योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णयच आपल्या आयुष्याचा पाया मजबूत करतात, केवळ रूढी परंपरा म्हणून मनाविरुध्द निर्णय घेणे चुकीचे

योग्य वेळी घेतलेले योग्य  निर्णयच आपल्या आयुष्याचा पाया मजबूत करतात, केवळ रूढी परंपरा म्हणून मनाविरुध्द निर्णय घेणे चुकीचे

Friday April 01, 2016,

7 min Read

आपले व्यक्तिगत वा सामाजिक जीवन समृद्ध करण्यासाठी आपणच जबाबदार असतो. आपण घेतलेले निर्णयच अनेक चांगल्या-वाईट गोष्टीना कारणीभूत ठरतात. काही निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असतात कारण योग्य निर्णयच आपल्या आयुष्याचा पाया मजबूत करतात. तसेच सामाजिक बांधिलकीचे जीवन जगत असताना समाज परिवर्तनाच्या कार्याच्या निर्णयाने समाजात कुठे तरी खोलवर प्रभावित करून त्यांना प्रेरीत करतात. अनेकदा आपण स्वतःच्या चुकीच्या निर्णयावर पश्चाताप करून दुसऱ्यांना दोषी ठरवून त्याला सामाजिक किंवा पारिवारिक आवरण चढवून निर्णय घेण्यास आपण जबाबदार नसल्याचे जाहीर करतो. ब-याचवेळा लोकांना आपल्या आयुष्यातील मोठी चूक ही जोडीदाराची योग्य निवड न झाल्यामुळे वाटते तसेच योग्य वेळी योग्य नोकरी किंवा क्षेत्र न निवडल्याची खंत ही आयुष्यभर वाटते.

आमचा दलित समुदाय. आई-वडिल दोघेही पाचवी पास. वडील जेव्हा आईला बघायला त्यांच्या गावी गेले तेव्हा आईने अट घातली की लग्नानंतर मी मुलांना खूप शिकवेल. तेव्हा वडिलांनी आईच्या शब्दाला मान देऊन सांगितले की कमावणे हे माझे काम व मुलांना शिकवणे तुमचे काम. अर्धशिक्षित आई-वडिल आमच्या शिक्षणासाठी नेहमीच संघर्षशील असायचे. आई अनेकवेळा सांगायची की जोपर्यंत आमची स्वतःची मुले नव्हती तोपर्यंत वडील गल्लीतील मुलांना शिकवायचे.

image


वडील खूप मेहनती होते व आई निपुण होती. फावल्या वेळात शेजारी पाजारी जावून बसण्यापेक्षा ती घरातील काम करणे पसंत करायची. क्रोशीयापासून उशांचे अभ्रे, चादरी, टेबलावरचे रुमाल, हिवाळ्यातील स्वेटर, मोजे इ. मन लावून करायची. आमच्या तिघींमध्ये आईच्या कलागुणांचा एक अंश सुद्धा आला नाही. वडील एक साधारण टेलर होते. वडिलांनी बऱ्याचवेळा पैसे जोडून तसेच आईचे दागिने विकून गारमेंटची फॅक्टरी उघडली पण ते त्यांत अपयशी ठरले. वडिलांच्या या अपयशाने आईची कौटुंबिक जबाबदारी वाढत गेली. आईने आमच्या सगळ्यांबरोबर कागदाचे लिफाफे बनवायला सुरवात केली त्यासाठी आई दिवस रात्र मेहनत करायची. लहानपणापासून मी अभ्यासात तशी साधारण होती पण घरातील गोष्टी मला चांगल्या प्रकारे समजायच्या. जेव्हा मी तिसरीत होते तेव्हा माझी आई मानसिक रूपाने असवस्थ झाली याचे कारण तिच्यावर शारीरिक मेहनतीबरोबरच मानसिक दबाव असेल. आजारपणामुळे तिला नियमित दिल्लीच्या शाहदरा मनोरुग्णालयात विजेचे झटके देण्यासाठी न्यावे लागायचे. या आजारपणामुळे ती नेहमीच काहीतरी काल्पनिक गोष्टींमध्ये रमायची. अनेकवेळा ती म्हणायची पक्षी माझ्याशी बोलतात ‘’उठ सकाळ झाली’’. माझ्या आठवणीत मी वडिलांना कधीच आईवर ओरडतांना बघितले नाही. त्यांनी नेहमीच आईच्या कलागुणांना वाव देऊन स्वतः भाग्यवान असल्याचे सांगितले तसेच आम्हाला पण आईचा आदर करायला शिकवले. आईच्या आजारपणाचा एकपट खर्च, तर आमच्या भावंडांच्या अभ्यासाचा दुसरा खर्च म्हणून वडील माया एक्सपोर्ट नामक फॅक्टरी मध्ये दिवस रात्र मेहनत करू लागले. लहान वयातच माझ्या आई-वडिलांची इमानदारी, मेहनत, संघर्षपूर्ण जीवन व धाडसी व्यक्तीत्वाने माझ्या मनात नेहमीच इमानदारी, सचोटीने जगण्याची अद्यम्य इच्छा निर्माण झाली.

