सारं काही सौर उर्जेसाठी

प्रवाहाच्या विरूद्ध जाणं तितकसं सोपं नसतं. पण प्रचंड आत्मविश्वास, झोकून देऊन अथकपणे काम करण्याची वृत्ती आणि कल्पकता याच्या जोरावर काहीही साध्य करता येतं हे कोलकत्यातल्या काही मित्रांनी एकत्र येऊन दाखवून दिलय. पर्यावरण टिकलं तर माणूस टिकेल हे जाणून कोलकत्यातले हे मित्र एकत्र काय येतात, आपल्या नोक-या काय सोडतात आणि सौर उर्जेच्या प्रसारासाठी आपलं आयुष्य काय पणाला लावतात हे सगळं कसं विलक्षणच. या मित्रांनी इन्व्हिक्टस सौर उर्जा या कंपनीची स्थापना करून ते स्वत:चे बॉस स्वत:च बनले आणि संपूर्ण भारतभर सौर उर्जेचा प्रसार करण्याचा त्यांनी विडाच उचलला. कथेतच शोभून दिसेल अशी त्यांच्या व्यावसायिक यशाची ही कथा.

सारं काही सौर उर्जेसाठी

Tuesday October 06, 2015,

5 min Read

गेल्या वर्षी अक्षय ऊर्जेचा उपक्रम कसा सुरू करता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी कोलकत्यातले काही मित्र एकत्र भेटले. त्यांपैकी एक असलेले अभिषेक प्रताप सिंग म्हणतात, “ आम्हा सर्वांना असं वाटत होतं की आपला स्वत:चा काही व्यवसाय सुरू करावा आणि स्वत:च स्वत:चे बॉस बनावं. काहीतरी वेगळं करावं हेच प्रत्येकाचं स्वप्न होतं, त्यातून श्रीमंत व्हावं आणि यासोबत देशाच्या उभारणीतही काही योगदान द्यावं.” अभिषेक प्रताप सिंग हे ‘इन्व्हिक्टस सौर ऊर्जा’ चे सहसंस्थापक आहेत. याबाबत काही वेळा चर्चा केल्यानंतर सर्वांच्या आवडीचा विषय असलेल्या अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात काही करावं असा त्यांनी सर्वानुमते निर्णय घेतला. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात काम करण्याची ही कल्पना त्यांच्यासाठी इतकी आकर्षक आणि महत्त्वाची होती, की सौर ऊर्जा सुरू करण्यासाठी त्या सर्वांनी आपल्या नोक-या सोडून दिल्या. हीच ‘इन्व्हिक्टस सौर ऊर्जा’ आता कोलकत्यात सौर ऊर्जेचा पुरवठा करून ऊर्जा क्षेत्रात चांगलं काम करत आहे.

'इन्व्हिक्टस''च्या मागची अक्षय ऊर्जा

'इन्व्हिक्टस''च्या मागची अक्षय ऊर्जा


पर्यावरण जागृतीच्या दृष्टीनं खूपच मागास असलेल्या राज्यात आपलं सौर ऊर्जेचं कार्य सुरू करायचं असं आम्ही ठरवल्याचं अभिषेक सांगतात. ते म्हणतात, “ अक्षय ऊर्जेच्या वापराबाबत पश्चिम बंगाल हे राज्य खूपच धीमं आहे.” खरं म्हणजे कोलकता, सॉल्ट लेक आणि न्यू टाऊन या भागांमध्ये घरांच्या आणि इमारतींच्या छतांवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याच्या कामाला उत्तेजन देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं नुकतीच एका पुरक धोरणाची अंमलबजावणी केली आहे. परंतु असं असलं, तरी यासंदर्भातला अक्षय खरेदी करार ( RPO )करण्यात आलेला नाही. नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या मतानुसार “ आरपीओ हा भारतात अक्षय ऊर्जा क्षेत्राला चालना देणारी मोठी प्रेरक शक्ती आहे.”

इन्व्हिक्टसच्या टीममध्ये एकूण २२ लोक आहेत. या २२ पैकी दोन सदस्य हे अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम केल्याचा ४० वर्षांचा अनुभव असलेले दीर्घ अनुभवी लोक आहेत. ही टीम आपल्या राज्यात अक्षय ऊर्जा असलेल्या या ग्रीन एनर्जीचं मानक वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. छतावर पॅनल बसवणं आणि याबाबत लोकांना सल्ला देणं असं काम ही टीम करते. “ आम्ही SME आणि मोठ्या कार्पोरेट संस्थांसोबत काम करतो, कारण हल्लीच त्यांना अक्षय ऊर्जा वापरणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे.”

छतावर पँनल बसवण्याचा आनंद काही औरच!

छतावर पँनल बसवण्याचा आनंद काही औरच!


ते पुढे म्हणतात, “ हजारो औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहक आपल्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी डिझेल कॅप्टिव्ह प्लांट्सवर अवलंबून असतात. डिझेलच्या किंमती या सतत वाढतच असतात आणि सरकार डिझेलच्या किंमतींचं विनियमन करण्याचा विचार करत आहे; म्हणून, ऑपरेटिंग कॅप्टिव्ह ऊर्जा प्लांट्सच्या किंमतींवर प्रतिबंध येईल. शिवाय पर्यावरणावर डिझेलमुळं होणारा प्रदूषणाचा दीर्घकालीन दुष्परिणाम हा नुकसानकारक आहे हे ही उघड आहे.

