देशाची दशा, दिशा बदलणारे सामाजिक उद्यमी

देशाची दशा, दिशा बदलणारे सामाजिक उद्यमी

Sunday November 08, 2015,

6 min Read

काही वर्षांपूर्वी लोक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा देत असत, पैकी काही लोकांना सरकारी नोकरी मिळत असे. पण गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती फार बदललेली आहे. आता विद्यार्थ्यांसाठी नोकऱ्यांची कितीतरी नवी दालने उघडलेली आहेत. आणि आजपासून काहीच काळापूर्वी लोकांच्या माहितीतही नसलेल्या क्षेत्रांमध्ये नवी पिढी आपले भविष्य घडवते आहे. अशाच पद्धतीने काही नव्या दमाच्या युवकांनी कुणाच्याही हाताखाली काम करण्यापेक्षा स्वत:चे व्यवसाय सुरू केले. पैकी काहींचे व्यवसाय अल्पावधीतच नावारूपाला आले, तर काहींचे सुरू झाले तसे बंदही झाले. यातले काही असे होते, की त्यांना नवे कामही सुरू करायचे होते आणि अशा पद्धतीने सुरू करायचे होते, की ज्यातनं देशसेवाही घडावी. देशाच्या प्रगतीत आपलेही योगदान असावे, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या कितीतरी समाजोन्भिमुख उद्योजकांनी, व्यावसायिकांनी देशाची दिशा आणि दशा बदलण्यात खरोखर मोलाचे योगदान दिलेले आहे.

समाजासाठी ज्यांनी भरपूर काम केले आणि त्याबद्दल त्यांचे भारतातच नव्हे तर जगभर नाव झाले, असे आपल्याकडे खुप लोक आहेत. त्यांनी आपल्या तळागाळातील कामाच्या बळावर आपली ओळख जागतिक स्तरावर निर्माण केली. सामाजिक उद्यमात सक्रिय असणाऱ्यांसाठी प्रेरणेचा झरा बनलेले असेच हे काही महान लोक…

image


१) मोहनदास करमचंद गांधी – महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. खादीसह विविध स्थानिक कलांना प्रोत्साहन देण्यासाठीही त्यांनी जिवाचे रान केले. सामान्य लोकांना त्यांनी स्वदेशीचा मंत्र दिला. देशातील कारागिरांना रोजगार मिळावा म्हणून पुरेपूर प्रयत्न गांधीजींनी केले. महिला सशक्तीकरण, शिक्षण, अस्पृश्यता निवारण अशा कितीतरी आघाड्यांवर त्यांनी कार्य केले. मिठाचा सत्याग्रह केला. गांधीजींच्या प्रत्येक सत्याग्रहामागे सामान्य माणसाचे हित दडलेले होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासह सामाजिक उद्यमी म्हणूनही या महात्म्याने मोलाची भूमिका बजावली.

२) वर्गिस कुरियन – धवल क्रांतीचे जनक म्हणून वर्गिस कुरियन यांची ओळख देशाला आहे. दुधाच्या टंचाईने सतत त्रस्त असणाऱ्या भारताला त्यांनी जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश म्हणून नावारूपाला आणले. कुरियन यांनी सहकारी तत्वावरील दूध उद्योगाचे मॉडेल देशाला दिले. किंबहुना सहकारी तत्वावर दूध उत्पादनाचा पायाच त्यांनी रचला. २६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळातील कोझिकोड येथे वर्गिस यांचा जन्म झाला. गुजरातेतील आणंद येथे एका लहानशा जागेत त्यांनी ‘अमुल’ची सुरवात केली. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांत देशाला स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न डोळ्यासमोर होते. शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचवायचे होते. त्रिभुवनभाई पटेल यांच्यासमवेत त्यांनी खेडा जिल्हा सहकारी समिती सुरू केली. १९४६ मध्ये दोन गावांना सदस्यत्व बहाल करून डेअरी सहकार संघाची स्थापना त्यांनी केली. आज या संघाचे सदस्य असलेल्या गावांची संख्या १६ हजारांहून अधिक आहे. ३२ लाख दूध उत्पादक या संघाशी संलग्न आहेत. म्हशीच्या दुधाची पावडर (भुकटी) तयार करणारे वर्गिस कुरियन हे जगातले पहिलेच. याआधी गायीच्याच दुधाची पावडर बनत असे. कुरियन यांनी आपल्या अभियानात जनसामान्यांना सोबत घेतले… आणि सामाजिक उद्यमाचा एक अत्यंत यशस्वी असा नमुना जगासमोर ठेवला.

