कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देणारा राज्यसरकारचा अभिनव उपक्रम !

शेतकरी, व्यापारी आणि आडत्यांपासून मुक्त, ग्राहकही महागाईमुक्त !

कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देणारा राज्यसरकारचा अभिनव उपक्रम !

Saturday October 15, 2016,

3 min Read

राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यानंतर कृषीप्रधान राज्य असलेल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले. दुष्काळ नापिकी आणि या संकटातून शेती उत्पादन केले तरी त्याला नसलेली बाजारपेठ आणि उत्पादन मूल्याच्या तुलनेत कमी असलेले उत्पन्न यामुळे शेतीधंदा आतबट्ट्याचा झाल्याचे निष्कर्ष समोर आले. दुसरीकडे ग्राहकांनादेखील महागाईच्या वणव्याने ग्रासले असल्याने त्यांना देखील रास्त दराने भाजीपाला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था नव्हती. बाजारातील अडत आणि दलाली ह्या व्यवस्थेने गांजलेल्या शेतकरी आणि ग्राहक राजा यांच्या हिताची नवीन योजना राज्यसरकारने अमलात आणली आहे ती म्हणजे थेट शिवारातून भाजीपाला बाजारात आणण्याची शेतकऱ्यांना दिलेली मुभा. त्यामुळे शेतकऱ्याला चार पैसे अधिक कमवता येतात आणि ग्राहकाला चार पैसे स्वस्त ताजा भाजीपाला उपलब्ध होतो. 

‘कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी’ या अंभगाच्या माध्यामातून संत शिरोमणी श्री. सावता माळी यांनी ईश्वराशी संवाद साधला. त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभाग आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘थेट शेतकरी ते ग्राहक’ या योजनेअंतर्गत “संत शिरोमणी श्री. सावता माळी आठवडी बाजार’’ सुरू करण्यात आले आहेत.

image


आतापर्यंत पुणे-२५, नागपूर- २, ठाणे- ५,कोल्हापूर-१ मुंबईत-२ एकूण ३५ ठिकाणी या शेतकरी आठवडी बाजारांचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल थेट मुंबई, पुणे अशा मोठ्या महानगरापासून ते जिल्हा स्तरावरील ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात येत आहे.

शेतकरी आडत्यांपासून मुक्त व्हावा त्यांच्या श्रमाचे उचित मूल्य त्यांना मिळावे आणि शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यत पोहोचवा व ग्राहकांना वाजवी दरात भाजीपाला मिळावा हाच हा या आठवडी बाजाराचा उद्देश आहे. या बाजारात फक्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक सहकारी संस्था याचाच समावेश करण्यात आला आहे. तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपन्या यांचे क्लस्टर तयार करून या बाजारात विविध प्रकारचा भाजीपाला व फळे एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून दिला जात आहे.

image


ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाल व्यापारी, अडते यांच्या मध्यस्थी शिवाय महानगरातल्या ग्राहाकांपर्यंत थेट पोहोचविण्याची किमया या उपक्रमाने साधली आहे. शेतकऱ्यांना त्यांचे भाज्या, फळे, अन्नधान्य आणि इतर कृषी उत्पादने थेट विक्रीसाठी महानगरपालिका, नगरपालिका यांनी त्यांच्या कार्यालयाच्या आवारात त्यांच्या भाजी मंडईत, तसेच नगरपालिका क्षेत्रात किमान एक मैदान व महानगरपालिका क्षेत्रात ३ ते ४ मैदाने दर शनिवार किंवा रविवारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या बाजारासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शेतकरी आठवडी बाजार ठरलेल्या वारी, ठरलेल्या ठिकाणी, आठवडयातून फक्त एकदाच आयोजीत करण्यात येत आहे आणि त्यामध्ये फक्त इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचाच वापर करण्यात येत आहे. या बाजारात समावेश असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतमाल विक्रीबाबत तसेच शेतकरी आठवडे बाजार आयोजनाबाबत कृषी पणन मंडळामार्फत प्रशिक्षणही देण्यात येत आहे. या बाजारासाठी आयोजक निवडण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची असून बाजारामध्ये उत्कृष्ट दर्जाच्या मालाची विक्री, अपरिपक्व, किडलेला, रोगग्रस्त, फुटलेला, जास्त पक्व (ग्राहक घेऊ शकणार नाही) असा शेतीमाल विक्रीसाठी आणण्यावर निर्बंध घातले आहेत.

image


या बाजारात भाजीपाला विक्रीसाठी पणन मंडळाची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी संस्था यांनी कोणाला माल किती कालावधीसाठी विक्री करणार याचा तपशील सभासदांच्या सद्याच्या सातबारा उताऱ्यासह आयोजकास परवानगीसाठी अर्जा सोबत देणे आवश्यक आहे. तसेच उत्पादक सहकारी संस्था यांच्या नोंदणीचे प्रमाणपत्र सुध्दा सोबत असणे आवश्यक आहे.

या बाजारात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ,चिठ्ठी पध्दतीने अथवा रोटेशन पध्दतीने स्टाल जागेचे वाटप करण्यात येते, शेतकरी बाजार आयोजक म्हणून शेतकरी गट, उत्पादक कंपन्या, उत्पादक सहकारी संस्था कामकाज करू शकतात. खाजगी व्यक्ती. बचत गट, खाजगी संस्थांना अथवा वैयक्तिकरित्या शेतकरी बाजार सुरू करण्यास मान्यता देण्यात येत नाही.

या बाजारात सहभागी असणाऱ्यांची यादी त्याच्या शेतमालाच्या विक्रीसह तसेच अंदाजित किंमतीसह कृषी पणन मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. याबाबतची माहिती कृषी पणन मंडळास ईमेलद्वारे पुरविणे आयोजकावर बंधनकारक आहे. या सर्व नियोजनमुळे आणि शासनाच्या नियोजनामुळे ग्राहक अदा करत असलेली रक्कम थेट शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस मदत होत असून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.