“दूरदृष्टी मिळवण्याठी गमावली दृष्टी”: नविन लक्कूरची असामान्य कहाणी

अनपेक्षितपणे आलेल्या अनेक अडथळ्यांवर मात करत एक हिंमतवान उद्योजक यशाचा मार्ग कशा प्रकारे पार करतो. एखाद्या अपंगत्त्वावर मानवी इच्छाशक्तीनं कशी मात करता येते याबाबतची ही आश्चर्यकारक अशी कथा आहे. हे असं अपंगत्व जे स्वतःहून स्वत:वर लादलेलं आहे , जन्मत: मिळालेलं नाही.

“दूरदृष्टी मिळवण्याठी गमावली दृष्टी”: नविन लक्कूरची असामान्य कहाणी

Saturday September 05, 2015,

10 min Read

जगप्रसिद्ध कवी जॉन मिल्टन, On His Blindness या आपल्या प्रसिद्ध कवितेतून हा बोचणारा प्रश्न विचारतो

“ हे सर्वशक्तीमान ईश्वरा,

माझ्या जीवनातला प्रकाश नाकारणा-या परमात्म्या;

माझ्याकडून या किर्र काळोखात कठोर परिश्रमानं काही कर्तुत्व करून दाखवण्याची मागणी कशी करतो?”

मी मुर्खपणाचा प्रश्न विचारला.


आणि त्या कवीनं आपल्या प्रश्नाचं उत्तर स्वत:च दिलं


“ ईश्वराला गरज नसते कशाचीही;

ना मानवाच्या श्रमाची,

ना कोणत्याही प्रतिभेची

आपल्या दैवाचा कासरा त्याच्याच हाती आहे;

या श्रद्धेचं जोखड जे आपल्या मानेवर वागवतात आनंदाने,

तेच असतात ईश्वराचे खरे सेवक.

तो आहे आपल्या राज्याचा चक्रवर्ती सम्राट,

सर्वदूर पसरेल्या धरतीवर,

अथांग अशा महासागरांतून,

त्याच्या एका इशा-यावर

क्षणार्धात, सर्वदूर, अविश्रांत,

अष्टौप्रहर झेपावणारे,

हजारो आहेत त्याच्या सेवेत

...आणि जे नुसते उभे आहेत,

वाट पाहत,

ते सुद्धा करत असतात सेवा."

नवीन लक्कूर: असामान्य दूरदृष्टीचे व्यक्तीमत्त्व

नवीन लक्कूर: असामान्य दूरदृष्टीचे व्यक्तीमत्त्व



आजचं अत्याधुनिक वैद्यक शास्त्र उपलब्ध असतानाही मिल्टननी आपलं उरलेलं सारं आयुष्य अंधपणात काढलं. ते स्वत:ला म्हणायचे, “ जे केवळ उभं राहतात आणि वाट पाहण्याचं काम करतात ते सुद्धा सेवा करतात,” याचा अर्थ

जे प्रचंड मेहनत करतात ते सुद्धा देवाची सेवा करत असतात. दृष्टी गमावल्यानंतर मिल्टननी पॅराडाईज लॉस्ट ही कविता रचली. त्यांची ही कविता मास्टरपीस म्हणून गणली गेली


