'अजून चालतोची वाट,' 'बरेच काही होत आहे, होणार याची आशा आहे' : मोदी सरकारच्या कामगिरीवर देशाच्या अपेक्षा कायम!

'अजून चालतोची वाट,' 'बरेच काही होत आहे, होणार याची आशा आहे' : मोदी सरकारच्या कामगिरीवर देशाच्या अपेक्षा कायम!

Wednesday May 25, 2016,

5 min Read

मे २०१४ या महिन्यात देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाच्या राज्यकारभाराची सूत्र मोठ्या अपेक्षा आणि विश्वासाने सुपूर्द केल्या. कॉंग्रेस आघाडीला त्यावेळी सपाटून मात देत नरेंद्र मोदी यांचे सरकार ‘अच्छे दिन’ ची हाळी देत सत्तेवर आले. त्यावेळी अनेक जाणकारांनी मोदी यांचा कार्यकाळ देशाच्या अर्थकारणापासून समाजकारण आणि राजकारणालाच वेगळी कलाटणी देणारा असेल असे भाकीत केले होते. या मे महिन्यात त्याला दोन वर्ष पूर्ण झाली. लोकांनी मोदी यांना त्यांच्या संकल्पनेतील भारताची उभारणी करण्यासाठी राज्यघटनेनुसार पाच वर्षांचा कालावधी दिला असल्याने केवळ दोनच वर्षांत त्यांच्या कामकाजाचे मुल्यमापन करणे घाईचे आणि अप्रस्तुत ठरेल. तरीही गेल्या दोन वर्षांतील मोदी सरकार समोर असलेली आव्हाने, भारतीय लोकशाही प्रक्रियेतील मर्यादा, आणि प्रशासकीय अधिकारी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळणारा प्रतिसाद या सा-यांची गोळाबेरीज केल्यास ‘अजून बरेच काही करायचे आहे’ असेच म्हणावे लागते.

गेल्या दोन वर्षांत ज्या काही ठळक गोष्टी झाल्या त्यांचा गोषवारा आणि मोदी सरकार बाबत उद्योग किंवा आर्थिक जगतातील मान्यवरांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा युअर स्टोरीने प्रयत्न केला.

image


ज्या मोठ्या अपेक्षा जनतेने ठेवल्या आणि मोदी यांना बहुमताने निवडून दिले त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अजून तीन वर्षांचा काळ बाकी आहे, मात्र जनतेच्या संयमाची ती कसोटी ठरणार आहे. मोदींच्या काही समर्थकांमध्येच आता त्यामुळे ‘काय केले दोन वर्षात?’ असे विचारण्यास सुरुवात झाली आहे, किमान ‘जे सांगितले त्या दिशेने काही पावले तरी टाकली’ असे काही लोक सांगू लागले आहेत.

नरेंद्र मोदी आणि टीका हा काही नवा विषय नाही ते गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्या विरोधकांनी मोदी यांना ‘सैतान’ संबोधून त्यांच्या अमेरिकेचा व्हिसा गमावला म्हणून किती दोष दिला होता, तेच मोदी मागील दोन वर्षात पाच-सहा वेळा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मित्र आणि प्रमुख पाहुणे म्हणून त्या देशात जाऊन सभा गाजवून आल्याचे आपण सा-यांनी पाहिले असेलच! म्हणजेच काही गोष्टींची वाट पाहिली पाहिजे नाही का? मोदी यांच्या पर-राष्ट्र धोरणाचा विजय म्हणजे जगभरात योगाला मिळालेली मान्यता आणि जागतिक योग दिनाच्या दिवशी जगाने त्यावर केलेले संचलन ही सुध्दा या देशाच्या पारंपारीक आत्मविश्वासाच्या दिैशेने केलेली ठळक कामगिरी म्हणावी लागेल. विदेशी परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी करण्यात येणा-या प्रयत्नात 'मेक इन इंडिया' हा मैलाचा दगड सिध्द होत आहे. एकाच वेळी चीन जपान आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांशी हातमिळवणी करत देशांच्या हिताचा समन्वय साधण्याचा प्रयत्न मोदी यांच्या सरकारने केला आहे. जन धन योजना ही गरीबातील गरीब माणसाला आर्थिक विकासात सोबत घेण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. त्यानंतर शेतक-यांच्या कृषी विम्याची योजना ही देखील पुढील दोन वर्षात सामान्य शेतक-यांच्या जीवनमानात अमुलाग्र बदल घडवून आणेल अशी योजना ठरेल. थेट बँकेच्या खात्यात रकम अदा करण्याच्या योजनेमुळेही सरकारी योजनांतील बाबूगिरी-खाबूगिरी यांना पायबंद होण्यास मदत मिळाली आहे.

