविधा प्रदान केल्या आहे जेणेकरून त्यांना निश्चित मासिक उत्पन्न प्राप्त होईल."
आशा आहे की भविष्यात शेतक-यांच्या आत्महत्या कमी होतील. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ ७० स्त्रियांना याप्रकारची मदत करून अारोग्याच्या क्षेत्रात अशा लोकांची मदत करीत आहे जे गंभीर आजारांनी पीडित आहे. हे सगळे काम अमोल ‘शिवप्रभा चॅरिटी ट्रस्ट’ च्या आपल्या टीम मार्फत करत आहे. ही संस्था आपला निधी २०% आरोग्य, ४०% ग्रामीणविकास, ३०% शिक्षण व १०% योग आणि अध्यात्मावर खर्च करतात. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, ‘बळीराजा ग्रुप’ स्थापन केला. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रगत पद्धतीचे शेतीविषयक ज्ञान हे तज्ञ अधिकाऱ्यांमार्फत दिले जाते.
आपल्या निधी संबंधात अमोल सांगतात की, “काही निधी हा लोकांकडून मदतीच्या स्वरुपात गोळा करतात. त्याचबरोबर आमचे सहयोगी या संस्थेत आपल्या वेतनाचा १०% हिस्सा देतात. जर एखाद्या मुलाला शिष्यवृत्ती द्यायची ठरलीच तर आम्ही फेसबुक च्या मार्फत पैसा गोळा करतो. जेव्हा आम्ही एखाद्या गरीब मुलाला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतो त्यानंतर नोकरी लागल्यावर आम्ही त्याला मिळालेल्या मदती इतकीच रक्कम इतर गरीब मुलांच्या प्रगतीसाठी खर्च करण्यास सांगतो.”
भविष्यातील आपल्या योजनेबद्दल अमोल सांगतात की सन. २०१६ -१७ मध्ये त्यांनी १०० स्त्रियांच्या सबलीकरणाबरोबरच, १०० मुलांचा विकास, ५ शाळांना डीजीटल करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. अमोल यांची काही परदेशी गुंतवणूकदारांशी चर्चा सुरु आहे ज्यामुळे ते कृषी क्षेत्रात गुंतवणूक करून बळीराजा संपन्न होईल.
लेखिका : गीता बिश्त
अनुवाद : किरण ठाकरे