शेतक-यांना डिजिटल क्षेत्राशी जोडतोय एक शेतकरी, ब्लॉगर आणि उद्योजक

शेतक-यांना डिजिटल क्षेत्राशी जोडतोय एक शेतकरी, ब्लॉगर आणि उद्योजक

Thursday October 13, 2016,

4 min Read

लोक अनेकदा कामाच्या शोधात गावातून शहराकडे जातात,परंतू बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यातील एका गावात राहणारे गिरिद्रनाथ झा यांनी याचा परिपाठ बदलण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे बारा वर्षे दिल्ली, कानपूर, सारख्या मोठ्या शहरात राहिल्यानंतर गिरिंद्रनाथ झा केवळ आपल्या गावी परत आले नाहीत तर तेथे राहून ग्रामपर्यटनाला चालना देत आहेत. इतकेच नाहीतर शेतीचे नवे नवे प्रयोग करून पर्यावरणाचे संवर्धन देखील करत आहेत. महत्वाचे म्हणजे ते एक प्रसिध्द ब्लॉगरसुध्दा आहेत त्यामुळे त्यांना भेटायला अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशातून लोक येतात.

गिरिंद्र यांचे शालेय शिक्षण पुर्णिया जिल्ह्यातच झाले पण पदवीसाठी त्यांनी दिल्लीच्या दिशेने वाटचाल केली. दिल्ली विद्यापिठाच्या सत्यव्रती महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी मिळवणा-या गिरिंद्र यांना इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयांची आवड आहे. ते मानतात की, कोणाही माणसाला आपला इतिहास ज्ञात असायला हवा. आणि जगण्यासाठी प्रत्येक पावलावर अर्थशास्त्र आवश्यक असते.” सन २००६ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यांनतर सेंटर फॉर दी स्टडी ऑफ डेवलपिंग सोसायटी म्हणजे सीएसडीएस मधून त्यांनी फेलोशिप पूर्ण केली. त्यांनतर त्यांनी तीन वर्षे दिल्लीत राहून पत्रकारिता केली आणि सन २००९मध्ये जेंव्हा त्यांचे लग्न झाले तेंव्हा ते कानपूरला गेले. तेथे त्यांनी एका मोठ्या वृत्तपत्रात पत्रकारिता सुरू केली. पण गिरिंद्रनाथ यांनी मनात निश्चय केला होता की एक दिवस त्यांना गावी परत जायचे आहे. त्या दरम्यान त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यांना गावी यावे लागले. त्यावेळी त्यांना जाणवले की गावी राहून ते सारे करू शकतात जे शहरातून करता येते. अशाप्रकारे ते सन २०१२मध्ये पूर्णियाला परतले.

image


पूर्णिया शहारापासून २५किमी दूर त्यांचे गाव चनका आहे. जेथे आज त्यांनी आपले विचार प्रत्यक्षात साकारले आहेत. आज गिरिंद्रनाथ शेतकरी, ब्लॉगर आणि उद्योजक या भूमिका सहज निभावतात. त्यांचे म्हणणे आहे की आता बिहार तसा राहिला नाही जसा लोक समजतात. गिरिंद्र यांचे म्हणणे आहे की, गावी येऊन त्यांनी शेतीवर लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी दुबार शेती सुरू केली. सर्वात आधी त्यांनी तांदुळ मका आणि बटाटा यांची शेती सुरू केली. त्याचबरोबर कदंबाच्या झाडांची लागवड केली. या झाडांपासून प्लायवुड तयार करतात. अशा प्रकारे त्यांच्याजवळ इतर पिकांबरोबरच उत्पन्नाचे नवे सधान तयार व्हायाला लागले. या शिवाय कदंबाची जी पाने शेतात पडतात त्यांचे खत होते. त्यांची ही कल्पना आजुबाजूच्या लोकांनाही भावली. त्यामुळे इतर शेतकरीसुध्दा दुहेरी शेती करू लागले. इतकेच नाही त्यांनी सेंद्रीय शेतीवरही जोर देण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी आजुबाजूच्या गावातील शेतक-यांना केवळ जागरूक केले नाही तर त्यांना प्रशिक्षणही देत आहेत की, सेंद्रीय शेती कशी केली जाते. आता गिरिंद्र यांचा प्रयत्न आहे शेतक-यांना डिजीटल दुनियेशी जोडण्याचा, त्यामुळे ते आपल्या जमिनीतून जास्तीचे उत्पन्न घेऊ शकतात. गिरिंद्र यांचे म्हणणे आहे की, “ आम्ही लोक शेतक-यांच्या शेतीमधून नवीन पध्दती शिकण्यासाठी युट्यूब आणि इतर डिजीटल माध्यामांचा वापर करतो”. गिरिंद्र म्हणतात की, “ मला माहिती आहे की समुह संपर्क माध्यमे हे मोठे आयुध आहे, कारण आपण याच्या माध्यमातून बरेच काही करू शकतो.” हीच गोष्ट लक्षात ठेवून त्यांनी मागील वर्षी डिंसेंबर महिन्यात गावात समूहसंपर्क माध्यमांचे संमेलन आयोजित केले होते. आणि येत्या डिसेबंर महिन्यात पुन्हा असे संमेलन करण्याची त्यांची योजना आहे. या संमेलनात समुह संपर्क माध्यमाशी जोडलेल्या बाजुच्या गावातील व्यक्ती भाग घेतात. आणि एकमेकांशी नवीन कल्पनांवर चर्चा करतात.

