... आम्ही आणि तुम्ही शांतीने झोपू शकू, यासाठी जागतात ‘चेतन’!

... आम्ही आणि तुम्ही शांतीने झोपू शकू, यासाठी जागतात ‘चेतन’!

Monday April 11, 2016,

8 min Read

घरात कुणी आजारी असो किंवा मुलाची परीक्षा सुरु असो, अशातच जर तुमच्या घराच्या बाजूला कुणी मोठ्या आवाजात डीजे किंवा लाउडस्पीकर वाजवत असेल तर, राग येणे स्वाभाविक आहे. तुमच्याच प्रमाणे बनारसमध्ये देखील लोक प्रत्येक दिवशी अशा घटनांमधून जात असतात. ते देखील अनेक काळापासून. कधी भजन-कीर्तनाच्या नावावर मंदिरात लावण्यात आलेला स्पीकर, मस्जिद मधून येणारा आवाज. उरलेली कसर, वरात आणि अन्य ठिकाणच्या आयोजनात गीत संगीताच्या नावावर सजणा-या मेहफिल काढतात. वर्षाची कदाचितच एखादी रात्र किंवा दिवस असेल, जेव्हा बनारसचे लोक शांतीने झोपू शकतील. कानठाळ्या बसतील इतक्या आवाजात रात्र घालविणे येथील लोकांनी आपली नियती मानली होती. मात्र बनारसमध्ये एक अशी व्यक्ती आहे, जो पूर्ण रात्र जगतो. जेणेकरून लोक शांततेने झोप घेऊ शकतील. त्यामुळे हा व्यक्ती आपली झोप खराब करतो. त्यांचे नाव चेतन उपाध्याय आहे. महत्वाकांक्षा आणि जिद्द अशी की, मागील आठ वर्षापासून या व्यक्तीने बनारसमध्ये ध्वनी प्रदुषणाविरोधी अभियान सुरु केले आहे. 

image


ध्वनीप्रदुषणाविरोधी आंदोलन का?

चेतन उपाध्याय यांनी ध्वनीप्रदुषणा विरुद्ध आंदोलन का सुरु केले आहे? अखेर ती कोणती कारणे होती, ज्याने चेतन यांना समाजसेवेचा रस्ता निवडण्यासाठी विवश केले. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पहिले चेतन यांच्याबाबत माहित करून घ्या. बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयु) येथून पदवी घेतल्यानंतर चेतन यांनी दिल्लीच्या प्रतिष्ठीत आयआयएमसी मधून पत्रकारितामध्ये डिप्लोमा केला. त्यानंतर संस्थांमध्ये काम देखील केले. चेतन यांच्या आयुष्यात सर्वकाही ठीक सुरु होते. दुस-या तरुणांप्रमाणे नोकरी करून चेतन आणि त्यांचे कुटुंबीय खुश होते. असे असूनही चेतन यांची आवड सामाजिक कार्य करण्यात देखील राहिली, त्यामुळे त्यांनी सन २०००च्या अखेर ‘सत्या फाउंडेशन’ची स्थापना केली, ज्याच्या मार्फत प्राकृतिक जीवनशैली, संगीत, ध्यान आणि योग च्या माध्यमातून लोकांना मन:शांती देण्याचे काम सुरु केले. आयुष्य आपल्या गतीने चालते. ८फेब्रुवारी २००८ची गोष्ट आहे, चेतन यांच्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली. वडिलांची काळजी घेण्यासाठी चेतन देखील घरी आले. या दरम्यान दहा फेब्रुवारीच्या रात्री एक अशी गोष्ट झाली, ज्यामुळे चेतन यांचे आयुष्य नेहमीसाठी पालटले. त्या रात्री चेतन यांचे आजारी वडील झोपण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांच्या घराच्या बाजूला मोठ्या आवाजात लागलेल्या डीजेमुळे वडिलांना त्रास होत होता. अनेक प्रयत्न केल्यानंतर देखील चेतन यांचे वडील झोपू शकत नव्हते. वडिलांचा त्रास पाहून चेतन यांनी डीजे बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र वैवाहिक कार्यक्रमाचे निमित्त सांगून लोकांनी चेतन यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. थकल्यानंतर चेतन यांनी १००नंबर वर फोन केला, परंतु याचा देखील फायदा झाला नाही. अखेर चेतन यांनी एसपी सिटी यांना फोन करून तक्रार केली तेव्हा, डीजे बंद झाला. दुस-या दिवशी ही बाब वर्तमानपत्रातील बातमी बनली तेव्हा, लोकांनी एसपी सिटी यांच्या सोबतच चेतन यांचे देखील कौतुक केले. कुणीतरी चेतन यांना सांगीतले की, आमचे आई- वडील तुमचे आई-वडील नाहीत का? खरेतर ही संपूर्ण शहराची समस्या होती आणि लोकांना वाटत होते की, चेतन यांनी समस्येतून संपूर्ण शहराला मुक्त करावे. 