भारतीय उद्योगांना आणि व्यावसायिक आस्थापनांना इन्व्हिक्टस बूट ( BOOT MODEL) मॉडेल हे ‘सौर ऊर्जा ही सेवेच्या रूपात’ देत असते. “ BOOT म्हणजे buildबांधा (Build), मालकी घ्या( Own) , चालवा ( Operate) आणि हस्तांतरित करा ( Transfer)’. आम्ही केवळ प्लांट बांधतच नाही, तर आम्ही त्यावर आमची मालकी प्रस्थापित करतो आणि ती प्रणाली बसवून ती सूरू देखील करून देतो. ग्राहक फक्त त्यानं वापलेल्या ऊर्जेचच भाडं भरतो.”

ते आले आणि त्यांनी जिंकलं सुद्धा

ते आले आणि त्यांनी जिंकलं सुद्धा


अभिषेक म्हणतात की पुरक शासकीय धोरणं आणि लोकांमध्ये अक्षय ऊर्जेबाबत जागृती वाढत असली तरी देखील त्यांची संकल्पना राबवण्यासाठी आपल्या लोकांची ‘भारतीय मानसिकता’ बदलणं हे आमच्या समोर एक आव्हानच राहिलेलं आहे. “ सौर उर्जा म्हणजे मोठी भांडवली गुंतवणूक आहे आणि म्हणून याबाबत ग्राहक दोनवेळा विचार करतात. ते सोन्याबरोबर, शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटसोबत सौर ऊर्जा गुंतवणुकीची तुलना करतात आणि यापासून आपल्याला काय फायदा मिळेल याची त्यांना कल्पना करता येत नाही.”

ऊर्जा निर्मितीचं नियंत्रण करणारी  यंत्रणा

ऊर्जा निर्मितीचं नियंत्रण करणारी यंत्रणा


प्रामुख्याने याच कारणासाठी इन्व्हिक्टस संपूर्ण कोलकता शहर, सॉल्ट लेक, नवं शहर आणि राजरहट या ठिकाणी सौर ऊर्जा ज्ञान मोहिम आखत आहे. “ सौर ऊर्जेबाबत जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सोशल मिडिया आणि माहितीपर पुस्तिकांचा वापर करणार आहोत. सौर ऊर्जा वापरातून मिळणारे फायदे हे मूर्त( वीज बील) तसेच अमूर्त( कार्बन फूटप्रिंट) अशा दोन्ही स्वरूपाचे आहेत.

अनेक आव्हानं असली तरी देखील, आता गोष्टी हळूहळू बदलत आहेत आणि आता इन्व्हिक्टस विविध संस्था, हॉस्पीटल्स, आयटी कंपन्या आणि मोठ्या वसाहती असलेल्या अपार्टमेंट्ससोबत करार करण्याचा विचार करते आहे. “ ग्रीडमध्ये ऊर्जेचा पुरवठा केल्याच्या बदल्यात सौर ऊर्जा सिस्टम असलेल्या ग्राहकाला क्रेडिट देणा-या ‘नेट मिटरींग’ या बिलींग यंत्रणेचा आम्ही वापर करतो. या सौर ऊर्जेच्या पॅनेलमधून ग्राहकाला हवी आहे त्याहून अधिक ऊर्जा निर्माण झाली की मग तो तयार ऊर्जेचा साठा आमच्याकडं पाठवला जातो. ऊर्जा तयार कऱण्याच्या कामासाठी ग्राहकाचं छत आम्ही वापरत असल्यानं त्याचं भाडंही ग्राहकाला देतो.”

अभिषेक समारोप करताना म्हणतात, की आमच्या समोर पुढचं मोठं आव्हान म्हणजे सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढवणं आणि गुंतवणूक आकर्षिक करणं हे आहे. “ आमच्या प्रकल्प आणि मॉडेलला देशभर फार मोठा वाव असल्याचं आम्हाला दिसतय आणि म्हणून नजिकच्या भविष्यात आम्ही VC ( व्हेंचर कॅपिटल) फंडिंगसाठी प्रयत्न करत आहोत. बंगळुरू आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये आम्ही आमचं जाळं पसरण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी विस्तार, संशोधन आणि विकासासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे.”

आपल्या शाश्वत भविष्यासाठी अक्षय ऊर्जा क्षेत्रात आपल्याला गुंतवणूक कऱण्याची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. उदाहरणार्थ, सौर पॅनेलची निर्मिती करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोफ्लोरिक असिडसारखी दाहक रसायनं, वीज आणि पाण्याची गरज आहे. शिवाय या प्रक्रियेतून कचराही तयार होतो. ही फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करणारी प्रक्रिया असते. पण सौर ऊर्जा पॅनेलचं हे मॉडेल मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होण्याच्या वाटेत हा अडथळा ठरू नये, पण जर ऊर्जा ही १०० टक्के प्रदूषण विरहित अशी पर्यावरणाला पूरक असणारी असेल तरच अशा उर्जेला कायदेशीरपणे अक्षय आणि शाश्वत ऊर्जा असं म्हटलं जाऊ शकतं. अक्षय ऊर्जा क्षेत्रात सुधारणा घडवून आणणं किंवा ते सक्षम बनवणं म्हणजे केवळ व्यावहारिक बिझनेस मॉडेलचा शोध घेणं नव्हे, तर त्य़ासोबत हे क्षेत्र दीर्घकाळ आपली सेवा देत राहिल अशी स्थिती निर्माण करणही तितकच गरजेचं आहे.