नटसम्राट हे प्रत्येक कलावंताचे वास्तव - नाना पाटेकर

नटसम्राट हे प्रत्येक कलावंताचे वास्तव - नाना पाटेकर

Thursday November 26, 2015,

3 min Read

नाना पाटेकर आणि विश्वास जोशी निर्मित नटसम्राट हा सिनेमा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला प्रदर्शित होतोय. आधीचे एस्सल व्हिजन आणि आताचे झी स्टुडिओ या सिनेमाची प्रस्तुती करतायत. तर महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन असणाऱ्या या सिनेमाचे संवाद लेखन केलेय किरण यज्ञोपवित याने.

या सिनेमात नटसम्राट अप्पा बेलवलकरांच्या भुमिकेत दिसणारे नाना पाटेकर. नटसम्राट कादंबरीवर सिनेमा बनवण्याचे स्वप्न महेशने पाहिले होते आणि ते प्रत्यक्षात आणायला नाना स्वतः निर्माते बनलेत. याबद्दल बोलताना नानांनी सांगितले की “ प्रत्येक कलाकार जो अभिनय क्षेत्रात वर्षोनुवर्षे काम करत असतो त्याला कधी ना कधी तरी निर्मात्याची जबाबदारी अनुभवावी लागतेच. मीही नटसम्राटच्या निमित्ताने सहनिर्माता बनलोय. नटसम्राटच्या निमित्ताने एक उत्तम कलाकृती माझ्या आणि महेशकडून साकारली जातेय, याचा मला नक्कीच आनंद आहे.”

image


नटसम्राट या कादंबरीबद्दल बोलताना नाना सांगतात की “ ही कादंबरी म्हणजे प्रत्येक कलाकाराची खरीखुरी व्यथा आहे, कलाकार म्हणून आम्ही आयुष्यभर वेगवेगळ्या भुमिका साकारतो, आपल्या कलेतून प्रेक्षकांना चाहत्यांना आनंद देतो, कधी एक नागरिक कधी मुलगा, कधी वडिल, कधी भाऊ अशा विविध भुमिका अभिनयातून पडद्यावर साकारत असताना वैयक्तिक आयुष्यातल्या आमच्या भुमिकांकडे आमचे दुर्लक्षच होत जाते ते कायमचेच. म्हणजे नटाच्या भुमिका साकारताना आम्ही आमच्यातला खरा मी विसरुनच जातो आणि जेव्हा आमचे हे खरे रुप समोर येऊ लागते तेव्हा अनेकदा खूप उशिर झालेला असतो.

सिनेमात कुटुंब कुटुंब खेळताना, यातल्या नात्यांसाठी झटताना, वेळेला त्यासाठी मरताना आम्ही वैयक्तिक आयुष्यातली आमची रक्ताची माणसे पाठी ठेवतो आणि जेव्हा त्या माणसांच्या जवळ आम्हाला जावेसे वाटते तेव्हा अनेकदा त्या माणसांना आमची न असण्याचीच सवयच झाली असते. आमच्याशिवाय जगणे, आयुष्य अनुभवणे हे त्यांच्या अंगवळणी पडले असते. आणि हे आम्हा कलाकारांच्या आयुष्यातले कटू सत्य आहे. ”

नाना या भुमिकेबद्दल अधिक बोलताना सांगतात की “कलाकार म्हणून जगताना मी माझी आई, बायको, मुलगा यांना किती वेळ दिला, त्यांच्या आयुष्याच्या महत्वाच्या वेळी मी त्यांच्यासोबत होतो का याचा विचार मी अनेकदा एकांतात करत असतो. आयुष्याच्या एका संध्याकाळी जेव्हा माझे काम हळूहळू कमी होईल आणि मला माझ्या कुटुंबासोबत वेळ काढावासा वाटेल तेव्हा त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ असेल का हा प्रश्न मला नेहमी सतावतो, कदाचित तोपर्यंत त्यांचे त्यांचे स्वतःचे जग बनलेले असेल मग बाहेरच्या जगात मी नटसम्राट म्हणून ओळखलो गेलो तरी काय विशेष...

image


नटसम्राट ही आमच्यासारख्या नटांची शोकांतिका आहे, यातनं जो समजला तो वाचला आणि जो नाही तो अप्पासाहेब बेलवकर बनतो.”

नानांनी यावेळी ज्येष्ठ साहित्यिक वि वा शिरवाडकरांची आठवण काढली. नाना सांगतात की “मला आनंद आहे की तात्यांचा सहवास मला आणि माझ्या बायकोला नीलकांतीला मिळाला. पुण्यात असताना आम्ही त्यांना भेटलो होतो तेव्हा तात्यांनी त्यांनी लिहिलेल्या काही रचना आम्हाला वाचून दाखवल्या होत्या. ते नीलूला मुलीसारखे मानायचेत.”

नाना सांगतात की “नटसम्राट सारख्या कादंबरीने तात्यांनी आपल्यावर आणि समस्त साहित्यक्षेत्रावर केलेल्या उपकाराची परतफेड करायचा प्रयत्न मी या कादंबरीवर सिनेमा करुन करतोय असे नक्कीच नाही. हे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे आहे. आणि माझी तेवढी लायकी नाही. पण एक कलाकार म्हणून मी नेहमीच नवनवीन भुमिकांच्या शोधात असतो अप्पासाहेब बेलवलकर ही अशीच एक सशक्त व्यक्तिरेखा.

कोणी घर देता का घर, जगावे की मरावे हाच एक प्रश्नही व्यक्तिरेखा सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर आणून मी आत्तापर्यंत नटसम्राट या नाटकातनं अप्पासाहेबांची भुमिका अजरामर करणाऱ्या डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, यशवंत दत्त आदी मान्यवरांना मानवंदना देऊ इच्छितो” अशी प्रांजळ कबूलीही नाना यांनी यावेळी दिली.