image


युवर स्टोरी सोबत संवाद साधताना चेतन सांगतात की,

“माझ्या आयुष्यात दहा फेब्रुवारीच्या त्या रात्रीची सकाळ अद्यापही झाली नाही. त्यानंतर मी निश्चय केला की, आता ध्वनीप्रदुषणाविरुद्ध आंदोलन करायचे आहे, जेणेकरून नंतर अन्य कुणाच्या घरी एखादे वृद्ध किंवा आजारी बैचेन होऊ नयेत. त्या दिवसानंतर पासून आजपर्यंत मी सलग आंदोलनाला मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे” 

image


ध्वनीप्रदुषणाविरुद्ध कसे उभे केले आंदोलन?

दहा फेब्रुवारीच्या त्या घटनेनंतर चेतन रस्त्यावर उतरले. चेतन यांनी पहिल्यापासूनच सक्रीय असलेली त्यांची संस्था ‘सत्या फाऊंडेशन’ च्या अंतर्गतच ध्वनीप्रदूषण विरोधी मोहीमव्दारे काही लोकांना आपल्या सोबत सामील केले. कागद घेऊन चेतन पायीच बनारसच्या रस्त्यांवर फिरले. ध्वनीप्रदूषण बाबत लोकांना जागरूक करत. त्यांच्या दुष्परिणामाबाबत लोकांना सांगत. त्याच्या संबंधित नियमांना समजवायचे. सुरुवातीच्या क्षणी चेतन यांनी २००पत्रक छापले. मात्र त्यांच्या उत्साहाला पाहून शहरातील काही डॉक्टर देखील सोबत उभे झाले आणि त्यांच्या कामात मदत करू लागले. चेतन सांगतात की,

“लोकांची साथ तर मिळत होती आणि पोलीस देखील अपेक्षित मदत करत होते, मात्र लोकांमध्ये कायदेशीर भीती निर्माण होत होती.”

आपल्या आंदोलनाला मजबूत रूप देण्यासाठी चेतन यांनी कायदेशीर मदत घेणे सुरु केले. ‘माहितीचा अधिकार’ कायद्याला आपल्या लढाईत हत्यार बनविले आणि ऑक्टोबर २००९मध्ये पोलीस विभागातून ही माहिती मागवली गेली की, ध्वनीप्रदुषणाविरुद्ध किती तक्रारींची नोंद करण्यात आली आहे, या सूचनेवर पोलीस विभागाकडून जे उत्तर मिळाले, ते खूपच आश्चर्यचकित करणारे होते. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध बनारसमध्ये एकही गुन्हा दाखला नव्हता. या उत्तरानंतर मिडियामध्ये बनारस पोलिस म्हणजे चेष्टेचा विषय झाला. आरटीआय कडून मिळालेली माहिती चेतन यांच्यासाठी आंशिक यश होते. 

image


युवर स्टोरी सोबत संवाद साधताना चेतन सांगतात की,

“ध्वनीप्रदुषणाच्या नियमांबाबत लोकांमध्ये माहितीची कमतरता होती. पोलीस देखील लोकांवर हात टाकण्यासाठी घाबरतात. मात्र, या घटनेनंतर पोलीस विभागात खूप परिवर्तन आले. ध्वनीप्रदुषणाबाबत जास्त न बोलणारे पोलीस आता सतर्क दिसायला लागले. तक्रार आल्यावर पोलीस त्यांना दुर्लक्ष करत नव्हते. पुढे येऊन त्यांनी कारवाई करणे सुरु केले. चेतन यांच्या प्रयत्नांचाच हा परिणाम होता की, २५नोव्हेंबर २००९ला पोलिसांनी ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन करणा-या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. बनारसच्या पोलीस विभागाच्या इतिहासात या प्रकारचा हा पहिला गुन्हा होता. असे असूनही त्यानंतर हे जलद गतीने वाढले."