जीवन बदलणारा बदल


ते १९९७चं वर्ष होतं. नवीन लक्कूर यांचं लग्न होऊन तीन वर्ष होत आली होती. पण कंपनीच्या कामातून त्यांना आपल्या पत्नीसाठी वेळ काढणं मुश्कील होऊन बसलं होतं. नवीनच्या मैत्रिणीच्या सासरकडच्या मंडळींनी स्वातंत्र्य दिनाच्या विकेंडला मौजमजा करण्यासाठी त्यांच्यासोबत चेन्नईला येण्याचं आमंत्रण नवीनना दिलं, आणि ते ही नवीनच्या पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांसह. नवीन आपली पत्नी आणि त्यांच्या माहेरच्या कुटुंबियांसह आपलं सामान पॅक करून चेन्नईला निघाला सुद्धा. ही ट्रीप आपलं संपूर्ण आयुष्य कायमस्वरूपी बदलून टाकणार आहे याची नवीनना पुसटशीही कल्पना नव्हती. चेन्नईमध्ये एका मंदिराला भेट दिल्यानंतर नवीन आणि त्यांचे कुटुंब MGM डिझी वर्ल्ड ला गेले. ते थीम पार्क होते. नवीनला पाणी खूप आवडतं. यामुळं नवीननी तिथ पाणी पाहिल्याबरोबर त्यांना कारंजी असलेल्या तलावात शिरण्याचा मोह आवरता आला नाही. ते पाण्यात शिरायला लागल्याबरोबर आधीच तलावाच्या पाण्य़ात खेळत असलेल्या काही लोकांनी त्यांच्या डोळ्यावर पाण्याचा फवारा उडवला. हा छोटा फवारा नव्हता. हा अतिशय वेगवान आणि सहन करता येणार नाही असा फवारा होता.

एका आठवड्यानंतर नवीन शाहरूख खानचा ‘परदेस’ हा चित्रपट पाहत होते. त्यावेळी त्यांना जाणवलं, की त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी थरथरतय. काहीतरी वाहतय. तो नाईट शो होता. मग त्यांनी आपला डावा डोळा बंद केला आणि उजव्या डोळ्यानं त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला. त्यांना उजव्या डोळ्यानं छानपैकी दिसत होतं. त्यानंतर त्यांनी उजवा डोळा बंद केला आणि ते डाव्या डोळ्यानं बघू लागले. मग मात्र त्यांना तशीच काहीशी थरथर दिसायला लागली. काहीतरी डोळ्यापुढं वाहतय असंही दिसायला लागलं. दुस-य़ाच दिवशी ते एका नेत्रचिकित्सकाकडं डोळ्याची तपासणी करण्यासाठी गेले. आणि त्यावेळी नवीनना त्यांच्या जीवनातला पहिला धक्का बसला. नेत्रचिकित्सक म्हणाले, “ तुमचा एक डोळा अंध झालेला आहे. या डोळ्यानं तुम्हाला आता कदाचित पाहता येणार नाही.” नेत्रचिकित्सकानं नवीनना एखाद्या रेटीना स्पेशॅलिस्टला दाखवण्याचाही सल्ला दिला.

रेटीना स्पेशॅलिस्टकडे नवीनसाठी या धक्क्यापेक्षा अधिक धक्का देणारी बातमी तयार होती. नवीनच्या डोळ्याचा पडदा आतून फाटला होता आणि डॉक्टरांनी त्यांना दुस-याच दिवशी सकाळी ऑपरेशनसाठी हॉस्पीटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. एक सच्चा आणि प्रामाणिक उद्योदक असल्यानं आता आपला बराचसा वेळ आजारपणात जाईल, आपल्याला बराच काळ कामापासून दूर रहावं लागेल या विचारानं ते चिंतीत झाले. ऑपरेशन नंतर आपल्याला आठ दिवसांऐवजी तीन दिवसांमध्येच सोडण्यात यावं अशी विनंती त्यांनी डॉक्टरांना केली. वरवर पाहता साधारण वाटणारा तो पाण्याचा फवारा एखादा दगड फेकून मारावा तसा डोळ्याला लागला आणि त्यामुळंच डोळ्याची ही समस्या निर्माण झाली होती.