३) संजित बंकर रॉय – संजित बंकर रॉय यांनी १९६५ मध्ये बेयरफुट कॉलेज सुरू केले. कॉलेजच्या माध्यमातून त्यांना ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांचे निराकरण करायचे होते. बेयरफुटने ते करूनही दाखवले. इथे पावसाचे दहा लाख लिटर पाणी साचवून ते पिण्यालायक बनवण्यात येते. मग हे पाणी जगभरातील १३०० ठिकाणांवर २३९००० शाळकरी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. जागतिक पातळीवर गरिबीशी दोन हात करत ग्रामीण भागासह दुर्गम भागात वीज आणि पाणी या मूलभूत सेवा पुरवणे, हे बेयरफुटचे उद्दिष्ट आहे. सौर उर्जा प्रणालीचा वापरही याअंतर्गत अभिप्रेत आहे. ५४ हून अधिक देशांमध्ये असे कार्य सुरू आहे. सौर उर्जा क्षेत्रातील ६०० हून अधिक महिला अभियंत्यांना या उपक्रमात रोजगाराची संधी प्राप्त झालेली आहे. भारत आफ्रिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर क्षेत्र तसेच आशियातील जवळपास १६५० भागांतून ४५०००० लोकांना वीज उपलब्ध करून दिली जात आहे.

४) अनिलकुमार गुप्ता – गुप्ता हे आयआयएममध्ये प्राध्यापक आहेत आणि ‘हनी बी नेटवर्क’ संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी देशातील गरिब तसेच संधीसाठी चाचपडत असलेल्या नवसंशोधकांच्या प्रकल्पांना ओळख देण्यासाठी एक अभियानच सुरू केले. १९८१ पासून ते आयआयएममध्ये शिकवत आहेत. तळागाळात काम करायला सुरवात केली तशी ‘हनी बी नेटवर्क’लाही सुरवात झाली. बरीच वर्षे ते बांग्लादेशातही राहिले. ग्रामीण भागातील लोकांसह काम करायला सुरवात केली आणि ग्रामस्थांमधील सुप्त गुणांना वाव मिळवून दिला. गोरगरिबांकडून कितीतरी प्रयोग करवून घेतले आणि त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यालायक बनवले.

५) हरिश हांडे – हरिश यांनी आपल्या कष्टाने, चिकाटीने आणि कौशल्याने ग्रामीण भागातील लोकांच्या जगण्यात उजेडाचे रंग भरले. हरिश यांनी ग्रामीण भागांत जिथे पुरेशी वीज नाही, अशा वस्त्यांमध्ये सौर उर्जा पोहोचवली. हरिश यांच्या या कामाचे जगभरातून कौतुक झाले. त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कारही त्यासाठी दिला गेला. हरिश यांनी १९९५ मध्ये फार थोड्या पैशांच्या बळावर ‘सेल्को इंडिया’ सुरू केली. सौर उर्जेचा वापर करून ग्रामीण भागाचा विकास घडवून आणणे, हे या कंपनीचे उद्दिष्ट होते. सुरवातीला हरिश यांनी फार थोड्या बजेटमध्ये आपले काम धकवले. कितीतरी अडचणी आल्या, पण त्यांनी काम रेटतच नेले. छोट्या बजेटच्या कल्पनांवर काम करत राहिले. आज ‘सेल्को’कडे ३७५ हून अधिक कर्मचारी आहेत. कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, बिहार आणि तमीळनाडूत या सर्वांचे काम चाललेले आहे. ग्रामीण भारत प्रकाशित करण्याचे, किंबहुना स्वयंप्रकाशित करण्याचे दिव्य ते पार पाडताहेत. या सर्व राज्यांमध्ये मिळून ‘सेल्को’ची ४५ हून अधिक सेवा केंद्रे आहेत. १९९५ पासून ते आतापावेतो ‘सेल्को’ने दोन लाखांहून अधिक लोकांच्या घरात आपली यंत्रणा लावलेली आहे.