image


आंदोलनाच्या रस्त्यात अनेक अडचणी

ध्वनीप्रदुषणा विरुद्ध चेतन यांची ही लढाई सहज सोपी नव्हती. धार्मिक आणि सांस्कृतिक शहर असल्यामुळे बनारसमध्ये कार्यक्रम होतच असतात. या कार्यक्रमांमध्ये लाउडस्पीकर लागणे सामान्य गोष्ट होती. ध्वनी प्रदुषणाच्या नावावर धार्मिक कार्यक्रमांमध्ये आडकाठी करण्याची हिम्मत पोलिसांमध्ये नव्हती. मात्र चेतन शांतपणे बसणारे नव्हते. त्यांनी पुढे येऊन या प्रकारच्या कार्यक्रमांचा विरोध केला. चेतन यांच्या प्रयत्नांमुळेच संकटमोचन मंदिरात होणा-या पाच दिवसीय कार्यक्रमात आता रात्री दहा वाजेनंतर बाहेरच्या भिंतीवर लागलेले लाउडस्पीकर बंद होऊन जातात. चेतन सांगतात की, अनेकदा त्यांना विरोधाचा देखील सामना करावा लागला. चेतन यांनी जेव्हा दुर्गापूजा मंडपात होणा-या ध्वनी प्रदुषणाचा मुद्दा उचलला, तेव्हा शहरातील एक भाजपाचे आमदार आंदोलनावर बसले. अनेक दिवसापर्यंत वाद सुरु होते. अखेर भाजप आमदाराला आपली चूक समजली आणि आज ते अभियानाचे प्रशंसक आहेत. अशाच प्रकारे बेनियाबाग मैदानात रात्रीचे मुशायरे आणि शहरातील मुस्लीम भागात रात्री चालणा-या लाउडस्पीकरचा विरोध केला, तेव्हा अनेक लोक विरोध करू लागले. मात्र अशावेळी मुफ्ती – ए – बनारस मौलाना अब्दुल बातीन नोमानी यांनी साथ दिली आणि सांगितले की, रात्री अखेरच्या नमाजानंतर वेळ झोपण्यासाठी असते. त्या दरम्यान कुठलीही खटर पटर किंवा लाउडस्पीकर वाजविणे, इस्लामधर्माविरुद्ध आहे. त्यांच्या एका अपीलमुळे खूप फरक पडला. 

image


डीजे आणि बँडवाल्यांची मिळाली साथ

आपल्या आंदोलनाला अजून धार देण्यासाठी चेतन यांनी डीजेवाल्यांना स्वतःसोबत सामील करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहित होते की, ध्वनीप्रदुषणाचा सर्वात मोठा धोका डीजेवालेच आहेत. सुरुवातीच्या पातळीवर खूपच कमी डीजेवाले त्यांच्यासोबत सामील झाले. वर्ष २०१०मध्ये चेतन यांनी आपल्या पातळीवर डीजेवाल्यांचे एक सम्मेलन करण्यासोबतच त्यांची एक युनियन देखील बनवली, जेणेकरून शहराच्या आत कुणीही स्वतःची मनमानी करू शकणार नाही. ध्वनी प्रदुषणाच्या या युद्धात चेतन यांच्यासोबत डीजेवाले देखील उभे दिसत आहेत. रात्री दहा वाजल्यानंतर डीजेवाले आपला लाउडस्पीकर स्वतःच बंद करून देतात आणि दिवसादेखील खूपच हळू आवाजात लावतात. केवळ डीजेवालेच नव्हे तर, बँडवाल्यांना देखील या अभियानात जोडले. चेतन सांगतात की, सलग २१दिवसापर्यंत ते शहराच्या कोप-या कोप-यात शोधत राहिले आणि या बैंडवाल्यांचे देखील एक मोठे सम्मेलन केले. बँडवाल्यांना रात्री १०वाजताच्या ध्वनीप्रदूषण कायदेशीरच्या बाजूने शपथ देऊ केली. परिणाम हा झाला की, आज बँडवाले त्यांच्यासोबत पावलावर पाउल ठेवून चालत आहेत. परिणाम इतका झाला की, जास्तीत जास्त बँडवाल्यांनी रात्री दहा वाजल्यानंतरची बुकिंग बंद केली.