डॉ. वाय. एल. राजशेखर या रेटीना स्पेशॅलिस्ट डॉक्टरांनी नवीनच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. या अंध झालेल्या डोळ्यांनी दिसण्याची शक्यता केवळ २० % इतकीच असेल अशी माहिती डॉ. राजशेखर यांनी नवीनला दिली. परंतु नवीनच्या जीवनात घडणा-या वाईट घटना संपण्याचं नावच घेत नव्हत्या. डॉक्टरांनी नवीनच्या या अपघाताबाबत अधिक माहिती देताना सांगितले की नवीनच्या दुस-या डोळ्याच्या पडद्याला सुद्धा चीर पडलेली आहे; आणि तो डोळाही अंध होईल किंवा कसं हे तपासण्यासाठी काही दिवस थांबावं लागेल, त्यानंतरच त्याची खातरजमा होईल. नंतर पुढे नवीनच्या दुस-या डोळ्यावरही शस्त्रक्रिया करावी लागली. यानंतर नवीनची पूर्ण दृष्टी गेली. अशा स्थितीत अंधुकसं दिसण्याची शक्यता होती, पण फारच थोडी. या शत्रक्रियेनंतर नवीनला पुढच्या तीन महिन्यांसाठी उताणा होऊन पाठीवर न झोपता पोटावर पालथं झोपावं असा सल्ला डॉक्टरांनी दिला. नवीन जर पाठीवर झोपले तर त्यांच्या डोळ्याचा पदडा जाग्यावरून सरकू शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. नवीनसाठी हा काळ त्यांची सत्त्वपरीक्षा पाहणारा होता. नवीननी स्वत:ला बिछान्याला खिळवूनच ठेवलं होतं.


संकटाच्या काळात शिकलेला धडा


आता नवीनच्या डोक्यात सतत विचारचक्र सुरू होतं की आपल्याला इकडं तिकडं हालता येत नसेल तर मग आपण व्यवसाय किंवा नोकरी कशी करणार ? व्यवसायाशिवाय आपण काय करायचं? ते स्वत:शी विचार करायचे, “ मी टेलिफोन ऑपरेटर बनू शकतो.”

नवीनचं सगळं भविष्य थांबलं होतं, उदास झालेलं होतं. आणि अशा वेळी नवीनचा जुना मित्र राजेश शेट्टीनं नवीनना एक पत्र पाठवलं. त्या पत्रातल्या शब्दांनी नवीनच्या नैराश्यानं भरलेल्या आयुष्यात आशेचे किरण चमकले. राजेश आपल्या पत्रात म्हणतो, “समस्या या अलौकिक अशा वीर पुरूषांच्या वाट्यालाच येतात, कारण या धैर्यशील माणसांमध्येच या समस्या दूर करण्याची धमक असते.” राजेशच्या या शब्दांनी नवीनला नवी उमेद दिली. आपल्या पायावर पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली. आपण बघूही शकत नाही आणि कोणतंही काम करण्याच्या लायकीचे राहिलेलो नाही अशी आपल्याबद्दलची माहिती नवीननं आपला मित्र राजेशला दिली. अशा ही अवस्थेत नवीन २० प्रकारची काम करू शकतो असं नवीनचा दुसरा एक मित्र वेंकटेसन याला वाटत होतं. त्याने नवीनला अशा २० कामांची यादीच देऊन टाकली. ज्याने आपली सगळी उमेद, आत्मविश्वास गमावलेला होता अशा नवीनच्या जीवनात अचानक काहीतरी घडायला सुरू होवू लागलं होतं. पण अचानक नवीनच्या दु:खात आणखी भर पडली. सी- डिझाईन सिस्टम या नवीनच्या पहिल्या कंपनीतल्या सर्व कर्मचा-यांनी सामूहिक राजीनामे दिले आणि कार्यालयाच्या चाव्या नवीनच्या हातावर ठेवल्या.

अशा परिस्थितीनं नवीनला एका जागी खिळवून ठेवलं होतं. आपली पत्नी आणि काही मित्रांच्या मदतीनं नवीननी पुन्हा कार्यालयात जाणं सुरू केलं, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुढच्या सहा महिन्यात नवीननी आपल्या व्यावसायात दुप्पट वाढ करून दाखवली. माणसाच्या आत्मविश्वासानं केलेल्या प्रयत्नांमध्ये हा असा गुण आहे जो पराभव नाकारतो आणि जेव्हा सगळीकडं अंधार व्यापून राहिलेला असतो तेव्हा दिवा तेवत ठेवण्याचं काम करतो. दैववादी दृष्टीकोण हा शारीरिक पिडा सहन करणा-या मनाला कमजोर करून टाकतो. पण आपलं मन जेव्हा सकारात्मक विचारांच्या आणि यशाच्या दिशेनं प्रवास सुरू करतं, तेव्हा दु:खाचं अस्तित्व संपलेलं असतं.


