राष्ट्रपती निवडणूक ही तर मोदी सरकारची सत्वपरिक्षाच!

कोण होणार आगामी राष्ट्रपती? चर्चित चेहरा की आश्चर्यकारक नांव?!

राष्ट्रपती निवडणूक ही तर मोदी सरकारची सत्वपरिक्षाच!

Monday May 22, 2017,

3 min Read

देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी पूर्ण होत आहे आणि २५ जुलै पर्यंत देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड होणे गरजेचे आहे. याबाबत जी नावे चर्चेत आहेत त्यातील काही ज्ञात आहेत तर काही आश्चर्यकारक आहेत. असे मानले जात आहे की, प्रतिभा पाटील यांच्या नंतर देशाला दुस-यांदा महिला राष्ट्रपती मिळू शकेल. एक कटाक्ष संभाव्य राष्ट्रपतीपदाच्या दावेदारांच्या नावावर टाकूया.

लालकृष्ण आडवाणी : नोव्हेंबर महिन्यात ९० वर्षांचे होत असलेले आडवाणी यांचे नांव सुरूवातीपासूनच या पदाच्या शर्यतीत होते, मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेंव्हापासूनच चर्चा आहे की, या महनीय नेत्याला राष्ट्रपती करून ते गुरूदक्षिणा देण्याचे पूण्य कमावतील. असे असले तरी बाबरी मशिद प्रकरणी नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याने हे नांव मागे पडू शकते, आडवाणी यांच्यावर बाबरी पतन केल्या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून खटला असताना त्यांना या पदावर येणे नितीसंगत होणार नाही.


image


मुरली मनोहर जोशी : भाजप आणि रास्वसंघ यांच्यात जोशी यांच्या विद्वत्ता आणि स्विकार्हता यावर कुणीच शंका घेवू शकत नाही, मात्र बाबरी पतन प्रकरणात जोशी यांना देखील सर्वोच्च न्यायालयाने मुख्य आरोपींच्या यादीत टाकल्याने त्यांच्या नावावर सध्या काजळी आली आहे. त्यामुळे सध्या त्यांचे नावही मागे पडण्याची शक्यता आहे.

मोहन भागवत : रास्वसंघाच्या प्रमुखांनाच राष्ट्रपती करण्याची मागणी सर्वप्रथम शिवसेनेने केली, मात्र संघाने यावर नेहमी प्रमाणे काही प्रतिक्रिया न देता हा मुद्दा स्विकारला किंवा नाकारला ते समजू दिले नाही. मात्र भाजपातूनही यावर मौन सुरू आहे. त्यामुळे भागवत यांचे नाव असेल का आणि त्यावर एनडीए आणि अन्य सहयोगी राजकीय पक्षांचे काय मत असेल ते पाहणे रोचक ठरेल.

सुमित्रा महाजन : सर्वात अनुभवी खासदार आणि सध्या लोकसभेच्या अध्यक्षा असलेल्या मृदू स्वभावाच्या महाजन यांना महाराष्ट्रातून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाकडून समर्थन मिळू शकते, याशिवाय ताई म्हणून महाजन यांनी ब-याच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मनात मानाची जागा मिळवली आहे, उदाहरणच द्यायचे झाले तर सर्वात प्रथम पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच महाजन यांच्या नावाला वाचा फोडली होती. संघ, मोदी, शहा सा-यांशी त्यांचे स्नेहाचे संब़ध राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला सहमती मिळणे कठीण नाही. मात्र मग नव्याने कुणाला लोकसभा अध्यक्ष करावे यावर शोध घ्यावा लागणार आहे.

सुषमा स्वराज : मोदी सरकार मध्ये चर्चेत राहिलेल्या लोकप्रिय नेत्या आहेत. विदेशात समस्यांमध्ये असलेल्या भारतीयांना मदत करण्याच्या त्यांच्या समूह संपर्क माध्यमातील प्रसंगातून मिडियाला नव्या बातम्या मिळत असतात. मात्र त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांचे कामकाज सध्या त्रासाचे झाले आहे, शिवाय मोदी यांच्याशी त्यांचे फारसे चांगले संबंध नसल्याचे मानले जात आहे.

द्रौपदी मुर्मू : मोदी यांनी अनेक नव्या चेह-याना संधी देवून धक्का दिला आहे, तसेच यांच्या बाबतीत होवू शकते, सध्यात् या झारखंड मध्ये राज्यपाल आहेत, त्या उडिशी आदिवासी समाजातील आहेत, जेथे पुढच्या वर्षी निवडणुकीत भाजपाला त्यांच्या राष्ट्रपती होण्याचा फायदा मिळू शकतो.

या स्पर्धेत भाजपाच्या विरोधी पक्षातील दोन शरद देखील आहेत, राकॉ चे शरद पवार आणि जदयूचे शरद यादव. पवार यांच्या नावाला कॉंग्रेसही समर्थन देत असल्याचे समजते, तर स्वत: पवार आपण इच्छूक नसल्याचे सांगत असल्याने शरद यादव यांच्या नावावरही चर्चा सुरू आहे.

कशी असेल प्रक्रिया

राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया कशी असेल ते पाहूया.

लोकसभा,राज्यसभा यांच्या सदस्यांशिवाय देशातील सर्व विधानसभांचे आमदार या साठी मतदार असतील. सन २०१७ मधील स्थिती नुसार देशात ७८४ खासदार आणि ४११४ आमदार मतदार म्हणून पात्र आहेत. प्रत्येक खासदाराच्या मताचे मुल्य ७०८ मतां इतके आहे, तर विधानसभांच्या आमदारांच्या मताचे मुल्य तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात ठरेल, सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यूपीच्या आमदारांच्या मताचे मुल्य सर्वाधिक आहे, तर सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या सिक्कीम मधील आमदारांच्या मताचे मुल्य सर्वात कमी आहे. जेथे प्रत्येक मताच्या मुल्याचे राष्ट्रपती उमेदवाराला केवळ सात गुण मिळतील. सध्याच्या स्थितीमध्ये एकूण मतांच्या गुणांचे मुल्य ११,०४,५४६ आहे. त्यामुळे विरोधीपक्ष आणि सत्ताधारी यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. कॉंग्रेस आणि सहयोगी पक्ष यांच्याकडे एकूण मुल्याच्या ३५.४७ टक्के मते आहेत, जर त्यांना आणखी १३ राजकीय पक्षांचा पाठींबा मिळाला तर हे मुल्य वाढून ४३.५३ टक्के पर्यंत जावू शकते. दुसरी कडे मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए कडे ४८.६४ टक्के इतक्या मतांचे मुल्य आहे. याचा अर्थ कोण उमेदवार आहे यावर येथून किंवा तेथून काही मते कमी काही जास्त होवू शकतात. त्यामुळे सर्वसहमतीने एखादा चेहरा देण्यावर सध्याच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.