image


घरातील आर्थिक परिस्थितीचा दबाव व संघर्ष वाढत असतांना माझ्या मोठ्या भावाचे मनोहरचे शिक्षण अर्धवटच राहिले पण त्यांनी हार न मानता एका फॅक्टरीमध्ये काम करून साहित्यिक पुस्तक वाचून आम्हाला सुद्धा वाचनासाठी प्रेरित केले. मनोहरच्याच प्रयत्नाने घरातील सदस्यांचे सामाजिक जीवनाशी बांधिलकी वाढू लागली. घरात दलित-गैरदलित कार्यकर्त्यांचे येणे जाणे वाढू लागले. त्यांचे मित्र आमच्याकडे बाल नजरेनेच बघायचे पण त्यांच्यामध्ये होणारी उत्स्फूर्त चर्चा सहजपणे आमच्या बाल बुद्धीवर खोल परिणाम करीत होती. म्हणूनच मला पण आपले जीवन सामाजिक कार्यकर्त्याच्या रुपात जगण्याची इच्छा निर्माण झाली.

image


आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही सामजिक जीवन व्यतीत करून समाजासाठी काही कार्य करू इच्छिता, तर तुमच्याद्वारे खात्रीने घेतलेले निर्णय तुमचे आयुष्य व विचारधारेला मजबूती प्रदान करण्याचे कार्य करतील. माझा हा वैयक्तिक अनुभव आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही एकदाच होत असते असे म्हणून आपण नात्यांमध्ये भावनिकरित्या गुंतत जातो. अनेक वेळा आपण समाजासमोर हार पत्करतो हेच कारण आहे की समाजातील रूढी-परंपरा कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहे. आपण आपल्या जीवनात व्यक्तिगत व सार्वजनिक क्षेत्रात याला स्पष्टपणे नाकारू शकत नाही, हुंड्याचा विरोध, साधारण पद्धतीने लग्न, सप्तपदी-मंगळसूत्र, कन्यादान सारख्या स्त्रीला गुलाम बनवणाऱ्या परंपरांना खंड पाडण्याऐवजी त्याचे समर्थन केले जाते. माझ्या एका मित्राला लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने सांगितले की मी माझी सगळी हौस मौज पूर्ण करणार आहे कारण लग्न हे आयुष्यात एकदाच होते. कधी हौस पूर्ण करण्यासाठी तर कधी परंपरेचा आदर, तर कधी कर्तव्य पालनाच्या नावाखाली बरेच काही घडत असते. परिस्थिती अशी झाली आहे परंपरा तोडण्यासाठी किंवा बदलण्यासाठी क्रांतिकारी किंवा एकांगी पद्धतीने लग्न सोहळा पार पडत आहे. आमचे सामजिक कार्यकर्ते सुद्धा याप्रकारच्या लग्नामध्ये रुची दाखवत नाही. याचे एकमात्र कारण आपल्या मनामध्ये व समाजात ठाण मांडलेली पितृसत्ता आहे काय? खरे तर हो, आपल्या मनात ती एवढ्या खोलवर रुजलेली आहे आपण तिच्यातून बाहेर निघण्याऐवजी त्या षड्यंत्रात जास्त फसत चाललो आहे.