मोदी सरकारला विरोधीपक्षांकडून भुसंपादन विधेयक, जीएसटी विधेयक कामगार कायद्यातील विधेयके मंजूर करण्यात अडचणी निर्माण करण्यात आल्या तरीही जागतिक पातळीवर कमी झालेल्या इंधनाच्या किमती, त्यामुळे अर्थिक व्यवस्थेवरील कमी झालेला ताण यामुळे गेल्या दोन वर्षात मोदी सरकारला करता येण्यासारख्या ब-याच गोष्टी करणे शक्य झाले नाही. बँकीग क्षेत्रातील सुधारणा, सौर ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी, बंदर आणि रस्ते विकास या विषयात मागील दोन वर्षात भरीव कामगिरी सुरू झाली आहे त्याचा दृश्य परिणाम पुढील दोन वर्षात पहायला मिळेल. स्मार्ट सिटी प्रकल्प,आणि राज्यांच्या हाती अनेक केंद्रीय योजनांची जबाबदारी देण्याच्या प्रयत्नातून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या दिशने एक पाऊल पडले आहे असेच म्हणावे लागेल. पाकिस्तानसह सार्क देशांशी मोदी यांच्या कार्यकाळात संबंध सुधारावे म्हणून ठोस पावले पडली तरी पाकच्या नेहमीच्या धोरणाने अदयाप त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मोदी सरकारच्या या कार्यकाळाचे हे सिंहावलोकन करताना काही महत्वाच्या व्यक्तींनी दिलेल्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रियाही महत्वाच्या आहेत.

" मोदी हे खूप मोठ्या उद्योजकतेचे प्रतिक म्हणून या देशाचे नेतृत्व करत आहेत. राजकारणासह सर्वच क्षेत्रात त्यांचा प्रभाव जाणवतो." - जे. राजमोहन पिल्लाई, उद्योजक.

"स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप मोदी, स्टँड अप मोदी. भारताचा ख-या अर्थाने कणा आहेत मोदी. भारताचा स्टार्टअप मित्र असलेले पंतप्रधान." - अॅड. तौफिक अहमद, व्यावसायिक.

 " मोदी यांनी सांगितलेले अच्छे दिन माझ्या मते माझ्यासारख्या छोट्या व्यावसायिकाला सुद्धा यावेत. मला असे म्हणायचे आहे की आम्हाला सहजपणाने भांडवल आणि सरकारी नियमांच्या सुलभीकरणाचा फायदा व्हावा." शशांक शर्मा, उद्योजक

"काही गोष्टी प्रवाहाने घडत आहेत. उद्योगात आम्हाला अपेक्षा आहे सकारात्मक बदल होण्याची. त्या दिशेने घडामोडी सुरू झालया आहेत त्यात सुधारणा होतील अशी आशा आहे."- रोहीत माहेश्वरी उद्योजक

"इच्छा असेल तर मार्ग मिळतोच. तुमचा विश्वास गमाऊ नका. आव्हाने स्विकारा आणि कष्ट करा. इथे ९ ९% टिका आणि १% प्रेरणा मिळते." - जगदिश ठक्कर आर्थिक सल्लागार.

"मोठ्या लक्ष्यासाठी, मोठा विचार मोठे धोके, मोठी अाव्हाने असतात. संयमाने चालत रहा. लढत राहाणे महत्वाचे आहे त्यातून आपली शक्ति कळते, आणि चुकाही समजतात आणि अंतिम यश गाठणे सोपे होते." -जयदेवसिंह चुडासामा, आर्थिक तज्ज्ञ.

 “ तुम्ही जर जोरदारपणाने काही केले तर तुम्ही चमत्कार दाखवाल” - सी के रंगनाथन, केविनकेअर संस्थापक आणि अध्यक्ष

" थोर द्रष्टा- साधे पण मोठे लक्ष्य! " - 

विकेंद्रीकरण- लक्ष्य निर्धारित करा आणि सहका-यांना ते गाठण्याचे स्वातंत्र्य द्या.

नेतृत्व – यथायोग्य नेता म्हणून स्वत:ला सिध्द करा.

स्नेहसंबंध – जागतिक श्रेणीचे लक्ष्य ठरवा आणि भारताला त्याच्या योग्य कौशल्य प्राप्त करून द्या.

संपर्क – देशाच्या शेवटच्या माणसापर्यत जाऊन पोहोचा.

अंतर्गत क्षमता- “ नेतृत्वाची प्रतिमा परावर्तीत करा ज्यातून देशहित घडेल.” 

- फूडकिंग सारथबाबू, उद्योजक आणि संस्थापक फूडकिंग

" स्टार्टअप आणि युवा भारताची संकल्पना नव्या कौशल्य विकासासोबतच नव्या गुंतवणूकीला चालना देणारी आणि उद्योजकाना प्रेरणा देणारी आहे. लवकर भारत उद्योजक राष्ट्र म्हणू उद्याला येईल. लोकांना सध्या उद्योग करावासा वाटतो पण त्याना पाठिंब्याची गरज आहे. पंतप्रधानांनी त्यासाठी उद्योजकतेला चमत्कृतीमध्ये परावर्तीत करण्याचा संकल्प केला आहे. माझ्यासारख्या उद्योजकाला हे प्रेरणादायी आहे. " - प्रशांत सागर, तरूण उद्योजक

" भारताचा विकास युरोप आणि रशियाच्या वेगाने होईल जर पंतप्रधानांचा संकल्प आपण सा-यांनी तडीस नेला तर. भारताने आपली चाल बदलली आहे. नव्या योजना आणि धोरणांनी हे दाखवून दिले आहे.त्याचा दृश्य परिणाम लवकरच दिसेल."- जयप्रकाश, सी ई ओ ऍग्रीको आणि व्यावसायिक.