...आणि दरवाजे उघडले


एक प्रसिद्ध म्हण आहे, “ ज्यावेळी तो दरवाजे बंद करतो, त्यावेळी दुसरे उघडतोही.” या म्हणी प्रमाणंच नवीन ज्याची अत्यंत आतुरतेनं वाट बघत होते ती संधी नवीनकडं चालत आली. २० प्रकारच्या नोक-यांची यादी देणारा नवीनचा मित्र प्रकाश वेंकटेसन हे आपल्या वेटिंग ब्रिज स्टॉकचं योग्य व्यवस्थापन करता यावं म्हणून सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या प्रयत्नात होते. प्रकाश वेंकटेसन यांचा व्यावसाय देशभर पसरलेला होता. व्यावसायातले आवश्यक ते तपशील किंवा मागणी-पुरवठ्याचा डेटा व्यवस्थित गोळा करता येत नव्हता. त्यांना सतावणारी ही सर्वात मोठी समस्या होती. यामुळं व्हायचं असं, की एक तर मालाला मोठी मागणी यायची आणि ती पुरवता पुरवता नाकी नऊ यायचे, तर कधी मागणीच नसायची, अशी परिस्थिती होती. आणि मग सगळ्या मालाचा ढिगच्या ढिग साचून रहायचा. नवीननं ग्राहकांचे व्यवस्थापन करणारी प्रॉस्पेक्ट मॅनेजमेंट सिस्टम विकसित करून त्याद्वारे ग्राहकांचा रेकॉर्ड सेट करून दिला. यामुळं प्रकाशना नेमका माल किती आहे याची माहिती मिळू लागली. शिवाय मागणी आणि पुरवठ्याची काय स्थिती आहे हे ही समजू लागले. यामुळं प्रकाशला आपल्या व्यवसायाला आवश्यक असलेली गती देता आली.

२००० हे वर्ष उजाडताच नवीनच्या आयुष्याला तेज प्राप्त होऊ लागतं. पण नव्यानं सुरू झालेल्या डोळ्यांच्या समस्यांमुळं नवीनची दृष्टी पुन्हा एकदा जाते. तो बघूही शकत नाही आणि वाचूही शकत नाही. अशा परिस्थितीत उद्भवलेल्या नव्या समस्य़ांची पुन्हा नव्यानं निदानं केली जातात. नवीनचा डोळा योग्य जागी बसवण्यासाठी तीन वर्षांमध्ये १४ ऑपरेशन्स केली जातात. वारंवार होणा-या डोळ्यांच्या समस्येमुळं नवीन निराश होऊन जातो. पुन्हा पुन्हा उद्भवणा-या या डोळ्यांच्या समस्या नवीनला पुरतं घेरून टाकतात. या समस्या नवीनला जगू देत नाहीत.

नवीन सांगतात, “ दृष्टी जाणं आणि येणं यामुळं माझ्या मनावर झालेले आघात झेलत असताना मला माझ्या डॉक्टरांनी सत्य साईबाबांकडे जायला सांगितलं आणि दस-याच्या दिवशी मी पुट्टपुरथीला गेलो. मग अचानक आयुष्यात एक दैवी चमत्कार घडला आणि मी पुन्हा बघू शकेन असा अप्रत्यक्ष संकेत मला मिळाला. सततच्या या दैवी मदतीमुळं मला माझ्या जीवनातल्या ज्वलंत प्रश्नावर विचार करून ती सोडवण्याची शक्ती मिळाली. मी श्री सत्य साईबाबांचा कट्टर भक्त आहे आणि त्यांच्या आशिर्वादानच मला माझे डोळे परत मिळाले.”


