हजारो स्त्रियांना ब्रेकनंतर करिअरची नव्याने सुरुवात करण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ सौंदर्या राजेश

हजारो स्त्रियांना ब्रेकनंतर करिअरची नव्याने सुरुवात करण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ सौंदर्या राजेश

Thursday March 24, 2016,

5 min Read

डॉ सौंदर्या राजेश लग्नानंतर, गरोदरपणानंतर किंवा स्थलांतरामुळे १० वर्षांपेक्षाही अधिक काळ करिअरमध्ये ब्रेक घेतलेल्या महिलांना करिअरच्या संधी मिळवून देण्याची मोहिम राबवित आहेत. २०१६ सालच्या १०० वुमन अचिव्हर्समध्ये त्यांची निवड करण्यात आली असून भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि केंद्रिय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांच्याहस्ते यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांचा सत्कार करण्यात आला.


image


‘अवतार करिअर क्रिएशन्स’ आणि ‘दि अवतार I-विन नेटवर्क’च्या (ब्रेकनंतर कामावर परतणाऱ्या स्त्रियांसाठी) संस्थापिका असलेल्या ४७ वर्षांच्या सौंदर्या यांनी त्यांच्या दोन दशकांच्या करिअरमध्ये खूप प्रशंसा आणि पुरस्कार मिळविले आहेत. पण त्यांच्या हृदयात एका साध्या कार्डला खूप मोठी जागा आहे. त्या सांगतात, “२००८मध्ये, एका ११ वर्षाच्या मुलाने मला स्वतः बनवलेलं एक कार्ड पाठवलं. त्याने त्याच्या आईला आठ वर्षानंतर पुन्हा नोकरी मिळवून दिल्याबद्दल माझे आभार मानले होते. मला आतापर्यंत मिळालेला तो सर्वोत्तम पुरस्कार आहे !”

जरी गेल्या ३० वर्षात संघटीत श्रमिक वर्ग असलेल्या विविध क्षेत्रांमध्ये स्त्री कामगारांच्या सहभागात अभूतपूर्व बदल झालेला असला, तरी एकूण संख्येच्या दृष्टीने स्त्री कामगारांचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. १९९० ते २०१०च्या दरम्यान जवळपास आठ टक्क्याने हे प्रमाण घटले आहे. स्त्री-पुरुष समानता आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते ही वस्तूस्थिती सामाजिक संशोधकांद्वारे यापूर्वीच सिद्ध झालेली आहे. दि वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचा ग्लोबल जेण्डर गॅप रिपोर्ट स्त्री कामगारांची मोठी संख्या आणि दरडोई जीडीपी दर यामध्ये सकारात्मक संबंध दर्शवतो.

याविषयी भारताबाबत बोलायचं झालं तर, पुढच्या ४० वर्षांमध्ये, नोकरी-व्यवसाय करु शकणाऱ्या वयातील प्रौढांची संख्या भारतात ४२४ दशलक्ष होईल असा अंदाज आहे. २०१५ मध्ये मॅककिन्झी ग्लोबल इन्स्टीट्यूटने केलेल्या अभ्यासानुसार, जर २०२५ पर्यंत भारतातील स्त्री कामगारांची संख्या १० टक्क्याने वाढली (आणखी 68 दशलक्ष स्त्रीया) तर भारताच्या जीडीपीमध्ये १६ टक्क्याने वाढ होईल. याचाच अर्थ भारताच्या जीडीपीमध्ये जवळपास ४६ लाख करोड (७०० अब्ज डॉलर) रुपयांची भर पडेल. त्याचबरोबर जेव्हा स्त्रियांना कुटुंब किंवा करिअर यापैकी एकाची निवड करण्याशिवाय वाव रहाणार नाही तेव्हा देशाने स्त्रियांच्या शिक्षणामध्ये केलेली गुंतवणूकही वाया जाईल.


image


सौंदर्या यांनी २००० साली ‘अवतार करिअर क्रिएटर्स’ नावाने एक रिक्रूटमेंट कन्सल्टींग फर्म सुरु केली आणि २००५ मध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म ‘अवतार I-विन’ सुरु केला. विशेषतः स्त्रीयांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पुनःप्रवेश मिळवून देण्यासाठी उभारलेली अशा प्रकारची ही पहिली सिस्टीम होती. समुपदेशन सत्र, करिअर-प्रवेश कार्यक्रम, कौशल्य निर्माण आणि नेटवर्किंग सत्र, दुसऱ्यांदाचे करिअर तसेच सुरुवातीच्या करिअरसाठी नोकर भरती कार्यक्रम त्यांच्याद्वारे आयोजित केले जातात. ७५ कर्मचाऱ्यांसह सुरु असलेल्या ‘अवतार I- विन’ने ८००० स्त्रियांना करिअरमधील ब्रेकनंतर पुन्हा कामाची सुरुवात करण्यास मदत केली आहे.

