कर्नाटकच्या या माजी प्राध्यापकने २५ एकर ओसाड जागेत फुलविले आहे हिरवेगार नंदनवन!

कर्नाटकच्या या माजी प्राध्यापकने २५ एकर ओसाड जागेत फुलविले आहे हिरवेगार नंदनवन!

Thursday January 26, 2017,

5 min Read

ही कहाणी आहे एका वाणिज्य शाखेच्या माजी प्राध्यापकांची ज्यांच्या अथक मेहनतीने २५एकर ओसाड जागेत हिरवेगार शेत फुलले आहे. ज्यातून वॉटर हार्वेस्टिंगचे उत्तम उदाहरण साकारले आहे. त्यांनी हेच सिध्द केले की, जिद्दीने आणि मेहनतीने काम केले तर चमत्कार वाटेल असा परिणाम साध्य करता येतो.


रिचर्ड रेबेल्लो, मालक ए.आर.फार्म्स, हेरूर गाव, कुंडापूर, उडुपी जिल्हा.

रिचर्ड रेबेल्लो, मालक ए.आर.फार्म्स, हेरूर गाव, कुंडापूर, उडुपी जिल्हा.


मंगलोर पासून २५ किमी दूर हेरुर गावातील कुंदनपूर, या उडपी जिल्ह्यातील रिचर्ड रिबेल्लो यांच्या २५ एकरातील शेताला भेट दिल्यानंतर जिद्द आणि परिश्रमाचा नवा आदर्श पहायला मिळतो. शेतीची काहीच पार्श्वभूमी नसताना एका माजी वाणिज्य माजी प्राध्यापकाने हे करून दाखवले आहे. त्यांचे परिश्रम आणि संशोधन यातून ते शेतीच्या क्षेत्रातही रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्राध्यापक झाले आहेत. त्यातून चत्मकार घडावा असे परिणाम समोर आले असून उजाड जागेचे परिवर्तन पाण्याने युक्त हिरव्यागार जमिनीत झाले आहे.

“ हे शेत पूर्वी आज तुम्ही पाहता तसे नव्हते,” रिचर्ड सांगतात. आज यावर विश्वास ठेवणे कठीण आहे कारण आज हे शेत भाजीपाल्याने बहरून गेले आहे. उंच हिरवे गवत, काजूच्या बागा, नारळ, काळ्या मिरी, अननस, केळी, यांनी डवरलेल्या या शेताची स्थिती ओसाड होती. दोन बोअरवेल आणि तीन विहीरी आता या शेतात पूर्ण भरल्या आहेत.

या उजाड शेताला स्वयंपूर्ण कसे केले त्याची कहाणी सुरू होते १९८७पासून. रिचर्ड यांनी एका डॉक्टरांकडून ही जागा विकत घेतली कारण पाणी नसल्याने ती खडकाळ आणि नापीक होती, आणि खडकाळ असल्याने तेथे पाणी धारण करण्याची क्षमता नव्हती. हे सारे त्यावेळी सुरु झाले ज्यावेळी डॉक्टरांनी ही जागा विकण्यासाठी रिचर्ड यांची मदत मागितली कारण नापिक असल्याने ती घेण्यास कुणी तयार होत नव्हते. डॉक्टरांचा तणाव पाहून रिचर्ड यांनी त्यांना मदत व्हावी यासाठी ही जमीन खरेदी करण्याचे ठरविले. त्यावेळी या जमिनीची स्थिती फारच वाईट होती. यापैकी २० टक्के भागात कठीण पाषाण होता त्यावर काहीच उगवू शकत नव्हते. थोडिशी नारळाची झाडे या जागेवर होती, ती सुध्दा खुरटली होती कारण पाणीच नव्हते.

रिचर्ड यांनी हे आव्हान घ्यायचे ठरविले. आणि निर्धाराने याचा शोध संशोधन सुरु केले. केरळ, दक्षिण कन्नडा भागात अनेक ठिकाणी ते गेले आणि त्यांनी पाहिले की याचा काही उपाय मिळतो का. त्यांना एकच पर्याय मिळाला मातीचा भराव घालणे. टेकडीच्या भागात रबराची लागवड करण्यासाठी तो उपयोगी आणला जातो.


पावसाच्या पाण्याचे तळे, ए.आर,फार्म्स

पावसाच्या पाण्याचे तळे, ए.आर,फार्म्स


त्यांनी त्यांच्या कल्पना वापरून आणि प्रयोग करून बघण्यास सुरुवात केली. मग त्यांनी नारळाची झाडे पालापचोळा टाकून त्यात लावून बघण्याचा प्रयोग केला. दुसरी कल्पना त्यांनी राबविली ती म्हणजे जमिनीला खड्डे पाडून पाणी वाहून जाण्यात अडथऴे तयार केले, त्यांनी जागोजागी तळी खोदून पाण्याचा प्रवाह त्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला.