शहरात दिसू लागले परिणाम

चेतन सांगतात की, त्यांच्या मोहिमेचा परिणाम आता दिसू लागला आहे. आठ वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर आता लोक ध्वनीप्रदुषणा बाबत चर्चा करत आहेत. चेतन यांच्यामते, काही वर्षापूर्वीपर्यंत त्यांच्याकडे फोन मार्फत ६०ते ७०तक्रारी येत होत्या, मात्र आता ही संख्या कमी होत आहे. जागरूकता इतकी वाढली की, रात्री दहा वाजताच लोक स्वतःच लाउडस्पीकर आणि डीजे बंद करू लागले आहेत. चेतन याला आपल्याहून अधिक जनतेची उपलब्धी मानतात. चेतन यांची संस्था ‘सत्या फाऊंडेशन’ चा बोर्ड लागला आहे, ज्यावर चेतन उपाध्याय यांचा नंबर दिलेला आहे. असे असूनही आपली ओळख लपवून तक्रार करणा-या लोकांसाठी देखील एक हेल्पलाईन नंबर ०९२१२७३५६२२ देण्यात आला आहे. ध्वनीप्रदूषणाच्या प्रकरणाबाबत पोलीस देखील चेतन यांचीच मदत घेतात. देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रात चेतन यांना ध्वनी प्रदुषणाच्या विविध गोष्टींवर आणि कायदेशीर तरतुदींवर व्याख्यान देण्यासाठी बोलविले जाते. शहरात कधीही ध्वनीप्रदूषण असो. बस एक रिंग करा, चेतन उपाध्याय पोलिसांच्या मदतीने दिवसादेखील ध्वनीला कमी करतात आणि रात्री १० वाजल्यानंतर बंद करतात. कधी कधी गरज पडल्यास आपल्या गटासोबत त्या ठिकाणावर देखील पोहोचतात. त्यांच्या प्रयत्नांचाच परिणाम आहे की, आजमितीस ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन करणारे जवळपास तीनशे लोकांविरुद्ध वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल आहे.

चेतन यांना पसंत करणारे काही लोकच नाही तर, त्यांच्या चाहत्यांच्या यादीत शहराचे खासदार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सामील आहेत.... मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये शहर प्रवासाच्या दरम्यान चेतन उपाध्याय यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. चेतन यांनी पीएम यांना देखील ध्वनीप्रदूषणाबाबत काही सल्ले दिले... चेतन यांच्या मते, त्यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रवासाच्या पहिले त्यांनी पीएम यांना शहराच्या आत हेलिकॉप्टर मधून न येण्याचे आणि खासदार विभागात रात्री आराम करण्याचा सल्ला दिला... ज्याचा परिणाम देखील पाहायला मिळाला आणि अखेरच्या क्षणात पीएम यांचे संशोधित प्रोटोकॉल आले... चेतन उपाध्याय यांच्या मेहनतीचाच परिणाम आहे की, पाच किलोवॅट जनरेटरच्या आवाजावर देखील वाराणसी पोलीस कारवाई करते...आणि एकटी वाराणसीची पोलीस आहे की, दिवसादेखील तक्रार आल्यावर लाउडस्पिकर कमी करतात... रात्री दहानंतर बंद करण्याचा नियम तर आहेच... अनेक पुरस्कारांनी सन्मानित चेतन उपाध्याय यांची संस्था “सत्य फाऊंडेशन” ने आज पर्यंत कुठलेही सरकारी अनुदान घेतले नाही आणि त्यांच्या संस्थेला देखील कुठलेही विदेशी धन मिळालेले नाही...

चेतन या लढाईला अजून वाढवू लागले... त्यांचा प्रयत्न हा आहे की, ध्वनीप्रदुषणाविरोधात जास्तीत जास्त लोकांना जागरूक केले जावे, जेणेकरून आम्ही आपल्या मुलांना एक स्वस्थ आयुष्य देऊ शकू... बनारस मध्ये उठलेला हा आवाज कौतुकास्पद आहे... गरज आहे की, चेतन यांच्या प्रयत्नांसोबत पूर्ण देश उभा राहण्याची... जेणेकरून ध्वनी प्रदुषणाला मुळासकट उखाडता येईल.

लेखक : आशुतोष सिंह

अनुवाद : किशोर आपटे

    Share on
    close