महिला ढोल पथकानं दुष्काळग्रस्तांसाठी मागितला धान्याचा जोगवा

महिला ढोल पथकानं दुष्काळग्रस्तांसाठी मागितला धान्याचा जोगवा

Wednesday November 18, 2015,

2 min Read

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रावर निसर्गाची वक्रदृष्टी सुरु आहे. अवर्षणामुळं दुष्काळ तर कधी अवेऴी आलेल्या पावसामुळं उभी पिकांचं नुकसान होतं. या निसर्गाच्या लहरीपणाचा फटका महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बसला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारी यंत्रणा सरसावलेय खरी पण ती तेवढी पूरेशी नाही. हेच ओळखून अनेक सामाजिक संस्था या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आल्यात. या सामाजिक संस्था आपआपल्यापरीनं या शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या जनतेला मदत करत आहेत. पुण्यातल्या शुक्रवारपेठेतल्या सेवा मित्र मंडळकृत विघ्नहर्ता वाद्य पथकानं या ग्रामीण भागातल्या लोकांच्या मदतीसाठी केलेला उपक्रम अगदीच कौतुकास्पद आहे. यासाठी त्यांना साथ मिळाली ती गणेशोत्सव मंडळ, नवरात्र मंडळ आणि पोलिसांची. याच जोरावर या पथकानं ९ हजार किलो धान्य शेतकऱ्यांसाठी जमवलं आहे.

image


महाराष्ट्रात दुष्काळ आहे. जून महिन्याचा पाऊस जुलै, ऑगस्टपर्यंत पडलाच नाही. यामुळं पाण्याचं दुर्भिक्ष झालंच. शिवाय पेरलेली शेती उन्हानं जळून गेली. आता या शेतकऱ्यांना आधाराची गरज होती. अनेक शेतकऱ्यांकडे तर रोजच्या जेवण्याची पंचाईत होती. त्यांच्या हातात काहीच नव्हतं. सर्व काही निसर्गाच्या लहरीपणानं त्यांच्याकडून हिरावून घेतलं. अशा शेतकऱ्यांना पैश्याची मदत तर हवीच होती शिवाय त्यांना रोजचा शिधा आणि जनावरांसाठी चारा आवश्यक होता. हेच ओळखून पुणे पोलिसांनी या शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं. याच आवाहनाचा विचार करुन विघ्नहर्ता वाद्य पथकानं यावर्षी गणपती आणि नवरात्रीत सुपारी म्हणून ढोल वाचवण्याचे पैसे न घेता या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी धान्य घेण्याचं ठरलं. पुण्यातले गणेशोत्सव मंडळ आणि नवरात्र उत्सावांनी ही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. बघता बघता या उपक्रमाचा प्रचार पुण्यात सर्वत्र झाला. जिथं जिथं विघ्नहर्ता वाद्य पथक ढोल वाजवत असत तिथं धान्य घेऊन लोक येऊ लागले. दुष्काळग्रस्त लोकांच्या मदतीला आपला हाथभार लावू लागले.

image


विघ्नहर्ता वाद्य पथकाची आणखी एक खासियत आहे. ती म्हणजे हे वाद्यपथक महिलांचं आहे. पथकातील सर्व महिला उच्चसुशिक्षित आहेत. सुरुवातीला फक्त हौस म्हणून सुरु झालेल्या या वाद्यपथकाला एक ओळख मिळाली. या पथकाचं नेतृत्व करणाऱ्या वृषाली मोहिते सांगतात, महाराष्ट्रात दुष्काळाचे वारे वाहत असताना वाद्य पथकातर्फे या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांनीही आप-आपल्यापरीनं मदत करण्याचं आवाहन केलं होतं. आम्ही ही वाद्य पथकाची सुपारी म्हणून पैश्यांऐवजी ‘धान्यरुपी जोगवा’ मागण्याचं ठरवलं. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. गणेशोत्सव आणि नवरात्र मंड़पात स्थिरवादन करुन हा धान्य आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी जोगवा मागण्यात आला आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. यातून सुमारे नऊ हजार किलो धान्य जमा झाले. हे धान्य बार्शी, बीड या भागातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तसंच पुण्यात रोजगारासाठी आलेल्या बांधकाम मजूरांना देण्यात य़ेणार आहे.

    Share on
    close