६) डॉ. जी. व्यंकटस्वामी – व्यंकटस्वामी यांनी १९७६ मध्ये तमीळनाडूत ‘अरविंद आय केअर’ची सुरवात केली. सर्वाधिक नेत्र सुरक्षा सुविधा आणि आकारानेही जगात सर्वांत मोठे असलेले हे नेत्र रुग्णालय आहे. इलाजावर पैसा खर्च करण्याची क्षमता नसलेल्या गोरगरिबांवर उपचार करण्याच्या उद्देशाने व्यंकटस्वामी यांनी हे रुग्णालय सुरू केले होते. सुरवातीला रुग्णालयात ११ खाटा होत्या आणि आज हे जगातील सर्वांत विशाल नेत्र रुग्णालय आहे. कमी खर्चातही चांगला आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार केला जाऊ शकते, हे या रुग्णालयाने सिद्ध केले आहे. चार दशलक्षांहून अधिक नेत्रशस्त्रक्रिया या रुग्णालयात पार पडलेल्या आहेत. पैकी बहुतांश रुग्ण हे अल्प उत्पन्न गटातील आहेत.

७) सुनील भारती मित्तल – सामाजिक उद्यमींच्या यादीत एअरटेलचे संस्थापक सुनील भारती मित्तल यांचे नाव बघून आश्चर्य वाटले का? त्याचे काहीही कारण नाही. कारण बहुतांश लोक एअरटेलचे नाव सामाजिक उद्यम म्हणूनच घेतात. एअरटेलने मोबाईल क्षेत्रात जी क्रांती केली, त्या क्रांतीमुळेच अगदी मोलकरणीपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल आलेला आहे. गोरगरिबांपर्यंत दळणवळणाचे हे सशक्त माध्यम पोहोचायला हवे, या उद्देशाने मोबाईलच्या किंमती एअरटेलने धाडकन कमी केल्या आणि मोबाईल सर्वव्यापी होण्याला सुरवात झाली. मित्तल यांची कंपनी एअरटेल आज ग्रामीण भागातही आपले नेटवर्क सुरू करते आहे. दुर्गम भागातील भारतही मोबाईल नेटवर्कने जोडला जावा, हा त्यामागचा उद्देश आहे. देशासाठी हे चांगलेच आहे. देशाचे हे भलेच आहे.

८) विनित राय – विनित यांचा जन्म जोधपूरला झाला. वयाच्या चोविसाव्या वर्षीच ते ‘अविष्कार’चे सीईओ बनले. ‘अविष्कार’ ही नावाप्रमाणेच संशोधनाला प्रोत्साहन देणारी कंपनी आहे. अविष्कार ग्रामीण उद्योजकांना कर्जही उपलब्ध करून देते. नवे काही घडवू पाहणाऱ्यांना, तशी क्षमता असलेल्यांना अविष्कार सर्वतोपरी सहकार्य देते. सन २००२ मध्ये विनित यांनी ‘इंटलॅक्चुअल कॅपिटल’ नावाने एक कंपनीही रजिस्टर्ड केली होती. ही कल्पना मित्र पवन मेहरा यांनी त्यांना सुचवली होती. बौद्धिक संपदेच्या क्षेत्रात व्यापार करणे, हे ‘इंटलॅक्चुअल कॅपिटल’चे उद्दिष्ट होते. अविष्कारचे कार्य अथवा हेतू निव्वळ नफा कमवणे नव्हताच, ज्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती करू शकतात, त्या कंपन्यांना उभे करणे, हे अविष्कारचे मूळ उद्दिष्ट राहिले.