गिरिंद्र देशातच नाहीतर जगभरातील लोकांशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांचे काम समजून घेण्यास, गावाची संस्कृती जाणून घेण्यास आणि शांततेच्या शोधात लोक देशाच्या अनेक राज्यातून तसेच ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतूनही त्यांना भेटायला चक्क गावात येतात. त्यांचे म्हणणे आहे की मागच्या दोन वर्षात ११७लोक त्यांच्या गावात भेटायला आले. यावेळी त्यांच्या गावी आलेल्या बाहेरच्या पाहुण्यांना केवळ त्यांचे गाव पहायला दिले जात नाहीतर तेथील राहणीमान खानपान यांचा अनुभव दिला जातो. याशिवाय लोक गावात येणारे बदल आणि आदिवासी लोकांच्या कला पाहतात आणि छायाचित्रणाचा आनंदही घेतात.

image


गिरिंद्र यांची खरी ओळख एक ब्लॉगर अशी आहे. ते सन २००६पासून नियमितपणे अनुभव या नावाने नियमित ब्लॉग लिहितात. त्यात ते केवळ गावाच्या बाबतीत चर्चा करतात. गावात नवे काय आहे याची माहिती देतात. सोबतच छोट्या मोठ्या निवडणुकांकडे शेतक-याच्या नजरेतून पहात आपली मते व्यक्त करतात. त्यांच्या या छान छान ब्लॉगमुळे काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकार आणि एका राष्ट्रीय हिंदी वाहिनीवर त्यांचा सर्वश्रेष्ठ हिंदी ब्लॉगर म्हणून सन्मानही केला आहे. त्यांनी लिहिलेल्या ब्लॉगला कशाप्रकारे लोकप्रियता मिळते याचा अंदाज त्यांच्या काही ब्लॉगला १५हजार फॉलोअर मिळाल्याचे दिसल्यावर येतोच. लोकांना याबाबतीत जिज्ञासा असते की, त्यांचा नवा ब्लॉग कोणत्या विषयावर येणार आहे. अनेकजण नियमितपणे त्यांना मेलही पाठवितात. इतकेच माही तर त्यांचे काही ब्लॉग मोठ्या हिंदी वृत्तपत्रात प्रसिध्दही होतात. गिरिंद्र म्हणतात की, “ब्लॉगने मला नवी ओळख दिली आहे. मी सतत लिहित असतो” आता लवकरच त्यांनी लिहिलेले एक पुस्तकही बाजारात येऊ घातले आहे. जे लघु प्रेमकथेवर आधारित आहे.

गिरिंद्रनाथ यांचे म्हणणे आहे की, ‘समुह संपर्क माध्यमे हे खूप मोठे व्यासपीठ आहे. ज्यातून खूप काही मिळू शकते.मात्र त्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. त्याच्या वापरासाठी असे काही नियमही नाहीत की तुम्हाला दिल्ली किंवा अशा कोणत्याही शहरातच राहिले पाहिजे. मी तर महानगरापासून काही शे मैल दूर आहे पण मी ते सारे करत आहे जे तेथे राहून करु शकत होतो. जर तुम्हाला काही वेगळे करायचे असेल तर कुठेही राहून करता येते. बस तुमच्याजवळ इंटरनेट असायला हवे आणि लोकांच्या संपर्कात राहायला हवे.”

ब्लॉग : http://www.anubhaw.blogspot.in/

लेखक : हरीश बिश्त

    Share on
    close