“ माझा मुख्य हेतू हा होता की, जोरदार पावसाचे सारे पाणी वाहून जाण्यापेक्षा साठवले जावे. आम्ही ज्या भागात राहतो तेथे डोंगराळ भाग असल्याने हे पाणी साधारणत: वाहून दिले जाते. मग मी प्रयत्न केला की पाण्याचा थेंबही वाहून वाया जाणार नाही.” त्यांनी दाखवून दिले की डोंगर उतारावर चरी खोदल्याने पाण्याचे प्रवाह जमीनीच्या आत झिरपून वाहू लागतात. आम्हाला हे देखील पहायला मिळाले की १०-१५ एकर जागेवरील पावसाचे वाहून जाणारे पाणी एका खोल खड्ड्यात जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्याची क्षमता दहा लाख लिटर्स आहे.

त्यांनी आम्हाला दाखविले की, नव्या चरी मारल्याने त्याच्या शेतात सातत्याने पाण्याचा झिरपा होत राहिला. “ अच्छादन केल्याने आणि भराव टाकल्याने पाण्याचे बाष्पीभवन थांबले,” ते म्हणाले. “ गेली २४ वर्ष मी हे करतो आहे, आणि मला क्रमाक्रमाने परिणाम मिळत गेले. कोणतीही जमीन ओसाड राहिली नाही.,” असे सांगताना त्यांनी आम्हाला हिरव्या भाज्यांनी डवरलेली शेती दाखवली. “ हे महत्वाचे आहे की, काही भागात विरळ झाडे लावली पाहिजेत जेणे करुन पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही आणि जमिनीची धुप होणार नाही.” त्यांनी माहिती दिली.

भाज्या आणि फळे पिकवताना रिचर्ड यांच्या शेतात पोल्ट्री देखील आहे ज्यात ब्रॉयलर चिकन तयार होतात आणि डेअरी देखील आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीला स्वयंपूर्ण करण्यास हातभार लागला आहे. त्यांच्या शेतात आता नारळ, अननस, काजूच्या बाजूलाच काळ्यामिरी होतात, ज्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते त्याच जमिनीतून जी काही वर्षापूर्वी नापिक होती!


image


रिचर्ड यांनी एक जागा उतारावर दाखविली आणि सांगितले की, कधी काळी हे मडका होते म्हणजे परंपरागत पावसाचे पाणी साठविण्याची जागा, ज्याकडे लक्ष देण्यात आले नाही आणि या जमिनीला सुपीक करण्यासाठी कोट्यावधी रुपये वाया घालविण्यात आले. “केवळ एकच गोष्ट यासाठी करायची होती ती म्हणजे यात साचलेला गाळ काढायचा होता, आणि या मडका जागेत पुन्हा संपूर्ण पाणी भरले,” त्यांनी सांगितले.

“ लोकांनी काय समजून घेतले पाहिजे की, पावसाच्या सा-या पाण्याचा योग्य वापर कसा करता येईल, यासाठी आमच्याकडे परंपरागत उपाय आहेत. अलिकडच्या काळात लोकांनी धरणे बांधली आणि पाण्याची गरज पूर्ण केली. सारे काही सरकारने करावे ही मानसिकता देखील आम्हाला मारक ठरते आणि स्थानिक भागात अशा छोट्या प्रयत्नातून मोठी धरणे बांधण्याची वाट पहावी लागत नाही”.

“ तसेच ते काही कायमस्वरुपी पर्याय देखील होवू शकत नाहीत. महत्वाचे काय आहे की तुम्ही स्वत:साठी स्वत:च प्रयत्न केले पाहिजेत आणि पाण्याचे तुम्हाला परवडतील असे स्त्रोत तयार केले पाहिजेत जे आमच्या पूर्वजांनी केले. रेन वॉटर हार्वेस्टिंगला आम्ही महत्वच देत नाही हे दुर्दैवी आहे, त्यामुळे पारंपारिक पावसाचे पाणी साठवण करण्याच्या मडका सारख्या उपायांकडे कानाडोळा केला जात आहे.” “ अनेकदा उपायांची हद्द होते, गरज आहे की ते योग्य दिशेने आणि निर्धाराने शेवटाला नेले पाहिजेत!” त्यांनी पुष्टी जोडली ज्यावेळी आम्ही त्यांच्या शेतातील घरात पोहोचलो आणि शहाळ्याचे पाणी प्यायलो, फळांचा आस्वाद घेतला, त्यांचे नैसर्गिक सौंदर्य अनुभवले आणि त्याच्या जिद्द आणि परिश्रमांनी भारावून जावून त्यांना सलाम केला!

लेखिका :आरती केळकर-खांबेटे

Disclaimer: This article, authored by Aarti Kelkar-Khambete, was first published in India Water Portal.

    Share on
    close