नवी सुरूवात


अशा असंख्य यश आणि अपयशाच्या प्रसंगांमधून तावून सुलाखून बाहेर निघाल्यानंतर नवीन पूर्णपणे बदलून गेले आहेत. नवीनना पूर्ण विश्वास आहे की त्याच्यासोबत देव आणि असे अनेक लोक आहेत जे त्यांना त्यांच्या आय़ुष्यातल्या अनेक परीक्षा आणि दु:खांतून बाहेर येण्यासाठी मदत करतात. आज नवीनना काही प्रमाणात दृष्टी प्राप्त झालेली असली तरी त्यांना अजूनही परिघदृष्टी प्राप्त झालेली नाही. म्हणजेच केवळ त्यांच्या समोर जे काही आहे ते ते बघू शकतात, परंतु आजुबाजूचं, खालचं वा वरचं असं ते काहीही बघु शकत नाहीत. घोड्यांना जशी झापडं लावलेली असतात, अगदी तशीच अवस्था नवीनची आहे. कधीकधी त्यांना हात मिळवणं जमत नाही, तर कधी ते अनोळखी जागी एखाद्या गोष्टीला आदळतात देखील. पण यामुळं ते आपलं काम करणं किंवा करवून घेणं कधीच सोडून देत नाही. आता नवीननी स्वत:ला नव्या स्वरूपात शोधलेलं आहे आणि त्यांच्या स्वत:च्या शैलीत ते म्हणतात, “ नवीन लक्कूर ही अशी व्यक्ती आहे जिच्याकडं अंधुक दृष्टी असेल पण अमर्याद दूरदृष्टी आहे,”

आपल्या वेगवेगळ्या क्षमतांच्या बळावर आपल्या १४ कल्पनांचं रुपांतर यशस्वी उद्योगात करण्याबाबत सांगताना नवीनच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि अभिमान झळकत असतो. अमेरिकेतल्या चाप्टर ऑफ विस्टेज ग्रुप ( CEO’s forum) नं नवीनना व्याख्यान देण्यासाठी नुकतच पाचारण केलं होतं. तिथं नवीनना क्रमिक उद्योजकता या विषयावर व्याख्यान द्यायचं होतं. पण जेव्हा त्यांनी हे जाणलं, की व्याख्यान ऐकण्यासाठी असे लोक आलेले आहेत ज्यांनी अब्जावधी डॉलर्सचा व्यावसाय केलेला आहे आणि ते स्वत: इतर उद्योजकांसाठी एक आदर्श बनलेले आहेत, तेव्हा त्यांनी आपला हा विषय बदलून “Problems Are Relative.” या विषयावर बोलणं पसंत केलं. आपल्या बाबतीत तो विचित्र अपघात कसा घडला, त्यानंतर दृष्टी परत मिळवण्यासाठी त्यांनी कसा संघर्ष केला, आणि हे जग पुन्हा बघण्याची त्यांची ज्वलंत इच्छा कशी होती हे सगळं स्तब्ध श्रोत्यासमोर त्यांनी हळूहळू उलगडायला सुरू केलं. ते त्यांना म्हणतात, “ मला दूरदृष्टी प्राप्त व्हावी म्हणून मी माझी दृष्टी गमावली. माझ्या दूरदृष्टीतून साकारलेल्या संकल्पनांपैकी १४ संकल्पना व्यापारी दृष्ट्या उपयुक्त आणि यशस्वी उद्योग म्हणून सिद्ध झालेल्या आहेत.”

नवीन हे बंगळुरू. पुणे, सिडनी आणि केंट इथल्या हाय एंड सॉफ्टवेअर आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट सर्विस कंपनीच्या ‘बोर्ड ऑफ कंपॅसाईट्सचे’ सद्स्य आणि संहसंस्थापक आहेत. आपल्या उद्योगाची झपाट्यानं प्रगती करतील अशा नव्या संकल्पना नवीन तयार करतात आणि त्या रूजवण्याचं काम करतात. अशा १४ नव्या संकल्पनांवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी अशाच नाविण्यपूर्ण रुजवलेल्या संकल्पनेचं ताजं उदाहरण म्हणजे आपल्या घरापर्यंत सेवा देणारी ‘होम कनेक्ट’ ही सेवा.

