शब्द-चित्रांतून ओवाळते ती ‘आरती’ नद्यांची… माते… पूर ओसरू दे, तुझा उर भरून येऊ दे…

शब्द-चित्रांतून ओवाळते                                               ती ‘आरती’ नद्यांची… 
माते… पूर ओसरू दे, तुझा उर भरून येऊ दे…

Wednesday October 14, 2015,

5 min Read

‘‘मी स्वत:ला फोटोग्राफर वा लेखिका म्हणून कधी मानलेही नाही आणि मिरवलेही नाही.’’ एक दर्जेदार लेखिका आणि परफेक्ट फोटोग्राफर असलेली आरती कुमार राव जेव्हा असं म्हणते, तेव्हा त्यात काही गर्भित अर्थ असतोच. तो अर्थात त्या पुढे स्वत:च उलगडतात.

त्या म्हणतात, ‘‘…कारण मी फक्त हकिगत सांगते. अगदी खरीखुरी. सामान्य लोकांची हकिगत. लोकपरंपरांची हकिगत. परंपरांमध्ये काळाबरहुकूम आलेल्या परिवर्तनांची हकिगत.’’ मुख्य प्रवाहातील माध्यमे जिथे लक्ष घालत नाहीत, तिथे लक्ष घालण्यावर आरती यांचा मुख्य भर असतो. आरती यांच्या मते त्या जे काही करताहेत, ते शब्दांमध्ये बांधले जाऊ शकत नाही… आणि म्हणूनच त्यांच्या दिमतीला असतात छायाचित्रे, व्हिडिओ, मानचित्र अन् ग्राफिक्स.

image


विशिष्ट परिसरातले लोकजीवन नेमके लक्षात यावे म्हणून आरती थेट त्या-त्या लोकांमध्ये वर्षानुवर्षे राहायलाही मागे-पुढे पाहात नाहीत. या दरम्यान त्या शासकीय धोरणांमधले बदल तसेच जमिनीच्या वापरातील बदलांवरही लक्ष ठेवून असतात. चित्रांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे गोष्ट सांगण्याची कला आरती यांना अवगत आहे आणि या कलेत त्यांना कमालीचा रसही आहे.

आरती सांगतात, ‘‘फक्त चित्रांच्या माध्यमातून किवा फक्त शब्दांच्या माध्यमातून अशी गोष्ट मी सांगूच शकत नाही. दोघांच्या मिश्रणातूनच माझी गोष्ट फुलत जाते.’’

image


गेल्या दशकादरम्यान ‘इकोसिस्टिम’मध्ये (पर्यावरणीय परस्पर पूरक पद्धती) तसेच जगण्याच्या एकूणच पद्धतीत आणि साधनांत आलेल्या परिवर्तनांसंदर्भातले दस्तावेजही आरतीकडे आहेत. ‘रिव्हर डायरी’ (नद्यांची दैनंदिनी) हा त्यांचा ‘प्रोजेक्ट’ तर मैलाचा दगड सिद्ध झालाय. नद्यांच्या जवळपास राहणारे जनसमुदाय आणि ‘इकोसिस्टिम’वर त्यात बराच खल आरती यांनी केला आहे.

पदवीचे शिक्षण घेत असतानाच आरती यांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या विषयात मला लक्ष घालायचे आहे, असे ठरवलेले होते. सध्या चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमधील ल्हासा शहराचा दौराही त्यांनी यासाठी केला होता. चीन-तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रेला ‘येरलुंग त्संगपो’ या नावाने ओळखले जाते.

image


ब्रह्मपुत्रेत एके ठिकाणी एकाच खोऱ्यामध्ये १६० बांध घातलेले आहेत. प्रवाह इतका आणि असा अडवणारा असला तर नदीच्या लगतची जीवनरेखा बाधित होणारच. ‘इकोसिस्टिम’वर विपरित परिणाम होणारच. ब्रह्मपुत्रेला नेहमी येणारे पूर. होणारी हानी. हे सगळे एकुणात फारच गुंतागुंतीचे आहे. ब्रह्मपुत्रेची हीच गुंतागुंत आरती यांच्या डोक्यात थैमान घालायची.

image


आरती यांचे म्हणणे आहे, की त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना कुठल्याही बाबतीत कधी रोखले नाही, की टोकले नाही. इतरांपेक्षा वेगळी आणि नवीन गोष्टींची माहिती मिळव म्हणून ते आरती यांना नेहमी प्रोत्साहन देत. बरेचदा त्या वडील आणि बहिणीसमवेत चिमण्या बघायला म्हणून जात आणि मग चिमण्यांची चित्रे काढत.

‘कॅलीग्राफी’ आणि टेनिस खेळण्याचाही आरतीला नाद होता. अभ्यासात आरतीला इंग्रजी साहित्य आणि विज्ञान या विषयांची आवड होती. म्हणूनच तिने ‘बायोफिजिक्स’ (जैवभौतिक) या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पण लवकरच त्यांना आतून जाणवले, की आपण उभे आयुष्य प्रयोगशाळेत घालवू शकत नाही. मग त्यांनी पत्रकारिता निवडली.

image


जीवनाचे अध्याय मात्र नेहमी मनाप्रमाणेच लिहिले जातील, असे घडत नाही. लग्नानंतर आरती यांना अमेरिकेत जावे लागले. इथे ८ वर्षे त्यांनी ‘कॉर्पोरेट सेक्टर’मध्ये (उद्योग जगतात) सेवा बजावली. मायदेशी परतण्यापूर्वी तिथे अमेरिकेतही त्यांनी काही दिवस लिहिणे आणि फोटो टिपणे असे केलेच.