जेव्हा सौंदर्या यांनी २००५मध्ये स्त्रियांच्या सेकंड करिअरबाबतची त्यांची संकल्पना कशी चांगली आहे हे लोकांना पटवून द्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना करिअरमध्ये ब्रेक घेतलेल्या स्त्रियांचे अर्ज नाकारणाऱ्या कंपन्यांच्या व्यवस्थापकांना, तसेच रिक्रूटमेंट एजन्सीजना तोंड द्यावे लागले. “ते लोक या स्त्रियांना नोकरी देण्याचा विचारच करु शकत नव्हते. ते मला विचारायचे की मी त्यांना सिरीयस रेझ्युमे का पाठवत नाही,” त्या सांगतात.

सौंदर्या यांनी ठरविले की या समस्येला वेगळ्या पद्धतीने हाताळायचे. त्यांनी कंपन्यांना समजवायला सुरुवात केली की ज्या स्त्रियांनी ब्रेक घेतला होता त्या नोकरी देण्यासाठी योग्य होत्या. लवकरच ज्या कंपन्यांना कौशल्यनिपुण कर्मचाऱ्यांची गरज होती, त्यांनी कामावर परतू इच्छिणाऱ्या स्त्रियांना कामामध्ये व्यस्त करुन सौंदर्या यांचे म्हणणे पडताळून पहायचे ठरवले. सर्वप्रथम नोंद झालेला भारतीय इण्डस्ट्रीमधील सेकंड करिअर प्रोग्रॅम जुलै २००६ ला सौंदर्या यांच्या व्यवस्थापनाखाली पार पडला. या पहिल्याच वेळी जवळपास ४०० स्त्रियांनी आपल्या कार्यक्षेत्रात पुनःप्रवेश केला. सौंदर्यांनी लिंग समावेशन योजना विकसित करण्याविषयी संस्थांना समुपदेशन करायला सुरुवात केली. जर संस्थांनी स्त्रियांच्या करिअरमध्ये गुंतवणूक केली तर त्यांच्या आर्थिक मोबदल्यात कशी वाढ होईल हे सौंदर्या यांनी संशोधन आणि विश्लेषणाच्या आधारे लक्षात आणून दिले.

करिअरमध्ये ब्रेक घेतलेल्या स्त्रियांना पुन्हा काम देण्याचे फायदे आणि महत्त्व याबाबत बोलण्यासाठी आज सौंदर्या बराच प्रवास करुन विविध परिषदांमध्ये आणि मंचांवर जातात. ‘दि अवतार I- विन नेटवर्क’मध्ये सहभागी असलेल्या कामावर जाणाऱ्या स्त्रियांची संख्या आज ४०००० पर्यंत वाढली आहे आणि आज अवतार वुमन प्रोफेशनल्सबरोबरच लिंग समावेशक प्रतिभा धोरणाद्वारे मिळणारा लाभ उपभोगू इच्छिणाऱ्या संस्थांसाठीही डेस्टीनेशन ठरले आहे. अनेक संस्थांनी स्त्रियांना ब्रेकनंतर कठीण जबाबदाऱ्या देण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्तान लिव्हर, ऍक्सिस बँक, गोदरेज, गोल्डमन सॅक्स, फिडेलिटी, एचसीएल, फिलीप्स आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी त्यांचे विशेष सेकंड करिअर प्रोग्रॅमही सुरु केले आहेत.