आजच्या आधुनिक काळात सुद्धा आपण स्वतःला पुढारलेले समजत असलो तरी आपल्या डोक्यात परंपरागत पती-पत्नीच्या कल्पनेने घर बनवले आहे. हेच एक कारण आहे की प्रेमविवाह करून सुद्धा सामाजिक तसेच राजकीय जीवनाशी जोडून काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची शक्ती घटस्फोटात व गृह कलह सहन करण्यात संपून जाते. जेव्हा दोन सज्ञान सामजिक कार्यकर्ता परस्परांशी लग्नबंधनाचा विचार करतात तेव्हा त्या दोघांनी आपल्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टींचा विचार केला पाहिजे. अशातच दोन लोकांमध्ये पैसा,पद,जात व सामाजिक तसेच आर्थिक प्रतिष्ठा विवाहाचे आधार ठरू शकतात काय? जर हा प्रश्न मला विचाराल तर माझे उत्तर नेहमीच नकारार्थी असेल, पण सद्यपरिस्थितीत आपल्या सुखी-संपन्न भविष्याचा विचार करून अनेक स्त्रिया आपल्या होणाऱ्या जोडीदाराचा उच्च प्रभावशाली रहाणीमान व त्याचा मजबूत आर्थिक आधार या गोष्टी लक्षात घेतात, पण अशा व्यक्ती व मित्र नेहमीच नजरअंदाज होतात ज्यांची आर्थिक बाजू भक्कम नसली तरी ते एक चांगले जोडीदार बनून त्यांच्याकडून मान-सन्मानाची अपेक्षा सुद्धा केली जावू शकते. पण त्याच्या विरुध्द पुरुष एका आदर्श स्त्रीची पत्नी म्हणून कामना करत असतात जी घरातील अनुशासन, रिती-रिवाज, स्वयंपाक करण्यापासून ते शय्यासोबत आनंदाने करून शकतील आणि असे गुण आई-वडिलांद्वारे पसंत केलेल्या मुलींमध्ये सहज उपलब्ध होतात, पण नंतर विचार व मन न जुळल्यामुळे पस्तावतात व आई-वडिलांना दोषी मानतात.

प्रत्येक कुटुंबाचे आपले वेगळे राजकारण असते. कुटुंबात प्रमुख म्हणून पुरुषाचे काम हे ठरलेले असतात. पुरुषाने कमावणे व मुल मोठे झाल्यावर त्यांचे भविष्य सांभाळणे तसेच स्त्रियांनी घरकाम करून मुलींवर चांगले संस्कार करणे. पुरुषाच्या कोणत्याही निर्णयावर प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही अशामुळे आपोआपच पितृसत्ता पिढीदर पिढी भक्कम होत गेली आहे. सामान्यतः युवा अवस्थेत असणारे आपले भावंड मुलींना पटवण्यासाठी दिवसभरातून अनेकवेळा कपडे घरभर फेकतात ते कपडे उचलून बहिण आपल्या पालकांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न करते, पण पालक हसून अनेकवेळा मुलींना समजावतात की तो पुरुष आहे व तो हे असेच वागणार. अशाप्रकारे हे अधिकार मुलांना वडिलोपार्जित मिळालेले असतात. तसेच मुलींना घरकाम करून सेवा करण्याचे बाळकडू पाजून तिला सामान्य अधिकारापासून लांबच ठेवले जाते आणि तेच जर मुलींनी ब्राम्हणवादी पितृसत्तेच्या मापदंडाला डावलले तर तिला ‘हाता बाहेर गेली’ असे संबोधले जाते. भार उतरवण्यासाठी अशा मुलीचे लग्न नालायक, अशिक्षित, दुराचारी अशा कोणत्याही तरुणाबरोबर न पारखून केले जाते.