नवीनना वाटतं की बाहेरच्या जगाकडं पाहण्यापेक्षा त्यांनी स्वत:च्या आत पाहण्याची आपली क्षमता वापरली होती आणि यामुळेच ज्याची ते कल्पनाही करू शकले नसते इतक्या मोठ्या उंचीवर उड्डाण घेऊ शकले. नवीनची कहाणी म्हणजे पडझड होऊन जमा झालेल्या नैराश्याच्या ओझ्यातून भरघोस व्यावसायिक यशाकडे घेऊन जाणाऱ्या प्रचंड अशा मानवी चैतन्याची कहाणी आहे. ही कहाणी आहे एका अशा जीवनाची जे पूर्णपणे विस्कटून गेलं असतं पण इतर अनेकांची आयुष्य घडवण्यासाठी ते सावरलं, आणि ही कहाणी आहे एका चिरंतन उद्योगी असलेल्या अखंड मनाची. नवीनची ही कहाणी खरोखर एक प्रेरणादायी धैर्यगाथाच आहे. एक अशी गोष्ट आहे जी नवीनच्या आयुष्यात प्रखरपणे चमकते, आणि ती म्हणजे नवीननं आपल्यात जिवंत ठेवलेली उद्योजकतेचा अंश आणि उद्योग उभारणीसाठी आपलं अपंगत्व मुकाट्यानं सहन करत दाखवलेली सोशिकता.

अकल्पित अशा अनेक घटनांना उद्योग क्षेत्रात सामोरं जावं लागतं. आणि उद्योगात कोणत्या विपरित घटना घडू शकतात याचा आपण अंदाजही लावू शकतो, परंतु आपलं स्वत:चं शरीर कोणत्या मार्गानं आणि कशा पद्धतीनं आपल्याला मर्यादा घालेल याबाबत आपल्याला अगदी थोडीशीच कल्पना असते. पण या सगळ्या विपरीत परिस्थितीत देखील नवीननी आपल्या आगळ्या दृष्टीनं हे दाखवून दिलय की प्रचंड ऊर्जा, सकारात्मकता आणि यशानं ओतप्रोत भरलेली जीवनाची दुसरी एक बाजू असते आणि ती आपण नक्कीच प्राप्त करू शकतो.


पुढची हद्द


नवीनच्या या जीवनकथेचा दुसराही एक अध्याय आहे. नवीननं तरूण उदयोजकांना प्रेरणदायी ठरेल असं विचार आणि तत्त्वांच्या दोह्यांनी युक्त असलेलं उपदेशपर ‘द इनसेपरेबल ट्विन्स: पेअर्ड प्रिन्सिपल्स टू इस्पायर यंग माईंड्स’ हे पुस्तक लिहिलं. बंगळुरूला या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आवर्जून हजर होत्या. या ख्यातनाम व्यक्तींनी नवीनच्या दृष्टीहीन (रिक्त) झालेल्या आपल्या जीवनाला महादृष्टीमध्ये ( चमकदार उद्योगातल्या चमकदार यशाचा मार्ग तयार करणारी दृष्टी) परावर्तीत करण्याच्या असामान्य क्षमतेला सलाम केला.

आपलं कार्य नेटानं पुढं नेणा-या कार्यक्षमतेची कसोटी पाहणारं अपंगत्व असूनही आपल्या जीवनाकडं पाहण्याची सकारात्मक दृष्टी, चिकाटी आणि अथक मेहनत हे उद्योजकतेचे विशेष गुण नवीनमध्ये ठासून भरलेले होते. आपलं जीवन बदलून टाकणा-या विदारक अनुभवाबद्दल बोलताना नवीन म्हणतात, “ माझ्या आयुष्यात तो विचित्र अपघात घडला नसता, तर आज जे काही मी मिळवू शकलोय त्या पैकी एक चतुर्थांश देखील मी मिळवू शकलो नसतो ”

"आपल्या स्वत:चा नव्यानं शोध घेणं हा उद्योजकतेच्या प्रवासाचा भाग आहे." – व्यकटेश कृष्णमूर्ती.