आरती म्हणतात, ‘‘आपल्या जिद्दीला वास्तवात आणणे हे कुठल्याही खडतर आव्हानाहून कमी नसते.’’

image


सुरवातीला सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. यातून मिळणारे पैसे आपल्या आवडीच्या कामावर खर्च केले. आवडीचे काम म्हणजे हेच फोटो काढणे अन् लिहिणे. अर्थात नियमित उत्पन्न यात नव्हतेच. मग त्यांनी आपले काम वाढवण्यासाठी म्हणून अनुदान आणि फेलोशिपसाठी लिहायला सुरवात केली. आरती यांच्या गुणवत्तेवर विश्वास असलेले अनेक लोक मग सहकार्यासाठी पुढे सरसावले.

पत्रकार म्हणून सांगितलेल्या प्रत्येक हकिगतीने पुढल्या वाटचालीसाठी आरती यांना प्रेरणा दिली. अनेक लोक त्यांना असे भेटले ज्यांनी त्यांच्यावर जुगार खेळला. (सोपवलेली जबाबदारी पार पाडतील, की नाही याबद्दल खात्री नसताना केवळ भरवसा ठेवून संधी दिली.) ‘सोसायटी’ मासिकाच्या सुमा वर्गिस यांनी त्यांना पहिल्यांदा वार्तांकनाची जबाबदारी सोपवली. लवकरच प्रेम पणीक्कर यांच्याशी आरती यांची ओळख झाली. आरती यांच्या मते प्रेम हे एक दूरदृष्टी असलेले संपादक आहेत. ‘रिव्हर डायरी’ लिहिण्यात त्यांची आरतीना मोठी मदत झाली. कितीतरी मौलिक सूचना प्रेम यांनी केल्या.

image


आपल्या कामादरम्यान आरती यांना अनेक असे अनुभव आले, ज्यांनी त्यांना अक्षरश: आतून हलवून सोडले. एकदा त्या ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किनाऱ्यावर होत्या. जमीन प्रचंड प्रमाणावर धसलेली होती. इथे त्यांची एका ६० वर्षांच्या गृहस्थाशी भेट झाली. गृहस्थाचा दूध विक्रीचा धंदा होता. पुढल्यावेळी जेव्हा येशील तेव्हा जेवायला माझ्या घरी ये म्हणून त्याने आरतीला सांगितले. आपला मोबाइल नंबरही दिला. तो गेल्यानंतर आरती यांना कळले, की भूस्खलनाने त्याची सगळी शेतीवाडी, गुरेढोरे, जमीन असे सगळेच नामशेष झालेले होते. मोठा जिगरबाज होता हा गृहस्थ. एवढे आभाळ फाटलेले असताना जमतील तितकी ठिगळे जोडून त्याने पूर्ववत जगणे सुरू केलेले होते.

image


आरती आणखी एक दाखला देतात. मोहम्मद इनामुल हक नावाच्या एका गृहस्थाचा. पश्चिम बंगालमधील गंगेच्या खोऱ्यातला तो रहिवासी. नेहमी-नेहमी गंगेचा प्रवाह बदलत असल्याने सात वेळा त्याचे घर उजाड झालेले होते. मोठ्या धीराने तो सरकारचे औदासिन्य आणि अभियंत्यांच्या चुकांचे फळ स्वत: भोगत होता. आरतीने हक यांना जेव्हा विचारले, या सगळ्या गोष्टींचा राग नाही येत का तुम्हाला? त्यावर तोंड पुसत आणि हसतहसत त्याने एक बशी उचलली. आरतीला उत्तर दिले. म्हणाला, ‘‘कुणी कुठवर ही बशी हातात धरून ठेवायची. आता कुणी या बशीत काहीही घालू शकतो. बशी टंच भरल्यावर शेवटी खाली सांडायलाच लागेल ना. असेच माझ्या रागाचेही झालेले आहे. खूप वाढला की गळून पडतो. माझे वय आता ६० आहे. आणि ७ वेळा डोक्यावरचे छत गळून पडलेले आहे. पुढे कितीवेळा असे होणार आहे, हे मी सांगू शकत नाही.’’ इतकी संकटे कोसळूनही हक एवढ्यावर खुश होता, की सध्या त्याच्याकडे अंग टाकायला का होईना जागा आहे ना!

image


सुंदरबन परिसरातील संकटांचे सगळे पाढे पाठ असलेल्या मोजक्या पत्रकारांपैकी आरती या एक आहेत.

अनेकदा त्यांनी या परिसराबद्दल सविस्तर लिखाण केलेले आहे. महिला पर्यटकांसाठी भारत ही सुरक्षित जागा नाही, असे काहीजण म्हणतात. आरतीचे मात्र याबाबत दुमत आहे. त्या म्हणतात, आसाम असो वा राजस्थान आणि आणखी कुठेही, देशाच्या कुठलाही कोपरा त्यांना घाबरा-घाबरा जाणवला नाही. उलट सगळीकडचे स्थानिक रहिवासी तुमच्या मदतीला तत्पर असतात. आरती सध्या बेंगळुरूच्या इतिहासावर काम करताहेत. एकेकाळी प्रत्येक बाबतीत समृद्ध असलेला हा परिसर ४० वर्षांपासून दुष्काळाचा सामना का करतोय, हे त्या सांगू इच्छिताहेत.

सध्या त्या बेंगळुरूत असल्या आणि इथे कामही जोमाने सुरू असले तरी सुंदरबनचा भाग आणि ब्रह्मपुत्रा नदी त्यांना खुणावते आहेच. सुंदरबनवर आणि ब्रह्मपुत्रेवर स्वत:ला ओवाळून टाकायला आरती अधीर आहेत…