चैन्नई कन्टेनर टर्मिनलचे खाजगीकरण हा १५ वर्षांपूर्वी अवतारने हाती घेतलेला सर्वात पहिला कार्यक्रम. फोक लिफ्ट ऑपरेटरच्या जागेसाठी पुरुषांऐवजी अवतार त्यांना स्त्री इन्जिनिअर्सचे प्रोफाईल देत होते. याविषयी एक्सपॅट इन्चार्ज खूश नव्हते. सौंदर्या सांगतात की एक स्त्री इन्जिनिअर मुलाखतीसाठी गेली, तिने खूप चांगलं परफॉर्म केलं, जमिनीपासून २५ फूटावर असलेल्या एका छोटाश्या केबिनमध्ये बसून तिने उत्तमरित्या फोक लिफ्ट ऑपरेट केली आणि जॉब मिळवला.


image


सौंदर्या त्यांच्या पुद्दुचेरीमध्ये घालवलेल्या लहानपणीच्या आठवणींकडे ओढल्या जातात. जिथे टेलिव्हिजन आणि स्मार्टफोनशिवायच्या जगात त्या त्यांची आवडती पुस्तकं वाचण्यात वेळ घालवायच्या आणि आंबराईमध्ये असलेल्या त्यांच्या शाळेत सायकलवरुन जायच्या. त्यांना मोठं झाल्यावर इंग्रजी शिकवायचं होतं.

१९८८ मध्ये मद्रास युनिव्हर्सिटीमधून इंग्रजी साहित्यामध्ये गोल्ड मेडल मिळविलेल्या सौंदर्या एमबीए करत असताना त्यांची ओळख त्यांच्याचबरोबर शिकत असलेल्या राजेश यांच्याशी झाली. पुढे या दोघांनी लग्न केलं. त्यांना आज दोन मुलं आहेत. सौंदर्या यांनी पहिल्या मुलाच्या जन्मानंतर सिटी बँकेतील नोकरी सोडली. गरोदरपणातील ब्रेकनंतर पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी प्रयत्न करताना त्यांना आलेल्या अनुभवातूनच त्यांना त्यांच्या आजच्या कामासाठी प्रेरणा मिळाली.

सौंदर्या सांगतात, “९० च्या दशकात स्त्रीला आपल्या आकांक्षा मुलं किंवा करिअर यांच्यापर्यंत मर्यादीत ठेवाव्या लागायच्या, दोन्ही गोष्टी सांभाळणं कठीण होतं.” त्यांची मुलं लहान असल्यामुळे त्यांनी दोन्ही गोष्टी सांभाळता येतील आणि त्यांचे कौशल्य वापरण्याचीही संधी मिळेल असं काम शोधण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि सर्व गोष्टींचा विचार करता त्यांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी चैन्नईमधील स्त्रीयांसाठीच्या एमओपी वैष्णव कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून शिकवायला सुरुवात केली आणि तिथे त्यांना त्यांच्या विद्यार्थीनींमुळे पहिल्यांदा भारतीय स्त्रीयांमधील गुणवत्ता समजू शकली. त्याचबरोबर २००५ मध्ये जेव्हा सौंदर्या चीवनिंग स्कॉलरशिप मिळवून युकेला गेल्या तेव्हा तिथे त्यांनी केवळ पार्ट-टाईम किंवा प्रोजेक्टवर आधारित काम करणाऱ्या अनेक प्रोफेशनल्सशी (पुरुष आणि स्त्री) संवाद साधला. त्या एका इन्जिनिअरला भेटल्या, जे शहरात रहायचे आणि एक तुलिप गार्डन सांभाळायचे. त्याचबरोबर एका वेब टेक्नोलॉजीस्टलाही भेटल्या जे शेक्सपिअरच्या थिएटर ग्रुपमध्ये सहभागी होते.

“दोन भागात सुंदर विभागणी केलेल्या त्यांच्या कामाने मला खरोखर प्रेरित केले. मी विचार केला की भारतीय स्त्रियांच्या घर-संसार सांभाळण्याच्या गरजेसाठी त्यांना आपण सहाय्य केले आणि त्याचबरोबर त्यांची प्रतिभा आणि कौशल्यही वाया जाऊ न दिले तर?” आज, सौंदर्या यांना तो विचार एका संस्थेच्या रुपात प्रत्यक्षात उतरवून हजारो स्त्रियांना मदत केल्याचे समाधान आहे.

या सारख्या आणखी काही यशस्वी महिला उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

एका विरामानंतर नव्याने कारकीर्दीस सुरुवात करणाऱ्या महिलांना मदत करण्याचे लक्ष्य... 

महिला नेतृत्वाचे प्रतिक - ग्लोबललॉजिकच्या ए.नंदिनी

प्रवाहाविरुध्द पोहण्याची जिद्द देऊन घडविले शेकडो उद्यमी, पहिल्या महिला ब्रँन्ड गुरु ‘जान्हवी राऊळ’ यांच्या यशाची कहाणी!

लेखक : शरीका नायर

अनुवाद : अनुज्ञा निकम