'एका क्लिकवर कचरा विका' आयआयटी मुंबईच्या विद्यार्थांचा ‘स्क्रॅपक्रो’ उपक्रम

'एका क्लिकवर कचरा विका' आयआयटी मुंबईच्या विद्यार्थांचा  ‘स्क्रॅपक्रो’ उपक्रम

Monday November 09, 2015,

3 min Read

आयआयटी मुंबईचे अनेक विद्यार्थी मोबाईलवर आधारित सेवा लाँच करत आहेत. यासाठी पवई व्हॅली ही ‘बी२सी’ या स्टार्टअप कंपन्यांसाठी एक प्रयोगशाळेप्रमाणे ‘टेस्टिंग ग्राऊंड’ बनत आहे. ‘Housing’, ‘TinyOwl’, ‘HandyHome’ सारख्या स्टार्टअप कंपन्यांचा इथे चांगल्या पद्धतीने विकास होत आहे. या प्रयोगामुळे गुंतवणूकदारांबरोबरच उद्योगक्षेत्रात देखील आनंदी आनंद पसरलेला आहे. विशेष सांगायचे म्हणजे या स्टार्टअप कंपन्यांहुन वेगळी अशी नवीन स्टार्टअप कंपनी देखील इथे लाँच करण्यात आली आहे. ही कंपनी कच-याची देखभाल करण्याचे काम करते. या नव्या कंपनीचे नाव आहे ‘स्क्रॅपक्रो’ (Scrapcrow). ही कंपनी कोणाच्याही कच-याची सुविधाजनक आणि पारदर्शक पद्धतीने विल्हेवाट लावणारे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. ‘स्क्रॅपक्रो’चे एक सह-संस्थापक रजत शर्मा आपल्या मेलमध्ये म्हणतात, “ सर्वोत्कृष्ट किंमतीत कच-याचे रिसायकलिंग करणारा आणि लोकांच्या थेट दारात उपलब्ध होणारा सर्वात विश्वासू मित्र बनणे हे आमचे लक्ष आहे.” ते पुढे लिहितात, “ आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आमचा ब्रँड कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या कार्यात लोकांचे योगदान वाढवून आम्ही ही पृथ्वी राहण्यासाठी एक चांगली जागा बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” ही एक उत्कृष्ट संकल्पना आहे आणि आपल्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर लगेच पहिल्याच महिन्यात कंपनीने पवईतून कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी ७० विनंत्या प्राप्त केल्या आहेत.

image


‘स्क्रॅपक्रो’मध्ये रजत शर्मा यांच्या व्यतिरिक्त आणखी तीन लोक सुद्धा सहभागी आहेत. या सर्वांकडे दोन वर्षांचा कॉर्पोरेट अनुभव देखील आहे. त्यांपैकी एक असलेले देवेश वर्मा यांनी ‘ट्रिंबल नेव्हिगेशन’मध्ये काम केले आहे. शिवाय ‘Terra Wizard Mapping Solutions’चे ते सहसंस्थापक देखील आहेत. दुसरे इहतीशाम खान हे ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’मध्ये मॅनेजर या पदावर काम करतात, तर प्रणव कुमार हे ‘सिस्को’मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. सध्या ही टीम प्राथमिक स्वरूपाचा (सीड राऊंड फंड) निधी उभा करत आहे. निधी उभारणीची ही प्रक्रिया सध्या सुरूच आहे.

‘स्क्रॅपक्रो’ म्हणजे सामान्य माणसाची कच-याची विल्हेवाट लावण्यासंबंधीची समस्या सोडवण्यासाठी उचललेले एक पाऊल आहे. ‘गो ग्रीन इनिशिएटीव्ह’ची उन्नती करणे आणि लोकांच्या मनात रिसायकलिंग सारख्या महत्त्वाच्या विषयाला आवश्यक गोष्ट बनवणे हा या कंपनीचा उद्देश आहे. रजत शर्मा सांगतात, “ आजच्या काळातील या तंत्रज्ञानाने युक्त अत्याधुनिक मोबाईलच्या युगात सुद्धा कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची औपचारिक बुकिंग पद्धत उपलब्ध नाही. आपल्या आजुबाजुला असलेल्या कचरा उचलणा-या विक्रेत्यावरच त्यासाठी अवलंबून रहावे लागते. यामुळे मक्तेदारी आणि अयोग्य व्यवहाराचा जन्म होतो.” ‘स्क्रॅपक्रो’ टीमने ऑनलाईन बुकिंगसाठी एक ऑनलाईन व्यासपीठ तयार केले आहे. हे व्यासपीठ आपल्या ग्राहकांना आपल्या सोईनुसार कच-याची विल्हेवाट लावणा-या विक्रेत्याला बोलावण्याची संधी मिळवून देण्याचे काम करते. ही टीम लवकरच एक मोबाईल अप्लीकेशन देखील लाँच करणार आहे. ‘स्क्रॅपक्रो’चे काम केवळ कचरा गोळा करण्यापर्यंत मर्यादित नाही, तर आपल्या ऑन-बोर्ड स्र्कॅप डिलर्सद्वारे कच-याचे रिसायकलिंग करण्याचे काम देखील स्क्रॅपक्रो निश्चित करते. रजत शर्मा सांगतात, “ आम्ही मध्यस्तांच्या मोठ्या साखळीला पार करून एकत्रित केलेल्या कच-याला थेट रिसायकलिंग प्लांट आणि डिलरना देतो.”

‘स्क्रॅपक्रो’ लवकरच कागदापासून ते ई-कच-यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी कॉर्पोरेट आणि किरकोळ विक्रेत्यांसोबत करार करणार आहे. या व्यतिरिक्त स्क्रॅपक्रो कंपन्यांसाठी चिंध्या तयार करणे (श्रेडिंग) आणि डेटा सॅनिटायझेशनची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजनाही बनवत आहे. सध्या ‘स्क्रॅपक्रो’कडे कच-याचे ५ ऑनलाईन डिलर्स आहेत, तर पवई आणि आसपासच्या परिसरात सेवा देण्यासाठी आणखी १० कचरा डिलर्सना जोडण्याची त्यांची योजना आहे. रजत शर्मा सांगतात, “ या डिलर्सनी व्यावसायिक पद्धतीने काम करावे यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेतो. यासाठी आम्ही त्यांना कम्यूनिकेशन आणि योग्य व्यवहार कसा करावा याचे प्राथमिक स्वरूपाचे प्रशिक्षण देखील देतो.” स्क्रॅपक्रोकडे सध्या विद्यार्थी, व्यावसायी, संस्था आणि किरकोळ विक्रेत्यांकडून बुकिंग होत आहे.

यापूर्वी देखील अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला आहे. भोपाळचे ‘द कबाडीवाला’ आणि ‘पेपरमॅन’ ही याची काही उदाहरणे. आणि या कंपन्या आपापल्या क्षेत्रात चांगले कामही करत आहेत. ‘स्क्रॅपक्रो’ हा एक असा उपक्रम आहे, जो काम तर तेच करत आहे, मात्र व्यापक स्तरावर. हा उपक्रम आता नफा कमावण्यावर देखील आपले लक्ष केंद्रीत करणार आहे. जेव्हा स्वच्छ ऊर्जा आणि रिसायकलिंगची गोष्ट येते, तेव्हा अटेरो (Attero) ही संभाव्यपणे भारतातील सर्वात मोठी यशोगाथा असल्याचे समोर येते. आणि भारतीयांनी अशा प्रकारच्या कंपन्याचा पाया घालायला हवा. तशी वेळ आता येऊन ठेपलेली आहे.