image


मी समाजात होणाऱ्या स्त्रियांच्या विसंगतीला बघूनच मोठी झाली आहे त्यांच्यावरील अन्यायानेच माझी वैचारिक क्षमता विकसित झाली आहे. मी दिल्ली विद्यापीठात दलित विद्यार्थी संघटन मुक्तीमध्ये काम करत असतांना अनेक विचारधारांच्या लोकांच्या संपर्कात आली आहे. त्यांच्या बरोबरीच्या कामाने मला जाणवले की मुली या संघटनेचा भाग असूनही त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते त्यामुळे त्यांच्या संघटनेच्या विविध आंदोलनामध्ये संख्या रोडावत चालली आहे. शिक्षण संपल्यानंतर का आपले जीवन एक गृहिणी म्हणून किंवा संघटनेतील एखाद्या कार्यकर्त्याबरोबर लग्न करून निष्क्रिय बनवतात? माझ्या बरोबर विद्यार्थी संघटनेत काम करणाऱ्या मुली या लग्नानंतर पूर्णपणे निष्क्रिय का आहेत?

कालांतराने माझ्या विचारांनी व सहकार्यांनी मला सामजिक कार्य करण्यास प्रेरित केले व त्यामुळेच मी माझ्या भावी नवऱ्याकडून हेच गुण असण्याची अपेक्षा केली. मी एक गृहिणी म्हणून नाहीतर नोकरी करून समाजकार्य करण्यास प्राध्यान्य दिले व एका अल्लारिपू नावाच्या नाटक कंपनीत नोकरी करत असल्यामुळे व वैचारिक स्वातंत्र्यामुळे आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी नाहीतर सामाजिक कार्यकर्त्याशी लग्न करू इच्छित होते. माझी अपेक्षा भावी जोडीदारकडून माझ्या विचारांची व भावनाची कदर करणारा तसेच तो विश्वासू व अहंकार मुक्त असून मला व माझ्या कार्याला सहाय्य करणारा असला पाहिजे अशी होती. माझ्याकडून आंतरजातीय विवाहाचा निर्णय घेतल्यामुळे वडील नक्कीच काळजीत पडले. कारण मी उच्च जातीतील मुलाशी लग्नाचा निर्णय घेतला ज्यांनी आमच्या समाजातील लोकांना नेहमीच हिणवले, त्यामुळे वडिलांचे चिंतीत होणे स्वाभाविकच होते. कारण अशा कुटुंबाकडून जर मला जातीच्या नावाखाली शिव्या दिल्या तर ते मला सहन होईल का? त्यांच्या मतानुसार समाज अजूनही पुढारलेला नाही. माझे सासरे जे सरकारी नोकरीत उच्च पदावर कार्यरत होते त्यांचा या लग्नाला कडाडून विरोध होता म्हणून माझ्या वडिलांची भीती ही रास्त होती. त्यामुळे माझ्या मनातही ही धारणा बसली की लग्नानंतर सगळे काही व्यवस्थित झाले तर ठीक नाहीतर परिस्थिती मान्य करायची. म्हणजे मनातल्या मनात मी माझ्या लग्नाच्या अपयशाची मानसिक तयारी केली होती पण मला राजीव बरोबर राहून कळले की तो एक सच्चा सामजिक कार्यकर्ता आहे. त्याने मला पदोपदी सहकार्य करून खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळेच कुटुंबात आम्हाला एक मानाचे स्थान मिळाले. एवढ्या वर्षात त्याने मला घरातील कोणत्याही कामाचा आग्रह केला नाही किंवा दबाव टाकला नाही. तेच आमच्या मित्र परिवारात आम्ही बघत आलो की ते सामजिक कार्यकर्ते असून सुद्धा परंपरा रूढी मध्ये अडकून पडले आहे. मला राजीवने कधीच हे जाणवू दिले नाही की मी एक दलित कुटुंबातून आली आहे व माझी अस्मिता ही केवळ एक दलित स्त्रीची आहे. आम्ही एकमेकांबरोबर राहून बरेच काही शिकलो.

लेखिका : अनिता भारती

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close